मुंबई-
मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. “मुंबईचं प्रेम सगळ्यांना आहे, ते बोलायला नको. ते प्रेम कामात दिसलं पाहिजे. तुमचं मुंबईवर प्रेम असेल, मुंबईकरांवर प्रेम असेल तर बुलेट ट्रेनला कांजूरची ओसाड जमीन का देत नाहीत?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईचं प्रेम सगळ्यांना आहे. ते बोलायला नको, पण कामात प्रेम दिसलं पाहिजे. मी म्हणतो मेट्रोच काय पण आणखी काही कामं केली असतील तर सगळ्यांचं श्रेय जे जे ओरडतायेत त्यांना देऊन टाकायला मी तयार आहे. तुम्ही मेट्रोवरील प्रेम दाखवत आहात, मात्र बुलेट ट्रेनचा आग्रह सुरू आहे. अजित पवार आणि आम्ही सगळे चर्चा करतो, मुंबईची लाख मोलाची जमीन जिथे आम्ही आर्थिक केंद्र करत होतो ती जागा यांनी बुलेट ट्रेनसाठी घेतली. या बुलेट ट्रेनचा मुंबईकरांना उपयोग काय?”“सध्या होऊ घातलेली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई होणार आहे. त्याचा मुंबईकरांना काय उपयोग आहे? तुमचं मुंबईवर प्रेम असेल, मुंबईकरांवर प्रेम असेल तर कांजूरची ओसाड पडलेली जमीन बुलेट ट्रेनला का देत नाहीत? ती जमीन बुलेट ट्रेनला दिली तर लाखो कोट्यावधी वाचतील. ती जागा आम्हाला द्या. आपण बदलापूर अंबरनाथपर्यंत जाऊ शकतो. ती जाण्याची वेळ एकदिवस येणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईच्या पंपिंग स्टेशनसाठी जागा मागत आहोत ती द्यायला तयार नाहीत. धारावीच्या पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन मागत आहोत ती द्यायला तयार नाही. यानंतर आम्ही काही केलं की आम्हीच केलं म्हणतात. मग तुम्ही केंद्राकडे अडलेल्या या गोष्टी करा ना. केंद्रात सरकार तुमचं आहे, तर मग तुम्ही मुंबईसाठी या गोष्टी का करत नाहीत. अडलेले अनेक प्रकल्प आहेत. ते मार्गी का लावत नाहीत. त्यामुळे याचं श्रेय असेल तर मुंबईकरांच्या कष्टाचं हे श्रेय आहे.“महाराष्ट्र कर गोळा करण्यात देशातील क्रमांक एकचं राज्य आहे. मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पाठकणा आहात. पण त्या बदल्यात मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळतं? तुम्ही मागा, आम्ही आमची मर्जी असेल तेव्हा देऊ असं नाहीये. आम्ही कोणाकडे भीक मागत नाही. आम्ही आमचा न्याय हक्क मागतो आहे. या न्यायहक्कासाठी लढायची वेळ आली तर आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. हेच छत्रपतींनी आम्हाला शिकवलं आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

