पुणेः- संविधानिक पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारी यंत्रणांकडून केला जात आहे. लोकशाहीचा हा संविधानिक पाया ठिसूळ झाला तर भारतातील लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल त्यामुळे प्रशासकीय सेवेत नव्याने येणा-या अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावापुढे न झुकता या देशातील जनतेशी आपण पूर्णतः बांधिल आहोत हे ध्यानात घेऊन लोकहिताचे निर्णय घ्यावेत. असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे यु.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या बार्टीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी पटोले बोलत होते. यावेळी बोलतांना पटोले म्हणाले, “लोकशाही यंत्रणा आस्तित्वात राहिली तरच प्रत्येकाला त्यांच्या स्वातंत्र्याचा ख-या अर्थाने आनंद घेता येईल. संविधानाची जोपासना करणे हे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे आद्य कर्तव्य आणि प्रमुख उद्देश्य असला पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेत पूर्वी युपी, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा मोठा टक्का होता. पंरतू आता महाराष्ट्रीयन टक्का देखील वाढत चालला आहे हे निरिक्षण अभिमानाने नोंदवावेसे वाटते.”यावेळी उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम आपल्या मनोगतात म्हणाले, “भारत देशाच्या जडण-घडणीत प्रशासकीय सेवांचा मोठा सिहांचा वाटा आहे. सक्षम प्रशासकीय सेवेमुळेच भारत महासत्तेचे स्वप्न पूर्ण करू शकेल.महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत सक्षम अधिकारी आहेत. एकमेकांना सांभाळून घेत, समजून घेत, सामंजस्यपणे हे अधिकारी कार्यरत असतात. लोकप्रतिनिधींना प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि योजनांचे अंतिम लाभार्थी जनता या दोन्ही आघाड्यांवर कधी भावनीक तर कधी शिस्त अशी तारेवरची कसरत करीत सुवर्णमध्य साधत काम करावे लागते. दोन्ही घटकांना अंतिमतः जनतेचा विकास साधायचा असतो.” या कार्यक्रमास उपस्थित पत्रकार अशोक वानखेडे यांनी समाजाकडून प्रशाकीय यंत्रणेला मिळणाऱ्या अपेक्षित प्रतिसादा बद्दल अवगत केले. तसेच यशदाचे डाॅ. बबन जोगदंड, इनकम टॅक्स विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे यांनी यावेळी स्वतःच्या प्रशासकीय अनुभवाचे कथन करीत प्रशासकीय यंत्रणेत वावरतांना अपेक्षित आदर्श वर्तन कसे असावे याबाबत मागदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार सामाजिक न्याय मंत्री डाॅ. विश्वजीत कदम, पत्रकार अशोक वानखेडे, यशदाचे डाॅ. बबन जोगदंड, इनकम टॅक्स विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे, मोहन जोशी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर योगेश रांगणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.