पुणे, दि. २९ नोव्हेंबर:“ सृष्टीवर शांती निर्मितीसाठी महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी आहेत. सुसंवादाला सह अस्तित्वासाठी अहिंसक संप्रेषणासाठी एकमेकांचा आदर करणे, समजूतदारपणा स्विकारणे, प्रोत्साहन देणे व सहानुभूती या पंच तत्वाच्या माध्यमातूनच घडू शकते. आत्मशांती शिवाय विश्वशांतीची कल्पना सुद्धा करता येणार नाही.” असे विचार केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या गांधी स्मृति आणि दर्शन स्मृतिचे वरिष्ठ कार्यक्रम प्रमुख डॉ. वेदाभ्यास कुंडू यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच डॉ. संजय उपाध्ये, धिरज सिंग, डॉ. सौरभ चतुर्वेदी, डॉ.मिलिंद पात्रे, अनामिका बिश्वास व महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. वेदाभ्यास कुंडू म्हणाले,“ शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे. आपला संवाद आपले जीवन बनविते तसेच त्याचा परिणाम कार्याच्या ठिकाणी होतो. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मंत्र दिला आहे, परंतु त्याचे पालन किती होते हा एक मुद्दा आहे. अहिंसक संवादामध्ये आपली भाषा, सकारात्मकता, भावनात्मकता, ज्ञान, भाषेमुळे किती नागरिकांवर त्याचा परिणाम होतो हे प्रत्येकाने तपासणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ महात्मा गांधी यांनी अहिंसक तत्वाचे पालन करून सृष्टीवर जीवनाचे नवे तत्वज्ञान सांगितले आहे. आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या गांधीजींनी शेवटच्या क्षणाला सुद्धा हे राम या शब्दांचा उच्चार केला होता. त्यांनी जीवनाची नवी दिशा दाखविली आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रेरणादायी वक्ता प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी ‘ युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर ते म्हणाले,“ एक हजार वर्षांचे नियोजन करणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा राजा सृष्टीवर होणे असंभव आहे. सैनिकांना दिलेल्या कौतुकाच्या थापेवर त्यांनी स्वराज्य उभे केले. कायद्याचे व न्यायाचे राज्य आणणाऱ्या राजांच्या दरबारात कारणे देणारी माणसे नसल्यामुळे मोठी क्रांती घडून आली. सध्यादेशात जी राज्य राखीव दलाची कल्पना आहे, ती राजांची देण आहे. अनेक लढाया या बुद्धिने लढता येतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.”
वरिष्ठ पत्रकार सचिन परब यांनी ‘ भारताच्या जडण घडणीत महाराष्ट्रातील संतांचे योगदान’ यावर ते म्हणाले,“ भारताच्या जडणघडणीत संताचे खूप मोठे योगदान आहे. हिंगोली येथील संत नामदेव यांनी शिखधर्माच्या स्थापनेसाठी सुद्धा मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच पंजाब, गुजरात आणि राजस्थान येथे त्यांची देवळे दिसतात. एकट्या राजस्थान येथे ३०० देवळे आहेत. त्याचप्रमाणे संत कबीरांच्या दोह्या मध्ये नामदेवांचा उल्लेख सापडतो. तसेच संत जनाबाई या स्त्री मुक्तीच्या पहिल्या जनक आहेत असे संबोधू शकतो. संत मीराबाई, गोरा कुंभार, सावतामाळी बरोबरच अनेक महाराष्ट्रातील संतांनी सांगितलेल्या भारतीय परंपरेच्या तत्वावर आपण जगत आहोत.”
डॉ. महेश थोरवे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले.
प्रा. रवी साहू यांनी सूत्रसंचालन केले. अनामिका बिश्वास यांनी आभार मानले.