पुणे- पुणे महापालिकेच्या उदयान विभागाकडून शहरात अनेक ठिकाणी व महापालिकेच्या उदयानांमध्ये वृक्ष लावले जातात. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरास अजून पुर्णपणे ग्रीन कव्हर होण्याच्या उददेशाने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. मात्र पुणे महापालिकेकडून वृक्ष लागवड करणेऐवजी खोटी बोलकी झाडे लावली जात आहेत. खोटी झाडे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.
पुणे महापालिकेकडून महावितरण कंपनीचे बिल न भरल्याने वीजेची थकबाकी भरण्यास पैसे नाहीत अशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या आहेत. पुणे महानगरपालिकेकडून कोथरूड येथील उदयानांमध्ये ८८ लाख रूपये खर्च करून झाडे बसवण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असून शहरातील अनेक विकासकामे आपण थांबविली आहेत. उपनगरांमध्ये पाणी, ड्रेनेज, रस्ते, विदयुत व इतर पायाभूत सेवा सुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हे नागरिक महापालिकेचा मिळकत कर पूर्णपणे भरतात. पुणेकरांनी मनपाच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून कोटयावधींचा भरणा कोरोना काळात उत्पन्न घटले असतानाही मनपावर विश्वास ठेवून केला आहे. याचा गैरफायदा सत्ताधारी पक्षाच्या दबावाने प्रशासनाकडून होत आहे. महापालिकेकडून खरी झाडे लावण्यापेक्षा खोटी बोलकी झाडे लावली जाणे ही कोरोना काळात दुर्देवी बाब आहे.
वास्तविक पुणे महापालिकेकडून मनपा हददीत सर्वत्र पायाभूत सेवा व सुविधा, रूग्णालयाच्या सुविधा सुसज्ज झाल्यानंतर शहराचे सुशोभिकरण करणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या रूग्णांना बेडस उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, विलगीकरण कक्षामध्ये सुविधा नाहीत अशी दयनीय अवस्था असताना प्रशासनाकडून ८८ लाखांच्या सुशोभिकरणाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जाणे हे महापालिकेस व पुणे शहराच्या संस्कृतीला अशोभनीय आहे. राज्य शासनाकडून शक्य तितकी कामे पुढे ढकलण्याचा आदेश महापालिकेस प्राप्त असताना महापालिका प्रशासनाकडून त्यास हरताळ फासला जात आहे. महापालिका प्रशासनाकडून कोरोना काळापासून या वर्षभरात ज्या ज्या ठिकाणी सुशोभिकरणाची कामे चालू आहेत, ती सर्व कामे तातडीने स्थगित करण्यात यावेत अशे आदेश आयुक्तांनी पारित करावेत. तसेच महापौर व महापालिका आयुक्त यांना खोटी झाडे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा याबाबत विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

