पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी महा.सहा.आयुक्त कार्यालयाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत सेवा व मार्गदर्शन कचरा प्रक्रिया मेळाव्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना विषयी ओला कचरा जिरविणेबाबत प्रदर्शनाचे आयोजन श्री.छत्रपती मंगल कार्यालय, श्री सद्गुरु शंकर महाराज चौक, धनकवडी, पुणे-४११०४ याठिकाणी दिनांक २३/०८/२०१५ व दि.२४/०८/२०१५ रोजी सकाळी १०.०० ते सायं.६.०० या वेळेत आयोजित केलेले आहे.
कचरा निर्मूलन, खतनिर्मिती, गांडुळखत प्रकल्प, कचरा विलगीकरण, बायोगॅस, कचèयातून वीजनिर्मिती अशा विविध उपाययोजनांबाबत विविध कंपन्या, संस्था सहभागी होणार असुन सदरचे प्रदर्शन नागरिकांना विनामुल्य खुले आहे. आपल्या परिसरातील कचरानिर्मूलनास व शहर स्वच्छतेच्या कामी या प्रदर्शनातील माहिती व उपायांचा लाभ होणार असुन सदर प्रदर्शनास नागरिकांनी अवश्य भेट दयावी असे पुणे महापालिका प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.
कचरा प्रक्रिया मेळाव्याचे आयोजन
‘अखिल धनगर समाज महासंघा’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
‘ कधी पकडणार दाभोळकर-पानसरे यांचे मारेकरी … कोण आहेत सूत्रधार ?
पुणे – ‘दाभोलकर- पानसरेंचा खून झाला, महाराष्ट्राची लाज गेली‘, अशी घोषणा देऊन अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी गुरुवारी अभिवादन फेरी काढली. महाराष्ट्रभर दाभोलकरांच्या स्मृतीला उजाळा देत वेगवेगळ्या स्वरुपाची अभियाने विविध शहरात गावांमधून राबविण्यातआली वर्धा, नंदुरबार,धुळे,औरंगाबाद, अह्मदनगर, बीड़, सोलापूर, जळगाव,नाशिक, लातूर,उस्मानाबाद,नांदेड, कोल्हापुर,सातारा इतर अनेक ठिकाणी आंदोलन,मोर्चे, कार्यक्रम घेण्यात आले सगळीकडून एकाच सूर होता’ कधी पकडणार दाभोळकर-पानसरे यांचे मारेकरी … कोण आहेत सूत्रधार ?
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त काढलेल्या या फेरीची सुरवात ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पत्रकार निखिल वागळे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत झाली.
अंनिसच्या कलाकारांनी फेरीच्या सुरवातीस “सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम‘ हे रिंगणनाट्य सादर करून विवेकवादाचा जागर केला. विठ्ठल रामजी शिंदे पूल येथून महापालिका, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता ते म्हात्रे पुलामार्गे निघालेल्या फेरीची मनोहर मंगल कार्यालय येथे सांगता झाली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. याचा उपस्थितांनी निषेध केला. “शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर‘, “लडेंगे, जितेंगे‘ “कितना दम है तेरी गोली में, देखा है, देखेंगे‘, आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. हमीद दाभोलकर म्हणाले, “शेवटपर्यंत लोकशाही मार्गाने हा लढा सुरू राहील. पोलिसांकडून खुनाच्या तपासात दिरंगाई होत असून, महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. त्यांना यामागील सरकारची भूमिका पटलेली नाही. त्यामुळेच या लढ्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात सनदशीर मार्गाने हा लढा अधिक जोमाने पुढे नेऊ.‘‘





शेतकऱ्यांनो धीर सोडू नका; शासन तुमच्या पाठिशी- बबनराव लोणीकर
श्री. लोणीकर यांनी सेलू तालुक्यातील हादगाव तसेच पाथरी तालुक्यातील रूढी व करंजी शिवाय सेलू, जिंतूर शिवारातील पिकांच्या स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. कदम, उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, ब्रिजेश पाटील, तहसीलदार आसाराम छडीदार, श्री.गाढे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे आदी उपस्थित होते.
श्री.लोणीकर म्हणाले, कर्जाचे पुनर्गठन, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेची हमी यासारख्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. टंचाई स्थितीत शेतकरी व ग्रामस्थांना सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी समन्वयाने काम करून दिलासा द्यावा. ग्रामीण पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच्या विविध विभागांच्या उपाययोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
सन 2014-15 या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रुपांतर करणे, जे शेतकरी या कर्जाचा वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील, अशा शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सन 2015-16 या वर्षात माफ करणे, त्यापुढील 4 वर्षांचे म्हणजेच सन 2019-2020 पर्यंतच्या वर्षाचे 6 टक्के दराने होणारे व्याज शासनातर्फे शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित बँकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद विभागातील सर्व व विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील 6 जिल्हे अशा 14 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, अशा दारिद्र्यरेषेवरील शिधापत्रक (केशरी) लाभार्थ्यांना (APL)सुद्धा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराप्रमाणे म्हणजेच तांदुळ 3 रुपये व गहू 2 रुपये प्रती किलो या दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये सर्व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेची हमी प्राप्त होणार आहे. शिवाय या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची अट न ठेवता राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. या जिल्ह्यामधील प्रत्येक शासकीय रुग्णालयात खाजगी मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध करुन त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.
पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे जमीन आर्द्रतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतपिकावरील त्याचे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार या योजनेची सुरुवात केली असून त्यामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहेत. याचा फायदा अनेक भागात होत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील धडक सिंचन विहिरींची कामे पूर्ण करणे, नव्याने 1 लाख विहिरी व 50 हजार शेततळ्यांचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
सदभावना दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक प्रतिज्ञा
‘मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करुन व सांविधानिक मार्गांनी सोडवीन’, अशी सामूहिक प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.
राजधानीत सदभावना दिन साजरा
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदभावना प्रतिज्ञा दिली.
यावेळी श्रीमती शुक्ला यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अभिलाष कुमार, संजय आघाव आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिनाची प्रतिज्ञा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदभावना प्रतिज्ञा दिली. श्री.कांबळे यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
सदभावना दिन भारतरत्न राजीव गांधीना अभिवादन
अमरावती : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमीत्त विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सदभावना दिनाच्या कार्यक्रमास प्र. अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, प्र. उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल, उपायुक्त (पुरवठा) रमेश मावस्कर, सहाय्यक आयुक्त जे. बी. अपाले, नगर रचनाकार दीपक नागेकर, सहाय्यक नगर रचनाकर, संजय नाकोड, विभागीय आयुक्तांचे स्वीय सहाय्यक महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सदभावना दिवस प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
विभागीय अधिस्वीकृती समितीच्या नूतन सदस्यांचा पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे सत्कार
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधी राज्य शासनाने राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समित्यांची नुकतीच स्थापना केली आहे. पुण्याच्या विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्य पदी लोकमत सोलापूरचे संपादक राजा माने, सामनाचे विठ्ठल जाधव, साम वृत्तवाहिनीचे स्वप्निल बापट, चिंतन आदेशचे सचिन घाटपांडे व साप्ताहिक भविष्यकाळचे संपादक सुभाष भारद्वाज यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नूतन सदस्यांचा राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस.एम. देशमुख, विभागीय माहिती कार्यालय पुण्याचे उपसंचालक यशवंत भंडारे व जेष्ठ पत्रकार अरूण खोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य किरण नाईक, शरद पुजारी, दत्तात्रय सुर्वे, संतोष पवार, सुनील वाळुंज आदी उपस्थित होते.
ऑरगॅनिक उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सातारा (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून व शेतकऱ्यांच्या सहभागातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑरगॅनिक उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती, सातारा येथे नुकताच पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, उपाध्यक्ष रवि साळुंखे, पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती कविता चव्हाण, आदी उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकणासाठी नोंदणी केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांकडील शेतमालाची विक्री महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. ही विक्री पंचायत समिती येथील डी.आर.डी.ए.कडील उभारण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत केलेला भाजीपाला, गुळ, काकवी, चवळी, गहू, ज्वारी, मोहरी, हरभरा, डाळ, कांदा घेवडा विक्रीसाठी उपलब्ध आहे तसे सेंद्रीय पद्धतीने आवळा ज्यूस, फेस पॅक, शाम्पू, साबण देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑरगॅनिक उपक्रम पंचायत समिती आवारात सुरु करण्यात आला असून हे विक्री केंद्र आठवड्यातून गुरुवार व रविवार या दोन दिवशी सुरु राहणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेट देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी मदत करणे व कृषी विद्यापीठांमध्ये शेतकऱ्यांच्या सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा
सातारा (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन, अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार चंद्रशेखर सानप, नेताजी कुंभारे, सविता लष्करे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
2015-16 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 255.84 कोटी नियतव्यय -पालकमंत्री विजय शिवतारे
सातारा (जिमाका) : नियोजन विभागाने दिलेल्या मर्यादेनुसार 197.35 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्यस्तरीय बैठकीत सादर केला होता. या बैठकीत चर्चा होवून 58.49 कोटी वाढीव निधी देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यासाठी सन 2015-16 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियतव्यय 255.84 कोटी रुपये अंतिम करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
येथील नियोजन भवनामध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा आज झाली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, महादेव जानकर, बाळासाहेब पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच सभापती श्री. नाईक-निंबाळकर यांनी राज्यात नव्याने होऊ घातलेल्या 22 जिल्ह्यांबाबत विशेषत: सातारा जिल्ह्यातून प्रस्तावित माणदेश जिल्ह्याबाबत माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री श्री. शिवतारे म्हणाले, जनमाणसाच्या तसेच आपल्या सर्वांच्या भावना मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील. निकष आणि नियमानुसार तसेच सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही पावले उचलली जाणार नाहीत. त्याचबरोबर सातारच्या जिव्हाळ्याचा असणारा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिहे-कटापूर योजना पूर्ण होणार, अशी माहितीही श्री. शिवतारे यांनी सभागृहात दिली.
श्री. शिवतारे पुढे म्हणाले, नियोजन विभागाने दिलेल्या मर्यादेनुसार 197.35 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्यस्तरीय बैठकीत सादर केला होता. दि.11 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या आराखड्यावरील योजनांवर चर्चा होवून 197.35 कोटीच्या आराखड्यात 58.49 कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे. याप्रमाणे सन 2015-16 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियतव्यय 255.84 कोटी रुपये अंतिम करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सन 2014-15 साठी जिल्ह्यासाठी एकूण 228 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पित तरतूद प्राप्त झाली होती. उपलब्ध प्राप्त तरतूदीपैकी 100 टक्के निधी खर्च झालेला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरीच क्षेत्राचा माहे मार्च 2015 अखेरच्या खर्चाचा अहवाल सादर केला आहे. सन 2014-15 साठी मंजुर अर्थसंकल्पित तरतूद 124.30 कोटी होती. त्यापैकी रुपये 120.30 म्हणजेच रुपये 97.38 टक्के इतका खर्च झालेला आहे.सन 2014-15 साठी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 4812 लक्ष रुपये अर्थसंकल्पित तरतुदीपैकी 3909.41 लक्ष रुपये तरतूद प्रत्यक्ष प्राप्त झाली होती. त्यापैकी मार्च 2015 अखेर 3899.21 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. या तीनही उपयोजनांच्या खर्चास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली.
कास पठार येथे स्थलांतरीत शौचालय सुविधा पुरविणे व रस्ता सुधारणा करणे, ओझर्डे धबधबा विकसीत करणे, महाबळेश्वर येथील पॉईंटच्या स्वच्छतेसाठी प्लॅस्टिक विल्हेवाट मशिन पुरविणे, 332 अंगणवाडी इमारत बांधकामास मान्यता देणे तसेच माण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. नाविन्यपूर्ण योजनेमधून जिल्ह्यातील न्यायालयाध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा बसविणे आणि पाझर तलाव दुरुस्तीसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
आजच्या या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, निमंत्रीत, विशेष निमंत्रीत सदस्य उपस्थित होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित …
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सगळ्यांना अभिमान वाटावे असे महान कार्य मागील 75 वर्षे केले असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशातच नव्हे तर जगभर पोहोचविला आहे. श्री. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा एक गौरवाचा क्षण असून महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव जोडले गेल्याने या सन्मानाचे महत्व अधिकच वाढले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला.
सन 2015 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी राजभवन येथील दरबार हॉल येथे विशेष समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, सर्वश्री आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार महादेव जानकर, ॲड. आशिष शेलार, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रताप सरनाईक यांच्यासह महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमादरम्यान मान्यवर कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन प्रवास काही पोवाड्यातून सादर केला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन आपल्या भाषणाची सुरुवात करणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राजभवन येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रम का करण्यात आला असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते की, नवी दिल्ली येथे देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान हे राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात प्रदान करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान राज्यपाल भवन म्हणजेच राजभवन येथे राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य शिवचरित्र आणि जाणता राजाच्या माध्यमातून श्री. पुरंदरे यांनी सर्वदूर पोहोचविले आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण त्यांनी याद्वारे केले आहे. जाणता राजा आणि शिवचरित्र वाचले की, तरुणांना राष्ट्रभक्ती शिकविण्याची गरज उरत नाही असे मला वाटते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या सेवकाला राज्य शासनामार्फत सन्मानित करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईचे पालकमंत्री श्री. देसाई आपल्या भाषणात म्हणाले, आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणाचा मला साक्षीदार होण्याची संधी मिळाली, याचे मी भाग्य समजतो. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने महाराष्ट्र भूषण ही मालिका अधिकच समृद्ध झाली आहे, असे मी म्हणेन. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचून आणि ऐकून 4 पिढ्या समृद्ध झाल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याची महती परत परत सांगण्याची गरज नाही. यावेळी श्री. देसाई यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, एक दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मला फोन आला आणि फोनवरुन त्यांनी मला चित्रकार वासुदेव कामत यांना त्यांच्या चित्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीसह मातोश्रीवर घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. मी वासुदेव कामत यांना घेऊन मातोश्रीवर पोहोचलो असता तेथे बाबासाहेब पुरंदरे बाळासाहेबांबरोबर बसलेले होते. तेथे त्यांनी वासुदेव कामत यांना बाबासाहेब यांचे चित्र काढण्यास सांगितले. त्या दिवशी श्री. कामत यांनी ते चित्र काढल्यावर बाळासाहेबांनी स्वत: ते चित्र बाबासाहेबांना भेट दिले होते. आज जर शिवसेनाप्रमुख हयात असते तर ते नक्कीच श्री. पुरंदरे यांच्या सत्काराला राजभवन येथे उपस्थित राहिले असते. याच कार्यक्रमादरम्यान श्री. देसाई यांनी श्री. पुरंदरे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनही केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मनोगतात म्हणाले, मला आज आनंद आहे की मी सोप्या आणि सरळ भाषेत केलेले लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कलाकाराने कधीही अहंकारी असू नये आणि सतत नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवावी आणि म्हणूनच आज मी जरी 94 वर्षांचा असलो तरी मला दररोज काहीतरी वाचावे, लेखन करावे असे सतत वाटत असते. राज्य शासनामार्फत देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ही माझ्यासाठी आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे. गेली 80 वर्षे करीत असलेले कार्य यापुढील काळातही सुरू ठेवून माझ्याकडून अधिकाधिक चांगले लेखन व्हावे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आज राज्य शासनामार्फत महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबरोबरच 10 लाख रुपये मला रोख देण्यात आले असले तरी मी हे पैसे न घेता या पैशामध्ये माझे स्वत:चे 15 लाख रुपये घालून एकूण 25 लाख रुपये पुण्यातील मास्टर दिनानाथ आणि माई मंगेशकर रुग्णालयाला कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी देणार आहे.
या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित तज्ज्ञांच्या समितीने सन 2015 च्या या पुरस्कारासाठी बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांची निवड केली होती. बाबासाहेब गेली 70 वर्षे शिवचरित्रावर व्याख्यान देत असून आतापर्यंत त्यांनी 12000 हून अधिक व्याख्याने महाराष्ट्रासह जगभरात दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी 25 हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’चे लेखन करणारे शिवशाहीर, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत म्हणून ख्यातकीर्त असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले लेखन लोकप्रिय आहे. संशोधनवृत्ती, संयम, चिकाटी व तीव्र स्मरणशक्ती, सखोल अभ्यासासह शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास गुणवैशिष्ट्ये. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्राची गौरवशाली शिवकालीन परंपरा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली आहे. बाबासाहेब पुरंदरे वयाच्या 94 व्या वर्षीही त्याच तडफेने अफाट बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर शिवचरित्र आपल्या वाणीतून जिवंत उभे करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, चित्रकार वासुदेव कामत, पत्रकार राजीव खांडेकर, कीर्तनकार मंगलाताई कांबळे, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, ॲड. उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. या समितीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती.
निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनातर्फे दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार सन 1997 पासून देण्यात येतो. पु.ल.देशपांडे (साहित्य), लता मंगेशकर (संगीत), सुनील गावसकर (क्रीडा), डॉ. विजय भटकर (विज्ञान), सचिन तेंडूलकर (क्रीडा), भीमसेन जोशी (कला), डॉ. अभय बंग व राणी बंग (सामाजिक प्रबोधन), बाबा आमटे (सामाजिक प्रबोधन), डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), रतन टाटा (उद्योग), रा. कृ. पाटील (सामाजिक प्रबोधन), मंगेश पाडगावकर (साहित्य), नानासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), सुलोचना (मराठी चित्रपट), जयंत नारळीकर (विज्ञान), डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान) यांनाही राज्य शासनामार्फत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
60 परदेशी विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून शोधला ‘अतुलनीय भारत’
1000 जिल्हा केंद्राचे विकसित हरित शहरात रूपांतर करण्याची गरज : अनंतराव अभंग
शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुगंधी गोड दुधाचे वाटप
पुणे-अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसच्यावतीने पुणे कॅम्पमधील वजीर भगत संघेलिया चौकातील श्री जाहरवीर गोगादेव मंदिराजवळ शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुगंधी गोड दुधाचे वाटप संरक्षण विभागाचे मालमत्ता विभागाचे संचालक ए. भास्कररेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विनोद मथुरावाला , नगरसेवक अतुल गायकवाड , मनजितसिंग विरदी , मन्नू कागडा , कैलाशकुमार , अरविंद चव्हाण , निखिल बेड , मुकेश चव्हाण , विशाल चव्हाण , घनश्याम सुसगोहेर , राज गौतम , अनिल चावरे , राजेश बागडी , अजय पिवाल , सुनिता गवळी , दिनेश चनाल , नवीन सुसगोहेर , संजय बेगी , रवि भिंगानिया , मनोज पटेलिया , वाहिद बियाबानी, अनिल चावरे , महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
नागपंचमी सणासाठी लाखो लीटर दुधाचे नुकसान होते , नाग दुध पीत नाही , त्याऐवजी तेच लाखो लीटरचे दुध अनाथ मुलांना , नागरिकांना वाटण्यात आले . समाजप्रबोधनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला .असे कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांनी केले तर सूत्रसंचालन विजय बेद यांनी केले तर आभार अरविंद चव्हाण यांनी केले .










