मुंबई-गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आता काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युक्तीची घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की,” गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकसोबत निवडणूक लढणार आहे. आम्ही काँग्रेस सोबत देखील युतीबाबत चर्चा केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही गोव्यात महाविकास प्रमाणे युती करत निवडणूक लढवणार आहोत. जर काँग्रेसला वाटत असेल की, गोव्यात त्यांना स्वबळावर यश मिळू शकते. तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा” असे म्हणत संजय राऊतांनी काँग्रसेला खोचक टोला लगावला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, आम्ही काँग्रेसला युतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रस पार्टी आणि शिवसेना युती करुन गोव्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात येईल, त्यानंतर काही दिवसांनी दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गोव्यात महाविकास आघाडीसोबत काँग्रेस युती करण्यास तयार नसल्याने प्रियंका काँग्रेसवर आक्रमक झाल्या. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “गोव्यात काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत युती करण्यास तयार नाही. काँग्रेस विरोधकांना सोबत घेत नाही, त्यामुळे आणखी फूट पडेल, ज्याचा फायदा भाजपलाच होईल. अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली आहे.
गोवा विधानसभा निवडणूक 2022
गोव्यात विधानसभा निवडणूक ही 14 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर मतमोजणी ही 10 मार्चला होणार आहे. गोव्या सत्ताधारी भाजप असून, त्याविरोधात गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्र गोमंतक पार्टी, काँग्रेस आणि आप, तृणमूल, शिवसेना, एनसीपी हे उतरले आहेत.
2017 साली काँग्रेसला 17 जागा
2017 साली काँग्रेसला 17 जागा मिळाल्या मिळाल्या होत्या. तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 3 जीएफपीतचे आमदार, 3 एमजीपीचे आमदार आणि दोन अपक्ष आणि NCP आमदारांच्या पाठिंब्याने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केला. 17 मार्च 2019 रोजी त्यांच्या निधनानंतर विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.