औरंगाबाद -भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर केला जातो. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे हेच झाले. मात्र भाजपाने इतर उमेदवारांना तिकीट देण्याऐवजी पंकजा मुंडे या चांगल्या उमेदवार असल्याचे सांगत विधान परिषदचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपला चिमटा काढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा त्यांनी रविवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी गोऱ्हे यांनी औरंगाबादला ठाकरे सरकारच्या काळात कसा निधी दिला आहे, त्याचा पाढा वाचवून दाखवला. यावेळी विनोद घोसाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, रेणूकदास वैद्य यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठवाडा आणि औरंगाबादने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात हे लोकांना ऐकायचे आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण विषय असो अथवा अनेक विषयवार मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तसेच औरंगाबाद नामकरण बाबतच्या प्रस्तावबाबत भाजपची ती जुनीच सवय असल्याचे सांगत मराठी भाषेच्या बाबतीतही सातत्याने प्रस्ताव पाठवून त्यामध्ये दोष दाखवत प्रस्ताव परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
ती त्यांची जुनीच सवय असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच राज्यसभेत भाजपने कितीही ताकद लावली तरी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपने केलेल्या टीके विषयी विचारचताच गोऱ्हे म्हणाल्या, औरंगाबाद आणि येथील जनेतेचे शिवसेनेशी वेगळे नाते आहे. या शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहे. त्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही.
मलनिस्सारण, रस्ते आणि पाण्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. एवढेच नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मुख्य ठिकाण आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले शहर म्हणून इथे मराठवाडा मुक्ती संग्रहालय उभारण्यात आले. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी ५० टक्क्याने कमी करत दिलासा दिला. मुबलक पाणी मिळावे यासाठी देखील सरकार, महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
समांतर योजेनेला विरोध केला नसता तर आज पाणीप्रश्न मिटला असता. तेव्हा योजनेला विरोध केला, ती बंद पाडली आणि आता मोर्चा काढतायेत, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या सभेत या सदंर्भात सविस्तर सांगतिलच. संभाजीनगरचा विषय आमच्यासाठी आजचा नाही, तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावर इतरांना राजकारण करायचे असेल ते करू द्या.