पुणे- स्त्री शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या सावित्रीमाईंच्या पुण्यात महागाई विरोधात आंदोलन करायला गेलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही मारहाण करणाऱ्या ‘त्या’ गुंडांना तातडीने अटक करा , त्यावेळी महिला पोलिसांना देखील धक्काबुक्की झाल्याचे आणि अरेरावी झाल्याचे व्हिडीओतून दिसते आहे . त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचे गृहमंत्री असलेले वळसे पाटील यांनी तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी देखील सुमोटो हि कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी येथे केली आहे.
ब्रिगेड चे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते आणि शिंदे यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व येथील सभेमध्ये महागाईच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपच्या गावगुंड पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. ‘महागाई विरोधात आंदोलन केले म्हणून बिघडले कुठे…? सरकारने उत्तर दिले पाहिजे.’ पुरुषांनी राजकीय पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणं हे निषेधार्ह आहे. अशी घाणेरडी महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असेल. जिजाऊ-सावित्री-अहिल्या यांच्या महाराष्ट्रात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून भर सभेमध्ये अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. RSS नेहमी स्त्रियांना शूद्र ठरवते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या माध्यमातून स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान देण्याचे काम संघाचे कार्यकर्ते करत आलेले आहेत. भाजपची विचारधारा ही आरएसएस शी संबंधित आहे. अशा घाणेरड्या मानसिकतेचे लोक महिलेला मारहाण करू शकतात हे महाराष्ट्राने पुण्यात पाहिले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या सुद्धा महिलेचा साडीचोळी देऊन सन्मान केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, शिवसेना किंवा कोणत्याही पक्षाची किंवा संघटनेची असो…महिलांना मारहाण झाली नाही पाहिजे.
पुणे पोलीस आयुक्तांनी महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या बद्दल गांभीर्याने दखल घेऊन भाजपच्या गावगुंडांना तात्काळ ताब्यात घेऊन अटक करावी व त्यांच्यावर कठोर शासन करावे. महाराष्ट्रासह पुण्यात कायदा व्यवस्था आहे. कोणालाही पाठीशी घालू नये. महाराष्ट्रात महिलांचा सर्वोच्च सन्मान झाला पाहिजे. संभाजी ब्रिगेड महिलांवरील अन्याय-अत्याचार कदापिही सहन करणार नाही. जर दोन दिवसात भाजपच्या गुंडांना अटक झाली नाही तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल…असेही या दोहोंनी स्पष्ट केले आहे.