हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आज सकाळी सकाळी प्रवेशाच्या कार्यक्रमापूर्वी हार्दिक पटेल याने केलेले ट्वीट मोठे चर्चेचा विषय ठरणारे आहे.
पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे नाव पुढे आले.पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केले. त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी आक्रमक होत भाजपा सरकारशी संघर्ष केला. शिक्षाही भोगली. त्यानंतर हार्दिक यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. आणि आता त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश करत आहेत. हार्दिक यांच्या भाजपा प्रवेशानंतरच्या घडणाऱ्या कृतींवर त्यांचे पाटीदार आंदोलनातील सर्व सहकारी लक्ष ठेवून असणार आहेत. हार्दिक पटेल त्यांच्या आंदोलनातील काही प्रमुख मागण्या आता भाजपा सरकारकडून कशा पूर्ण करून घेतात याकडे यावर त्यांच्या सहकाऱ्यांची पुढची भूमिका अवलंबून असणार आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समिती ( पीएएएस) च्या नेतृत्वाखाली २०१५ साली झालेल्या आंदोलनानंतर अखेसरीस सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. पण, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने पाटीदार आंदोलकांवर देशद्रोहाच्या आरोपासह अनेक फौजदारी गुन्हे दाखल केले. या आंदोलना दरम्यान १४ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हे आंदोलन शांत करण्यासाठी सरकारने प्रतिसाद देत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही लोकांवरील गुन्हे मागे घेतले तर काही लोकांवर अजूनही गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासह आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या घरातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी अजून कायम आहे.