बाळासाहेब ठाकरे आजी माजी सैनिक, सैनिकांच्या वीरपत्नींना मालमत्ता कर माफी योजना” तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी
पुणे-बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सैनिकांना मिळकत करमाफीची योजना असताना या सैनिकांनी महापालिकेचे उंबरठे त्यासाठी झिजवावेत अशी अपेक्षा बाळगून त्यांची एकप्रकारे अवहेलना महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन करत असल्याचा आरोप करत शिवसेना आज येथे आक्रमक झाली . संजय मोरे , पृथ्वीराज सुतार ,बाळासाहेब ओसवाल,विशाल धनवडे , गजानन थरकुडे, युवासेना सहसचिव किरण साळी, उपशहरप्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, अविनाश साळवे, उमेश वाघ व इतर सर्व विभागप्रमुख, संघटक, समन्वयक, उपविभागप्रमुख, प्रभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.या सर्वांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली .
यावेळी मोरे , सुतार आणि शिवसैनिकांनी सांगितले कि ,’माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेले देशाची सेवा व विविध स्तरावरुन प्राप्त झालेली मागणी विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणे आवश्यक आहे. म्हणून राज्य सरकारने “बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना”, या योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र पुण्यातील विविध आजी माजी सैनिकांच्या संस्थेने वारंवार पाठपुरावा करुनही सदरील मिळकत कराच्या माफीसाठी पुणे म.न.पा.ने प्रशासकीयदृष्ट्या कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही.पुण्यामध्ये एकूण अंदाजे वीस हजार मिळकतदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. तसेच २०२१ हे वर्ष केंद्र शासनाने १९७१ च्या युद्धातील भारतीय सैन्य दलाने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व विजयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने, सैन्यदलाचा सन्मान, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे करण्याचे योजिले आहे. परंतु भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमास फक्त आणि फक्त पुणे महानगरपालिकाच एक अपवाद असावी. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सदर ठरावाची अंमलबजावणी ह्या वर्षापासून सुरुही केली आहे. महाराष्ट्रातील जवळ जवळ ९९% म.न.पा., न.पा., ग्रामपंचायत यांनी या योजनेची पूर्ण अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने याबाबत आवाज उठवावा लागेल.असाही इशारा यावेळी देण्यात आला .