मुंबई-
रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, यांनी 12 मार्च, 2022 रोजी जालना स्टेशन येथे आयोजित समारोहात मनमाड ते मुदखेड पर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्प आणि कर्षण उपकेंद्राचे भूमिपूजन केले. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आणि इतर लोक प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात अवर महाप्रबंधक, दक्षिण मध्य रेल्वे ए.के. जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग उपेंदर सिंह आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, भारतीय रेल्वे आपल्या सध्याच्या ब्रॉड गेज मार्गांसोबतच सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण मिशन मोडवर करत आहे. ते म्हणाले की, दमरेचा मनमाड – मुदखेड विभाग मराठवाडा क्षेत्राच्या दृष्टीने एक महत्वाची रेल्वे लिंक आहे. मनमाड-मुदखेड विद्युतीकरण प्रकल्प पायाभूत सुविधा वाढविण्याच्या आणि सर्व दिशांनी या क्षेत्राशी जोडणी होण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. 357 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पावर 484 कोटी रुपये खर्च होणार आहेत. महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत घसघशीत वाढ करण्यात आली आहे, ही तरतूद 1100 कोटीहून 11,000 कोटी रुपये करण्यात आली आहे. मनमाड ते परभणी पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण टप्प्या टप्याने केले जाईल.
रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि इंधन खर्च देखील कमी होईल, यामुळे पर्यावरणाचे रक्षण देखील होईल. दानवे म्हणाले की मुंबई-नागपुर; मुंबई-पुणे-हैदराबाद विभागात हाय स्पीड ट्रेन सुरु करण्यासाठी डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे. याशिवाय 400 वंदे भारत गाड्या टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येतील आणि महाराष्ट्राला देखील मोठ्या संख्येने वंदे भारत गाड्या मिळतील.