पुणे, ता. १९ : कोरोना विषाणूमुळे पुणे शहरात निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य शासन आणि प्रशासनाला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७ आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, परंतु त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रत्येक अधिकारी वेगवेगळे आदेश काढत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याची टीका शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
रेड कंटेनमेंट विभागामध्ये ८० हजार कुटुंबांना शिधा पॅकेटस वितरण करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने एक आठवड्यापूर्वी केली होती. परंतु आठवड्यानंतर जेमतेम २० हजार पॅकेटस वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या विभागात नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. नागरिक बाहेर पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने या भागातील नागरिकांना तातडीने पॅकेटस वाटण्याची व्यवस्था करावी अशी सुचना खासदार गिरीश बापट यांनी केली.
अधिकार्यांमध्ये समन्वय वाढावा, कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन बेडसची उपलब्धता करावी, रूग्ण आणि बेडसची उपलब्धता दाखविणारे पोर्टल विकसित करावे, अन्य रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये इतर आजारावर उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते त्यांच्यावर कारवार्इ करावी, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांची निवास व्यवस्था, पीपीई किट, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य खात्यात आवश्यक असणार्या पदांची तातडीने भरती करावी, कोरोना रुग्ण आणि कॉरंटाइन केलेले नागरिक यांच्यासाठी पुरेसे बेडस, भोजन व्यवस्था, औषधे, मास्क, सॅनिटायझर, स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पुणे शहरात मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, रस्ते विकास, उड्डाणपूल आदी अर्धवट अवस्थेत असलेली विकासकामे तातडीने सुरू करावीत, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज करावीत, पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांचे तातडीने नियोजन करावे, कचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
भाजपच्या वतीने शुक्रवारी आंदोलन
कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. २२ मे) सकाळी दहा वाजता भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक म्हणाले, ‘शहरातील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते आपआपल्या घराच्या दारात उभे राहून राज्य शासनाचा निषेध करणारे फलक प्रदर्शित करणार आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन केले जाणार आहे. कोरोनाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आपत्कालिन व्यवस्थेत मदत आणि विविध प्रकारचे सेवा कार्य करीत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भाजपची भूमिका आहे. हे सहकार्य यापुढे ही कायम राहील. परंतु राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, पुण्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहेत. या बेजबाबदारपणाकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा हेतू आहे.’
पुण्यातील स्थितीचे गांर्भीर्य विषद करताना मुळीक म्हणाले, ‘ससून सर्वोपचार रूग्णालयात कालपर्यंत ४६९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच ससूनमध्ये दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, कर्नाटक या देशातील काही मोठ्या राज्यातील मृत झालेल्या व्यक्तिंच्या संख्येपेक्षा ससूनमधील मृतांची संख्या खूप मोठी आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.’
राज्य
पॉझिटिव्ह रूग्ण
मृत्यू रुग्ण
मृत्यूचे प्रमाण
उत्तर प्रदेश
४४६४
११२
३९.८५
तामिळनाडू
११७६०
८१
१४५.१८
आंध्र प्रदेश
२४०७
५०
४८.१४
कर्नाटक
१२४६
३८
३२.७८
पंजाब
१९८०
३५
५६.५७
ससून पुणे
४६९
११५
४.०७
४ व्यक्ती मागे 1 मृत्यू