नवी दिल्ली -2009 साली वनखात्याच्या जमिनीवर रश्मी ठाकरे यांनी अलिबागमध्ये 19 बंगले बांधले. अन् संजय राऊत म्हणतात की, त्याठिकाणी काहीच नाही. मग 2013 पासून आतापर्यंत रश्मी ठाकरे टॅक्स का भरतात? असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना प्रतिप्रश्न विचारला आहे. जर तुम्ही त्या बंगल्याचे मालक नाहीत तर मग तुम्ही कर कशाला भरला? वाधवान आणि कंपनीशी माझा आणि माझा परिवाराचा काहीच संबंध नाही. माझ्यावर संशय असेल, तर माझी खुशाल चौकशी करा. असे किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली.
पुढे सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार नाटकं करुन जनेतची दिशाभुल करत आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पीएमसी बँक घोटाळा किरीट सोमय्या यांनी समोर आणला. संजय राऊत का चौकशीसाठी गेले नाहीत? तुम्हाला चौकशी करायची असेल, तर खुशाल चौकशी करा. अलिबागमध्ये 2009 मध्ये वनखात्याच्या जमिनीवर 19 बंगले बांधण्यात आले, आता राऊत म्हणतात की, ते बंगले तिथे नाहीत. हे बंगले चोरी गेले आहे, की राऊत खोटे बोलतात. असे सोमय्या म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, अन्वय नाईक यांनी हे बंगले 2008 साली बांधले होते. त्याचा सर्व टॅक्स रश्मी ठाकरे भरतात. टॅक्सची रक्कम आरटीजीएस झाली आहे. ग्रामपंचायतीकडे घर नावावर करण्यासाठी देखील अर्ज करण्यात आला होता. स्वत: 19 बंगल्याप्रकरणी रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितली होती. मात्र खुन्नस काढण्यासाठी संजय राऊत दिशाभुल करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हत्या झाली
कोरोना काळात ठाकरे सरकारने बोगस कागदपत्रे देऊन कोरोना सेंटरचे कंत्राट घेतले. त्यात कित्येक कोटींचा भ्रष्टाचार झाला. आता मी त्याचे घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यामुळे ते हे सर्व प्रकार करत आहे. कोरोना सेंटरवर संजय राऊत काहीच बोलत नाहीत. पण तुमची घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.