मुंबई, दि. २९ नोव्हेंबर – राज्यातील महविकास आघाडी सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. महाराष्ट्रामधील जनतेला भेडसावणारे अनेक प्रश्न व समस्या विधीमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून सुटतील अशी राज्यातील कोट्यवधी जनतेला माफक अपेक्षा असते आणि आम्हीही अशा प्रकारची मागणी केली. पण दुदैर्वाने हे सरकार चर्चेला तयार नाही. म्हणूनच नागपूरचे अधिवेशन मुंबईला आणून ते अधिवेशन पाच दिवसाचे करीत आहेत. विदर्भातील जनतेने कॉंग्रसेला जनाधार दिला, विदर्भामध्ये अधिवेशन होण्यासाठी कुठल्याही प्रकारची आग्रही भूमिका दुदैर्वाने काँग्रेसने घेतलेली दिसत नाही. सध्या कॉंग्रेसची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबर फरफट होताना दिसत असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधीमंडळाच्या आवारात प्रसिध्दीमाध्यामांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन मुंबईला आणण्याचे काही कारण नाही. कारण कायदा नागपूर कराराप्रमाणे विदर्भातील जनतेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन नागपूर येथे घेतली पाहिजे असा आग्रही धरला.
नागपूरचे विविध योजना व प्रकल्पांविषयी बजेटमध्ये किंवा पुरवणी मागण्यांसदर्भात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. कारण जर नागपूरमध्ये अधिवेशन होत नसेल तर विदर्भाला किमान काहीतरी मदत करा अशी आमची मागणी आहे. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जास्त बेस विदर्भात नाही. शिवसेनेचाही तेवढा बेस नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसला विदर्भाच्या जनतेच्या मनामध्ये पाडण्यासाठी अशी भूमिका घेतल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहेत. त्यांनी आग्रह करुन विदर्भात अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं परंतु कॉंग्रेसला सरकार चालविताना तसेच सरकारच्या निर्णय प्रक्रियेत कुठलेही महत्त्व देण्यात येत नाही असे सध्या चित्र यावरून दिसत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.