अनिल भोसले व सतीश चव्हाण यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती
वरंधा घाटात मध्यरात्रीनंतर अपघात-एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुदैवी मृत्यू
पुणे- महाड-भोर रस्त्यावरील वरंधा घाटाजवळील आंबेघर येथे मंगळवारी मध्यरात्री अल्टो कार नदी कोसळून पिंपरी-चिंचवड शहरातील५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिला व पुरुषांसह एका लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात कशामुळे व किती वाजता झाला हे अद्याप पुढे आले नाही. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. अपघातातील मृत चिंचवड गावातील रहिवासी व एकाच कुटुंबातील आहेत.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समन्स
नवी दिल्ली – कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पटियाला हाऊसच्या विशेष न्यायालयाने आरोपी म्हणून समन्स बजावले आहे. त्यांना 8 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मनमोहन सिंग यांच्यासह हिंदालको कंपनीचे कुमार मंगलम बिर्ला, पीसी पारेख यांच्यासह 6 जणांनाही न्यायालयाने आरोपी म्हणत समन्स पाठविले आहेत. न्यायालयाने गुन्ह्याचा कट, विश्वासघात तसेच भ्रष्टाचार निर्मुलन काद्यातील तरतुदींनुसार समन्स बजावले आहेत. डिसेंबरमध्येही सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तत्कालिन पंतप्रधानांची जबाब घेण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान कॉंग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे निष्कलंक तसेच प्रामाणिक असल्याचा दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे अनुराग ठाकूर यांनी “मागील सरकारने अनेक गैरव्यवहार केले. तसेच अशा गैरव्यवहारांना दया दाखविण्यात येणार नसल्याचेम्हटले आहे . आता हे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल असे म्हटले आहे.
चित्रजीवनगौरव ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना तर नाट्यजीवन गौरव नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर
महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या झी गौरव पुरस्कारांत सर्वात महत्त्वाचे स्थान असते ते झी जीवनगौरव पुरस्कारांचे. मराठी चित्रपट, नाटक आणि संगीताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या ज्येष्ठ आणि मान्यवर कलावंताना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी होणा-या झी गौरव पुरस्कारामध्ये आपल्या ठसकेदार आवाजाने गाण्यांमध्ये विशेषतः लावणीमध्ये रंगत आणणा-या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना यावर्षीचा चित्र जीवन गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना नाट्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामध्ये सिंहाचा वाटा आहे तो तमाशाप्रधान चित्रपटांचा आणि या चित्रपटांच्या लोकप्रियतेमध्ये महत्वाचं योगदान आहे ते सुलोचना चव्हाण यांचं. वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणा-या सुलोचनाबाईंनी आपल्या ठसकेबाज आवाजात एकाहून एक फक्कड लावण्या देत मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. लावण्यांबरोबर हिंदी चित्रपट कीते, ऊर्दू गजल गायनाने सुलोचनाबाईंनी आपल्या आवाजाची मोहिनी अनेक रसिकांवर घातली. त्यांच्या आवाजाची जादू केवळ राज्य किंवा देशापुरतीच मर्यादित नाही राहिली तर तिची ख्याती परदेशातही पोचली आणि तिकडेही त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो पाकिस्तानचा कारण या देशातही सुलोचनाबाईंच्या आवाजावर प्रेम करणारे हजारो श्रोते आहेत. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’, “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा”, “सोळावं वरीस धोक्याचं”, “तुझ्या उसाला लागंल कोल्हा” अशा एक ना अनेक लावण्यांनी आपल्या रसिकांना घायाळ करणा-या सुलोचनाबाईंनी आपलं अवघं आयुष्य या कलेला समर्पित केलं. लावणी सोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. कित्येक शाळा, महाविद्यालये, वाचनालये, दवाखाने यांच्या मदतीसाठी मानधन न घेता त्यांनी कार्यक्रम केले आणि मिळालेले पैसे देणगी म्हणून दिले. कलेसोबतच सामाजिक भानही जपणा-या या लावणी सम्राज्ञीच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून यावर्षीचा चित्र जीवन गौरव पुरस्कार त्यांना बहाल करण्यात येत आहे.
मराठी नाट्यलिखाणामध्ये स्वतःची वेगळी शैली निर्माण करत नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे नाटककार म्हणजे महेश एलकुंचवार. नाटक या माध्यमामध्ये किती कमालीची ताकद असते याची प्रचिती त्यांच्या नाटकांमधून येते. ‘आत्मकथा’, ‘गार्बो’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘पार्टी’, ‘प्रतिबिंब’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘यातनाघर’, ‘युगान्त’, ‘रक्तपुरूष’ अशा एकाहून एक सरस नाटकांमधून त्यांनी मानवी प्रवृत्तींचे विविध कंगोरे मांडले. त्यांच्या या नाटकांचे रसिक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले या कौतुकाबरोबरच अनेक मानाच्या पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले.
त्यांच्या ‘त्रिधारा’या नाट्यप्रकाराने मराठी नाटकांना जागतीक पातळीवर एक नवा आयाम प्राप्त करून दिला. त्यांची बरीच नाटके ही इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतरीत झाली हे विशेष. आपल्या प्रतिभावान लेखणीने मराठी नाटकांना वेगळ्या उंचीवर नेणा-या या नाटककाराला मानाचा सलाम करत यावर्षीचा झी नाट्य जीवनगौरव त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षीपासून झी गौरव पुरस्काराचे झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरव असे दोन वेगवेगळे पुरस्कार सोहळे होत आहेत. यातील १३ मार्चला पार पडणा-या चित्रगौरव पुरस्कारामध्ये सुलोचनाताई चव्हाण यांना जीवनगौरव प्रदान करण्यात येणार आहे तर २६ मार्चला होणा-या नाट्यगौरव पुरस्कारात महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.
अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईचा २ लाखाचा खर्च वसुलीसाठी शाहरुख खानला नोटीस
मुंबई-वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्यासमोरचा अनधिकृत रॅम्प पाडण्यासाठी आलेल्या सुमारे दोन लाख रुपयांच्या खर्चाचं बिल मुंबई महानगरपालिकेनं बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला पाठवलं आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी शाहरुखला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
आपली व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी शाहरुखनं ‘मन्नत’ बंगल्यासमोर रॅम्प बांधला होता. परंतु, परिसरातील नागरिकांसाठी तो अडथळा ठरत होता. त्यामुळे हा अनधिकृत रॅम्प हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, त्याची दखल ना महापालिका घेत होती, ना शाहरुख. अखेर, खासदार पूनम महाजन यांनी नागरिकांची व्यथा जाणून या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. त्यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून रॅम्प हटवण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन, पालिका प्रशासनानं लगेचच शाहरुखला नोटीस पाठवली होती. रॅम्प हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत देऊनही शाहरुखनं काहीच हालचाल न केल्यानं ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी पालिकेच्या एच पश्चिम विभागानं हा रॅम्प जमीनदोस्त केला होता.
या कारवाईनंतर आता मुंबई महापालिका कायद्यातील कलम ४८९(१) अंतर्गत, रॅम्प पाडण्यासाठी आलेला दोन लाख रुपयांचा खर्च पालिका प्रशासन शाहरुखकडूनच वसूल करणार आहे. त्यासाठी ५ मार्चला त्यांनी शाहरुखला नोटीस पाठवली आहे. या संदर्भात शाहरुखशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु, रॅम्प पाडण्याचा खर्च देण्यासाठी शाहरुख आधीच तयार होता आणि नोटीस मिळताच तो पालिकेला चेक देईल, असं त्याच्या एका निकटवर्तीयानं स्पष्ट केलं आहे. अर्थात, शाहरुखनं सात दिवसांत ही रक्कम न भरल्यास ती त्याच्या मालमत्ता करात समाविष्ट केली जाईल, असं पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
दरोडे-जोग प्रॉपर्टीजतर्फे ‘प्री लाँच ऑफर’
पुणे-
रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून सर्वपरिचित असलेल्या दरोडे-जोग प्रॉपर्टीजतर्फे घर खरेदीदारांसाठी अनोखी आणि आगळीवेगळी एक्स्क्लुझिव प्री लाँच (ईपीएल) ऑफर सादर करण्यात येत आहे. याद्वारे ग्राहकांना प्री लाँच ऑफरमधील विशेष दर तर मिळणारच असून, त्याचबरोबर गृहकर्जावरही खास सवलतीचा दर मिळणार आहे.
यासंदर्भातील घोषणा दरोडे-जोग प्रॉपर्टीजचे संचालक सुधीर दरोडे आणि आनंद जोग यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
ईपीएल ऑफरसंदर्भात अधिक माहिती देताना आनंद जोग म्हणाले, की पुणे व परिसरातील उत्कृष्ट ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न बाळगणार्या सर्वांसाठी एक्स्क्लुझिव प्री लाँच (ईपीएल) ऑफर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही ऑफर खर्या अर्थाने खास असून, याअंतर्गत पुणे व परिसरातील उत्तमोत्तम ठिकाणांचे व्यापक पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत व त्यासोबत अत्यंत किफातशीर दर दिला जाणार असल्याने घर खरेदी करताना मोठी बचत होणार आहे.
या ऑफरची ठळक वैशिष्ट्ये नमूद करताना ते म्हणाले, की या ऑफरअंतर्गत सध्याच्या बाजारभावापेक्षा सरसकट 10 टक्के कमी दराने घरे उपलब्ध केली जाणार असून गृहकर्ज घेणार्यांना पहिल्या दोन वर्षांसाठी वार्षिक ८ टक्के इतका कमी खास सवलतीचा व्याजदर आकारला जाणार आहे. या ईपीएल ऑफरअंतर्गत घर घेण्याची इच्छा असणार्या ग्राहकांना विहीत नमुन्यातील फॉर्म भरून तो १२ मार्च ते १५ मार्च दरम्यान रु. ५0 हजार रुपयांच्या धनादेशासह दरोडे-जोग प्रॉपर्टीजच्या आपटे रस्त्यावरील कार्यालयात सादर करावा लागणार आहे. या ऑफरच्या काळात घर घेणार्यांची पैशाची मोठी बचत तर होणारच असून, त्याशिवाय रु. १ लाखाचे फर्निचर जिंकण्याची संधीही मिळणार आहे.
संत तुकाराम गाथा अनुदानासाठी मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, वित्त मंत्री आणि पुणे जिल्हा पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन कीर्तन करणार – लक्ष्मीकांत खाबिया
पुणे-संत तुकाराम गाथा अनुदानासाठी मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या घरासमोर जाऊन कीर्तन करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे राज्यप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.
गाथारूपाने शब्दधन जनलोका देऊन मराठी वाड्मय समृद्ध करणार्या जगद्गुरू संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदान मिळणे बंद झाले आहे. २00८ पूर्वी या गाथेच्या प्रतीसाठी ६८ रुपये खर्च येत होता. त्या वेळी शासकीय अनुदान असल्याने ही गाथा जनतेला अवघ्या ५0 रुपयांना मिळत होती. मात्र, मार्च २0१४ पासून एका प्रतीसाठी तब्बल १00 रुपये खर्च येत आहे. शिवाय, शासकीय अनुदानही संपले. असे असताना केवळ १00 रुपयांना संत तुकाराम गाथा विकली जात आहे. निर्मितीमूल्यांपैकी दहा रुपयांचा भार देवस्थान उचलत आहे. त्यामुळे राज्य शासनाने अनुदान पूर्ववत सुरू केल्यास वारकर्यांना संत तुकाराम गाथा पुन्हा ५0 रुपयांना मिळू शकेल, अशी माहिती खाबिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान संपल्यानंतर २00९ साली तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी, कॉँग्रेस सरकारने १५ लाखांचे अनुदान दिले होते. त्यानंतर तब्बल ७0 हजार गाथांची निर्मिती करण्यात आली. तुकाराम गाथा जनसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने अनुदानाबाबतचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खाबिया यांनी दिला आहे.
गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉवॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, तसेच लष्कर जलकेंद्र व इतर सर्व जलकेंद्रांत विद्युत व स्थापत्यविषयक अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी (दि. १२) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. १३) पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा बंद असणारे भाग
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर) शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, मुकुंदनगर, सहकारनगर, तळजाई, कात्रज, धनकवडी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, शिवनेरीनगर, साईबाबानगर,पद्मावती टँकर भरणा केंद्र, ज्ञानेश्वरनगर.
वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा.वारजे जलकेंद्र परिसर – पाषाण, औंध, खडकी, गोखलेनगर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, वारजे माळवाडी, रामनगर, अतुलनगर, सुतारवाडी, भूगाव रोड़
लष्कर जलकेंद्र भाग – लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रोड, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, वानवडी, कोंढवा, हडपसर, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रोड, कल्याणीनगर, वडगावशेरी, गोंधळेनगर, सातववाडी.
नवीन होळकर पंपिंग भाग – विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर.
सरकारविरोधात अण्णा हजारेंची ३0 मार्चपासून वर्धा-दिल्ली पदयात्रा
वर्धा : आधी शेतकरीविरोधी भूमिअधिग्रहण कायदा आणला. त्यात बदलाव करतो असे सांगून त्याचे रूपांतर बिलमध्ये केले. मात्र भूमिअधिग्रहण कायदा व सुधारित केलेले बिल यात काहीही फरक नसून हे शेतकरीविरोधी बिल आहे. हे कृत्य इंग्रजांपेक्षाही भयंकर हुकूमशाही करणारे आहे. याविरुद्धच माझी शेतकरी संघर्ष यात्रा ३0 मार्चपासून सेवाग्राम येथून निघत असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.मी २३ ते २५ फेब्रुवारीला दिल्ली येथे या शेतकरीविरोधी बिलाविरुद्ध आंदोलन केले. मला चांगले सर्मथन मिळाले. त्या वेळी संघर्ष यात्रा करण्याचे ठरविले. त्याबाबतच्या नियोजनाकरिता सेवाग्राम येथे ९ मार्चला बैठक घेण्याचे ठरले. त्यामुळे मी येथे आलो. मी कोणाशीही पत्रव्यवहार केला नाही. मीडियाच्या माध्यमातून या बैठकीबाबत सर्वांना माहीत झाले. तरी १00च्या वर विविध प्रांतांतून प्रतिनिधी येथे आले होते. ३0 मार्चला किसान संघर्ष यात्रा सेवाग्राम येथून सुरू होणार असून १ मे रोजी दिल्ली येथे पोहोचणार आहे. तेथे विविध प्रांतांतील शेतकरी यात सहभागी होतील. तसेच विविध शेतकर्यांचे समूह ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी जनजागृती करतील व या शेतकरीविरोधी बिलाबाबत माहिती देतील. दिल्ली येथे पोहोचल्यानंतर परिसरातील हरयाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश येथून रॅली निघून यात्रेत सहभागी होईल व नंतर दिल्लीत जेल भरो आंदोलन करण्यात येईल. तसेच यादरम्यान केंद्र सरकारच्या सर्व खासदारांच्या घरापुढे भजन करण्यात येईल व हे बिल रद्द व्हावे याकरिता त्या खासदारांनी विषय उचलावा, असे सांगण्यात येईल. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. तत्पूर्वी २३ मार्च रोजी रोजी वीर भगतसिंग यांच्या जारनवाला या गावात जाऊन तेथे भेट देण्यात येईल. वीर भगतसिंगांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमचे बलिदान गेले तरी चालेल. २४ ते २८ मार्चला दिल्लीच्या परिसरातील हरयाणा, बिहार, उत्तर प्रदेश व विविध प्रांतांत मोठी सभा लोकशिक्षण व लोकजागृतीकरिता घेण्यात येईल. आम्ही या बिलासंदर्भात मसुदा कमिटी तयार केली आहे. गांधीजींनी खेड्याकडे चला असा मूलमंत्र दिला मात्र भाजपा सरकार स्मार्ट व्हिलेज ऐवजी स्मार्ट सिटी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सरकारची नियत साफ नाही. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा यांनी विरोध केला. मात्र तेच बिल हे आता घेऊन येत आहेत. एखादा इर्मजन्सीमध्ये वटहुकूम पास केला तर समजू शकतो. मात्र ६ वटहुकूम यांनी पास केले, हे संविधानविरोधी आहे. आम्ही या बिलात काय असावे याकरिता सूचना पाठवत आहोत. आधी ज्या जमिनींचे अधिग्रहण केले त्याचा शेतकर्यांना मोबदला द्या. सुखसुविधा द्या, उद्योगपतींना जमिनी द्यायच्याच आहेत तर लीजवर द्या, ज्या शेतकर्याच्या जमिनीवर प्रकल्प उभा होत असेल त्या प्रकल्पात त्या शेतकर्याला समाविष्ट करा. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. आजपर्यंत भूमॅपिंग झाले नाही ते करा. १ ते ६ ग्रेडपर्यंत जमिनी ग्रेड तयार करा. ५ व ६ ग्रेडची जमीन इंडस्ट्रीजला द्या, असे सुझाव कळविणार आहोत. ज्यांना कुणाला आंदोलन करायचे आहे., त्यांनी स्वतंत्र करावे. अन्यथा हे विशिष्ट पक्षातील आंदोलन आहे, असे सांगतील. त्यामुळे ज्यांना कोणाला आंदोलन करायचे आहे. त्यांनी वेगळेच आंदोलन करावे. तसेच राष्ट्रीय किसान आयोग व राज्य किसान आयोग तयार करावेत, असे आवाहनही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
अमर साबळेंना राज्यसभेची उमेदवारी
मुंबई- राज्यसभेसाठी भाजपने अनुसूचित जाती-जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अमर साबळे यांना उमेदवारी दिली आहे. साबळे हे भाजपचे जेष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जायचे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून त्यांना पक्षाने अर्ज माघारी घ्यायला सांगितला होता. भाजपने हा मतदारसंघ आठवले यांच्या आरपीआय पक्षाला सोडला होता.
एप्रिल मध्ये’ सनी लियोन’चा धिंगाणा …
एका सीन मध्ये सनी ला चक्क १०० लिटर दुधाने न्हाऊ घालण्यात आले आहे,एका दृश्यासाठी , तिच्यासाठी लंडन हून एक विक्टोरिया ड्रेस हि आणला गेला आहे . झीनत अमान च्या ‘ सत्यम शिवम सुन्दारम ‘च्या पुढची झलक करायची ठरवूनच हा चित्रपट केला असला तरी ती तेवढ्यापुरतीच असेल हे कोणी सांगायला नकोच आहे . एकूण ९ गाणे या चित्रपटात असले तरी अर्थात त्याला ‘सत्यम शिवान सुंदरम ‘ ची सर मात्र कधीच येणार नाही .सत्यम शिवम सुंदरम शी त्याची तुलनाच होवू शकत नसली तरी … सनी चा हा खास चित्रपट नक्कीच तिच्या चाहत्यांना मोठ्ठी मोहिनी घालण्यात नक्कीच यशस्वी होईल हे मात्र निश्चित कारण । सव्वा महिन्यात सव्वा कोटी लोकांनी नुसता ट्रेलर पाहीला … यु ट्युब वर …
सनी ने या चित्रपटात लीला -मीरा ची भूमिका केली आहे तर जय भानुशाली ने कारण ; रजनीश दुग्गल ने श्रावण , राहुल देव ने भैरव ; मोहित अहल्वत ने प्रिन्स रणवीर आणि शिवानी टांकसाळे हिने राधिका ची भूमिका यात साकारली आहे .
तब्बल ४ निर्माते या चित्रपटाला लाभले आहेत . क्रिशन कुमार अहमद खान आणि शायरा खान अशी त्यांची नवे आहेत आणि बॉबी खान या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे .
या चित्रपटाचा हा पहा ट्रेलर ……
महिलादिनी महिला शेतकर्यांना समजले शेत जमिनीचे आरोग्य ! खा. वंदना चव्हाण यांचा सुदुंबरे गावात अभिनव उपक्रम
सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावामध्ये महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोनशे पन्नास महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे) भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जमीन आरोग्य व्यवस्थापन अभियान 2014-15 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100 महिलांना खासदार अॅड.वंदना चव्हाण यांच्या हस्ते माती परिक्षण कार्डाचे (Soil Health Card) वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी खा.वंदना चव्हाण यांनी ‘महिला सबलीकरण’विषयी मार्गदर्शन केले. तसेच ‘सुदुंबरे गावात तयार होणारे शेती उत्पादन हे ‘सुदुंबरे ब्रँड’ या नावाने ओळखले जावे यासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.’ असे त्या म्हणाल्या.
ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र (नारायणगाव,पुणे) चे डॉ.संतोष सहाणे यांनी उपस्थित महिलांना माती परिक्षण कसे करावे, पिकांची निवड कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. कांदा, ऊस (पाचट व्यवस्थापन), गहू, भात, सोयाबीन, बटाटा लागवडीचे तंत्र, तयार झालेले उत्पन्न बाजारात कधी आणावे, बीजोत्पादन करून शेतकर्यांनी फायदा कसा मिळवावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
संजीवनी जोगळेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी सरपंच संगीता भांगे, उपसरपंच गाडे, ग्रामपंचायत सदस्य आशा गाडे, तसेच ‘बुलढाणा सहकारी बँकेचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे उपस्थित होते.
सुदुंबरे गावामध्ये कृषिविभागाच्या वतीने राबविण्यात येणारा ‘शेतीशाळा’ हा उपक्रमात अवकाळी पाऊस आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे होणारे शेतकर्यांचे नुकसान कसे टाळता येईल त्यासाठी शेतीनियोजन कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली.
महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, चमचा लिंबू, रांगोळी स्पर्धा, फुलांच्या रांगोळ्या, गाण्यांच्या भेंड्या अशा विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्दपणे सहभाग घेतला.
मानवतेवर जातीपातींचा प्रहार सुरूच … भटजीला बोलावले नाही म्हणून चिपळूणचे साबळे कुटुंब २ वर्षापासून टाकले वाळीत …
चिपळूण : वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे . जातीपातीवरून विविध क्षेत्रात शहरोशहरी होणारी लॉबिंग आणि खेड्या खेड्यातील भीषणता मानवतेला गाडून टाकील कि काय ? असा प्रश्न आता नक्कीच भेडसावणार आहे साबळे कुटुंबाने न्याय मिळण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.दापोली तालुक्यात मुरुड, लोणवडी व चिखलगाव येथे मानपानावरून वाळीत टाकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता चिपळूण तालुक्यातही त्याचे लोण पसरल्याचे उघड झाले आहे
साबळे कुटुंबीयांनी रविवारी पत्रकार बैठक घेऊन घटनेची माहिती दिली. मनोहर तुकाराम साबळे, चंद्रकांत तुकाराम साबळे हे मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील मूळ रहिवाशी असून, नोकरीनिमित्त ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी आई, काकी, काकू राहतात. ही मंडळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. २६ डिसेंबर २०१३ रोजी तुकाराम साबळे यांचे बारावे होते. त्यासाठी भटजीला न बोलविता आपण बारावे करणार आहोत, अशी कल्पना साबळे बंधूंनी वाडीची बैठक घेऊन दिली होती. परंतु, बाराव्याच्यावेळी वाडीतील काही लोकांनी जर तुम्हाला आमच्या मतांनी चालायचे नसेल, तर वाडीशी तुमचा संबंध राहणार नाही. तुमच्या सुखदु:खात, कोणत्याही कार्यक्रमात मार्गताम्हाणे गोपाळवाडी भाग घेणार नाही, असे सांगितले होते.
त्यानंतर वाडीतील कोणाच्याही घरी साखरपुडा, विवाह, बारसे अथवा कोणताही सुखदु:खाचा प्रसंग असेल, तर आम्हाला कोणी बोलवत नाहीत. त्याप्रमाणे घरामध्ये आजूबाजुला कोणतेही मजुरीचे काम करायचे असेल तर मजुरी करणाऱ्या लोकांनादेखील घरी मजुरीसाठी पाठवत नाहीत, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. आम्हाला पुन्हा समाजात घ्यावे, यासाठी २ डिसेंबरला बैठक होणार होती. मात्र संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने ४ जानेवारीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली. बैठकीत तुम्ही आमच्या मताप्रमाणे वडिलांचे कार्य न केल्याने जर तुम्हाला वाडीत घ्यायचे असेल, तर दंड द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. परंतु, गुन्हा न केल्याने हे मंजूर नाही, असे सांगून बैठक आम्ही सोडली. तेव्हा लोक अंगावर धावून आले, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. साबळे कुटुंबीयांच्या वाळीत प्रकरणाबाबत अंनिसचे निखिल भोसले, मनोहर साबळे आदींनी याबाबत आता आवाज उठविला आहे








