पुणे- काेथरुड भागातील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्याक्षासह संचालकांनी पावणेदहा काेटी रुपयांची फसवणूक करत ठेवीदारांना गंडावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणी पतसंस्थेच्या संचालकांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार यांना अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.
याबाबत अपर विशेष लेखापरीक्षक जे,एस. गायकवाड यांनी काेथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दिपक निकम, नियंत्रक अभिजीत भाेसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व सतर सहा संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संचालकांवर एमपीआयडी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2015 ते 31 मार्च 2020 यादरम्यान घडलेला आहे.
लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिलेले हाेते. त्यानुसार पतसंस्थेच्या कारभाराचे 2015 ते 2020 यादरम्यानच्या काळातील लेखापरीक्षण करण्यात आले. कालावधीत पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरिता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा दुरुपयाेग करुन घेतला. त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करुन या अपहारामुळे पतसंस्था अडचणीत येणार असून ही गाेष्ट निंबधक कार्यालयास कळवणे गरजेचे हाेते. परंतु तशाप्रकारे कल्पना न देता तसेच नियंत्रक वैशाली पवार व अभिजीत भाेसले यांनी संगनमताने बाेगस कर्ज नावे टाकून अपहार करण्यात आला आहे.
खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज आकारुन अपहार करणे, बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करुन अपहार करणे, दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन नऊ काेटी 74 लाख 40 हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे लेखा परीक्षणातून समाेर आले आहे. त्यानुसार याप्रकरणाची दखल घेत आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून याप्रकरणी पतसंस्थेच्या चेअरमनसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.