जळगाव-राज्यातील महिलांवर यानंतर हात उचचला तर हात तोडून हातात देईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने पाहायला मिळाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जळगावमध्ये वाढत्या महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. राज्यातील प्रत्येक महिलेचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. मात्र यापुढे राज्यात कुठल्या पुरुषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल. त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे.
केंद्र सरकार महागाई कमी करण्याच्या नावावर सत्तेत आले आहे. मात्र गेली 8 वर्षे महागाईंचा आलेख वाढता दिसत आहे. आम्ही केंद्रात सत्तेत असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रुपये इतका होता. तेव्हा मोदीजी म्हणायचे “बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार मोदी सरकार”. आता गॅस सिलिंडरचे दर १००० रुपये झाले आहेत. त्यामुळे “बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार किसकी सरकार?” असा सवाल सुप्रियाताईंनी केला.धरगुती गॅस असो की, इंधर दरवाढ या मुळे देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मात्र त्यावर सरकार काही करणार नाही असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.देशात महागाईऐवजी जानेवारी महिन्यात हिजाबचा मुद्दा उचलला गेला, फेब्रुवारीत काश्मीर फाईल्सचा प्रचार केला गेला, मार्च महिन्यात भोंगे, लाऊडस्पीकर आले, एप्रिल महिन्यात हनुमान चालिसा गायली गेली आणि आता मे महिन्यात ज्ञानवापी मंदिराचा मुद्दा उचलला जात असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या.केंद्र सरकारने एक लक्षात ठेवावं की, कोरोना काळात कोणताही माणूस उपाशीपोटी मृत्यू पावलेला नाही. याचं सर्वात जास्त श्रेय हे शेतकऱ्याला जातं. कोरोना काळात लोक शहरांऐवजी गावाकडे पळत होते. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात सोमवारी (काल) स्मृती इराणींचा कार्यक्रम होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार व स्मृती इराणी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. आणि आक्रमक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी भाजपच्या 3 जणांविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.