पुणे- काल आपल्या भाषणात ,आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘देवेन्द्रजी मी परत कोल्हापूरला जाईल , माझ्या विरोधकाना सांगा … असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय खळबळ उडाली .उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसह सर्वांनी दखल घेत टीकेची झोड उठविल्यानंतर आज याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले कोथरूड चे आमदार पाटील यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून यावर स्पष्टीकरण करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …
पुणे येथे प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण, देवेंद्र फडणवीसजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करताच दुसर्या दिवशी त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, असा सवाल विचारला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी, हुरळून जाऊ नका, पक्षाने एका मिशनवर पाठवले आहे, असा टोला दिलाय. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचाच शब्द अंतिम आहे, असे सूचवत अजित पवार यांना खोचक टोलाही पाटील यांनी हाणला आहे.
माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये. तसेच घाबरूनही जाऊ नये.
मी कुठे जाणार नाही. मी इथे राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असे पाटील म्हणाले.
माझ्या पक्षाने मला एक मिशन दिलं होते. त्यामुळे मी इथे आलोय. मिशन पूर्ण झाले की परत कोल्हापूरला जाणार. हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.तसेच, विरोधक बाहेरचे आहेत. त्यांना माझं मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील पुण्यातून गेलेले बरे असे त्यांना वाटतंय.
अजित पवार यांना आमच्या पक्षाचं काय पडलंय? त्यांनी जरा त्याचं बघावं. त्यांनी काय म्हटलं यांच्याशी माझा काही संबंध नाही. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, त्यांनी त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मी वारंवार म्हटलंय की, उद्या महाराष्ट्रात काही मोठी पोझिशन देण्याची वेळ पवार यांच्यावर आलीय, तर ते कोणाला देणार आहेत? हे त्यांनी पवारसाहेबांना विचारुन घ्यावं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावलाय.
पाटील यांना कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील सेफ मतदारसंघ निवडल्याच्या आरोपांना नेहमी सामोरे जावे लागते. त्यामुळे पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असे वक्तव्य केले होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपला पुणेकर भेटला नाही का? असाही प्रचार केला गेला.
या निवडणुकीमध्ये पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागलाय. यावर पाटील यांनी मी आज कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयाराय. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य हि केले होते. पुण्यामध्ये सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवलीय. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होते.
…म्हणून मी पुण्यात राहिलोय
माझी बॅग भरलेली आहे. आम्हाला पक्ष सांगेल त्या ठिकाणी जावे लागतंय. मी राज्याचा अध्यक्ष आहे. मला एखाद्या जिल्ह्याचा किंवा भागाचा विचार करता येत नाही. त्यामुळे मी पुण्यामध्ये राहिलो काय? कोल्हापूरला किंवा नागपुरात राहिलो काय? काहीच फरक पडत नाही, असे देखील ते म्हणाले