Home Blog Page 427

भररस्त्यात लघुशंका_तरुणाची ओळख पटली, वडील म्हणाले,त्याचे कृत्य लज्जास्पद

आरोपी अल्पवयीन नाहीत, त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना, लवकरच ताब्यात घेऊ; पोलिसांची माहिती

पुणे-पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. गौरव आहुजा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते, त्याने रस्त्यावर नव्हे तर माझ्या तोंडावर लघवी केली आहे, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.या प्रकरणातील आरोपींवर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील व अश्लाघ्य वर्तन करणे, मोटार व्हेइकल कायद्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव म्हणाले.

गौरव आहुजाने पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएमडब्ल्यू कार थांबवून लघुशंका केली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संतापाची लाट पसरली आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिसांवरही टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारावर कार मालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मनोज आहुजा असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लघुशंका करणाऱ्या गौरवचे वडील आहेत. त्यांनी स्वतःच ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्त वाहिनी शी बोलताना आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात पुणे – नगर रोडवर भररस्त्यात लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, दोन मद्यधुंद अवस्थेतील तरुण रस्त्याच्या मधोमध आपली आलिशान कार उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करतो. यावेळी त्याने रस्त्यावरच महिलांसमोर अश्लील चाळे केल्याचेही निदर्शनास येत आहे. त्याच्या सोबत असणारा दुसरा तरुण कारच्या समोरच्या सिटवर बसला आहे. त्याच्या हातातही दारुची बाटली आहे. हे दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांना जाब विचारला असता ते भरधाव वेगात वाघोलीच्या दिशेने निघून गेले.

तो माझा मुलगा असल्याची लाज वाटतेमनोज आहुजा यांनी आपल्या मुलाच्या कृत्यावर तीव्र संतापही व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते. त्याने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. घटनेत वापरलेली कार माझ्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकरणी जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे त्यांनी म्हटले. मनोज आहुजा यांचा पुण्यात एक बार असल्याची माहितीही उजेडात आली आहे.

आरोपी तरुणी अल्पवयीन नाही – पोलिस-पुण्याचे पोलिस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, एक तरुण भर रस्त्यावर अश्लाघ्य वर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. संबंधित तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोपीचे नाव काय आहे? गाडी कोणाची होती? याची माहिती आमच्याकडे आहे. पण आरोपीला पकडण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मी त्यांची नावे उघड करत नाही.कारवाई पूर्ण झाल्यावर आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर याबद्दलची माहिती उघड केली जाईल. आरोपी व्यक्तीचे घर, त्यांचे काही नातेवाईक, पुण्याच्या बाहेरील त्यांची काही मित्रमंडळी यांच्याकडे त्यांचा शोध घेतला जात आहे. मुलांनी कुठे पार्टी केली होती का? याबद्दल माहिती मिळाली नाही, पण तपास केला जात आहे. आरोपी मुलांच्या आई-वडीलांशी संपर्क झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी टीम रवाना झाली आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे अल्पवयीन नाहीत, असे ते म्हणाले.

महिला दिनानिमीत्त महिला पोलीसाची भव्य बाईक रॅली

पुणे ८ मार्च –
बेटी बचाओ … बेटी पढाओ हा संदेश देत महिला दिनानिमीत्त महिला पोलीसांनी आज भव्य बाईक रॅली वानवडी येथून काढली .परिमंडळ ५ मधील २३२ महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ११६ मोटार सायकलींवर स्वार होऊन बाईक रॅलीमध्ये यथेच्छ सहभाग घेतला होता. सदर बाईक रॅलीस सिनेअभिनेता पुष्कर जोग, संगिता तरडे व प्राजक्ता गायकवाड यांनी महात्मा फुले सांस्कृतीक भवन, वानवडी येथे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली होती.

बेटी बचाओ … बेटी पढाओ या उपक्रमाला दिनांक २२/०१/२०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमीत्ताने ८ मार्च जागतिक महिला दिनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीसांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . त्या अनुषंगाने परिमंडळ ५ मधील महिला पोलीसांच्या वतीने दिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी १०/३० वाजता महात्मा फुले सांस्कृतीक भवन, वानवडी ते एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर असे महिला पोलीस बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.हि बाईक रॅली एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे समाप्त झाली .
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ५ मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावतीने करण्यात आले होते.

महिलांनी स्वतःच्या मानसिक व शारिरीक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे- पुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर

पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरीपदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान

पुणे : घर, संसार, करिअर सांभाळताना महिलांनी स्वतःचा स्वाभिमान देखील जपला पाहिजे.हे करीत असताना त्यांनी स्वतःच्या मानसिक व शारिरीक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे.महिला भावनिकरित्या कमजोर असतात असे नेहमी बोलले जाते, परंतु मला असे वाटते की महिला भावनिक असतात पण कमजोर नसतात. जागतिक महिला दिनाचा खरा उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे, असे मत पुणे विभागाच्या सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरी पदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी पुणे सह-धर्मदाय आयुक्त क्र. २ राहुल मामू सो, पुणे विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी महिला सशक्तीकरण वर मनोगत व्यक्त केले. तसेच, माईंड ट्रेनर संभाजी पिसाळ यांनी सर्वांना मानसिक तणाव कमी होण्याबाबत संदेश दिला.

यावेळी धर्मदाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी साधना जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या ११ नवोदित नोटरी पदी नियुक्त महिला वकिलांचा सन्मान-चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

संभाजी पिसाळ म्हणाले, दैनंदिन जीवनात काम करताना नेहमीच प्रत्येकाला ताण येत असतो. परंतु या ताणाचे रुपांतर तणावात होऊ नये, हा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. जरी हा ताण आला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर ताणामुळे निर्माण होणारी अवघड परिस्थिती टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.  

पीटीपीए चे अध्यक्ष ऍड. मोहन फडणीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ऍड. साधना बाजरे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. रोहिणी पवार यांनी केले, सचिव ऍड. गजानन गवई यांनी आभार मानले.

श्री स्वामी समर्थ पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा : वीरेंद्र किराड यांना यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार 

पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त १६ मार्च पर्यंत महानगरपालिकेजवळील  कॉंग्रेस भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे  यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ होईल. पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष आहे.

यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट पुणे चे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. १६ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित राहणार आहेत.

पालखी सोहळ्यात गुरुवार, दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता तुकाराम दैठणकर आणि हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी  भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता लुई ब्रेड अंध अपंग कल्याण संस्था ऑर्केस्ट्रा साई सातसूर परिवार सांस्कृतिक मंच यांचा ‘साई सातसुर’ हा कार्यक्रम होणार आहे.  तर १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता  मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक १६ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस ‘रक्तदान महायज्ञ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

श्री लकडी पूल विठ्ठल मंदिराच्या वतीने भजनी मंडळातील महिलांचा सन्मान

लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या सहकार्याने आयोजन  

पुणे : भजन हे केवळ भक्तिसंगीत नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. भजनी मंडळातील महिलांची भूमिका ही केवळ गायनापुरती मर्यादित नसून, त्या समाजाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात, अशी भावना व्यक्त करीत पेशवेकालीन श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या वतीने भजनी मंडळातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या सहकार्याने  टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  श्रीफळ, गुलाबपुष्प आणि साडीचोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. 

पासोड्या विठोबा मंदिराचे प्रमुख विश्वस्त रविंद्र फटाले यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, स्वप्निल काळभोर, विनोद मणियार, लायन्स क्लबचे बजरंग आकडे उपस्थित होते.

रोमा लांडे, दिलीप बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. अमर लांडे यांनी आभार मानले.

स्त्री जन्माचे स्वागत होणे ही फलश्रुती : खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या साहित्यकृतीच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृती घडत आहे. समाजाचा स्त्री जन्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होणे हे या कार्याचे फलित आहे, असे गौरवोद्गार भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काढले.

बेटी बचाओ अभियानाच्या प्रणेत्या आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. 8) खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मानकन्हैय्या ट्रस्टतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, यशोवाणीच्या प्राची गुर्जर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा विमल बाफना, मानकन्हैय्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, कवी चंद्रकांत पालवे, भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर मंचावर होते. ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या ऑडिओ सीडीचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.

लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, मला लहानपणापासूनच लेखन, वाचनाची आवड होती. त्यासाठी घरात पोषक वातावरणही होते. आई ग्रंथपाल आणि वडिल पत्रकार असल्याने साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास व आशीर्वादही लाभला. यातून रुजलेले बीज चळवळ रूपाने लेखनात परावर्तीत झाले. आरोग्य पत्रिकेतून लिहिलेले अनेक लेख, कविता, नाटिका, स्त्रीविषयक कायद्यांची माहिती याचे पुस्तकात रुपांतर झाले. सासरी देखील या कार्याला प्रेरणा मिळत गेली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साहित्य शारदेच्या मंदिरात ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे हा माझ्यासाठी अमृतसिद्धी योग आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, सनातन भारतीय संस्कृतीत स्त्री जिद्दी, स्वतंत्र आणि ज्ञानवंत होती. तिला ब्रह्मचारिणी राहण्याचा, पती निवडण्याचा अधिकार होता. परंतु मध्ययुगात परकीय आक्रमणांमुळे सामाजिक व धार्मिक परिस्थिती स्त्री स्वातंत्र्यासाठी पोषक नव्हती. याविषयी साहित्यिकांनी संशोधन करून समाजाची आजची मानसिकता बदलण्यासाठी साहित्यकृतींची निर्मिती करावी.

डॉक्टर कुटुंबाकडून समाजभानाची जपणूक : प्रा. मिलिंद जोशी

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. सुधा कांकरिया यांनी या पुस्तकाच्या निर्मितीतून समाजमनाला सावरण्याचे काम केले आहे. आजच्या प्रगत, समृद्ध सामाजिक परिस्थितीत किळसवाणे वैचारिक दारिद्य्र असताना ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजमन बदलण्याचे मौलिक कार्य डॉ. सुधा कांकरिया करीत आहेत. कांकरिया कुटुंबियांनी फक्त नेत्रचिकित्सेच्या क्षेत्रात योगदान दिलेले नाही तर समाजाला वेगळी दृष्टी देण्याचेही कार्य केले आहे. समाज परिवर्तनासाठी शब्दांचे शस्त्र होऊन सामर्थ्यवान ठरणाऱ्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या डॉ. सुधा कांकरिया या सर्जनशील लेखिका आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. संवेदनशीलता बोथट होऊन अश्रू आटणे ही आजची सामाजिक विकृत मानसिकता झाली आहे. अशा काळात संवेदनशील मनाचे हे डॉक्टर कुटुंब समाजभान जागृत ठेवून कार्यरत आहेत.

डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याची लोकचळवळ झाली आहे, असे सुनिताराजे पवार यांनी सांगितले. दृष्टीहिन विद्यार्थ्यांना अवांतर वाचनातून बहुश्रुतता येण्यासाठी ओडिओ सीडीची निर्मिती केली आहे, असे यशोवाणीच्या प्राची गुर्जर यांनी सांगितले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास कुंदनऋषीजी महाराज साहेब, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, आदिती तटकरे, राम शिंदे, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन विमल बाफना, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी केले.

प्रास्ताविकपर स्वागत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. सुरुवातीस श्लोका वर्धमान कांकरिया हिने सरस्वती वंदना नृत्य सादर केले तर स्मीरा वर्धमान कांकरिया हिने डॉ. सुधा कांकरिया यांची ‌‘गोड मुलगी गोडुली‌’ ही कविता सादर केली. उपस्थितांचे स्वागत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन नेहा अभिजित यांनी केले तर आभार जयंत येलूलकर यांनी मानले.

“हा विषय केवळ एका तरुणाच्या उद्दाम वर्तनाचा नाही, तर समाजातील वाढत्या बेशिस्त वृत्तीचा, तातडीने कारवाई करणे गरजेचे”– डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील एका तरुणाचा उद्दामपणा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कठोर भूमिका; शहराच्या सुरक्षेसाठी मोहीम घेण्यासंदर्भात सूचना

पुणे, दि. ८ मार्च २०२५ : पुण्यात सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये एका तरुणाने मुख्य चौकात अश्लील हावभाव करत लघुशंका केल्याचे दिसत आहे. या प्रकारावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका गाडीतून उतरून मुख्य चौकात हा तरुण लघुशंका करतो. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी विरोध केला, तरीही त्याने उद्दामपणा केला. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रकरणी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत चालली आहे. पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे.”

त्या पुढे म्हणाल्या, “अशा घटना घडतात कारण काही पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरूण घालतात. हे थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, पोलीस आणि सरकारने एकत्रितपणे कठोर भूमिका घेतली पाहिजे.”

शहराच्या सुरक्षिततेसाठी मोहिम राबवण्यासंदर्भात सूचना

या घटनेतील तरुणाचा तपशील पोलिसांना मिळाला असून, लवकरच त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली. तसेच, पुणे शहरातील रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही मार्च महिन्यात कार्यान्वित होतील, मात्र पोलिसांना या घटनेचे फुटेज मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील वाढत्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना त्यांनी दिली. “राजकीय श्रेयवाद न खेळता सर्वांनी मिळून समाजात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. सरकारने पोलिसांना अधिक स्वायत्तता द्यावी आणि नागरिकांनीही जबाबदारीने वागावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

BMW रस्त्याच्या मधोमध थांबवून फुटपाथवर केली लघुशंका; VIDEO व्हायरल

पुणे-पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू घेण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यातील सिग्नलवरती गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केले आहे. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा. या विकृतांना ठेचून काढले पाहिजे, असे रुपाली ठोबरे यांनी म्हटले आहे.

पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार उभी करत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यात महिला दिनाच्या दिवशी भररस्त्यात असा श्रीमंत बापाच्या मुलाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.

मागील घटनेतून पुणे पोलिसांनी धडा घेतला नाही

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.

तासाभरात कारवाई करा- दमानिया

अंजली दमानिया म्हणाल्या की, पोलिसांनी तर सोडा लोकांनीही धडे घेतलेले नाही. लोकांना महाराष्ट्राची परिस्थिती दिसत आहे. हा मोठ्या गाडीतून उतरला आहे. काय बोलावे अशा लोकांना. त्यांच्यावर तासाभरात कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनी आता थोडेसे सक्रीय होण्याची गरज आहे. पोर्शेमध्ये जसा निबंध लिहण्यास सांगितले तसेच काहीसे याच्या बाबतीत होईल.

व्हिडिओ न करता चोप द्यावा- मोरे

वसंत मोरे म्हणाले की, स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला आहे. पोलिस यंत्रणेवर प्रयन चिन्ह उपस्थित होत आहे. ते चौकात गाड्या थांबवतात, काळ्या काचा, नंबर यासाठी थांबवणाऱ्या पोलिसांना हे दिसत नाही का? असा सवाल मोरेंनी केला आहे. पुणे शहराचे वातावरण खराब झाले आहे. पोलिस कुणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. प्रत्येकाला 31 मार्चचे टार्गेट आहे. त्यामुळे ह्याकडे कुणाचे लक्ष नाही. तिथल्या पोलिस चौकीचे कर्मचारी काय करता असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमच्यासमोर आले तर आम्ही त्यांना तिथेच राइट करू. लोकं व्हिडिओ करतात तसे न करता त्यांना तिथेच चोप दिला पाहिजे.

पोलिसांना दोष देणं योग्य नाही

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 40-50 गावे पुणे शहरात समाविष्ट झाली आहेत. पोलिसांची देखील ग्रामीण आणि शहरी भागातील संख्या कमी आहे, प्रत्येक गोष्टीचा दोष पोलिसांवर टाकणे योग्य नाही. त्या तरुणावर कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाईच्या सूचना मी सरकारला करणार आहे. गृह विभाग परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सर्वांनी मिळून या संदर्भात एक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

लोकांची विकृती वाढली- रुपाली पाटील

विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे. बीएमडब्ल्यू सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज आहे. यांना संस्कार नावाची गोष्टच नाही. एवढाच पैशांचा माज असेल, तर हॉटेलमध्ये जाऊ शकला असता, पाच रुपयांऐवजी शंभर रुपये देऊन लघुशंका केली असती, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स: वेबसाईट उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे-शनिवार दिनांक ८मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या वेबसाईटचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा.ॲड. अशोक पलांडे यांच्या शुभहस्ते झाले.त्यावेळी संस्थेच्या फायनान्स कंट्रोलर श्रीमती प्राजक्ता प्रधान,संस्था सदस्य श्री.मिलिंद कांबळे,प्रशालेच्या शालासमितीअध्यक्षा मा.डॉक्टर प्रीती अभ्यंकर, मुख्याध्यापिका श्रीमती दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता भोसले,पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती जज्जल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालकप्रतिनिधी , वर्गप्रतिनिधीविद्यार्थिनी उपस्थित होत्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फक्त मुलींसाठी असणाऱ्या अहिल्यादेवी प्रशालेत जागतिक महिलादिनी वेबसाईटचे उद्घाटन अतिशय औचित्यपूर्ण आहे.
शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटीसंचलित, ८६वर्ष विद्यादानाचा अनुभवसंपन्न वारसा लाभलेली ,इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावातही आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवलेली अग्रमानांकित मराठी माध्यमाची ही शाळा असून या वेबसाईटच्या माध्यमातून आधुनिकपद्धतीने तिची ओळख आता आपल्याला होणार आहे.

रमणबाग शाळेत महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सन्मान

उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत येताना जसं कौतुक झालं होतं तसंच आज शाळेत कौतुक झालं….परंतु आजचं कौतुक शेकडो मुलांच्या साक्षीनं होतं.. आम्हा शिक्षिकांच!

पुणे-महिला दिनाच्या औचित्याने रमणबागेच्या फरसबंद चौकात फुलांच्या पायघड्यांवरून शाला प्रमुख चारुता प्रभुदेसाई,पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अंजली गोरे, प्रमुख अतिथी मेघा नगरे,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिलांना व्यासपीठावर आणण्यात आले.
प्रत्येक महिलेचा पुरुष सहकारी शिक्षकाने आपुलकीने भेटवस्तू देऊन सत्कार केला….
प्रत्येकीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटून आले होते…
प्रशालेचे माजी विद्यार्थी निलेश गिरमे यांनी महिला शिक्षिकांसाठी भेटवस्तू दिल्या.
उपशालाप्रमुख जयंत टोले यांनी विद्यार्थ्यांना आई, आजी, बहिण यांचा सन्मान करण्याचे,त्यांच्या प्रति आपले प्रेम व भावना व्यक्त करायला सांगितले. प्रमुख अतिथी मेघा नगरे शालेय जीवनात शिक्षण संस्कार व जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन केले.रवींद्र सातपुते यांनी अतिथींचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले तर देवेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कर्तृत्ववान महिलांच्या स्मृतींना उजाळा देत नवीन मराठी शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

पुणे:शनिवार दिनांक ८/०३/२०२३ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ.अनन्या बिबवे प्राचार्य मॉडर्न कॉलेज पुणे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तसेच शाळेतील थोर महिलांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींचे परीक्षण करण्यासाठी मा.सायली गोडबोले (लेखिका) व मा. सुवर्णा बोडस (व्हाईस ओव्हर कलाकार )तसेच साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.पियुष शहा उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. मा.मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व महिलांचा सन्मान फक्त आजच्या दिवशी न करता सतत त्यांचा सन्मान करा असे सांगितले.मीनल कचरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची माहिती सांगितली.
राजमाता जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई, सावित्री बाई फुले,डॉक्टर आनंदीबाई जोशी, प्रतिभाताई पाटील, बहिणाबाई चौधरी, संतोष यादव , सिंधुताई सपकाळ सुधा मूर्ती, मादाम कामा ,महाराणी ताराबाई ,रमाबाई रानडे, संत मीराबाई ,मनू भाकर, कॅप्टन लक्ष्मी सहगल,सरोजिनी नायडू, यांसारख्या थोर महिलांच्या वेशभूषा शाळेतील विद्यार्थिनींनी करून त्यांनी स्वगत व्यक्त केले. या विद्यार्थिनींमधून प्रथम पाच क्रमांक निवडून त्यांना साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे बक्षीसे देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.अनन्या बिबवे यांनी विद्यार्थ्यांना सर्व महिलांना सन्मान द्या आणि तो एक दिवस न देता शहाण्यासारखे आयुष्यभर मोठ्या माणसांचा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन्मान करा असा संदेश दिला. तसेच साने गुरुजी कथामाला तर्फे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. त्याचबरोबर भालभा करंडक स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.स्वाती यादव यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा पाखरे यांनी अतिथी परिचय करून दिला. सौ.योगिता भावकर यांनी आभाराचे काम केले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा
तिकोने, धनंजय तळपे यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसच्या सद्भावना पद यात्रेला मस्साजोग येथून सुरुवात

मस्साजोग/मुंबई, दि. ८ मार्च २०२५

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या क्रूरतेने, अमानुषपणे ही हत्या करण्यात आली ते पाहून समाजाला चिंतन करावे लागेल. महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, या महापुरुषांचा गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांच्याराख्या महान संताचा वारसा लाभलेला आहे. संतोष देशमुख यांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे. ही लढाई एकट्या देशमुख कुटुंबाची नाही तर सर्वांना ही लढाई लढावी लागणार आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, क्रुरता नष्ट व्हावी, मानवता व सद्भाव वाढावा हा संकल्प घेऊन ही सद्भावना पद यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी सकाळी स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मस्सोजोग येथून सद्भावना यात्रेची सुरुवात केली. यावेळी सद्भावना यात्रेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या बलिदानातून आपण काय शिकणार आहोत की नाही? एका प्रवृत्तीच्या विरोधात लढताना त्यांचा बळी गेला आहे आणि ही प्रवृत्ती नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलला पाहिजे. सद्भावना ही आपल्या भारताच्या डीएनएमध्ये आहे, संविधानात आहे व आम्ही या विचाराचे पाईक आहोत. घटना घडल्यापासून देशमुख कटुंबियांचा तोल ढललेला नाही, त्यांनी विवेकपूर्ण विचार मांडला आहे. गुन्हेगारांना जात, धर्म नसतो, तो गुन्हेगार असतो, या प्रवृत्तीच्या मागे कोण आहे, याचा उहापोह होत आहे मात्र ही सद्भावना जनतेपुढे घेऊन गेले पाहिजे.
सद्भावनेच्या विरोधात तोडाफोडा, भय, द्वेष, मत्सर, जाती धर्माला एकमेकाविरोधात लढण्यास लावणाऱ्या प्रवृती आहेत, अशा प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो. संस्कृती रक्षणाच्या माध्यमातून ही पदयात्रा आहे. देशमुख परिवाराच्या संघर्षासोबत आम्ही आहोत. संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये तसेच हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. या बलिदानातून आपण धडा शिकला पाहिजे, पैशाच्या हव्यासातून अशा हत्या होऊ नयेत असेही सपकाळ म्हणाले.
जातीभेद मिटवूया मानवता जपूया अशा घोषणा देत हजारोंच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हिमाचलच्या प्रभारी रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, नांदेडचे खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे,ज्येष्ठ अर्थतज्ञ एम. एच. देसरडा, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील युवा नेते अजिंक्य पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, अमर खानापूरे, दादासाहेब मुंडे, भगवानगडाचे विश्वस्त आणि जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह प्रदेश काँग्रेस व बीड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते महिला तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो नागरिक सद्भावना रॅलीत सहभागी झाले होते.
मस्साजोग येथून सुरु झालेली पदयात्रा पुढे उत्तरेश्वर पिंप्री फाटा, पिंपळगाव फाटा, सांगवी, सारणी, रेणु पेट्रोल पंप, बरड, नांदूरफाटा, येळंबघाट, चाकरवाडी फाटा, नेकनूर असा प्रवास करत रात्रीचा मुक्काम नेकनूर येथे करेल. उद्या रविवार दि.९ मार्च रोजी पुन्हा या पदयात्रेची सुरुवात होऊन बीड शहरात सद्भावना मेळाव्याने यात्रेची सांगता होईल.

जिल्हा इंटरस्कूल शूटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची उत्कृष्ट कामगिरी

१४ पदकेः ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांवर कोरले नाव

पुणे ८ मार्च: शिरूर येथील शूटिंग स्पोर्टस क्लब मध्ये झालेल्या स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रतिभावना नेमबाजांनी अविश्वसनीय १४ पदकांवर नाव कोरले आहे. त्यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच अंडर १४ मुलीमध्ये स्वरा गुरूवाले, आणि अंडर १९ मुलीमध्ये कंगन सिंग व अंडर १७ मुलांमध्ये अर्थव सिंह भादोरिया यांनी एअर पिस्तूल प्रकारातील यश धक्कादायक आहे. यांनी अनुक्रमे 327/400, 325/400 व 371/400 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले.
ध्रुव ग्लोबल स्कूल ला मिळालेल्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी सर्वांन शुभेच्छा दिल्या.
नेमबाजी स्पर्धेत अंडर १४ पीपी sight एअर रायफल मध्ये हर्षवर्धन शर्मा (रौप्य), विहान पाटील (कांस्य) तर अंडर १७ पीप Sight एअर रायफल मध्ये कुशान पांडे (रौप्य), तनिष कन्सारा (कांस्य) पदकावर नाव कोरले. तसेच अंडर १४ एअर पिस्तूल मध्ये आदित्य गोडसे (रौप्य) व अर्णव चवन (कांस्य) आणि अंडर १७ एअर पिस्तूल मध्ये अर्थव सिंह भादोरिया (सुवर्ण) व शौर्या डुलकर (रौप्य) यांनी पदकावर शिक्कामोर्तब केला.
अंडर १९ एअर पिस्तूल मध्ये प्रमत झा (कांस्य) व अंडर १४ एअर पिस्तूल मुलीमध्ये स्वरा गुरूवाले (सुवर्ण) व शौर्या थोरवे (रौप्य), अंडर १७ एअर पिस्तूल मुलीमध्ये अनन्या मिस्त्री (रौप्य) आणि अंडर १९ एअर पिस्तूल मुलीमध्ये कंगन सिंग (सुवर्ण पदक) व त्रिशा सावंत (रौप्य) यांनी पदक मिळविले.
या खेळाडूंना प्रशिक्षक अश्विनी गुंजाल, सोनाली परेराव, संध्या फडतर यांनी प्रशिक्षण दिले. या खेळाडूंना सहाय्यक क्रीडा समन्वयक रोहित पाटील आणि क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय काठे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.

प्रतिकूलतेतूनही उर्ध्वगामी जाणारी भारतीय अर्थव्यवस्था !

( लेखक प्रा. नंदकुमार काकिर्डे)

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमधील म्हणजे ऑक्टोबर – डिसेंबर 2024 या काळातील अर्थव्यवस्थेची प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने विविध प्रकारची माहिती दिली असून प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहून संमिश्र पण उर्ध्वगामी दिशेने वाटचाल करत आहे. जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेने निश्चित चांगली उभारी घेतली असल्याने या वर्षाची अखेरची तिमाही चांगली जाईल असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा घेतलेला वेध.

जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत जटिल व बहुआयामी संस्था आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत प्रभावी सामर्थ्य असून लक्षणीय कमकुवतपणाही आढळतो. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 6.2 टक्के झाली. याच वर्षाच्या दुसऱ्या तिमाही मध्ये म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2024 त्या तिमाही मध्ये ही वाढ 5.6 टक्के झालेली होती. दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ निश्चित समाधानकारक असून प्रतिकूलतेमध्येही आपली अर्थव्यवस्था लवचिकता सिद्ध करत आहे याबद्दल समाधान व्यक्त करायला हरकत नाही. मात्र 2023-24 या वर्षाच्या याच तिसऱ्या तिमाही मध्ये अर्थव्यवस्थेने 9.5 टक्क्यांची वाढ नोंदवलेली होती. त्या तुलनेत या तिमाहीतील कामगिरी कमी झालेली आहे हे मान्य करावे लागेल. मात्र एवढी उत्तम वाढ सतत टिकवून ठेवणे हे अर्थव्यवस्थेपुढचे मोठे आव्हान आहे. हे लक्षात घेतले तर चालू आर्थिक वर्षामध्ये झालेली पहिल्या नऊ महिन्यातील कामगिरी ही निश्चितच समाधानकारक आहे. भारताचे अनुकूल लोकसंख्याशास्त्र, मोठ्या व वाढत्या कर्मचाऱ्यांसह तसेच साक्षरता व शिक्षणाच्या तुलनेने उच्च पातळीमुळे आपली अर्थव्यवस्था विविध निकषांवर उजवी ठरते.

या तिसऱ्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेची कामगिरी समाधानकारक होण्यामागची जी प्रमुख कारणे आहेत त्यात केंद्र सरकारने केलेला भांडवली खर्च व खाजगी क्षेत्राने केलेला जास्त वापर किंवा उपयोग ( consumption) ही आहेत. या काळातील सरकारी खर्च हा 8.3 टक्क्यांनी वाढलेला असून त्याच वेळेला खाजगी क्षेत्राचा वापर 6.9 टक्क्यांच्या घरात आहे. या दोन्हीमुळे अर्थव्यवस्थेला निश्चित चांगला हातभार लागला असून विकासाची गती कायम राखण्यात आपल्याला यश येताना दिसत आहे. त्याचप्रमाणे निर्यातीच्या आघाडीवरही या तिमाहीमध्ये आपली कामगिरी चांगली झाली असून त्यात 10.4 टक्क्यांची चांगली वाढ झालेली आहे. या तुलनेमध्ये आयात मात्र अपेक्षेपेक्षा थोडी कमी झालेली असून त्याचे प्रमुख कारण हे डॉलरच्या तुलनेत क्षीण होत असलेला रुपया हे आहे.

अर्थात यावरून चालू आर्थिक वर्षातील एकूण चित्र फार “गुलाबी” स्वरूपाचे आहे असे नाही. या अर्थव्यवस्थेमध्ये अद्याप काही महत्त्वाची आव्हाने जाणवतात. आपला दीर्घकालीन आर्थिक विस्तार बराचसा मंदावलेला आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री यांच्यामधील गुंतवणुकीचे परिमाण असलेली सकल निश्चित किंवा स्थिर भांडवल निर्मिती ही फक्त 5.7 टक्के झाली आहे. हा दर एका वर्षांपूर्वी 9.30 टक्के इतका होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे एका बाजूला केंद्र सरकारचा खर्च वाढत असला तरी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक ही अत्यंत सावधगिरीने होताना दिसते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप साठी भारत हा जागतिक केंद्र बनत आहे. एकेकाळी शेतीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था आता सेवा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

2025-26 या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर 6.5 टक्के अपेक्षित आहे. एप्रिल ते डिसेंबर 2024 या नऊ महिन्यातील विकासाचा प्रत्यक्ष दर विचारात घेतला तर हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जानेवारी ते मार्च 2025 या तिमाही मध्ये विकासाचा दर 7.6 टक्के इतका गाठणे आवश्यक आहे. सरकारी बाबू याबाबत खूप आशावादी असले तरी काही ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञांच्या मते 6.5 टक्क्यांचा आकडा गाठणे हे अशक्यप्राय आहे. विशेषतः गेल्या दोन महिन्यात म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची अतर्क्य धोरणे राबवण्यास प्रारंभ केला आहे, भारतासह अनेक देशांवर अवाजवी आयात शुल्क आकारण्यास प्रारंभ केलेला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये एक प्रकारचे व्यापार युद्ध सुरू झालेले आहे आणि त्यातून भारताच्या अर्थव्यवस्थेची सुटका होणे होणे अवघड आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून जागतिक पातळीवरील व्यापार धोरणे आकलन शक्तीच्या बाहेर जाताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर अपेक्षा एवढा गाठावयाचा असेल तर खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक व देशातील उत्पादन क्षेत्राची चांगली वाढ ही दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक आहे यात शंका नाही. सध्याची देशातील आर्थिक स्थिती मात्र त्यासाठी अनुकूल दिसत नाही किंवा जाणवत नाही.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा किंवा क्षेत्रांचा विचार करायचा झाला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी क्षेत्र हे आजही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. यावर्षीचा खरीप हंगाम खूप चांगला गेल्यामुळे कृषी क्षेत्राने 4.6 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चांगल्या टप्प्यावर आलेली असून आत्ताचा रब्बीचा म्हणजे हिवाळ्याचा हंगाम चांगला गेला तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला जोरदार हात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या क्षेत्राच्या तुलनेत देशातील उत्पादन क्षेत्राची कामगिरी मात्र काहीशी मंदावलेली आहे. सध्या देशातील उत्पादन क्षेत्राचा विस्तार 4.3 टक्के दराने होत आहे. उत्पादन क्षेत्रावर आलेल्या संकटाचा विपरीत परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर झालेला असून शहरी भागातील एकूण मागणी मध्येच चांगली लक्षणीय कपात झालेली दिसते. त्याचाच प्रतिकूल परिणाम म्हणून देशातील एकूण भाव वाढ ही अद्यापही आटोक्यात आलेली नाही.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो सेवा क्षेत्राचा. या वर्षभरामध्ये सेवा क्षेत्राचा विस्तार खूपच कमी झालेला किंवा मंदावलेला आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगावयाचे झाले तर गेल्या वर्षी याच काळात सेवा क्षेत्राचा विकासाचा दर 7.3 टक्क्यांच्या घरात होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे केंद्र सरकारचा गेल्या नऊ महिन्यातील भांडवली खर्च लक्षणीय रित्या वाढलेला आहे मात्र खाजगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढताना दिसत नाही.

देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि गुंतवणूक यांच्या गुणोत्तराचे प्रमाण पाहिले तर गेल्या तीन वर्षात ते प्रथमच खूप कमी झालेले असून सध्या 31.9 टक्के इतका तो खाली आलेला आहे. सार्वजनिक उद्योग क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात किंवा खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढताना दिसत नाही. अजूनही देशातील खाजगी उद्योग मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी धजावताना दिसत नाहीत. त्याचे प्रमुख कारण मागणी मधील अनिश्चितता व जागतिक पातळीवरील अस्थिर अर्थव्यवस्था असून त्याचा परिणाम गुंतवणुकीवर झालेला आहे. यामुळे जोपर्यंत केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे तोपर्यंत अर्थव्यवस्थेला थोडा जोर किंवा बळ लाभत आहे मात्र खाजगी उद्योगांनी गुंतवणूक केली तर खऱ्या अर्थाने शाश्वत विकासासाठी ती उपयुक्त ठरेल. पण तसे होताना दिसत नाही.

सध्याचे अर्थव्यवस्थेतील दुसरे मोठे आव्हान आहे ते भाव वाढीचे. गेल्या काही सप्ताहांमध्ये त्यात अनुकूल बदल होताना दिसत असला तरी या भाव वाढीचा परिणाम शहरातील मागणीवर झालेला दिसत आहे. अनेक ग्राहकपयोगी उत्पादन कंपन्यांच्या आकडेवारीनुसार भाव वाढीच्या दबावामुळे ग्राहकांच्या विवेक पूर्ण खर्चावर मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेच्या वाढीचे जे उद्दिष्ट ठेवले आहे ते गाठावयाचे असेल तर निश्चितपणे खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आणि उपभोग्य वस्तूंचा वाढता वापर होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक वाढीमध्ये लक्षणीय उत्पन्न असमानता आहे. शिक्षण व आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत सेवा ही अनेक नागरिकांना सहजगत्या उपलब्ध नाहीत. त्यांना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. भ्रष्टाचार व नोकरशाहीची अकार्यक्षमता हा आपल्या अर्थव्यवस्थेतील मोठा कच्चा दुवा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारी सेवा सहजगत्या मिळत नाहीत किंवा मिळताना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. पायाभूत सुविधांमध्येही काही ठिकाणी अविकसित परिस्थिती आहे. वायु,जल प्रदूषणासह महत्वपूर्ण पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व लोककल्याण योजनांवर झालेला आहे.

एक गोष्ट निश्चित नमूद केली पाहिजे की जागतिक पातळीवरील विकसित देशांचा म्हणजे अमेरिका, चीन व अन्य काही देशांचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेने गाठलेला चालू वर्षातील विकासदर हा सर्व देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ ही निश्चित वित्तीय तूट कमी करण्यामध्ये उपयुक्त ठरते. त्यामुळे सरकारलाही अंदाजपत्रकात ठरवलेला खर्च प्रत्यक्षात करण्यासाठी चांगला वाव मिळतो.

जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली वाढती अनिश्चितता आणि स्थानिक पातळीवरील गुंतवणुकीमध्ये अजूनही अपेक्षेएवढी वाढ वाढ होताना दिसत नसल्यामुळे आपल्या पुढील मार्ग हा काहीसा आव्हानात्मक झालेला आहे. अर्थात केंद्राने समर्थनासह त्यांचे स्थिर धोरण कायम ठेवले व खाजगी क्षेत्रामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकला तर भारतीय अर्थव्यवस्थेची विकासाची गाडी उर्ध्वगामी मार्गावर म्हणजे वरच्या दिशेने जाणारी राहील असे निश्चित वाटते.

*(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

मांजरीखुर्दमधील भेसळयुक्त पनीर बनवनाऱ्या फॅक्टरीवर छापा 1400 किलो भेसळीच्या पनीरसह, ७१८ कि. पामतेल४०० कि.GMS पावडर पकडली

अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस निरीक्षक वाहिद पठाणची महत्वपूर्ण कारवाई

पुणे-मानवी जीवनाची कोणतीही परवा न करता नफेखोरी आणि प्रचंड पैसा कमविण्याच्या मागे लागलेल्या हैवानांनी मांजरी खुर्द येथून सुरु ठेवलेल्या भेसळयुक्त पनीर बनवनाऱ्या फॅक्टरीवर छापा टाकून 1400 किलो भेसळीच्या पनीरसह, ७१८ कि. पामतेल४०० कि.GMS पावडर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत पकडून नष्ट केली

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०७/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न व औषध प्रशासन पुणे यांना पत्रव्यवहार करून माणीकनगर, मांजरीखुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडावुन मध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालु असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी युनिट ६ कडील पथक व अन्न व औषध प्रशासना मार्फत धाड टाकली असता सदर ठिकाणी एकुण १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकुण ११,५६,६९०/- रू.चा मुद्देमाल मिळुन आला आहे. पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुणे तपासणीसाठी घेवुन उर्वरीत भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांचेकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळुन आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार करावी.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालया कडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहूल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त (अन्न) पुणे बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे, श्रीमती सुप्रिया जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे एल डब्ल्यु साळवे, नमुना सहायक, पुणे यांनी केली आहे.