पुणे : भारतात फार मोठी माणसे होऊन गेली. मात्र एवढ्या मोठ्या देशभक्तांमध्ये जेवढा अपमान सावरकर यांचा
केला तो आतापर्यंत कोणाचाच झाला नसेल. यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती.काँग्रेसला पण आहे अन् ती दहशत वाढली पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.डीईएसच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर या सावरकरांच्या साहित्यावरील नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोंक्षे बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. अभिनेते योगेश सोमण, शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, मुख्याध्यापिका लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोंक्षे म्हणाले, सावरकर प्रेमींचा एक प्रॉब्लेम असा की कोणी विरोधात बोललं तरी त्याला उत्तर देण्याची ताकद आणि शब्द नसतात. सध्या उत्तर देणारे कमी आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत. ते जाणीवपूर्वक करतात याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर याचं मोठेपण मान्य करणे म्हणजे त्यांना राजकीय तोटा वाटतो. कितीही सागितले तरी ते ऐकणार नाहीत. आताच्या कार्यक्रमाला राजकीय व्यक्ती आला नाही तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सावरकरांवर मनापासून प्रेम करणारी माणसे हवीत.
महाराष्ट्र शासनाला शाळांमध्ये हे कार्यक्रम घ्यायला लावू
सावरकर अभिवाचन कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे. मंत्रिमंडळ स्थापन झाले की माझे खूप जवळचे स्नेही आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. सावरकरांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील शाळेत कार्यक्रम झाले पाहिजे. दोन बस घेऊन प्रयोग झाले पाहिजेत. इथं असणारे सगळे सावरकर प्रेमी आहोत. जिथं अनेक शाळेत सावरकर फोटो लावला जात नाही आणि धडा शिकवला जात नाही. महाराष्ट्र शासनाला शाळांमध्ये हे कार्यक्रम घ्यायला लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोमण म्हणाले, सावरकरांच्या विचारात राष्ट्राचा ध्यास आणि ध्येय होते. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आता प्रत्येकाने सावरकर होण्याची आवश्यकता आहे.
कुंटे म्हणाले, सुजाण आणि संस्कारक्षम पीढी घडविण्यासाठी डीर्इएसच्या वतीने सातत्याने देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
जय देव जय देव जय शिवराया, जयोस्तुते, ने मजसी ने परत मातृभूमीला अशा प्रसिद्ध आणि अप्रचलित गाण्यांनी देशभक्तीच्या वातावरणाची निर्मिती झाली. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, वंदे मातरम् या गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाच्या नाट्य प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शाळेतील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.