पुणे – शिवाजीनगर कोर्टातून अपहरण केलेल्या वकिलाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पुणे पोलिसांनी ३ संशयितांना अटक केली. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दृश्यम चित्रपटाच्या कथेनुसार हा खून झाला असल्याचे समजते.मोरे याचा मृतदेह ताम्हिणी घाटात नेहून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर कोर्टाने त्या तिघांना आज ४ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
उमेश चंद्रशेखर मोरे रा. (गुरुदत्त अपार्टमेंट, पवार हॉस्पिटल शेजारी, बालाजीनगर, धनकवडी) हे दि. 1 ऑक्टोबरपासून कोर्टातून बेपत्ता झाले होते.त्यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची तक्रार उमेश चा भाऊ प्रशांत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परंतु आता बेपत्ता झालेले ॲड. उमेश मोरे यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी कपिल विलास फलके (वय ३४, रा.चिखली) , दीपक शिवाजी वांडेकर (वय २८ ,रा,सालेवडगाव,ता,आष्टी, जि. बीड) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२,रा. संतनगर मार्केटयार्ड) या तिघांना अटक केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी उमेश मुळे यांचा शोध घेण्यासाठी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. यावेळी उमेश मोरे हे बेपत्ता झाल्याचा दिवशी त्यांच्या आसपास संशयास्पदरित्या दोन व्यक्ती दिसत होत्या. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र पथकही तयार करून तांत्रिक बाजूने तपास केला जात होता.
उमेश मोरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील ते फिर्यादी होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूमिअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. 1 ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्रांनाही ते भेटले. त्यानंतर पत्नीशी फोनवर बोलल्यानंतर घरी येतो असे त्यांनी सांगितले. परंतु रात्री नऊ वाजल्यानंतर ही ते परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.