पुणे- सुख,दु:ख,शांती, प्रेम, विरह, संस्कार, मातृ- पितृ प्रेम, पती-पत्नी प्रेम, भक्ती अशी मानवाच्या जीवनातील
विविध सौंदर्य स्थळांचा उलगडा करणारी हिंदी, मराठी व भक्ती गीते आणि त्याला साजेश्या निवेदनाने एका
उंचीवर नेलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘स्वर निनाद’ या संस्थेच्या ‘सत्यम शिवम
सुंदरम’ या कार्यक्रमाचे बुधवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आले होते. विविध विषय, विचार
मनोरंजनाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘जिंदगी कैसी है पहेली हाय…’, ‘ तारो मे सजके, अपने सुरजसे धरती चली मिलने…’, ‘ झिलमील सितारोंका
आंगण होगा…’, ‘मा तुझे सबकुछ पता है ना मा..’, ‘सांगायची आहे दमलेल्या बापाची कहाणी तुला..’, ‘तुम्ही
मेरी मंझील, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो…’, ‘ये तो सच है की भगवान है.. यांसारखी एकापेक्षा एक सरस
गीते, ‘माउली..माऊली..’, हे भक्ती गीत, ‘ दही दुध लोणी, घागर भरली..नेऊ कशी बाजरी…’, ही गवळण तर
एकाच वेळी राधा- कृष्णामधील प्रेम तर कृष्ण आणि मीरा मधील विरह व्यक्त करणारे ‘एक राधा, एक
मीरा…दोनोने श्याम को चाहा..’, तर ‘ईश्वर सत्य है..सत्य ही शिव है.. शिव ही सुंदर है…’, या सुख आणि
शांतीचा मागोवा घेणाऱ्या गीतांनी रसिकांना चिंब केले.
गायक रणजीत गुगले, विजय वळवडे, गायिका अनघा नवरे, वैदेही जाधव, स्मिता कुलकर्णी या कलाकारांनी
आपल्या मधुर आवाजाने रसिकांची माने जिंकली. या कार्यक्रमाचे निर्माते सुनील सुतार हे असून दिग्दर्शन प्रा.
सुरेश शुक्ल यांनी केले आहे. तर निवेदन भारतभूषण शेंबेकर यांनी केले.
जेष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रा. सुरेश शुक्ल यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात
आला. या प्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी सत्याचा आग्रह
धरीत शांतीमय जीवन जगण्यासाठी चांगल्या विचारांचा संकल्प अंगी बाळगला पाहिजे असे आवाहन केले. पुणे
नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घन:श्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित
बागुल हे यावेळी उपस्थित होते.
आपला स्नेहांकित