लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, “प्रत्येकाचे विचार भिन्न असू शकतात. विचारभिन्नता नव्हे, तर विचारशून्यता ही समस्या आहे. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी साहित्य, महाराष्ट्राचे मराठीपण किती मोठे आहे, हे महाराष्ट्राबाहेर गेल्यावर कळते. सामाजिक जागृती करण्याचे काम साहित्य करीत असते. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे सर्व खोटे आहे. जीवन आनंदाने जगण्यासाठी विचारांची प्रेरणा लागते. विचारांतूनच व्यक्तिमत्त्व परिपक्व आणि भारदस्त होते. भारतीय समाजाला अशी परिपक्वता, प्रगल्भता साहित्यानेच दिलेली आहे. जाती-धर्म याचा विचार न करता बंधुता व्यासपीठ विचारांचे भांडार बनले आहे.”
लोकशिक्षण, लोकप्रबोधन, लोकसंस्कार देणारे साहित्य संमेलने हवेत -लक्ष्मणराव ढोबळे
पुणे : “साहित्य संमेलनात सर्व प्रकारचे साहित्य समाविष्ट होत असल्याने त्यातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार होत असतात. मानवी मन त्यातून घडत जाते. त्यामुळे साहित्य संमेलने व्हायला हवीत. बंधुतेसारख्या महत्वाच्या विषयावर साहित्य संमेलनातून विचारमंथन होत आहे. जाती-धर्माला जोडणारा हा बंधुतेचा विचार प्रत्येकाच्या मनात पेरण्याची आवश्यकता आहे,” असे मत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आयोजिलेल्या एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या समारोप्रसंगी ढोबळे बोलत होते. यावेळी जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर बंधुता परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते हाजी अफझलभाई, प्रकाश जवळकर आणि मधुश्री ओव्हाळ यांना ‘बंधुता जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रुपये पाच हजार असे या सन्मानाचे स्वरूप होते.
प्रसंगी साहित्यिका डॉ. आश्विनी धोंगडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संयोजक प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, सहसंयोजक महेंद्र भारती, प्राचार्य रामचंद्र जगताप, कवी चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुरके, पत्रकार शिवाजीराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची प्रकट मुलाखत शंकर आथरे यांनी घेतली. गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
प्रकाश रोकडे म्हणाले, “मागासवर्गीय असल्याने जातीचे आणि आर्थिक चटके मनाला सहन करावे लागले. पण संघर्ष हा जिवनाचे सामर्थ्य निर्माण करतो. आयुष्यातच्या प्रत्येक टप्प्यावर मला पत्नीची बहुमोल साथ मिळत गेली. शिवाय, वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक जोडत गेलो आणि बंधुतेचा सेतु निर्माण झाला. चांगल्या विचारांची माणसे जोडली की, आयुष्यात नेहमीच चांगली कामे होतात. धर्मनिरपेक्षतेसाठी बंधुता हा एकमेव धर्म आहे. त्यातूनच देशाची अखंडता टिकेल.”
सुत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले तर अशोक शिंदे यांनी आभार व्यक्त केले.