Home Blog Page 528

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन

राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली विशेष प्रार्थना

नाशिक, दि. २३ मे २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान, चांदवड येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. या भक्तिपूर्ण प्रसंगी त्यांच्या सोबत त्यांची भगिनी जेहलम जोशी देखील उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी रेणुका मातेच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसराची पाहणी करत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दोघींचे स्वागत करत देवीच्या प्रसादाने त्यांचा सत्कार केला. डॉ. गोऱ्हे यांनीही श्रद्धेने देवीला साडी व हार अर्पण करून ओटी भरली आणि देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

यावेळी परिसरातील नागरिक, महिला कार्यकर्त्या आणि भक्तगण उपस्थित होते.

मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण ‘हाय अलर्ट’वर 

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहा- सीएमडी श्री. लोकेश चंद्र

मुंबई, दि. २३ मे २०२५: अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.  

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (दि. २३) राज्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मुख्यालय व परिमंडलस्तरावर २४x७ आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची लगेचच स्थापना करावी. कोणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले. व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीमध्ये संचालक (संचालन) श्री. सचिन तालेवार यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते उपस्थित होते.

यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची दररोज हजेरी सुरू आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सध्या स्थिर असले तरी त्याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी ही बैठक झाली. दरम्यान, शुक्रवार (दि. २३) पासून मुख्यालय व राज्यातील आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने व वेळेत सुरू करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. काम करताना वीजसुरक्षेसाठी काळजी घ्यावी. सुरक्षा साधनांचा प्रत्येकवेळी वापर करावा. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे, व्हॉटस् अॅप ग्रुप्स, ट्वीटर व सोशल मिडिया, प्रसिद्धी माध्यमांद्वारे ताबडतोब कळविण्यात यावे. खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीबाबत मुख्यालयाकडून पर्यवेक्षण करण्यात येत आहे. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू झाला नाही, तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी क्षेत्रीय वरिष्ठ अभियंत्यांनी मोठ्या व गंभीर बिघाडाच्या ठिकाणी स्वतः जाऊन दुरूस्ती कामांना वेग द्यावा. तसेच महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे स्पष्ट निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

वादळवारा व मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईलसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी. पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी संबंधित अभियंते, कर्मचाऱ्यांना तसेच सर्व एजन्सींना मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहण्याची सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली. या पद्धतीने मान्सूनच्या आगमनानंतर पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणच्या यंत्रणेने सज्ज राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पुणे, दि. २३: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी काळातही सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची हवामान विभागाची माहिती पाहता महानगरपालिकेने कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. नालेसफाईची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत. पावसादरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते असे नागरी भाग व झोपडपट्ट्यांची माहिती महानगरपालिकेकडे असते. आपत्तीकाळात व पूरस्थितीमध्ये बाधितांना सुरक्षित जागी हलविण्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करावी.

निवारा केंद्रात नागरिकांना हलवण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. त्या ठिकाणी हलविण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न, निवास व्यवस्थेसह अंथरून पांघरून आदी सोई- सुविधा व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. भविष्यात या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व ती दक्षता घेण्यात यावी. नागरिकांची घरे, इतर मालमत्ता आदींचे नुकसान झाल्यास महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच बाधितांना १०० टक्के मदत मिळेल याची दक्षता घ्यावी.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाने पुरेशी आधीच माहिती द्यावी. आपत्ती काळात पावसाचे, पूरस्थितीच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेऊन ते नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करावे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची तयारी करावी. वाहतूक कोंडी होणार नाही आणि रहदारी सुरळीत राहील यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावे. मनपा हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याची काळजी घ्यावी. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाच्या सतत संपर्कात रहावे. तसेच बोटी, मदत साठा आदी तयार ठेवावे, असेही ते म्हणाले.

शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या लगतच्या झोपडपट्ट्यात पुराचे पाणी येऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पांना गती देणे आवश्यक असून भविष्यात सीमाभिंतींचे काम हाती घेणे गरजेचे आहे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

आयुक्त श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष, जलसंपदा विभागाचा कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून २४ तास ७ तास तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, अग्निशमन बाबत फायर क्रू अशी नवीन संकल्पना सुरू केली आहे. हवामान विभागाचा इशारा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र निश्चित केली असून असून तेथे आवश्यक त्या सुविधा, अन्न, निवास व्यवस्थेसाठी अंथरूण, पांघरूण पुरविण्याचे नियोजन केले आहे. पूरपरिस्थिती असलेल्या काळात तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतींनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी केली असून त्यापैकी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५७० कोटी रुपये पवना नदी पूर शमन उपाययोजनांसाठी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. यातून नैसर्गिक नाल्यांचे पुनुरूज्जीवन, पुराच्या धोका कमी करणे, नागरिकांच्या जीविताचे, मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचे संरक्षण, पर्जन्यजल वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची सुधारणा करणे तसेच आदी समग्र पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. आव्हाड, उपायुक्त श्री. बांगर यांनी पोलीस विभागाच्यावतीने वाहतुकीच्या अनुषंगाने, पर्यायी मार्ग तसेच अन्य नियोजनाची माहिती दिली.

जलसंपदा विभागाने त्यांचेकडील पूरनियंत्रण कक्ष, पाणी सोडण्याबाबतचे नियोजन कसे करण्यात येते याची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नागरिकांच्या जीविताचे रक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही व नियोजन आदींची माहिती दिली.

महानगरपालिकेतील उपायुक्तांनी त्यांच्या हद्दीतील नियोजनाची माहिती दिली. त्याचबरोबर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट हल्ला एकनाथ शिंदेंवर टीका

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यात घडणाऱ्या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली आहे.पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात एकनाथ शिन्देंच्या गटात आलेल्या एका माजी आमदाराचा हाथ असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना सपकाळ यांच्या या टीकेला महत्व प्राप्त होते आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातील दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये एका पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून दुसऱ्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, बोगस कागदपत्रे बाबत राष्ट्रवादीचे दीपक मानकर आणि नंतर वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे?

शिंदेच्या सर्व आमदारांची चौकशी करा

हर्षवर्धन सपकाळ यांनी आणखी एका पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. या माध्यमातून त्यांनी शिंदेंच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौ-यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीए कडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी.’

झुडपी जंगलाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील अनेक कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका!

सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबई दि. २३ मे २०२५

विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी काँग्रेसे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर १९९६ च्या निर्णयाच्या धर्तीवरच निकाल दिला आहे. त्यामुळे आता झुडपी जंगलाला वनभूमी घोषित केले असून ती वनविभागाचा हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने २०१४ – १८ काळात अनेक परिपत्रके काढून विकास कामांसाठी जमिनीचा वापर बदलण्याचा प्रयत्न केला आहे त्यालाही या निर्णयामुळे धक्का बसला आहे. तसेच महसूल खात्यात्या अख्त्यारीतील वनजमीन खासगी व्यक्ती संस्था यांनी दिली आहे का? याची पडताळणी राज्याच्या मुख्य सचिवांनी एसआयटी स्थापन करून ती जमीन वनखात्याला परत करावी किंवा सार्वजनिक हिताचा विचार करून हे शक्य नसेल तर शुल्क वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्यांना आणि गोरगरीबांना बसणार आहे. ज्यांची शुल्क भरण्याची कुवत नाही ते बेघर आणि भूमिहीन होणार आहेत.

न्यायालयाच्या निर्णयाने काही मोजक्या लोकांना दिलासा मिळेल पण बहुतांशी लोकांना मोठा फटका बसणार आहे. ऑक्टोबर १९८० च्या नंतर या जमिनींवर झालेले सर्व व्यावसायिक आवंटन अतिक्रमण मानले जाईल त्यामुळे हजारो बांधकामे धोक्यात येणार आहेत. भविष्यात ही सर्व जमिनीचे स्वरूप बदलता येणार नाही. अपवादात्मक स्थितीत बदलण्यासाठीही केंद्र सरकारच्या स्तरावरच बदल करण्यात येईल राज्य सरकारला या संबंधी निर्णय घेता येणार नाही. यामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विकास कामे आणि प्रकल्प उभारणे अशक्यप्राय होणार आहे. उद्योग धंदे उभे राहणार नाहीत, स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार नाहीत. राज्य सरकारने या संदर्भात सहारिया कमिटी नेमली होती. त्या कमिटीने आपला अहवाल दिला होता या अहवालाच्या आधारे सरकारने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली असती तर सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असता. गडचिरोलीच्या सुरजागड प्रकल्पासाठी लाखो झाडे तोडण्यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या सरकार सहज मिळवून देते पण लाखो गोरगरीब जनतेसाठी सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत नाही हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: या भागातून येतात पण त्यांनीही ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही. आता तरी त्यांनी स्वत: याची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अन्यथा पूर्व विदर्भाला विकासापासून वंचित ठेवण्याचे आणि लाखो कुटुंबाना लोकांना बेघर आणि भूमिहीन करण्याचे पातक त्यांना स्वीकारावे लागेल असे पटोले म्हणाले.

मैत्रिणीने बोलवल्याने तो गेला… अन … बनला होस्टेज ..

पुणे : नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी बाल मैत्रिणीने बोलवल्याने तो गेला. परंतु या मैत्रिणीने पती आणि इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करुन बाथरुममध्ये डांबुन ठेवले. खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरुन मेसेज केला. कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चार तासात या तरुणाची सुटका करुन चौघांना गजाआड केले.

प्रवीण जगन्नाथ लोणकर (वय ३९, रा. कोंढवा खुर्द) अशी सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोनल ऊर्फ सोनी कापरे ऊर्फ कटके (वय ३५, रा. सनश्री सनटेक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द), अतुल दिनकर रायकर (वय ३८), रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द) आणि सुरेश ऊर्फ कुरेश कुमारस्वामी हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील प्रवीण लोणकर यांना त्यांची बालपणीची मैत्रीण सोनल ऊर्फ सोनी रायकर हिने मंंगळवारी सायंकाळी तिचा एनआयबीएम रोडवरील फ्लॅट पाहण्यासाठी व चहासाठी बोलावले़ लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळयात मिरची पुड टाकून जखमी केले. त्यावेळी तिचा पती अतुल रायकर व इतर साथीदार हे फ्लॅटच्या बाहेर दबा धरुन बसले होते. त्यांच्या मदतीने सोनी हिने प्रवीण लोणकर यांना मारहाण करुन त्यांच्या तोंडात बोहा कोंबला. त्याचे हातपाय दोरीने बांधुन त्यांना बाथरुमध्ये डांबुन ठेवले. त्यांच्याकडून एटीएम कार्ड व मोबाईल काढून घेतला. त्यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज केला की, ‘‘घरातील दागिने व पैसे काढून ठेव. मी एकाला आपल्या घरी ते घेऊन येण्यासाठी पाठवत आहे’’ हा मेसेज पाहून त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. परंतु, व्हिडिओ कॉल आला नाही. काहीतरी गडबड असल्याची शंका त्यांना आली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांना कळविले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ दखल घेऊन लोणकर यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

प्रवीण यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन पठाण, सुकेशिनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानुसार एनआयबीएम रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीतील एका फ्लॅट मधून डांबून ठेवलेल्या प्रवीण लोणकर यांची सुटका केली. आरोपींविरोधात खंडणी, अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मनोज पाटील , पोलीस उप-आयुक्त परि.०५ डॉ. राजकुमार शिंदे सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, सहा. पोलीस निरीक्षक मोहसिण पठाण, सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, व पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी केली आहे.

मराठी नाईटिंगेल:मीना घोडविंदे

परिचारिका म्हटले की, आपल्या डोळ्यापुढे लगेच एखादे रुग्णालय आणि रुग्णाजवळ त्याला प्रेमाने औषध ,इंजेक्शन देणारी, सलाईन लावणारी पांढऱ्या शुभ्र गणवेशातील एका प्रेमळ स्त्रीची मूर्ती उभी राहते.अशाच एक लोकप्रिय, रुग्णांची अतिशय मनोभावे सेवा केलेल्या परिचारिका
सौ मीना घोडविंदे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी

मीनाताई अवघ्या दहा वर्षांच्या असताना त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. त्यामुळे वडिलांनी;रामचंद्र वनगे
त्यांना जाणीवपूर्वक सुशिक्षित, सुसंस्कारी, सेवाभावी घडवले.१९५० च्या दशकात वडिलांचे ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध कापड दुकान,अन टेलरिंग जेन्टस क्लोथ शॉप होते. मीनाताईना त्यांना दुकानात मदत करावी लागत असे. घरकाम, शाळा याबरोबरच मीनाताईंनी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक बक्षिसे मिळवली.त्या अकरावी बोर्डाची परीक्षा पास झाल्या आणि त्यांनी स्वतःतील सेवाभाव ओळखून ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला. तेथेही त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत.
पुढे तिथूनच त्यांची वर्कर्स टीचर्स ट्रेनिंग साठी निवड झाली.त्या कुर्ला बोर्ड येथे प्रशिक्षणास जात असत.तेथे निरनिराळ्या संस्थातून ४० जणी प्रशिक्षणासाठी येत असत.

मीनाताईंचा नर्सिंगच्या चार वर्षांच्या प्रशिक्षणात त्या चारही वर्षे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.पुढे,बरीच वर्षे त्यान्च्या उत्तरपत्रिका शिकाऊ परिचारिकांना वाचण्यासाठी ठेवल्या जात असत.शिवाय या प्रशिक्षणात त्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत राहिल्या.
प्रत्येक स्पर्धेत त्यांचे बक्षीस ठरलेलेच असायचे.रांगोळी स्पर्धा, नृत्य, नाट्य, गायन, हस्ताक्षर ई. स्पर्धेत त्या अग्रणी असत.

नर्सिंग चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स म्हणून हॉस्पिटल प्रशासनानेच कायम स्वरुपी आदेश देऊन मीना ताईंना रुजू करून घेतले.सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या प्रसूती कक्षामध्यें सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती मातेला धीर देत, तणावमुक्त करत आश्वस्थ करीत असत.अत्यंत संवेदनशिलतेने, अगदी शेवटच्या क्षणाला प्रसूती प्रक्रिया पूर्ण होताना, नवजात शिशुला कौशल्याने हाताळणे आणि इतर सर्व कामे त्या शास्त्रोक्त पद्धतीने करत असत. नवशिशूला स्वच्छ करत त्या मातेच्या जवळ ठेवत, अन स्तनपानाचे तंत्र मातेला शिकवत असत. त्यांच्या या सर्व कौशल्यपूर्ण कामाचे निरीक्षण केवळ शिकावू परिचारिकाच नव्हे तर शिकावू डॉक्टर्ससुद्धा करीत असत. कमालीची सहनशीलता, सहजता, नीटनीटकेपणा, स्वच्छता या मीनाताईंच्या गुणांचे सर्व कौतुक करीत असत.
प्रसूती कक्षातच त्यांना सातत्याने १० वर्षे सेवा करता आली.या दरम्यान त्यांनी जवळपास १० हजार गरीब महिलांच्या कौशल्याने प्रसूत्या
केल्या.

विवाहानंतर मीनाताईंच्या
३ पाळ्यांच्या नोकरीमुळे सासऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या ठाण्यातच राहिल्या. पती कला शिक्षक असल्याने शाळेत चित्रकला, संगीत कला शिकवीत असत. शिवाय मुलांना ते खाजगीरित्याही शिकवत असत. तसेच मराठी भक्तीसंगीत व सुगम संगीताचे कार्यक्रम स्वतंत्ररित्या सादर करत असत .

मीनाताईंच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ३ वर्षांनी
दुसरा मुलगा झाला.

इतर स्त्रियांच्या बाळंतपणासाठी सदैव तत्पर असलेल्या मीनाताईंनी स्वतःच्या बाळाकडेही पूर्ण लक्ष दिले.म्हणूनच त्यांनी त्यांची प्रसूती रजा संपल्यावर शिल्लक होती ती पगारी रजा , तीही संपल्यावर बिन पगारी रजाही घेतली .पण आपल्या मुलांना स्वतःच्या नजरेखाली वाढवले .मुलांना जेव्हा स्वतः ची अंघोळ स्वतः करणे ,कपडे घालणे , प्रातर्विधी करणे ही कामे जमू लागली, तेव्हाच त्या मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीस जाऊ लागल्या. ड्युटीवर जाताना मुले पाळणाघरात ठेवायची व घरी येताना घेऊन यायची हा त्यांचा नित्यक्रमच झाला. त्यात त्यांची ठाणे जिल्ह्यातली शिबिरातील कामाची वेळ असली किंवा त्यांच्या पतीस रात्रीच्या गाण्याच्या कार्यक्रमास जायची वेळ आली तर मुले पाळणाघरातच झोपी जायची. त्यामुळे त्यांची खूपच तारेवरची कसरत व्हायची. तेव्हा घरी फोनची सोयही नव्हती. त्यामुळे हे पतिपत्नी एका वहीत एकमेकांसाठी निरोप लिहून ठेवत असत.त्यात परत त्यांच्याकडे गॅसही नव्हता. त्यामुळे सर्व स्वयंपाक त्यांना स्टोव्ह वरच करावा लागत असे. कामाव्यतिरिक्तचा सर्व वेळ हे दोघेही मुलांसाठीच देत असत.३ पाळ्यातील परिचारिकेची नोकरी सांभाळत मुलांना घडविणे ही फार तारेवरची कसरत होती. पण मीनाताईं सातत्याने मुलांचे संस्कारवर्ग, खेळ , अभ्यास यात त्यांच्या सोबत स्वतःही सतत गुंतून राहायच्या. त्यामुळे मुले सरळमार्गी राहून कायम प्रथम
क्रमांक मिळवित राहिली. पुढे दोघांचेही शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या गुणवत्तेवर नोकरीस लागले.

आजच्या अती महत्वाकांक्षी आईवडिलांनी लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे, मीनाताईंनी स्वतःची कुठलीही मते मुलांवर न लादता त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला नेहमी वाव दिला. त्यामुळे दोन्ही मुलांना ,त्यांच्या मनाप्रमाणे स्वतःचे जीवन घडविता आले. या सर्व कष्टांचे फळ म्हणजे मुले तर चांगली घडलीच पण मीनाताईना डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या “आई महोत्सवात आदर्श आई” चा पुरस्कार प्रथम क्रमांकाने मिळाला अन जणू त्यांच्या जीवनाचे अन आईपणाचे सार्थकच झाले.आज त्या दोन गोंडस नातवंडाच्या आजी आहेत.त्यांच्या घरात गोकुळ नांदत आहे .या आनंदासोबत त्या व त्यांचे पती स्वतःचे छंद आवडीने जोपासत आहेत.

मीनाताईंच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन आरोग्य खात्याने त्यांचे नाव प्रथम क्रमांकाने राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले होते.या बरोबरच त्यांच्या सेवाभावी सेवेबद्दल त्यांचा शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक संस्था, ई. मधून अनेकदा गौरव करण्यात आला आहे.
पूर्ण सेवाभावी वृत्तीने ४१ वर्षे सेवा बजावून त्या नियत वयोमानाप्रमाणे ५८ व्या वर्षी निवृत्त झाल्या .

नोकरीतून सन्मानाने निवृत्त झाल्यावर आरामदायी जीवन न जगता मीनाताईंनी स्वतःला सामाजिक आणि साहित्यिक सेवेत मनस्वीपणे झोकून दिले आहे.अनेक गरजूंना त्या मदत करीत असतात.मदत करण्याची सहज प्रवृत्ती अन मनमिळावू स्वभाव यामुळे त्या खूप लोकप्रिय आहेत. स्वतःतील कलागुणांना विकसित करत जीवन जगण्याची किमया साधत त्या आनंदयात्री ठरल्या आहेत.

समाजात जनजागृती करण्यासाठी मीनाताई महिलांचे स्वातंत्र्य, हक्क, कर्तव्य, विद्यार्थ्यांवर संस्कार मूल्ये व शिक्षणाचे महत्व रुजविणे यासाठी सातत्याने लेखन करीत असतात. विविध काव्य स्पर्धेत, निबंध स्पर्धेत त्या सहभागी होतात आणि पुरस्कारही मिळवितात.

मीनाताईंच्या हाताखाली
४८ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून राहिलेल्या आणि नंतर त्यांच्या जीवलग मैत्रीण बनलेल्या सौ चारुशीला गायकवाड मीनाताईंविषयी बोलताना म्हणतात,
“मीनाताईंचे कौशल्यपूर्ण काम बघत बघत आम्ही परिचारिकेचे काम आत्मसात करीत गेलो. नर्सिंगच्या सेवेसोबतच आपल्यातील कला गुणांना वाव देणे, विविध सामाजिक साहित्यिक उपक्रमात सहभाग घेणे ,हे त्यांचे व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण पहात आम्हीही नकळत घडत गेलो.”

अशा या अतिशय निष्ठेने परिचारिकेची सेवा बजाविलेल्या, निवृत्ती पश्चात सामाजिक,साहित्यिक सेवेत मनस्वीपणे काम करीत असलेल्या मराठी नाईटेंगल सौ मीनाताई वनगे घोडविंदे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


लेखन:देवेंद्र भुजबळ
-9869484800

हगवणे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घाला – संदीप खर्डेकर.

वैष्णवीची आत्महत्या ( की हत्या ) बाळ पळविणे, बाळाला अज्ञाताच्या हाती ताब्यात देणे, मयुरी चा छळ करणारे ह्या सर्वांना संघटित गुन्हेगारी ची कलमे लावून मोका लावावा – संदीप खर्डेकर

पुणेवैष्णवी हगवणेच्या शरीरावरील जखमा बघता ही हत्या का आत्महत्या असा संशय निर्माण होत असून या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. तसेच मोठी सून मयुरी हिची तक्रार असताना देखील कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्याने स्थानिक पोलिसांबाबत जनतेच्या मनात संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा अन्य यंत्रणेकडे सोपवावा. सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या सर्व भगिनींना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आरोपी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालणे ही शिक्षा सर्वोत्तम असेल. त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील नागरिकांनी, गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी अशी क्रूर कृत्य करणाऱ्यांवर बहिष्काराचे अस्त्र वापरावे. तसेच यापुढे हुंडाबळीच्या प्रकरणात मुलीच्या सासरच्यांना “मकोका” लावण्याची तरतूद केल्यास जरब बसेल व असे प्रकार घडणार नाहीत. किंबहुना असे गैरप्रकार करणारे दहा वेळा विचार करतील, असेही संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.

हुंड्यापायी विवाहितेचा अशाप्रकारे अमानुष छळ करणे चुकीची बाब आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबातील सर्व नराधमांना कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

साडेनऊशे पेक्षा अधिक अनाधिकृत होर्डिंग पीएमआरडीएची कारवाई सुरु-विरोध केला तर पोलीस कारवाई -आयुक्त

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत केलेल्या सर्वेक्षणात साडेनऊशे पेक्षा अधिक अनाधिकृत होर्डिंग असल्याचे समोर आले आहे. त्यावर कारवाई सुरू असून या कारवाईला विरोध / अडथळा निर्माण करणाऱ्याविरुद्ध थेट गुन्हे नोंदवणार असल्याची भूमिका पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली आहे. महानगर आयुक्त यांनी गुरुवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत, पीएमआरडीए हद्दीतील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले.

पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आले आहे. त्यातील जवळपास ९० होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. रहदारीस अडथळा आणणाऱ्या तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा अनाधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२६) धडक कारवाईचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक पालखी मार्गावरून जात असतात. या मार्गावरील अनाधिकृत होर्डिंग तातडीने काढावेत. यासह उर्वरित होर्डिंगसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून ते दोन महिन्यात कसे काढले जातील, त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी डॉ. म्हसे यांनी दिले. पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून पीएमआरडीए हद्दीतील नालेसफाईला प्राधान्य देत नदी – नाल्याचा प्रवाह मार्गात असलेले राडारोडा दूर करावा. जेणेकरून त्या हद्दीतील नागरिकांना पुराचा धोका निर्माण होणार नाही.

यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, रवींद्र रांजणे यांच्यासह अनधिकृत होल्डिंग काढणाऱ्या संबंधित एजन्सीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हानी झाल्यास गुन्हा नोंदवणार
ज्या ठिकाणी अनाधिकृत होडींमुळे कुठली मनुष्यहानी किंवा इतर काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित जागामालक आणि जाहिरात एजन्सीला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत सणसवाडी आणि भुकूम या ठिकाणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

ज्युनिपर ग्रीन एनर्जीने अंकुश मलिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली नियुक्ती

गुरुग्राम,: ज्युनिपर ग्रीन एनर्जीने अंकुश मलिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

वीज क्षेत्रात 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले अंकुश मलिक हे नेतृत्वक्षमता, धोरणात्मक अंमलबजावणी आणि सखोल औद्योगिक ज्ञान यासाठी ओळखले जातात. 12 नोव्हेंबर 2018 पासून त्यांनी ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या प्रगतिपथावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, 30 एप्रिल 2024 रोजी त्यांची मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून संचालक मंडळात नियुक्ती झाली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे कंपनीच्या शाश्वत भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा समाधान पुरविण्याच्या मिशनला अधिक गती मिळाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या नव्या भूमिकेत श्री. अंकुश मलिक हे कंपनीच्या दीर्घकालीन वृद्धीच्या धोरणाचे नेतृत्व करतील, तसेच कंपनीच्या सर्व कामकाजांवर, व्यवसाय विकासावर, प्रकल्प विकासावर, बांधकाम प्रक्रियेवर आणि नियामक बाबींवर देखरेख ठेवतील. भारताच्या विकसित होत असलेल्या नवीकरणीय ऊर्जा बाजारात आपली उपस्थिती आणि प्रभाव वाढविण्याच्या उद्दिष्टाने ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या वाटचालीत ही नियुक्ती एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना अंकुश मलिक म्हणाले, “ही जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत सन्मान वाटतो आणि माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे. भारत सध्या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे आणि अशा वेळी ज्युनिपर ग्रीन एनर्जी भारतात वेगाने वाढणाऱ्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. आपल्या सर्व भागीदारांसोबत आणि टीमसोबत काम करत दीर्घकालीन व शाश्वत मूल्यनिर्मिती करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

अंकुश मलिक हे आयआयटी दिल्ली आणि आयआयएम लखनौचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी ऑरेंज रिन्युएबल पॉवरमध्ये नेतृत्व पदे भूषविली असून, आयसीआयसीआय बँक आणि लांको इन्फ्राटेकमध्येही मोलाचा अनुभव मिळविला आहे. व्यवसाय विकास, नियामक बाबी आणि कार्यात्मक धोरण, यामध्ये त्यांना सखोल ज्ञान असून, ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत.

श्री. मलिक यांचे त्यांच्या नव्या भूमिकेत स्वागत करताना मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पराग अग्रवाल म्हणाले, “अंकुश यांची CEO पदावर झालेली बढती ही त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे नैसर्गिक extension आहे. क्षेत्रातील त्यांचा सखोल अभ्यास, अंमलबजावणीवर असलेला भर आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व या सर्व गुणांमुळे ते ज्युनिपर ग्रीन एनर्जीला पुढील वाढीच्या टप्प्यावर नेण्यासाठी योग्य निवड ठरतात. भविष्यकालीन आणि सक्षम ऊर्जा कंपनी उभारण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची मला उत्सुकता आहे.”

युरेका फोर्बज् तर्फे स्वच्छ, आरोग्यदायी भारतासाठी श्रद्धा कपूरची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्ती

ही धोरणात्मक भागीदारी भारतातील घरांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा देणाऱ्या ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे

आरोग्य आणि स्वच्छता उद्योगातील भारतातील आघाडीची कंपनी युरेका फोर्बज् लिमिटेडने त्यांच्या प्रतिष्ठेच्या व्हॅक्युम क्लिनर्सच्या श्रेणीसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरला ब्रँड अॅम्बेसडर म्हणून घोषित केले आहे. चार दशकांहून अधिक काळ लाखो भारतीय घरांमध्ये विश्वासार्हतेने सेवा देणाऱ्या या कॅटेगरी लीडरच्या या सहयोगामुळे युरेका फोर्बज्च्या स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी घेतलेल्या वचनबद्धतेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.

व्हॅक्युम क्लिनिंगच्या क्षेत्रात बाजारपेठेतील अग्रणी आणि चार दशकांहून अधिक काळ जपलेल्या परंपरेसह युरेका फोर्बज्ने भारतीय घरांमध्ये नेहमीच अत्याधुनिक गृह स्वच्छता तंत्रज्ञान आणले असून त्याला अतुलनीय सर्व्हिस नेटवर्कचा आधार आहे. नवीन फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक  व्हॅक्युम क्लिनर्स शक्तिशाली सक्शन आणि वेट मॉपिंग यांचे एकत्रीकरण करून सहजतेने फरशी चकाचक करतात. AI आणि नेक्स्ट-जेन LiDAR तंत्रज्ञानाद्वारे ही स्मार्ट उपकरणे अचूकता, बुद्धिमत्ता आणि अतुलनीय सुविधा पुरवितात. श्रद्धा कपूरसोबत भागीदारी करताना युरेका फोर्बज्चे उद्दिष्ट आजच्या तरुण, शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आहे. ते स्मार्ट आणि आरोग्यदायी जीवनशैलीला महत्त्व देतात. या भागीदारीद्वारे युरेका फोर्बज् घरांना स्वच्छ आणि आरोग्यदायी उपाय सुविधांनी सक्षम करणे हे आपले ध्येय अधिक बळकट करत आहे.

युरेका फोर्बज् सोबतच्या आपल्या सहभागाबाबत बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, “युरेका फोर्बज् कुटुंबाचा भाग होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वच्छ घर हा आरोग्यदायी मन आणि शरीराचा पाया असतो असे मला नेहमीच वाटले आहे. आपण ज्या जागांमध्ये राहतो त्या आपल्या दैनंदिन कार्यक्षमतेवर मोठा प्रभाव टाकतात. युरेका फोर्बज् हा ब्रँड दीर्घकाळापासून स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करत आला आहे आणि स्वच्छ राहणीमान हे आपले कायमस्वरूपी ध्येय असलेल्या ब्रँडसोबत जोडले जाणे मला अभिमानास्पद वाटते. फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक्स सारखी नाविन्यपूर्ण उत्पादने बुद्धिमान तंत्रज्ञान आणि सहज, सुलभता यांचा मिलाफ आहेत. त्याद्वारे युरेका फोर्बज् घरगुती स्वच्छतेचे भविष्य नव्याने परिभाषित करत आहे. मला खरोखर आशा आहे की आपण एकत्र मिळून अधिकाधिक लोकांना ही जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करू शकू.”

युरेका फोर्बज् लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री. अनुराग कुमार म्हणाले, “युरेका फोर्बज् कुटुंबात व्हॅक्युम क्लिनर्सच्या ब्रँड अॅम्बेसडर म्हणून श्रद्धा कपूरचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सजग जीवनशैली, स्मार्ट निवडी आणि उद्देशपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमांना महत्त्व देणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व ती करते. या सर्व गोष्टी आमच्या ब्रँडच्या मूल्यांशी सुसंगत आहेत. युरेका फोर्बज् मध्ये आम्ही 40 वर्षांहून अधिक काळ घरगुती स्वच्छतेच्या उपाययोजनांमध्ये अग्रगण्य आहोत आणि आमच्या नवीन फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक्स रेंजसह आम्ही आजच्या घरांमध्ये सहजतेने मिळवू शकणाऱ्या स्वच्छतेचे स्वरूपच बदलून टाकत आहोत. श्रद्धाचा प्रामाणिकपणा आणि आताच्या काळातल्या भारतीय घरांशी असलेली तिची घट्ट नाळ तिला आमच्या ‘एक स्मार्ट घर, एक स्वच्छ भारत’ या प्रवासासाठी परिपूर्ण सहयोगी बनवते.”

ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनासह युरेका फोर्बज् नेहमीच अशा नाविन्यपूर्ण, सहज समजणाऱ्या आणि कार्यक्षम व्हॅक्युम क्लिनर्सद्वारे बाजारपेठेमध्ये अग्रणी राहिला आहे. हे व्हॅक्युम क्लिनर्स घरगुती स्वच्छता सुलभ आणि प्रभावी बनवतात. रोबोटिक क्लिनर्सपासून डीप-क्लिनिंग व्हॅक्युम्सपर्यंतच्या विस्तृत श्रेणीसह या ब्रँडने आधुनिक घरांच्या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार स्वतःला सतत विकसित केले आहे.

तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं प्रावीण्य ठरते – धीरज घाटे

वस्ती विभागातील मुलांना खेळाचे साहित्य व गोष्टीची पुस्तकं देऊन भाजपा चे नवनिर्वाचित शहर अध्यक्षांचा आगळावेगळा सत्कार – संदीप खर्डेकर.

पुणे :आपला जन्म कोणाच्या घरात झाला, आपण कुठल्या भागात राहतो कुठल्या वस्तीत राहतो हे महत्वाचे नाहीये तर तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं प्रवीण्य ठरते असे भाजपा चे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा इतर अनेक मंडळींनी बालपणापासूनच कामाला सुरुवात केली आणि त्यांनी देशात, राज्यात मोठं कार्य केलं असं ही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी धीरज घाटे यांची शहर अध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार वारजे येथील छत्रपती शाहू महाराज वसाहत येथे सेवाव्रत फाउंडेशन च्या वतीने चालविल्या जाणाऱ्या “वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्पातील” मुलांच्या हस्ते धीरजजींचा सत्कार आणि धीरजजींच्या हस्ते मुलांना खेळाचे साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी धीरजजी बोलत होते.
यावेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप देवकुळे, भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर वस्तीतील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
आम्ही क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतो आणि म्हणूनच धीरजजींच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यापेक्षा त्यांच्या हस्ते गरजू मुलांना आवश्यक वस्तू देऊन त्यांचा सन्मान करणे आम्हाला अधिक योग्य वाटले असे भाजप चे प्रदेश प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकल्पाला भेट दिली तेव्हा मुलांनी आम्हाला खेळाचे साहित्य द्या अशी मागणी केली, त्यानुसार धीरजजींच्या हस्ते क्रिकेट बॅट बॉल, बास्केटबॉल, फुटबॉल आणि गोष्टीची पुस्तकं देण्यात आल्याचे संदीप खर्डेकर आणि मंजुश्री खर्डेकर म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला. तसेच धीरजजींना विविध प्रश्न देखील विचारले.हाच धागा पकडून धीरज घाटे यांनी मुलांशी संवाद साधला आणि ” अनेक मोठ्या कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो पण हा कार्यक्रम आणि येथे झालेला सत्कार मनाला भावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुलांनी स्वहस्ते बनविलेले ग्रीटिंग कार्ड देऊन धीरज घाटेना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण

बारामती,: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शासकीय संस्थेकरिता उद्योजकांच्यावतीने देण्यात आलेल्या पिण्याचे पाणी साठवणुकीकरिता १ हजार लिटर क्षमतेच्या ६० टाक्या वितरित करण्यात आल्या.

पंचायत समिती परिसरात आयोजित कार्यक्रमाच्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गट शिक्षण अधिकारी निलेश गवळी, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, उद्योजक आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक शाळा आणि पशुसंवर्धन दवाखान्यांना १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतील बालक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

आगामी मान्सून काळात स्थानिक पातळीवर स्वच्छता, पाणी, आजारांवर त्वरित उपचार, आवश्यकतेनुसार कीटकनाशकांची फवारणी आदी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात, अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी केल्या.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते शरद सूर्यवंशी, खंडु गायकवाड, सुरेश परकाळे, दिलीप भापकर, प्रशांत जगताप आणि शंकर साळुंखे या उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय आणि पंचायत समिती यांचा संयुक्त प्रयत्न

उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद

बारामती पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने शासकीय संस्थांना पिण्याच्या पाणी साठवणूकीकरिता टाक्या मिळण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यालयाच्यावतीने आवाहन केले असता, उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला या ६० टाक्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.
0000

गोव्यातील ‘अकेशिया पाम्स’ रिसॉर्ट आता संपूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली

महिलांच्या समावेशासाठी क्लब महिंद्रा पुढाकार

मुंबई : ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड’चा प्रमुख ब्रँड असलेल्या ‘क्लब महिंद्रा’ने एक क्रांतिकारी पाऊल उचलत गोव्यातील अकेशिया पाम्स रिसॉर्टचे रूपांतर पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिसॉर्टमध्ये केले आहे. ‘क्लब महिंद्रा’ संपूर्ण पोर्टफोलिओमधील हे पहिलेच असे रिसॉर्ट असून हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

लिंगसमभाव, महिलांचा कामकाजात समावेश आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठीचे योगदान यांविषयी क्लब महिंद्रा किती गंभीर आहे, हे या निर्णयामुळे दिसून येते. या रिसॉर्टचे व्यवस्थापन करण्यापासून क्लबमध्ये येणाऱ्या अतिथींची सेवा करण्यापर्यंतच्या सर्व बाबी केवळ महिलाच सांभाळत आहेत. रिसॉर्ट सांभाळणाऱ्या या महिला विविध पार्श्वभूमीतील आहेत. काहीजणी सुरक्षारक्षक आहेत, तर काहीजणी तांत्रिकी सहाय्य (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) अशा अभियांत्रिकी सेवा सांभाळत आहेत. रिसॉर्टमधील उद्यान, स्वयंपाकघर ही ठिकाणेदेखील महिलांच्याच अधिपत्याखाली आहेत. पारंपरिकपणे पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रांमध्ये या महिला पहिल्यांदाच काम करीत आहेत. रिसॉर्टमधील कामांमुळे त्या आपले कौशल्य विकसित करू शकत आहेत, एवढेच नव्हे तर आपले करिअरही घडवू शकत आहेत. या उपक्रमामुळे आतिथ्य क्षेत्रात अधिक समावेशक व न्याय्य कार्यसंस्कृती निर्माण होईल आणि जागतिक पातळीवर एक आदर्श उभा राहील.

स्थानिक महिला उद्योजिका व कारागिरांशीही क्लब महिंद्रा सहकार्य करत असून त्यांच्या कौशल्याचा आणि उत्पादनांचा रिसॉर्टच्या सेवा व अनुभवांमध्ये समावेश केला जात आहे. यामुळे स्थानिक समुदायाचा विकास व शाश्वत उपजीविका यांनाही चालना मिळत आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाविषयी ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज भट म्हणाले, “गोव्यातील आमचे अकेशिया पाम्स रिसॉर्ट आता पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. लिंगसमभाव, समावेश आणि महिला सशक्तीकरणासाठी आमच्या दृढ बांधिलकीचे हे प्रतीक आहे.”

महिंद्रा हॉलिडेजच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख तन्वी चो़कसी म्हणाल्या, “समाजातील कोणत्याही गटाचा खरा समावेश हा केवळ हेतूपुरता मर्यादित नसावा, असे महिंद्रा हॉलिडेजमध्ये आम्ही समजतो. आम्ही अशा कार्यसंस्कृतीचे वातावरण निर्माण करत आहोत, जिथे महिला केवळ टिकून राहत नाहीत, तर त्यांची प्रगती होते, त्या नेतृत्व करतात आणि अभियांत्रिकी, सुरक्षा व स्वयंपाकघर व्यवस्थापन अशा पारंपरिक पुरुषप्रधान भूमिकांमध्ये आपली छाप सोडतात. ‘क्लब महिंद्रा’चे अकेशिया पाम्स रिसॉर्ट महिलांच्या नेतृत्वाखाली रूपांतरित होणे हे रूढकल्पनांना छेद देणारे, क्षमतेला वाव देणारे आणि संपूर्ण आतिथ्य क्षेत्राला प्रेरणा देणारे पाऊल आहे.”

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पुणे : एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘अभया सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे. वंचित विकास संस्थेतर्फे शनिवार, दि.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील गांजवे चौक येथील पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या  मीनाक्षी नवले, तृप्ती फाटक, देवयानी गोंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वुमनिया पुणे च्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर उपस्थित राहणार असून व आधार संस्थेच्या संस्थापक डॉ. नंदा शिवगुंडे या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संस्थेतर्फे एकल महिलांसाठी अभया मैत्री गट चालविला जातो. अभया मैत्रीगटातर्फे परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग काढणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्याला अभया सन्मान असे म्हणतात. यावर्षी अभयाला ११ वर्षे पूर्ण होत आहेत.

बीड मधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानीक मूल्य समाजात रुजविणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूर मधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबीता धुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्त्वाची लढाई लढणारी कार्यकर्ती रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या स्त्रियांच्या गोष्टी आपण पुस्तकांतून वाचतो. परंतु ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणारी पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व तिच्या पतीवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारी आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘अभया’तर्फे वाचनकट्टा चालविला जातो. ‘ग्रामपरिवर्तन प्रबोधिनी’, मु. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके आपण भेट कार्यक्रमात देण्यात येणार आहे. वंचित विकास ही सामाजिक काम करणारी नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे स्त्रिया, मुले, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजुर, शहरी व ग्रामीण गरीब इ. घटकांमध्ये गेली ३९ वर्षे सुरु आहे. तरी अभया सन्मान या कार्यक्रमास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.