प्रगत तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर नियंत्रण शक्य- डॉ. अंजली शिरास
पुणे : “शरीरातील अनिर्बंध पेशींमुळे कर्करोगाची समस्या उद्भवते. या पेशी आपल्याच शरीराचा एक भाग असल्याने आपण त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. परिणामी प्रमाणाबाहेर या पेशी वाढतात आणि कर्करोग होतो. अलीकडच्या काळात प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचे निदान प्राथमिक पातळीवरच होत असल्याने कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होत आहे. आधुनिक उपचारपद्धतीमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमी होत आहे,” असे मत राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. अंजली शिरास यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्करोग निदानाची नवी तंत्रे‘ या विषयावर डॉ. शिरास यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. मयूर कॉलनीतील भारतीय शिक्षण शास्त्र संस्थेच्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन) सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विंद्यान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., कार्यवाह संजय मालती कमलाकर, ज्येष्ठ सदस्य डॉ. विद्याधर बोरकर आदी उपस्थित होते.
डॉ. अंजली शिरास म्हणाल्या, “उतारवयात कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. जगात दरवर्षी सुमारे दीड कोटी कर्करुग्णांची भर पडते. त्यामध्ये प्रामुख्याने फुप्फुसे, यकृत, जठर, रक्त आणि स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. स्तनाचा कर्करोग दर चार महिलांमागे एका महिलेला झालेला आढळतो. अविकसित देशांमध्ये औषधोपचार करण्याच्या पद्धती आधुनिक नसल्यामुळे आणि कर्करोगाचे निदान बरेच उशिरा होत असते. केमोथेरपीच्या रासायनिक उपचारांमुळे शरीरातील कर्करोगाच्या गाठींवर नियंत्रण मिळवता येते. मात्र काही कर्करोगाच्या पेशी या नियंत्रणाच्या पलीकडे जातात आणि वाढत राहतात. हे नियंत्रित करण्यासाठी कोणत्या प्रकारची नवी तंत्रे सध्या वापरली जातात. अमेरिका व इतर देशांत कर्करोग होणारच नाही, अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, त्याची किंमत कोटीच्या घरात आहे.”
विनय र. र. यांनी प्रास्ताविक केले. संजय मालती कमलाकर यांनी आभार मानले.