रचनाकाराने स्मार्ट, कल्पक असायला हवे -अभिजित धोंडफळे
स्मार्ट सिटी संकल्पनेवर ‘सूर्यदत्ता’तर्फे ‘ऑरा २०१९’ प्रदर्शन
पुणे : “विद्यार्थ्यांमध्ये खूप काही करण्याची ऊर्जा असते. त्याला महाविद्यालयीन स्तरावर वाव दिला पाहिजे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. सगळीकडे ‘स्मार्ट’ असण्याची चर्चा असताना ‘स्मार्ट’ विद्यार्थी घडविणेही तितकेच महत्वाचे आहे. भवताल समजून घेत नव्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असते. सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहणे हेच चांगल्या विद्यार्थ्यांचे आणि रचनाकाराचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे केवळ शैक्षणिक पदवी महत्वाची नाही, तर त्यासाठी कौशल्य, प्रमाण व कल्पकता असायला हवी,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केले.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे आयोजित ‘ऑरा २०१९’ या अंतर्गत सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनवेळी धोंडफळे बोलत होते. प्रसंगी सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, रचनाकार महेश बांगड, अभिनव महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पराग नारखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य अजित शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. टाकाऊ वस्तूंपासून या सगळ्या गोष्टी साकारण्यात आल्या आहेत, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी सदाशिव पेठेत असलेल्या ‘पीआयएटी’ संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन ३० डिसेंबर २०१९ पर्यंत सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. प्रदर्शनाचे हे सतरावे वर्ष असून, यंदा ‘स्मार्टसिटी’ ही या प्रदर्शनाची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठीच्या वस्तू, स्मार्ट सिटीतील जीवनशैली, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्लास्टिकमुक्त परिसर, सुंदर शहर, हरित शहर, ऊर्जेचे पर्याय, आपत्ती व्यवस्थापन, मेट्रो, फ्लाईंग कार अशा विविध गोष्टी शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चिथारल्या आहेत. प्रदर्शनाच्या आयोजनात शिक्षकांमधून पल्लवी पुरंदरे, ऋतुजा माने, अनिकेत नाईकरे व अमित जगदाळे यांच्यासह दीपक कोळी याच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली.
डॉ. सुषमा चोरडिया म्हणाल्या, “मुलांनी भरविलेले हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. अतिशय छोट्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टी आखीवरेखीव पद्धतीने उभारल्या आहेत.” डॉ.पराग नारखेडे, महेश बांगड, अजित शिंदे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले.