‘जीविधा’ च्या हिरवाई तपपूर्ती महोत्सवात व्याख्यान
पुणे :
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’संस्थेच्या ‘हिरवाई तपपूर्ती महोत्सव’ मध्ये शनीवार, ११ जून रोजी वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉ विनया घाटे यांनी ‘ पुण्याची बदलती हिरवाई’ या विषयावर व्याख्यान दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. विनया घाटे म्हणाल्या, ‘ पुण्यात मुख्यवस्ती बाहेर शेती, वाडया आणि जंगल होते. सारसबागेत आतापेक्षा मोठे तळे होते.पर्वतीवर देवचाफा, तुळशीबागेत मुचकुंद, खुन्या मुरलीधर मंदिरात बकुळ, मधुकामिनी या वनस्पति पाहायला होत्या , काही अजुनही आहेत.
ब्रिटिशांनी शिस्तबद्ध अभ्यासाची सवय लावली. वनस्पतीशास्त्राला त्याचा लाभ झाला. त्यांच्या उपयोगाच्या का होईना, अनेक वनस्पती ब्रिटिशांनी लावल्या.
ब्रिटिशांच्या काळात पुढे एम्प्रेस गार्डन, दापोडी बाग, विद्यापीठ, अशा हिरवाईच्या जागा तयार झाल्या. पेशवे पार्क, संभाजी पार्क त्यानंतर हिरवाईची ठिकाणं तयार झाली. कृषी महाविद्यालय, पुणे विद्यापीठ येथे रस्त्याकडेला मोठी झाडे लावून अॅव्हेन्यू तयार करण्यात आले.
पुण्यात सपुष्प वनस्पतींच्या सोळाशेहून अधिक प्रजाती आहेत. पुण्यातील टेकड्या या आधी गायराने होती.३० हून गवताचे प्रकार आहेत.टेकडयावर ५०० हून अधिक वनस्पति वैविध्य पाहावयास मिळतात.१९६० नंतर टेकड्यांवर ग्लीरिसिडिया लागवड झाली. त्यामुळे हिरवाई वाढली पण गवती रानाची मूळची परिसंस्था बदलली आहे.पुण्याच्या नद्यांमध्ये ५०० हून वनस्पती प्रजाती आढळतात.
शुद्ध पाण्यात येणाऱ्या वनस्पति आता आढळत नाहीत. शहरीकरणात १५० उद्यानांमुळे, टेकडयांमुळे, हौशी पुणेकरांच्या बागांमुळे हिरवाई टिकून आहे. निराश होण्यासारखे चित्र नसले तरी,अजून जागरूकता वाढवली पाहिजे.
या व्याख्यानानंतर रमा कुकनुर व सहकारी भरतनाट्यम नृत्यातून वनस्पती विश्व साकार केले.
९ ते ११ जून दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून वनस्पती,प्राणी,हिरवाई आणि पर्यावरण रक्षणाची चर्चा करणारी व्याख्याने,बिया वाटप आणि देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृती असे या महोत्सवाचे स्वरूप होते.
‘जीविधा’संस्थेचे संस्थापक राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले.वृंदा पंडित यांनी आभार मानले.
९ ते ११ जून पासून सायंकाळी ६.३० ते ८ दरम्यान व्याख्याने झाली. या महोत्सवात दिनांक 9 ते 11 जून दरम्यान सायंकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान निसर्गसेवक ‘संस्थेचे ‘रानभाज्या’ विषयक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महोत्सवातील सगळे कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुले होते.