शेतकरी, वाहतुकीच्या समस्येवर ‘एआय’चा उपाय- डॉ. श्रीनिवास पद्मानभुनी यांचे मत
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा अविष्कार आहे. ‘एआय’ आणि मशीन लर्निंगचा वापर करून शेतकऱ्यांच्या समस्या, वाहतुकीचे प्रश्न सोडविणे शक्य आहे. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देऊन त्यासाठी कोणती तंत्रे आणि अल्गोरिदम वापरायचे याचे ज्ञान अवगत केले पाहिजे. शिक्षकांनी हे नवतंत्रज्ञान आत्मसात करून समाजाच्या, देशाच्या समोरील समस्यांचे निराकारण कसे करता येईल, याचा विचार करायला हवा,” असे प्रतिपादन ताराह टेक्नॉलॉजीजचे प्रमुख डॉ. श्रीनिवास पद्मनाभूनी यांनी केले.
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग आणि आरपीजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग’ यावर दोन दिवसीय ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. पद्मनाभुनी बोलत होते. प्रसंगी एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे प्रमुख अमोल निटवे, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विजय मेमाणे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. निलेश उके म्हणाले, “सद्यस्थिती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) खूप महत्वाची आहे. ती यंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालींद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रियेची नक्कल आहे. ‘एआय’ आणि ‘एमएल’च्या मदतीने वास्तविक जगाच्या समस्या सोडवू शकतो, हा विश्वास मिळत आहे. याविषयी अधिक माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.”
डॉ. श्रीनिवास पद्मनाभूनी यांनी ‘एआय’ आणि ‘एमएल’च्या मूलभूत संकल्पनांविषयी मार्गदर्शन करतानाच समस्या सोडविताना या तंत्रज्ञानाचा व्यावहारिक वापर कसा होतो, याविषयी माहिती दिली. अमोल निटवे यांनी रोजगार कौशल्य विकास कार्यक्रम आणि शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापकांच्या क्षमता विकसनाचे महत्व विशद केले. विजय मेमाने यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.