चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पाकिस्तान आणि नेपाळ चीनसोबत असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला
बीजिंग. गलवान खोऱ्यात लष्करांच्या चकमकीनंतर चीनने पुन्हा एकदा एका सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चिनी सरकारचे मुखपत्र माउथपीस ग्लोबल टाइम्सनुसार, एलएसीवर तनाव वाढला तर भारताला चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळ सेनेचा दबाव सहन करावा लागेल. याचा अर्थ भारत-चीन सीमेवर बिघडलेल्या परिस्थितीत पाकिस्तान आणि नेपाळ चीनला पाठिंबा देऊ शकतात.
सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांत झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. दरम्यान चीनचे 43 सैनिक मारले गेले किंवा जखमी झाल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
मानसिक दबाव निर्माण करण्याचे षड्यंत्र
ग्लोबल टाईम्स हे चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. त्यातील लेख चीन सरकारच्या मतानुसार असतात. हे वृत्तपत्र अनेक दिवसांपासून भारताला धमकावणारे लेख प्रकाशित करत आहे. वृत्तपत्राने शांघाय अकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या संशोधक फेल हू झियोंग यांचा एक लेख प्रसिद्ध केला आहे. यामध्ये झियोंगने म्हटले की, “सध्या भारताचा चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळसोबत सीमा वाद सुरू आहे. पाकिस्तान आणि चीनचे जवळचे संबंध आहेत. नेपाळही आमची सहयोगी आहे. दोन्ही देश चीनच्या वन बेल्ट रोड प्रकल्पाचा भाग आहेत.”
भारताकडे इतकी सैन्य ताकद नाही
झियोंग पुढे म्हणतात, ” भारताने सीमेवर तणाव वाढवल्यास तीन मोर्चांवर लष्करी दबावाचा सामना करावा लागेल. या दबावाला सामोरे जाण्याची ताकद भारताच्या सैन्याकडे नाही. भारताचा दारुण पराभव होऊ शकतो.” झियोंगनुसार, चीन एलएसी बदलू इच्छित नाही. गलवान खोऱ्यात जे काही घडले त्याला भारतीय सैन्यच जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला. कारण, भारतीय सैन्यानेच चिनी सैनिकांना चिथावले होते.
भारताने चौकशी करावी
लेखात पुढे म्हटले की, “गलवान खोऱ्यासारख्या घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत हे भारताने ठरवायला हवे. भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. जबाबदार लोकांना कठोर शिक्षा द्यावी.” या वृत्तपत्राने चीनमधील लष्करी तज्ञाचे एक विधानही प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यांचे नाव सांगितले नाही. या विधानानुसार, चीनने आपल्या मृत किंवा जखमी झालेल्या सैनिकांची संख्या किंवा नाव यासाठी प्रसिद्ध केले नाही कारण यामुळे तणाव आणखी वाढू शकतो.
15 जूनला चिनी राष्ट्राध्यक्षांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी चिनी लष्कराची नीच कुरापत
गलवान खोऱ्यात १५ जून रोजी जेव्हा चिनी सैनिक विश्वासघातकीपणे भारतीय सैनिकांना घेरून कौर्य करत होते, तेव्हा चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वाढदिवसाचा समारंभ सुरू होता. पीएलएचे हे कृत्य म्हणजे जिनपिंग यांच्या वाढदिवसाची भेट असल्याचे भारतीय लष्करी सूत्र सांगताहेत. शहिदांच्या शरीरावरील जखमा याचा पुरावा आहेत. २० शहिदांपैकी १६ जणांच्या शरीरावर काठ्या आणि दगडाचे वार यांच्या खोलवर जखमा आहेत. चार जवानांचा मृत्यू शिखरावरून पडल्याने झाला. मात्र त्यांना धक्का दिला की या झटापटीत ते वरून पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुमारे १५ हजार फूट उंचीवर हा हिंसाचार जेथे झाला तेथे खूपच कमी जागा आहे. ज्या सीमा चौकीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. संतोष गेले होते. तेथे चिंचोळी वाट खाली जाते. तेथून चिनी सैनिक या चौकीतून तंबू परत नेताना दिसले होते. मात्र, कर्नल संतोष यांची तुकडी पोहोचल्यानंतर पीएलएने पवित्रा बदलला आणि त्यांना घरून मारण्यास सुरुवात केली. सूत्रांनुसार, मंगळवारी हेलिकॉप्टरने चिन्यांनी जखमी सैनिकांना बाहेर काढले. येथून ४६ स्ट्रेचर जाताना दिसले. मात्र, यापैकी किती जखमी आणि किती मृतदेह होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चिनी कुरापतीच्या विरोधात बुधवारी देशभर संताप उसळला. माजी लष्करी अधिकाऱ्यांनी चिनी दूतावासासमोर निदर्शने केली. गलवान खोऱ्यात शहीद जवानांना बुधवारी लेहच्या लष्करी रुग्णालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. येथून पार्थिव मूळ गावी नेण्यात आले.
खोटारडेपणा : चिनी परराष्ट्रमंत्री म्हणाले, चकमक चीनच्या हद्दीत
चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी १५ जूनच्या घटनेबद्दल म्हटले आहे की, “दोन्ही सैनिकांत जेथे चकमक झाली तो भाग चीनच्या नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर एलएसी ओलांडून तेथे पोहाचले.’ मात्र, चीनचा खोटारडेपणा १६ जूनच्या सॅटेलाइट इमेजमधून दिसला. १६ जूनला सायंकाळच्या या छायाचित्रात चिनी सैनिक भारतीय हद्दीत दिसत आहेत. म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही घुसखोर तेथेच होते.
भारत-चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची फोनवर चर्चा, पुढे तणाव वाढू नये या मुद्द्यावर एकमत :
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. हा तणाव वाढवणारी कारवाई करण्याऐवजी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करण्यावर दोघांत एकमत झाले. जयशंकर यांनी या वेळी गलवान खोऱ्यातील घटनेबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, तणाव कमी करण्यासाठी ६ जूनला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जवान हटवण्यावर एकमत झाले होते. मात्र, चिनी सैनिक भारतीय हद्दीत तंबू उभारण्यासाठी हट्टाला पेटले होते. यावरून वाद झाला.