मिटसॉगच्या १४ व १५ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ
पुणे, १८ मे : “ अध्ययन आणि विश्लेषण या दोन तत्वांच्या जोरावर सदैव प्रगतीपथाची पायरी चढता येते. देश व समाज ही प्राथमिकता ओळखून कार्य केल्यास येणार्या काळात राजकारणात खूप मोठे बदल दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे धोरण देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे. राजकारणाच्या प्रचंड अभ्यासामुळेच ते एक यशस्वी नेता बनले आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक, महामार्ग आणि नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री जनरल डॉ व्ही. के. सिंग (रिटायर्ड) यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या मास्टर्स प्रोग्रॅम इन गव्हर्नमेंटच्या १४ व १५ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपति होते. खासदार गजानन कीर्तिकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्युपीयूचे कार्यध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. परिमल माया सुधाकर, परिक्षा विभागाचे प्रमुख गणेश पोकळे, डॉ. जयश्री कंभमपति व विदिशा गजानन किर्तीकर उपस्थित होते. तसेच, धिरज सिंग, डॉ. शालिनी शर्मा व डॉ. सौरभ चतुर्वेदी उपस्थित होते.
डॉ. व्ही. के. सिंग म्हणाले, “आर्मीमध्ये ज्या पद्धतीने जाती भेदाला थारा दिला जात नाही, सेवा हाच सर्वात मोठा धर्म असतो आणि एकता या तीन गुणांच्या जोरावर देशात आर्मीवर सर्वांचा विश्वास आहे. हेच तत्व राजकारणात वापरल्यास देश बदलेल. या क्षेत्रात लक्ष निर्धारित करून सकारात्मक भावनेने कार्य करावे. राजकारणात वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी असून संपत्ती कमविण्याच्या जाळ्यात फसू नये. समाज आणि देशाची आर्थिक स्थिती ओळखून सदैव कार्य करावे.”
डॉ. हरि बाबू कंभमपति म्हणाले,“ कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. एमआयटी शिक्षण संस्थेने सर्व विद्याशाखा उघडून ती गरज पूर्ण करीत आहे. त्यातच राजकारणाचे प्रशिक्षण देणारी संस्था देशाचे भविष्य बदलेल. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी राजकारणी मंडळींना प्रशिक्षण देणारी संस्था उघडली जावी. राजकारणात ३५ वर्षाखालील ३२ नवे खासदार निवडून येणे हे चांगले संकेत आहेत. युवकांसाठी इंटर पार्लमेंट यूथ म्हणजेच आयपीयू सुरू केले आहे.”
गजानन किर्तीकर म्हणाले,“ जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला शिक्षित नेते मिळाले तर कायापालट होईल. नेत्यांचा पीए प्रशिक्षित असून तो मिटसॉगच्या तुकडीचा विद्यार्थी असला तर उत्तम कार्य होईल. मिटसॉगचा विद्यार्थी गौरव कळंबकर च्या जोरावर मी राजकारणात बरेच कार्य करीत आहे. प्रशिक्षित राजकारणाच्या जोरावर देशातील बर्याच समस्या संपविता येतील.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ धर्म हे कर्तव्याची जाणीव करून देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माता पिता, समाज आणि देशाप्रतिचे कर्तव्य समजून घ्यावे. नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपले कर्तव्य कधीही विसरता कामा नये. विश्वशांती निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या सर्वात मोठा डोम ही आध्यात्माची प्रयोगशाळा आहे. जीवनात सर्व गोष्टींचे संतुलन ठेवावे.”
प्रा. राहुल वि. कराड म्हणाले,“ देशाचे भविष्य बदलण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. राजकारणात सुशिक्षित तरूण आले तर देश प्रगतीपथावर जाईल. या उद्देशाने मिटसॉगची स्थापना झाली. वर्तमानकाळात वसाहतवादी मानसिकता बदलण्याची वेळ आली असून भारतीय संस्कृतीची मुळ धारणा स्विकारावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण अनिवार्यपणे करावे. मिटसॉगच्या मंचावरून भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय महिला संसद, नॅशनल टिचर्स कॉग्रेससारखे कार्यक्रम राबवून देशात नवी चळवळ उभी करण्यात येत आहे.” यावेळी मान्यवरांच्या हस्ते १४ व १५व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या बॅचमध्ये उत्तम कमगिरी करीत सुवर्ण पदक मिळविणारे संदीप बी, सार्थक साऊजी, मुथुरासन, स्नेहल देसाई, ज्युडा जेबा कुमार आणि प्रविण कुमार झा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एकुण ३८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी वैभव नलगुंडवार, संभल झा व जयंती या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. गिरीसन यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा. परिमल माया सुधाकर यांनी १४ व १५ व्या तुकडीच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.
सूत्रसंचालन डॉ. अनुराधा पै यांनी केले. गणेश पोकळे यांनी आभार मानले.