पुणे ता.१२ (प्रतिनिधी): देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून गरीब कल्याणासाठी मिळणारा पैसा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण पोहचत नव्हता. मात्र नरेंद्र मोदिजींच्या सरकारने तंत्रज्ञाच्या मदतीने हा भ्रष्टाचार संपवला. असे मत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान तथा कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकराला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, माजी महापौर दत्ता गायकवाड, प्रभाग १२ च्या अध्यक्षा उमा गाडगीळ, पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, दिपक पोटे, राजेश येनपुरे, सनी निम्हण, रेखा चौंधे, गणेश घोष, निहाल घोडके, आनंद छाजेड, अनिल भिसे, वसंत जुनवणे, बाळासाहेब रानवडे, नितीन बहिरट, गणेश नाईकरे, सचिन वाडेकर, सुप्रीम चौंधे, अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रास्ताविकामध्ये सुनील माने म्हणाले, मोदींच्या कार्याची माहिती देण्यासाठी राजीवजी चंद्र्शेखर दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राजीव हे बीपीएल मोबाईलचे संस्थापक होते. मोदी सरकार आठ वर्षांपासून शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. केंद्र सरकारकडून गोरगरीबांच्या कल्याणासाठी वितरीत होणारा पैसा जसाच्या तसा त्यांच्या पर्यंत पोहचेल याची काळाजी केंद्र सरकार घेत आहे. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याबद्दल ते आग्रही असतात. या मध्ये राजीवजी यांच्या मंत्रालयाची भूमिका महत्वपूर्ण असते.
यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही या भ्रष्टाचाराची अनेकवेळा कबुली दिली होती. ते नेहमी म्हणत केंद्र सरकारकडून जर एखाद्या योजनेसाठी एक रुपया देण्यात आला तर प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसेच पोहचतात. म्हणूनच चीनसारखा देश लोकशाही हे लोकांच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे असे म्हणतो. कॉंग्रेसने त्यांच्या ६५ वर्षांच्या कालखंडात हे खरे करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. २०१४ नंतर मात्र मोदिजीनी पंतप्रधान होताच ही व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांनी ‘ट्रान्स्फोर्मिग इंडिया’ ही संकल्पना आणली.
गरीब कल्याणासाठी येणारा पैसा जसाच्या तसा लाभार्थ्यांपर्यत पोहचावा यासाठी त्यांनी प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघडायला लावले. यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला लाभ होत आहे. २०१४ नंतर भ्रष्टाचार संपावा यासाठी प्रधानमंत्री किसान योजना, डिजिटल रुपया, यूपीआय, आयुष्मान भारत सारख्या अनेक योजनांची घोषणा गेल्या ८ वर्षात केंद्र सरकारने केली. गेल्या आठ वर्षात अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण होऊन याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्याला आता दिसत आहेत. सरकारी यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञाचा वापर होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहेत. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे येत्या काही वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन भारत जागतिक पातळीवर प्रगत देश म्हणून ओळखला जाईल.