१०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर
पुणे : टाळ मृदूंगाचा गजर आणि वारकऱ्यांनी विठुनामाचा केलेला जयघोष अशा भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांनी पुणे मेट्रोची सफर केली. पांडुरंग पांडुरंगच्या जयघोषाने निनादलेला हा भक्तीचा सोहळा पुणेकरांनी मेट्रोमध्ये देखील अनुभविला.
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने १०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करीत मेट्रोची सफर केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,अखिल कर्वे रोड गणेशोत्सव मंडळाचे चित्रसेन खिलारे, सारथी ग्रुपचे पराग ओझा, राजेश राठोड, निलेश लाटे, भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, पुणे मेट्रोचे अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे, राजेश जैन, विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, सरचिटणीस वरूण जकातदार, उपाध्यक्ष समीर हळंदे, अभिजीत मोडक, खजिनदार गुणेश साने, रमेश गिरमकर उपस्थित होते.
सुनील पांडे म्हणाले, पुण्यात विसाव्यासाठी पालखी थांबलेली असते. यावेळी खेडोपाड्यातून असंख्य वारकरी पुण्यात येतात. त्यांना पुणे मेट्रोची सफर घडवावी, आणि नवीन पुण्याची ओळख करुन द्यावी या उद्देशाने या मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० पेक्षा अधिक वारकऱ्यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ पर्यंत मेट्रो प्रवास केला.