महापालिका आयुक्तांच्या स्वागताचा उत्साही विक्रमाने भरले भक्तीरंग…
पुणे: श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे बुधवारी लाखो वैष्णवांसह पुण्यात आगमन झाले. आळंदीतील अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुपारी दीड वाजता कळस (नगर रस्ता) मध्ये पोहचली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांची पालखीही दुपारी पावणे दोन वाजता बोपोडीतील हॅरिस पूलाजवळ पोहचली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, सहआयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.
या दोन्ही पालखी रात्री उशिरा मुक्कामाच्या ठिकाणी विसावल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी सुमारे एक तास तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुमारे दोन तासांच्या विलंबानंतर पुणे येथील आपापल्या विसाव्याच्या ठिकाणी पोचली.
संत तुकाराम महाराजांची पालखी रात्री ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुण्यातील टिळक चौकात (अलका टॉकीज चौक), तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रात्री ९ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास टिळक चौकात पोचली. या चौकातून लक्ष्मी रस्त्याने या पालख्या आपापल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाले. भाविकांची अलोट गर्दी, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात या पालख्या मार्गस्थ होत होत्या. पुणेकरांनी ठिकठिकाणी विशेषतः चौका-चौकांत या पालख्यांचे स्वागत केले.
तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावरील तुळशीवृंदावन आकाशाकडे झेप घेतल्याचे दिसून येत होते. टाळ-मृदंग भजनाने वारकरी तल्लीन होऊन, हारी नामाचा गजर करीत होते. पालखीच्या स्वागतासाठी रस्ते स्वच्छ करून जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्त्यांनी जणू वारकऱ्यांच्या सेवेचा ध्यासच घेतला होता. ठीक – ठिकाणी अन्नदान , पाणी वाटप करण्यात आघाडीवर होते. वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य सेवक मनापासून झटत होते. भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती शोभून दिसत होती. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी पालख्या व वारकऱ्यां सोबत फोटो काढण्यात मग्न होते.
पालिकेच्या ११ शाळा पिण्याच्या पाण्यासाठी अकरा टँकर, स्वच्छतेसाठी शंभर अधिकारी आणि ६०० कर्मचारी २४ बाय ७ कार्यरत झाले आहेत. २५० पोर्टेबल टॉयलेट, वीजपुरवठा, पंचेचाळीस अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, औषध फवारणी, तसेच २४ तास दवाखान्यांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर कार्यरत झाले आहेत. कोविड-१९ लस आणि मास्क वाटपाबरोबर स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा असा संदेशही दिला जात आहे.
निवडुंगा विठोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत येणाऱ्या तीन हजार वारकरी व दिंडी व्यवस्थापन, पोलीस सहकारी यांना अन्नदानाचे व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळा झाला नव्हता. परंतु त्याआधीच्या वर्षापर्यंत या दोन्ही पालख्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास टिळक चौकातून आपापल्या विसाव्याच्या ठिकाणांकडे मार्गस्थ होत असत. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन रात्र मुक्काम असणार आहे. या पालख्या येत्या शुक्रवारी पहाटे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.