नृत्यभारतीचा रंगला हृद्य सोहळा
पुणे – गुरु पं. रोहिणीताई भाटे यांच्या रचनासंपदेमधून मंथन करून काढलेल्या अमृताला संस्थेच्या सहा पिढ्यांनी आपल्या कलेतून साकार केले. नृत्यभारतीच्या निपुण नृत्यांगनांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी रसिकांवर अक्षरश: मोहिनी घातली.
निमित्त होते ‘अमृतमंथन ‘ मैफलीचे. नृत्यभारती कथक डान्स ॲकॅडमीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त हा हृद्य सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे रंगला. यावेळी दिल्ली कथक केंद्राचे संचालक सुमन कुमार, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, प्रख्यात विचारवंत व हिंदी कवी अशोक वाजपेयी, ज्येष्ठ नृत्यांगना रश्मी वाजपेयी, दिग्दर्शक सुनील सुकथनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरु पं. रोहिणीताई भाटे यांनी संस्थेच्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर रचलेल्या एकापेक्षा एक संपूर्णपणे वेगळ्या अशा ३७ नृत्य रचनांचा थक्क करणाऱ्या नृत्यप्रस्तुती या मैफलीत सादर झाल्या. यात एकूण ५० नर्तकींनी सहभाग घेतला होता. अधूनमधून गुरु रोहिणीताईंच्या रचनांची ध्वनीचित्रफित आणि बाकी प्रत्यक्ष नृत्ये असे मैफिलीचे स्वरूप होते. यात संस्थेचा इतिहास सांगणारी छायाचित्रे व त्याच्यासह गुंफलेले अत्यंत चपखल निवेदन यामुळे संस्थेच्या महत्त्वाच्या घटना क्रमाक्रमाने प्रेक्षकांना उलगडत गेल्या. उत्तम तयारीने सादर होणारे नृत्य, अभिरुचीपूर्ण पोशाख, हृद्य संगीत, अभिनव प्रकाशयोजना यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. संस्थेच्या संचालिका नीलिमा अध्ये यांनी संपूर्ण आयोजनाची संकल्पना, संहिता आणि सादरीकरण याची सुंदर गुंफण केली होती.
संस्थेच्या पुढच्या परवाची जणू मंगल नांदी करत संत रामदासांचे ‘ओम नमोजी गणनायका’ हे गुरु रोहिणीताईंनी संगीत आणि नृत्यबद्ध केलेले स्तवन संस्थेच्या वरिष्ठ नृत्यांगनांनी एकत्र सादर करत अत्यंत पवित्र वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी सुमन कुमार म्हणाले, महिलांना सशक्त बनवून त्यांना आत्मनिर्भरतेची वाट कथक नृत्याने निर्माण करून दिली आहे. रोहिणी भाटे यांनी जगात कथक नृत्याला प्रतिष्ठा मिळवून देत प्रेक्षक आणि कलाकारांचे नाते अधिक समृद्ध केले.
अशोक वाजपेयी म्हणाले, पं. रोहिणी भाटे यांचे कथक नृत्यातील कार्य हे कथक नृत्याचा भौगोलिक परिघ वाढवणारे आणि इतिहास घडवणारे आहे. कथक कलेचा इतिहास बहुतांश लोकांना १५० वर्षांपूर्वीपासूनचा माहिती होता. मात्र पं.भाटे यांनी कथक कलेस वेद काळापर्यंत नेले. त्यांची विचारधारा अद्भूत होती. कथक कलेला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेले. स्वतः बरोबर इतर कलाकारांना ही मोठे करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.
सुनील सुकथनकर म्हणाले, महिलांसाठी प्रथम चूल आणि मूल आणि त्यानंतर कला हा दुय्यमतेचा विचार नष्ट करून पं. रोहिणी भाटे यांनी अप्रत्यक्षपणे परंतु, आत्मविश्वासाने स्रीमुक्तीचा विचार रुजविला. प्रत्यक्ष नृत्य साधने व्यतिरिक्त शिष्यांबरोबरच्या सहवासात अनेक जीवनमूल्ये त्या सर्वांना देत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलिमा अध्ये तर सूत्रसंचालन शिल्पा भिडे यांनी केले.