पुणे : पक्ष विस्ताराची जबाबदारी ही कोणा एकट्याची नसून ती सर्वांची आहे. यासाठी कोणत्याही अडचणी न सांगता झोकून देवून काम करा. असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त येथील सोनल हॉंल येथे आयोजित विस्तारक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे,पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाधक्ष आमदार बाळा भेगडे,जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, तानाजी दिवेकर, सचिन सदावरदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, एके काळी कॉंग्रेस हा देशातील एक नंबरचा पक्ष होता. त्याकाळी कॉंग्रेसला आव्हान देणारा कोणता पक्ष नव्हता. कॉंग्रेसला एकट्या उत्तरप्रदेश मधून २०० हून अधिक जगावर विजय मिळत होता. त्याच उत्तर प्रदेश मध्ये सध्या कॉंग्रेसला २१ पेक्षा अधिक जागा मिळवता आल्या नाहीत. तर भारतीय जनता पक्षाला लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल. कॉंग्रेस सरकारने आजपर्यंत शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचे काम केले. त्यामुळे राज्यातही त्यांनी काढलेल्या पंचतारांकित संघर्ष यात्रेकडे लोकांनी पाठ फिरवली.
कॉंग्रेस संस्कृतीला वैतागलेल्या जनतेला भाजप काम करू शकते हा विश्वास प्राप्त झाल्यामुळे लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी,पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम करून चालणार नाही. तर सर्वांनी जबाबदारीने काम करून पक्ष वाढवला पाहिजे. भाजप सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. या योजना लोकांच्या पर्यंत योग्य रित्या पोहचत नाहीत हे पोहचवण्याचे काम विस्तारकाने करायचे आहे.
पंडितजींनी पक्षासाठी भरपूर योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने हा संघटनात्मक कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्यामुळे त्यांचा आदर्श घेवून हे काम केले पाहिजे. हे काम पैशात मोजण्याचे नसून वेळेत आणि श्रमात मोजण्याचे आहे. मी ज्या गावात गेलो होतो त्या गावात येणाऱ्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल ही जिद्द आणि आत्मविश्वास घेवून काम करा. असा सल्ला ही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.