पुणे-महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरु केली होती. यामुळे भिडे वाड्याला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा प्राप्त झाला आहे. म्हणूनच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी फुलेवाडा ते भिडेवाडा मशाल मोर्चा काढण्यात आला.
या महामशाल मोर्चामध्ये महात्मा फुले वसतिगृह कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले- पाटील, महामशाल मोर्चाचे मुख्य समन्वयक कल्याण जाधव, रघुनाथ ढोक तसेच युवा माळी संघाच्या महिला अध्यक्षा आणि ओबीसी महासभेच्या महिला अध्यक्षा सुनीता भगत, युवा माळी संघाच्या चिटणीस वृषाली शिंदे, अमर हजारे, छाया भगत, सतीश गायकवाड, अरुण हरकळ, देवरा जाळे आदी मान्यवरांसह फुले विचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलतानामाजी आमदार कमलताई ढोले- पाटील म्हणाल्या की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ साली भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा, म्हणजे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही ‘सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती’च्या वतीने मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण आंदोलन आणि उपोषण करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. मात्र, शासकीय पातळीवर या मागण्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने यासाठी भरघोस तरतूद करून भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक घोषित करून ते जतन करावे, अशी आमची मागणी आहे.