पुणे- एका डिजीटल माध्यमावरी चर्चेत बोलताना ‘घटना समुद्रात बुडवा’ हे वक्तव्य संदर्भासहित ऐकावे. यावर माझी भूमिका मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो.
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येकाला न्याय मिळावा अशा हेतूने घटनेची निर्मिती केली आहे. विकास आराखड्यासाठी महापालिकेला मिळालेले अधिकारही बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेने महापालिकेला दिलेले आहेत, त्या घटनादत्त अधिकाराचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, याचा अर्थ त्यांचीच कृती ही घटनेचा अवमान करणारी आणि घटनेला किंमत नाही हा संदेश देणारी आहे. त्यांच्या या कृतीविषयी असलेला त्रागा माझ्या शब्दातून व्यक्त झाला आहे.
बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या घटनेमुळेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकारणात संधी मिळालेली आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. घटनेचा अवमान करण्याचा हेतू माझ्या स्वप्नात देखील येउ शकत नाही. माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर देतां येत नसल्याने माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जाते आहे. विकास आराखड्यासंदर्भात पुणे महापालिकेच्या घटनादत्त अधिकारांबद्धल मी बोलतच राहील. माझ्या एखाद्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मी कधीही यशस्वी होउ देणार नाही.
तथापी माझ्या तोंडातून निघालेल्या वक्तव्याबद्धल दिलगिरी व्यक्त करण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्य घटना माझ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र, वंदनीय आणि अनुकरणीयच आहे. असे स्पष्टीकरण सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिले