पुणे-जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (गुरुवारी) सायंकाळी पाच वाजल्यानंतर पिंपवड उद्योगनगरीत दाखल झाला. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष अन् उत्साहात भागवत धर्माची पताका उंचवत एक दिवसाच्या मुक्कामासाठी आलेल्या वैष्णवांमुळे सारा परिसर भक्तीरसात न्हावून निघाले आहे.
पालखी सोहळ्याने काल आजोळघरी, इनामदार वाड्यात मुक्काम केला. आज सकाळी सव्वा आकाराच्या सुमारास तेथून तो पिंपवड कडे ऊन-पावसाच्या पाठशिवणीचा खेळ आणि अधुन-मधून वरुण राजाचा शिडकावा झेलत हा पालखी सोहळा सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात दाखल झाला. देहूरोडकडून निगडीच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना मावळतीच्या सूर्य किरणांनी चकाकणारा चंदेरी पालखी रथ नजरेस पडताच सर्वाच्या नजरा त्याच दिशेने वळाल्या. गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळावर केशरीगंध लावलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या नाक्याजवळ येताच आबालवृद्ध भाविकांचा उत्साह दुणावला. “ग्यानबा-तुकाराम”चा एकच जयघोष झाला. पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. पालखी रथ जवळ येताच नागरिक दर्शनासाठी पुढे सरसावले.
भक्ती-शक्ती चौकापासून दुपारी अडीच वाजल्यापासून वारकरी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. पालखीच्या मागे आणि पुढे मिळून 326 दिंड्या होत्या. सर्वात पुढे सनईचौघडा, नंतर तुकोबांच्या पालखीचे अश्व, मागे फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथातील महाराजांच्या पादुकांची पालखी, त्यानंतर जगनाडे महाराज, गवरशेठ लिंगायत वाणी पालखी असा लवाजमा होता.हा भक्तीचा अनोखा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी निगडी चौकात पिंपरी-चिंचवडवासीयांची अलोट गर्दी लोटली होती. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना सतरंजी देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे आदी उपस्थित होते