मुंबई, दि. ७ मार्च – मी पुण्यात भाषणात एक वक्तव्य केले होते. त्याचा विपर्यास करत माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच पोलिस आधीक्षकांनी हा गुन्हा दाखल केला. जी गोष्ट मी बोललो त्याचा विपर्यास करत गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्या एसपीला केवळ समझ देऊन सोडणे योग्य नाही तर त्यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात पुणे जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष तथा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्यावरील बदली आदेशातील अपमानास्पद उल्लेख प्रकरणी कारवाई करण्याचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, मंत्री महोदय उत्तर देतायत की, त्यांना समज देण्यात आली आहे, ते आम्हाला मान्य नाही. एसपीने एका बदलीच्या आदेशामध्ये लिहिलेय की त्या महिलेचे कुणाशी तरी संबंध आहेत. आणि तुम्ही सांगताय की समझ दिली, दिलगिरी व्यक्त केली. तुम्ही काहीही केलेले चालते. या प्रकरणीही संबंधित एसपीच जबाबदार आहे. एसपीला निलंबित करण्याची मागणी दरेकर यांनी केली.
तरुण शेतक-याची आत्महत्या हे सरकारसाठी लज्जास्पद
सोलापूरातील मगरवाडी येथे सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’, असं म्हणत या तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. ही बाब महाविकास आघाडी सरकारसाठी लज्जास्पद असल्याची टीका करत महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे.
विधानपरिषदेत हा महत्त्वाचा विषय माडंताना दरेकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. यातच सूरज जाधव नावाच्या तरुण शेतकऱ्यांने केलेल्या आत्महत्या केली. शेतकऱ्यांची विज तोडणी करू नये, शेतकरी आत्महत्या करताना सरकार वीज तोडणी करत असून त्यांना अवाजवी वीज बिल पाठवित आहेत, त्यामुळे शेतक-यांची वीज तोडणी थांबवणार नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सूरज जाधवने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ केला आहे त्यात त्याने म्हटलंय, मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीए, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाहीए, असं म्हणत त्याने शेतकरी धोरणाचा निषेध केला. आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. सुरजने वीज तोडणी केल्यामुळे, वीज खंडित केल्यामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगत सरकारवर दरेकर टीकेची झोड उठविली.
मुंबई -गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा
काम पूर्ण होईपर्यंत वाहतकीची पर्यायी व्यवस्था करावी
होळी किंवा अन्य सणाला कोकणात जाताना चाकरमान्यांना ८-१० तास लागतात, लहान मुलांना घेऊन ट्रॅफिकमध्ये ताटकळत राहावे लागते. तेव्हा मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यायी सर्विस रोड किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात ट्रॅफिक अधिकारी आणि कोकणातील संबंधितांशी तातडीने संयुक्त बैठक घेऊन कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी अधिवेशनात केली. सभापतींच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेण्याचे विधानपरिषदेत मान्य केले.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या सदस्थितीबाबत तसेच कोकणवासीय आणि चाकरमान्यांचे प्रवासात होणारे हाल याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाला गतीने पुढे नेणारा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. राज्यकर्त्यांनी ठरवले तर हा महामार्ग वेळेत पूर्ण होऊ शकतो. समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण आहे. मंत्रीमहोदय यांनी ही जबाबदारी केंद्राची की राज्याची हा प्रश्न न उपस्थित करता याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले की, होळीला मोठ्या प्रमाणावर लोक कोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्गाचा हा विषय कोकणवासियांसाठी जिव्हाळ्याचा आहे. कंत्राटदाराला तीन वेळा मुदतवाढ दिली. अजूनही या महामार्गाची कामे पूर्ण झालेली नाहीत. नेमकी त्यामागची काय कारणे आहेत? आतापर्यंत किती खर्च झाला? आणि काम कधी पूर्ण होणार आहे? तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा कामाला विलंब झाल्याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करणार का? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
मागील पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले. आता दोन महिन्यांनंतर पाऊस सुरू होईल. मागे पाऊस पडला तेव्हा रस्त्यावर पाणी तुंबले होते. अर्धवट कामांमुळे हायवेला चिखल निर्माण होतो व अपघात घडतात यासंदर्भात सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? त्यासंदर्भात काय दक्षता घेतली आहे? सिमेंटचे रस्ते तयार करताना या रस्त्याखालील पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यावर कोकणात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे निर्माण झाली आहे असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
शासनाने अशा प्रकारच्या क्रॉस होणाऱ्या नादुरुस्त वाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे का? त्याचा काही आराखडा तयार केलाय का? हा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करणार का? या नादुरुस्त वाहिन्यांमुळे गावागावात आज पाणी मिळत नाही. केंद्र शासन, राज्य सरकार आपण बैठका खूप घेताय. प्रामाणिक प्रयत्नही होतायत पण आता या महामार्गाबाबतची नेमकी सद्यस्थिती काय आहे? कोकणच्या जनतेला आपण कधीपर्यन्त हा महामार्ग उपलब्ध करून देणार आहात, असा प्रश्न लक्षवेधीद्वारे दरेकर यांनी विचारला आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा अशी व्यवस्था सरकारने तातडीने करावी, अशी मागणीही केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकणच्या संबंधितांसोबत संयुक्त बैठक घ्यावी. यंदाच्या होळीसाठी प्रवाश्यांना सुखरूप चार ते पाच तासात पोहचता येईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी असल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली जाईल, जिथे जिथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जागा शोधून पर्यायी मार्ग कसा उपलब्ध करता येईल याकडे लक्ष दिलं जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे.