पुणे-केंद्र सरकारने बुधवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय वर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेवर बंदी घालण्यासाठी गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या कारवाईचा पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठा जल्लोष करण्यात आला.राज ठाकरे यावर पहिल्यांदा बोलले. त्यानंतर मनसेने पुण्यात मोठे आंदोलन केले. त्यामुळे या बंदीचे संपूर्ण श्रेय राज ठाकरेंचे असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटना बेकायदेशीर कृत्ये करत होत्या. या कारवाया देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी धोकादायक आहेत. या संघटनांच्या कारवाया देशाच्या शांतता आणि धार्मिक सौहार्दाला धोका निर्माण करू शकतात या कारणांमुळे गृह मंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली आहे.मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की,पीएफआय ही देशविरोधी संघटना असून पुण्यातील आंदोलना दरम्यान, ज्या घोषणा देण्यात आल्या त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या संघटनेवर बंदी आणावी आणि घोषणाबाजी करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही जल्लोष साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, देशभरात अशा संघटना राहूच नयेत याबाबत सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.