पुणेकरांची आवडती सपना थाळी पुन्हा सेवेत सज्ज
युवकांनी पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजक व्हावे. -पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर
पुणे,दि. 13: दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे.अंडयांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती,व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्यानी पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंडयाचे पोषणमूल्य नागरिकांपर्यत पोहोचविणे, कुक्कूट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निमिर्तीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ते बोलत होते.
आरोग्याच्या दृष्टीने अंड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात महिलांची शारीरिक स्थिती अवघड आहे.यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा.अंडी उत्पादन घराघरांत व्हावे याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रसार करावा अशी अपेक्षा पालकमंत्री मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्यातील स्वयंसहायता बचत महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल माहिती दिली. आहारतज्ञ् डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्व त्यातील महत्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच अंड्याविषयी असणारे गैरसमज याबद्दल शंकानिरसन केले. यावेळी उपस्थितांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.आभारप्रदर्शन अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन आशिष जरद यांनी केले.
यावेळी केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई,मार्केट यार्ड कमिटीचे चेअरमन दिलीप खैरे,सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे विद्यार्थी, नागरिक, तसेच विविध विभागातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना १३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
नागपूर, दि. १३ ऑक्टोबर २०१७ : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सर्वश्री सचिन ढोले, विनोद बोंन्द्रे आणि सुरज वाघमारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळें वीज कर्मचा-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे
सवलतीत 12 हजार डायलिसिस पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा
मान्यवर वृध्द साहित्यिक, वृध्द कलाकार मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे दि.13: मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन योजनेसाठी इच्छूकांनी विहीत नमुन्यात अर्ज दहा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी दिली.
मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन देण्याची योजना 1954-55 पासून राज्यात राबविली जाते. शासन निर्णय दि. 22 ऑगस्ट 2014 नुसार सुधारित अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. ज्यांनी सांस्कृतिक, कला वाड:मय क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदिर्घ काळासाठी मोलाची भर घातली आहे व महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्या स्त्र्ी व पुरुष कलावंताचे व साहित्यिकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे. साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नाही. असे कलावंत अर्ज करु शकतात. जिल्हयातून प्राप्त प्रस्तावांची जिल्हा परिषद स्तरावर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रत्येक वर्षी शासनाने निश्चित केलेल्या इष्टांकानुसार 60 पात्र वृध्द साहित्यिक व कलावंतांची निवड केली जाते.
इच्छूक वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार यांनी विहीत नमुन्यात अर्ज करावेत. योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती, अर्जाचा नमुना व अटी/ शर्ती संबंधित तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून विनामुल्य उपलब्ध करुन घ्यावेत. परिपुर्ण अर्ज दोन प्रतीमध्ये कागदपत्रासह बातमी प्रसिध्द झाल्यापासून दहा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत असेही श्री.कोरगंटीवार यांनी कळविले आहे.
महिंद्र बाहा एसएईइंडिया २०१८ च्या अकराव्या आवृत्तीस प्रारंभ
- पहिल्यांदाच दोन बाहा कार्यक्रम – पितमपूर आणि रोपर
- ३३८ प्रवेशिकांमधील २२१ महाविद्यालयांना मिळणार अंतिम फेरीत प्रवेश
पुणे – महिंद्र अँड महिंद्र लि. ने एसएईइंडिया या ऑटोमोटिव्ह इंजिनियर्ससाठी असलेल्या व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने आज बहुप्रतिक्षित बाहा मालिकेच्या अकराव्या आवृत्तीचा प्रारंभ होत असल्याचे जाहीर केले. या आवृत्तीची अंतिमफेरी इंदौरजवळील पितमपूर येथील नॅट्रिप सुविधा केंद्रात २४ ते २८ जानेवारी २०१८ दरम्यान होणार असून त्यानंतर आयआयटी रोपार येथे ८ ते ११ मार्च २०१८ दरम्यान पार पडणार आहे.
बाहा एसएईइंडिया २०१७ साठी एकूण ३८८ प्रवेशिका आल्या होत्या, ज्यामधील १८० संघांची पारंपरिक बाजासाठी निवड करण्यात आली, तर ४१ संघ ईबाजासाठी व्हर्च्युअल फेरीतून निवडण्यात आले.
बाहा एसएईइंडियाने विद्यार्थ्यांना तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेत सहभागी होण्यासाठी एकच सीट असलेल्या चार चाकी ऑल- टेरेन व्हेइकलची (एटीव्ही) संकल्पना, बांधणी, चाचणी आणि अधिकृतता इत्यादी तयार करायला सांगितले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमात तांत्रित तपासणी, स्टॅटिक विश्लेषण उदा. डिझाइन, खर्च आणि विक्री साजरीकरण तसेच डायनॅमिक इव्हेंट्स उदा. अक्सलरेशन, स्लेज पुल, सस्पेंशन- ट्रॅक्शन आणि गतीशीलता यांचा समावेश असेल.
बाहा एसएईइंडियाचे उल्लेखनीय, अभिनव वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये दरवर्षी नव्या संकल्पनेचा अवलंब केला जातो. यावर्षी बाहा २०१८ ची संकल्पना ‘ग्राउंड टु ग्लोरी’ ही असून ती शून्यापासून सुरुवात करत वर्षभर संघर्ष आपले स्वप्न पूर्णत्वाला नेणाऱ्या उदयोन्मुख इंजिनियर्सची तळमळ, मेहनत, चिकाटी साजरी करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या आव्हानावर मात करून यश मिळवण्याच्या वृत्तीला सलाम करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांचा प्रवास आणि त्यांच्याकडून प्रत्येक सीमेला दिले जाणारे आव्हान यांचे प्रतीक असून त्यामुळे बाहा हा कार्यक्रम त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना यश प्रदान करणारी आहे.
बाहा एसएईइंडियाने २०१५ मध्ये भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ईबाहा मालिका सुरू केली. एमबाहा गाड्या १० एचपी आणि बी अँड एस गॅसोलिन इंजिन जे सर्व १८० संघांसाठी सारखेच असते त्यावर चालते, तर ईबाहा गाड्या इलेक्ट्रिक मोटर आणि चार्ज करण्यायोग्य लिथियम- इयॉन बॅटरीद्वारे विजेवर चालतात.
बाहा २०१८ मध्ये पुण्यातील २५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून त्यातील महाराष्ट्रातील ६४ प्रवेशिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. बाहा मालिकेच्या गेल्या काही आवृत्त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रवेशिक पुणे शहरातील होत्या. पुण्यातील महाविद्यालयांनी गेल्या काही वर्षांत अंतिम फेरीत सर्वाधिक बक्षिसेही मिळवली आहेत. बाहा २०१७ मध्ये प्रतिष्ठित बक्षिस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेने व त्याखालोखाल पुण्यातीलच अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने बक्षिस मिळवले होते. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेला ‘बेस्ट ईबाहा टीम’ पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आले होते.
बाहा पुरस्कारासाठी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जुलै २०१७ मध्ये चित्कारा विद्यापीठ, चंडीगढ येथे झालेल्या व्हर्च्युअल फेरीत चाचणीत परीक्षण करण्यात आले. इथे त्यांनी अंतिम फेरीसाठी बाहा बगी गाडीचे त्यांना इच्छित असलेले डिझाइन दाखल केले.
कॅड डिझाइन, सीएई विश्लेषण, रोल केजचे डिझाइन, सस्पेंशन, स्टिअरिंग आणि ब्रेक्स तसेच रूल बुक व्हायवा सत्र आणि त्यांना आयत्या वेळेस देण्यात आलेल्या विषयाच्या विश्लेषणावरून या संघांची निवड करण्यात आली. व्हर्च्युअल बाहादरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका दिलेल्या सूचना व तपशीलांनुसार बनवण्यात आलेले नमुने होते. अंतिम फेरीतील संघांना त्यांची स्वतःची बगी रेस कार तयार करत आपले वाहन क्षेत्रातील आपले कौशल्य, आकलन आणि तळमळ दाखवून द्यायची होती.
याप्रसंगी श्री. पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्र अँड महिंद्र लि. म्हणाले, ‘बाहा एसएईइंडिया २०१८ शी नाते जोडताना महिंद्रला आनंद होत आहे. बाजासोबत आम्ही महिंद्रची सतत प्रगती करण्याची विचारसरणी पुढे नेत आहेत. यंदा पितमपूर आणि आयआयटी रोपार या ठिकाणी मिळून दोन बाहा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ही बाहा एसएईइंडियाची वाढती लोकप्रियता आणि राष्ट्रीय महत्त्व यांची पावती देणारी आहे. यंदा ग्राउंड टु ग्लोरी ही संकल्पना साजरी करत असताना मला आनंद वाटतो, की बाजा एसएईइंडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जे तरुण इंजिनियरींग गुणवत्तेला वर्गात मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर मशिनरी तयार करत विजय मिळवण्यासाठी संधी देते.’
श्री. मुकेश के. तिवारी, आयोजक, बाहा एसएईइंडिया २०१८ आणि उप व्यवस्थापक महिंद्र टु व्हीलर्स लि. म्हणाले, ‘ या वर्षी एकंदर सहभाग २०१७ मध्ये १८ टक्क्यांनी वाढला आहे, तर एम- बाहा विभागातील सहभागात ३३ टक्क्यांची वाढ आहे. एम- बाहासाठी आमच्याकडे १२० संघ, तर पितमपूर आणि आयआयटी- रोपार येथील ई- बाहासाठी ३७ संघ आहेत.’
बाहा एसएईइंडिया बद्दल
बाहा एसएईइंडिया हा इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांसाठीचा शैक्षणिक उपक्रम असला, तरी तो वर्गाच्या चौकटीबाहेरचे व्यवहारिक ज्ञान मिळवून देण्यास मदत करतो. देशभरातील इंजिनीअरिंगचे विद्यार्थी इथे एक टीम म्हणून सहभागी होऊ शकतात तसेच त्यांना इंडस्ट्रीत वावरताना येणाऱ्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येतो. एसएई इंटरनॅशनलने सर्वात आधी अमेरिकेत सुरू केलेली मिनी बाहा एसएई स्पर्धा आज विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. भारतात बाहा एसएईइंडिया नावाने तिचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीच्या या स्पर्धेत जगभरातील विद्यापीठे सर्व प्रदेशांत चालू शकणारी कार डिझाइन, फॅब्रिकेट करून तिची तपासणी घेऊ शकतात. त्यानंतर स्टॅटिक, डायनॅमिक आणि टिकाऊपणासाठी असलेल्या डिझाइन, किंमतीची मीमांसा, सादरीकरण, अक्सलरेशन, चढ चढणी आणि सहनशीलता अशा पातळ्यांवर तिची चाचणी घेतली जाते.
इतक्या वर्षांत बाहाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवरचा मोठा कार्यक्रम ठरला आहे. बाहा एसएईइंडिया मालिका तरुण, उत्साही, गुणवान इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना वाहनउत्पादन क्षेत्राबद्दल असलेली आवड दाखवण्यासाठी संधी देते, शिवाय त्यांना सर्व प्रदेशांत चालू शकणारी चारचाकी, एक आसन असलेली गाडीची संकल्पना मांडण्यापासून तिचे डिझाइन बनवण्यापासून आणि फॅब्रिकेट करण्यापर्यंत पूर्णपणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते.
बाहा स्टिअरिंग समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. पवन गोएंका यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्थापना झाल्यापासूनच महिंद्र या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या पाच वर्षांपासून महिंद्र या कार्यक्रमाचा शीर्षक प्रायोजक असून यावर्षीसुद्धा ही परंपरा सुरू ठेवताना त्यांना अभिमान वाटत आहे. त्याशिवाय एआरएआय, अल्टेर, आनंद ऑटोमोटिव्हज, अनेसिस, एएसडीसी, एव्हीएल, भारत पेट्रोलियम, बीकेटी, बॉश, ब्रिग्ज अँड स्ट्राटॉन, चित्कारा विद्यापीठ, काँटिनेंटल, कमिन्स, डेल्फी, एलिएशन, एंड्युरन्स, जीएम, आयएसी, आयसीएटी, आयटीडब्ल्यू केमिन, जॉन डिअरे, लिअर, एल अँड टी, मॅथ वर्क्स, मेदांता हॉस्पिटल, मेंटॉर ग्राफिक्स, एम पी. कन्सलटिंग, नॅटिप, ओयो रूम्स, पद्मिनी इंजिनियरिंग, पोलारिस, प्रिया इव्हेंट्स, रॅडिसन हॉटेल्स, व्हॅरॉक, व्होल्वो, वुर्थ आणि झिटाडेल हे ही अभिमानाने आपला पाठिंबा या कार्यक्रमासाठी देत आहेत. त्याशिवाय एसआयएएम आणि एसीएमए यांचाही या कार्यक्रमाला पाठिंबा लाभलेला आहे.
ईबाहा बद्दल
ईबाहा हा बाहा एसएईइंडियाच्या एससी आणि ओसी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे, ज्यात दरवर्षी १००० इंजिनियरिंग विद्यार्थी भाग घेतात. भारतातील उदयोन्मुख इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी २०१५ मध्ये श्री. सुबोध मोर्ये यांच्या आयोजनाखाली आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. या व्यासपीठावर इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना बाहा रूलबुकनुसार इलेक्ट्रिक गाडी तयार करण्याची आणि ही गाडी इलेक्ट्रिक ताकदीच्या सहाय्याने काय कमाल करते हे अनुभवण्याची संधी मिळते. यातील एका सत्रादरम्यान हिज एक्सलन्सी स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती, भारत यांनी आयोजक समितीला या व्यासपीठाचा देशाच्या समृद्धीसाठी वापर करण्याची सूचना दिली होती. त्यांच्या विचारांनी भारावलेल्या आयोजक समितीने आठव्या सत्रात ई- बाहा हा एक उप- कार्यक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. नेहमीचा बाहा कार्यक्रम पेट्रोलवर चालणाऱ्या एटीव्हीवर आधारित असून ईबाहा गाड्या रिचार्ज होऊ शकणाऱ्या लिथियम इयॉन बॅटरी पॅकची जोड लाभलेल्या इलेक्ट्रिक मटोरवर चालतात.
ईबाहा ही इलेक्ट्रिक बाहा एटीव्हीवर आधारित संकल्पना असून ती इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर देते. जीवाश्म इंधन बनण्यासाठी सौर उर्जेची कित्येक वर्ष खर्च होतात आणि अतिश दुर्मीळ भौगोलिक परिस्थितीत ती तयार होतात व निसर्गासाठी धोकादायक असतात. म्हणूनच आपल्याला उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि मानवनिर्मित हवामानबदल स्थिर करण्यासाठी शाश्वत तसेच स्वच्छ तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय इंधनाचे हे स्त्रोत चिरकाल टिकणारे नसल्यामुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो. त्याआधीच आपल्याला वाहतुकीसाठी पर्यायी उर्जा स्त्रोत तयार करणे व शाश्वत विकास साधणे आवश्यक आहे. म्हणूनच इलेक्ट्रिक मोबिलिटीला चांगले भविष्य असेल आणि ते देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असे आम्हाला वाटते.
देशातील सर्व कलाप्रकारांना एकत्र आणावेेः पद्मभूषण सेठी
एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे पद्मभूषण राजीव सेठी यांना जीवन गौरव पुरस्कार
पुणे, दि.13 ऑक्टोबर: “संगीत, हस्तकला, वास्तुशिल्प, वस्त्रप्रावरणे इ. त्याचप्रमाणे सर्व राज्यातील कलाप्रकारांना एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यामुळे कलाकारांची कला जगासमोर आणल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारच्या आर्थिक मदती बरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळत जाईल.” असे उद्गार एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक पद्मभूषण राजीव सेठी यांनी काढले.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांना‘ जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा हे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं.अतुल कुमार उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे अंकुश सेठी, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ.चंद्रकांत पांडव, सल्लागार डॉ. जय गोरे, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ.एल.के. क्षीरसागर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम.पठाण आणि माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे हे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना पद्मविभूषण राजीव सेठी म्हणाले,“ भारताच्या प्रत्येक विभागात सृजनात्मक कला दिसते. या देशात विशेषकरून लोककला आणि हस्तशिल्प या सर्वेत्कृष्ठ कला दिसतात. मुंबई विमानतळावर प्रथमच कला क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला. त्यामुळे देशातील सर्व कलाप्रकारांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. तेथे 7 हजार कलाकृती पहावयास मिळतात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अध्यात्म हा महत्वपूर्ण घटक आहे. तोच धागा पकडून आम्ही विज्ञान आणि अध्यात्माच्या आधारे शिक्षण देण्याचे कार्य करीत आहोत. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे 21वे शतक हे भारताचे शतक असेल. तसेच, भारत देश संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देईल.”
पं.अतुल कुमार उपाध्ये म्हणाले,“ संगीत ही सर्व जगाची भाषा आहे. संगीत ही कला देश व संपूर्ण मानवजात यांना जोडण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करते. मी व्हायोलिनवादक असल्यामुळे प्रत्येक वेळेस माझे व्हायोलिन सर्वांशी बोलत असते.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्थापनेबरोबरच विश्वशांतीसाठी केल्या जाणार्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
डॉ. चंद्रकांत पांडव यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा
मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. असाच वेगळ्या आशय आणि विषयाच्या ‘Thank U विठ्ठला’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता–दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते उत्साहात नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केली असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला संदेश देणारा ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं अभिनेता महेश मांजरेकर यांनी याप्रसंगी सांगितलं. मी आणि मकरंद अनासपुरेनी ‘Thank U विठ्ठला’ च्या निमित्ताने बऱ्याच दिवसाने एकत्र काम केलं असून आम्ही जितका हा चित्रपट एन्जॉय केला तितकाच तो प्रेक्षकही एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात पहाता येईल.
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.
चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.
३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.
अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गिरीश बापट
पुणे,दि. 12: जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. या तालुक्याचा विकास करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दोघांनी समन्वयाने काम केल्यास हे सहज शक्य आहे,असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.शासकीय विश्रामगृह पुणे येथे आयोजित जुन्न्नर तालुक्यातील विविध विषयासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे,जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सुवेज हक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.सकारात्मकतेने जनतेसाठी विकासाची कामे करत राहावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.
जागतिक संधीवात दिना निमित्त ‘वॉकथॉन’ संपन्न
पुणे-साई श्री हॉस्पिटल तर्फे जागतिक संधीवात दिना निमित्त ‘वॉकथॉन’ चे आयोजन करण्यात आले होते.हे वॉकथॉन हॉटेल सीझन,औंध ते साई श्री हॉस्पिटल औंध पर्यंत घेण्यात आले.
संधीवाताचे दिवसोनदिवस वाढणारे प्रमाण पाहता संधिवाता विषयी जनाजृतीसाठी व्हावी यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी साई श्री हॉस्पिटल व्यवस्थापकीय संचालक डॉ. नीरज आडकर असे म्हणाले की “बदलत्या जीवनशैलीमुळे, संधिवात हा तरुणपणातही होऊ शाकतो यासाठी लहान पणापासूनच व्यायामाची सवय जोपासणे आवश्यक आहे मात्र या व्यायामाचा अतिरेक करणेही चुकीचे आहे .“ त्या बरोबर ते असेही म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांनी दररोज सकाळ व संध्याकाळ चालणे आवश्यक आहे मगच या संधिवाता पासून लांब राहता येईल.
या वॉकथॉन मध्ये १८० ते २०० स्त्री पुरुषांचा सहभाग होता व ज्येष्ठ नागरिक हि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.हे वॉकथॉन साई श्री हॉस्पिटल यांच्या बरोबर ज्येष्ठ नागरिक संघटना, बाणेर तसेच ज्येष्ठ नागरिक संघ औंध व पुणे यांचाही यात सहभाग होता.
कॉंग्रेस भवनात नाचले …नेते ..अन कार्यकर्ते ..(व्हिडीओ)
पुणे-पुण्याच्या कॉंग्रेस भवनातला आनंदोत्सव ..पहावा असा ..आणि अनुभवावा असाच ठरला . नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला मिळालेल्या यशाची बातमी येथे धडकताच कॉंग्रेस भवनाचे आवार गर्दीने फुलून गेले. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे दुपारी येथे येताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला . पेढे वाटले, नाचले … फटाके फोडले .. आणि ‘नांदेड तो झाकी है ..गुजरात अभी बाकी है ..’ च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या .माजी आमदार मोहन जोशी , रोहित टिळक,नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, तसेच सोनाली मारणे, विठ्ठल थोरात ,पीएमटी चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते तसेच लतेंद्र भिंगारे,राजू साठे ,आयुब पठाण ,संदीप मोकाटे , विकी खन्ना ,आदी असंख्य कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते .
यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमेश बागवे यांनी , नांदेड पासून भाजपला संपवायला कॉंग्रेसने सुरुवात केली असल्याचे सांगितले . अशोक चव्हाण आणि सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी केलेले प्रयत्न ,राहुल गांधींच्या बाबत वाढलेल्या जन आशा .. आणि भाजप सरकारने केलेली जनतेची फसवणूक यामुळे हा विजय मिळाल्याचे बागवे यांनी सांगितले . या विजयाचे वारे राज्यभर आणि देशभर पसरेल असेही ते म्हणाले .
पहा कॉंग्रेस भवनातील बहार … (व्हिडीओ)
खासदार काकडे यांचा पुन्हा अचूक अंदाज!
कांबळे व कार्यकर्त्यांचे खासदार काकडेंकडून अभिनंदन
पुणे, दि. 12 ऑक्टोबर : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा साडे चार हजार ते पाच हजार मताधिक्याने आज दणदणीत विजय झाला आणि भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी वर्तविलेला अंदाज खरा ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार काकडे आणि त्यांच्या राजकीय अभ्यासाचे गणित समोर आले.
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यातर्फे नुकत्याच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार काकडे यांनी हा अंदाज वर्तविला होता. यावेळी खासदार अनिल शिरोळे व शहराध्यक्ष योगेश गोगावले आदींची उपस्थिती होती.
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खासदार काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना विनंती केली होती. परंतु, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. निवडणूक कमळ चिन्हावर होत असल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उभा करण्यात आला. खासदार काकडे यांनी सुरुवातीपासूनच हिमाली कांबळे यांच्या विजयासाठी नियोजन केले होते. त्यास चांगलेच यश आले.
जीएसटीमुळे व्यापार व उद्योग क्षेत्र त्रस्त असल्याचा व पेट्रोलच्या भावामुळे महागाई वाढल्याचा विरोधकांनी प्रचार केला. परंतु, मतदारांनी या मुद्द्यांना बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले. हेच यातून स्पष्ट होते, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. तसेच, विजयी उमेदवार हिमाली कांबळे व त्यांच्या विजयासाठी काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक झाली. राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्यावर हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी मात केली. हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली.



