शिवसेना शहरअध्यक्ष आणि गटनेत्यांनी कॉंग्रेसच्या अरविंद शिंदेंवर केला प्रहार
पुणे- आगामी महापालिका निवडणुकीसाठी वर्षभराचा अवधी उरला असताना राज्यात कॉंग्रेस ला बरोबर घेऊन राष्ट्रवादी शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार प्रस्थापित केलेले असताना राज्यात कॉंग्रेस सत्तेतून बाहेर पडणार ..पडणार अशा मध्यंतरी वावड्या उठत असताना ..इकडे पुण्यात प्रत्यक्षात कॉंग्रेस आणि शिवसेनेत वादास प्रारंभ झाल्याचे दिसत आहे . कळीचा मुद्दा, महापालिकेतील ऑनलाईन मुख्य सभा छत्रपती सभागृहात घेण्याऐवजी महापौरांच्या अँँटीचेंबर मधून घेण्यात येत असल्याचा ठरला आहे.
कोरोनाच्या नावाखाली महापालिकेची मुख्य सभा आता केवळ गटनेत्यांची महापौर दालनातील गोपनीय सभा बनल्याने कॉंग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी काल राज्याचे नगरविकासमंत्री शिवसेनेचे आहेत ते या पालिकेला स्पष्ट आदेश देऊन छत्रपतींच्या नावाच्या सभागृहात सभा घेण्याचे आदेश का देत नाहीत ? काय रहस्य दडले आहे यामागे .. ते येथील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालीत आहेत काय ? असे प्रश्न उपस्थित केले होते . काही माध्यमांमधून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून महापालिकेच्या मुख्य सभा अशा ‘ ऑनलाईन’पद्धतीने घेण्यास शिवसेनेचा मूक पाठींबा आहे कि काय ? अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करणारे आरोप अरविंद शिंदे यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले . या पार्श्वभूमीवर या साऱ्या वक्तव्यांचा आज शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी अरविंद शिंदे यांच्यावर प्रतिसमाचार घेतला आहे.
या संदर्भात या दोहोंनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि ,’कोरोना महामारीचा प्रादुर्भाव एवढा वाढत चाललेला असताना, काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक असून देखील अरविंद शिंदे नामक गझनी ला या गोष्टीचे विस्मरण होत आहे.राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या सर्व प्रकारच्या बैठका ऑनलाईन घेणेबाबत आदेश निर्देशित झालेले आहेत. महापालिकेतील पक्षनेतेपदाची जबाबदारी काढून घेतल्यामुळे सध्या ते अतृप्त आत्मा असल्यासारखे वागत आहेत, कदाचित त्यामुळे ते महापालिकेच्या सभेची नियमावली विसरलेले दिसत आहेत.
शिवसेनेने भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घातले नाही भविष्यातही कधी पाठीशी घालणार नाही. मुंबई महानगरपालिकेमधे सातत्याने शिवसेनेला एकहाती सत्ता गेली 25 वर्ष मुंबईकर जनता उगाचच देत नाही, याचेही विस्मरण कदापि होता कामा नये. शिंदेंनी कालचे विधान काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले दिसून येत आहे. कारण यामुळे काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष होण्यास मदत होईल असे त्यांना वाटत असावे.त्यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक आहे की पक्षाचे आहे हे सुध्दा सांगणे आवश्यक होते.असेही शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.
कळीचा मुद्दा आणि पक्षाध्यक्षांच्या भूमिका महत्वाच्या
दरम्यान महापालिकेत भाजपा ची सत्ता असली तरी भाजपच्या शहराध्यक्ष पदावर जोवर योगेश गोगावले होते तोवर येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण होते त्या प्रमाणात आता मात्र शहरअध्यक्ष यांचे येथील कारभारावर लक्ष राहिलेले नाही .भाजपच्या असंख्य नगरसेवकांना देखील अशा पद्धतीने मुख्य सभा घेणे रुचलेले नाही ,ते सर्व नाराज आहेत .पण पक्ष शिस्त म्हणून त्यांनी जाहीर वाच्यता करणे टाळलेले आहे.ठराविक पदाधिकारी विरुद्ध भाजपचेच नगरसेवक अशी हि स्थिती पडद्याआडून आहेच .पण या परिस्थितीत सुधारणा करण्यास किंवा समन्वय साधण्यासाठी अद्याप तरी कोणा नेत्याने प्रयत्न केल्याचे दिसून आलेले नाही .
कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांना आरोग्याच्या आणि काही वैयक्तिक कारणास्तव गेले २ महिने महापालिकेच्या कारभारात फारसे लक्ष घालता आलेले नाही . मात्र कॉंग्रेसमध्ये काल अरविंद शिंदे यांनी जाहीरपणे शिवसेनेविषयी प्रश्न उपस्थित करत आवाज उठविला आहे.ज्यामुळे सेना आणि कॉंग्रेस मध्ये पडलेली ठिणगी पेट घेणे अशक्य मानता येणार नाही .
राष्ट्रवादीचे तर गटनेते महापौरांच्या अँँटीचेंबर मधील सभेस उपस्थित असतात आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष असलेले आमदार तसेच माजी महापौर, नगरसेवक याच अँँटीचेंबर चे दार उघडा ..म्हणून दरवाजे ठोठावत असतात , आंदोलन करताना दिसून आले आहेत. एकूणच महापालिकेतील पक्षनेते आणि नगरसेवक यांच्यातच अशा पद्धतीने मुख्य सभा घेण्याने मतभेद निर्माण झालेले आहेत . नेत्यांची अशा पद्धतीने महापौरांच्या दालनात चालणारी मिटिंग सर्वच पक्षातील असंख्य नगरसेवकांना त्रास देणारी ठरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर गटनेत्यांच्याबरोबर आता शहराध्यक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असे वाटत असतानाच शिवसेनेच्या शहर अध्यक्ष आणि गटनेते यांनी एकत्रित पणे काढलेल्या या प्रसिद्धीपात्रकाला महत्व दिले जात असले तरी शिवसेनेतही आपसात मतभेद असल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहे.