रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये महिला दिन साजरा !
‘अपारंपारिक उर्जा’ निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी -डॉ. दीपक केळकर
तर ..समोर कोणीही येवू द्यात.. – खा. संजय काकडेंचे आव्हान (व्हिडीओ)
पुणे-भाजपचे सहयोगी अशी ओळख निर्माण झालेले राजसभेतील अपक्ष खासदार संजय काकडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जाहीर घोषणा केली.कॉंग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी देतील ती जबाबदारी आपण पार पाडू ,मला कोणताही शब्द देण्यात आलेला नाही पण जर कॉंग्रेसने मला उमेदवारी दिली तर समोर कोणीही येवू द्यात ,मला काही फरक पडत नाही असे आव्हान हि यावेळी काकडे यांनी पुण्याचे पालकमंत्री बापट यांच्यासह अन्य विरोधी उमेदवारांना दिले आहे .
काल सकाळी ‘मायमराठी’ ने काकडे यांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्याबाबत दिल्ली दरबारी विचार झाल्याचे वृत्त दिल्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली .या पार्श्वभूमीवर ,आज माध्यमांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते , ते म्हणाले ‘काँग्रेस पक्षाबद्दल माझी आधीपासूनच सकारात्मक भूमिका होती. या पक्षाच्या एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिले आहे. काँग्रेस हा त्यागातून तयार झालेला पक्ष आहे. हा पक्ष सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालतो. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी काही दिवसांपासून दिल्लीत होतो. मी अनेक काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली आहे. अजून मी पक्षात प्रवेश घेतला नसला तरी लवकरच अधिकृत पक्षप्रवेश करणार आहे, असे काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
दरम्यान, आगामी काळात पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो मला मान्य आहे. लोकसभेसाठी काँग्रेसकडून विचारणा झाल्यास समोर कोण असेल याचा मला फरक पडत नाही, असे सांगत त्यांनी गिरीश बापट यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले.
काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यापुर्वी भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा झाली का? किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल काय भूमिका आहे असे विचारले असता, मुख्यमंत्र्यांशी वैयक्तीक मतभेद नाहीत. मी पक्ष सोडला असला तरी आमची मैत्री कायम राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मनसे आमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेना प्रवेश
भारताच्या 19वर्षाखालील अ क्रिकेट संघात पीवायसीच्या सिद्धेश वीर याची निवड
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या कुंचबिहार 19वर्षाखालील करंडक व विनू मंकड 19वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना 19वर्षाखालील संघाच्या सिद्धेश वीर याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची निवड भारताच्या 19वर्षाखालील अ क्रिकेट संघात करण्यात आली आहे.
तिरुअनंतपुरम येथे भारत अ व ब संघ, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या क्वाडरँग्युलर मालिकेसाठी सिद्धेश वीर याचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. सिद्धेश हा गेली 4 वर्षे तो निरंजन गोडबोले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सराव करत होता. सध्या तो प्रशिक्षक पराग शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीवायसी 19वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
कुंचबिहार 19वर्षाखालील करंडक स्पर्धेत सिद्धेशने 57.43 धावगतीच्या सरासरीने एकूण 804धावा केल्या असून यामध्ये 2 शतके झळकावली आहेत. तसेच, फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगीरी करत त्याने 31.42च्या सरासरीने धावा देत 26 विकेट घेतल्या असून यामध्ये एका सामन्यात 50 धावात 5 गडी बाद केले होते.
तसेच, विनू मंकड 19वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत 39.13 धावगतीच्या सरासरीने एकूण 313धावा केल्या असून यात त्याने सर्वाधिक 85 धावा केल्या आहेत. भारतीय 19वर्षाखालील अ संघात सिद्धेश वीर याच्या निवडीबद्दल पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने त्याचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे,क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आदी मान्यवर उपस्थित होते.
पीएमआरडीए च्या परवडणाऱ्या ३२ हजार घरांना मंजुरी,पहा कुठे केवढ्याला घर ..
पुणे: केंद्र शासनातर्फे केंद्रीय संनियंत्रण व मान्यता समितीच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३२ हजार ६२७ परवडणा-या घरांना मंजूरी देण्यात आली. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आणखी ३० हजार १९१ सदनिका प्रस्तावित असून त्यातील २० हजार २०६ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधणार आहेत.
महाराष्ट्रात राज्यातील परवडणा-या घरांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक 3 नुसार एमएमआरडीएमार्फत माण-महाळूंगे नगर रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर १४ ठिकाणी सुमारे १३.३ हेक्टर क्षेत्रावर परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ (महाहौसिंग)सोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर ही घरे बांधण्यास पीएमआरडीएला मान्यता मिळाली आहे.या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न (ईडब्ल्यूएस)व अल्प उत्पन्न गटासाठी ६ हजार ५०३ परवडणा-या घरांची निर्मिती केली जाणार आहे.या योजनेमुळे माण-महाळुंगे परिसरातील लोकसंख्या १.५ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर खासगी विकासकाकडून घटक ३ नुसार परवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठी ६ विकसकांचा सहभाग मिळाला असून २३ हजार ६८८ घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी १३ हजार ७०३ घरांची निर्मिती शासकीय दराने केली जाणार आहे. त्याचप्रमाणे भागीदारीमधील परवडणा-या घटकांतील घरांसाठी २.५ लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी तसेच सदर सदनिकांचा लाभ मिळविण्यासाठी www.pmrdapmay.com या
संकेतस्थळावर भेट द्यावी व ९५६१३३८९६२/७२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
वाघोली, भावडी, मुळशीत घरे
हवेली तालुक्यातील भावडी येथे १८० ,आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकांसाठी वाघोलीत 425 परवडणा-या सदनिका,मुळशी तालुक्यात ७०३ तर लोणीकंदमध्ये १ हजार २७१,महाळुंगे येथे १० हजार ६१३ परवडणा-या सदनिका केल्या जाणार आहेत.माण-महाळुंगे येथे २ हजार ३८७ घरे निर्माण केली जाणार आहेत.
भावडी येथील झेन स्पेस इको टाऊन या बिल्डरच्या २ प्रकल्पात ७२० सदनिका असून प्रत्येकी किंमत १२ लाख ८७ हजार एवढी आहे .वाघोलीत गुनिना बिल्डरच्या प्रकल्पात ८४० सदनिका असून त्यांची प्र्त्यर्की किंमत १२ लाख २८ हजार एवढी आहे .मुलखेड(मुळशी )दीपार्थ इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या १२९२ सदनिका असून त्यांची प्रत्येकी किंमत ७ लाख ८४ हजार एवढी आहे.लोणीकंद येथील कोलते हाऊसिंग मधील २४५२ सदनिका असून त्यांची प्रत्येकी किंमत ९ लाख १२ हजार एवढी आहे.म्हाळुंगे येथे पोतदार हबितेत यांच्या १८ हजार ३८४ सदनिका असून त्यांची प्रत्येकी किंमत १८ लाख ७९ हजार एवढी आहे.मान म्हाळुंगे येथे महा हाऊसिंग आणि पीएमआरडीए च्या ६५०३ सदनिका याच किमतीत आहेत
अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे घोडे अडले …
पुणे-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची घोषणा झाली . बजेट मध्ये नाममात्र तरतुदी झाल्या .पण नुकत्याच झालेल्या मुख्य सभेत या रुग्णालयासाठी केलेल्या अवघ्या २ कोटी ६५ लाखाची तरतूद महापालिका सेवकांच्या रिंअम्बेसमेंट साठी वळविण्यात आली . या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी सल्लागार नेमावा असा प्रयत्न वादाच्या भोवऱ्यात आहे . या पार्श्वभूमीवर पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या प्रकल्पा संदर्भात मांडलेली मते देखील महत्वाची आहेत .पहा नेमके काय म्हणाले उपमहापौर …
खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या अन्वीत बेंद्रे याला दुहेरी मुकुट- महिला गटात निधी चिलुमुला यांना विजेतेपद
पुणे- पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूषांच्या गटात महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट पटकावला. महिला गटात हैद्राबादच्या निधी चिलुमुला हिने विजेतेपद संपादन केले.
पुना क्लब टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने दिल्लीच्या दुसऱ्या मानांकित कुणाल आनंदचा टायब्रेकमध्ये 7-5, 1-6, 7-6(5) असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. चुरशीच्या 2तास 30मिनिटे झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये कुणालने पहिल्याच गेममध्ये अन्वीतची, तर दुसऱ्या गेममध्ये अन्वीतने कुणालची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत अन्वीतने 2-1अशी आघाडी घेतली. त्यानंतर अन्वीतने कुणालची चौथ्या व आठव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-3अशी आघाडी घेतली. सामन्यात 15-30अशा फरकाने आघाडीवर असताना 12व्या गेममध्ये कुणालने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत अन्वीतने सुरेख खेळ करत त्याची सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या कुणालने जोरदार कमबॅक करत अन्वीतची तिसऱ्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1असा सहज जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये अन्वीत याने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत कुणालची सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट टायब्रेकमध्ये 7-6(5)असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
महिला गटात अंतिम फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित तेलंगणाच्या निधी चिलुमुलाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत चौथ्या मानांकित आंध्रप्रदेशच्या सोहा सादिकचा 6-4, 6-0असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 30मिनिटे चालला. निधी हि हैद्राबाद येथे सायनेट टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक रवीचंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने रोहन भाटियाच्या साथीत परिक्षित सोमाणी व सुरेश दक्षिणेश्वर यांचा 2-6, 4-6, 10-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. महिला गटात तेलंगणाच्या श्राव्या चिलकलापुडी व गुजरातच्या वैदेही चौधरी यांनी तेलंगणाच्या हुमेरा शेख व मध्यप्रदेशच्या सारा यादवचा सुपरटायब्रेकमध्ये 4-6, 6-1, 10-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरूष दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूला 11,340 रूपये व महिला दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूला 7,560 रूपये अशी पारितोषिके देण्यात आले.
स्पर्धेतील एकेरीच्या पुरूष गटातील विजेत्या खेळाडूला 23,400 रूपये व 35 एआयटीए गुण तर, उपविजेत्या खेळाडूला 16,200 रूपये व 25 एआयटीए गुण देण्यात आले. महिला गटातील विजेत्या खेळाडूला 15,600 रूपये व उपविजेत्या खेळाडूला 10,080 रूपये देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष राहुल ढोलेपाटील, क्लबचे उपाध्यक्ष नितीन देसाई, आणि स्पर्धेचे संचालक व पुना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव सचिन राठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नल सरकार, शशांक हळबे, जयदीप पटवर्धन, विराफ देबू, नितीन कीर्तने, वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: एकेरी: पुरुष गट:
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)वि.वि.कुणाल आनंद(दिल्ली)(2)7-5, 1-6, 7-6(5)
अंतिम फेरी: एकेरी: महिला गट:
निधी चिलुमुला(तेलंगणा)(7) वि.वि. सोहा सादिक(आंध्र प्रदेश)(4) 6-4, 6-0;
दुहेरी: पुरुष गट: अंतिम फेरी:
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)/रोहन भाटिया(3) वि.वि.परिक्षित सोमाणी/सुरेश दक्षिणेश्वर(तामिळनाडू)(2)2-6, 4-6, 10-5;
महिला गट:
श्राव्या चिलकलापुडी(तेलंगणा)/वैदेही चौधरी(गुजरात)वि.वि.हुमेरा शेख(तेलंगणा)/सारा यादव(मध्यप्रदेश)4-6, 6-1, 10-5.
पद्मा कांबळे पुरस्कृत गटाच्या गंगा धेंडे ‘परिवर्तनाचे दूत पुरस्काराच्या मानकरी
रक्त पिशव्यांच्या दरवाढीविरोधात आंदोलनाचा इशारा
पुणे : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते सामाजिक जाणिवेतून केले जाते. त्यामुळे रक्ताची उपलब्धता व त्यासंबंधीचा व्यवसाय हा देखील सामाजिक जाणिवेतूनच व्हायला हवा. मात्र, रक्तांच्या पिशव्यांचे सध्याचे दर हे अवाजवी आहेत. दोन हजार रुपयांपर्यंत रक्ताच्या पिशवीची विक्री होते. हा प्रकार बेकायदेशीर व सामाजिक जाणिवेला काळिमा फासणारा आहे. म्हणून रक्तहितवर्धिनी याविरोधात आंदोलन पुकारणार असून आम्ही सरकारच्या विरोधात जनतेत जाणार आहोत व जनजागृती करणार आहोत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान मोदी ते पालकमंत्री बापट यांच्यापर्यंत अर्ज विनंत्या करुन त्यांना कळत नसेल तर, येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जनतेमध्ये सरकारची रक्तदानाविषयीची उदासिनता उघड करणार आहोत. सरकारमधील मंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी आम्ही जाणार व रक्तदानाबद्दलचा सरकारचा नाकर्तेपणा उघड करणार, असे शिंदे म्हणाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील, शंकर पवार, दिलीप इंगळे, धनंजय झुरंगे, समीर पवार, राजाभाऊ यादव, मुकेश पोटे, यादव पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून अनेक सामाजिक संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. रक्तपेढ्यादेखील यामध्ये सहभागी होतात. मात्र, रक्तदात्याला आमिष दाखवून रक्तदान शिबिर होऊ नये. कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. आमिष देण्याचे प्रकार रक्तपेढ्यांकडून किंवा इतरांकडूनही केले जातात. त्यामुळे संबंधीत आमिषाचा खर्च भरुन काढण्याचा प्रकार रक्त पेढ्यांकडून होत असतो. परिणामी रक्ताच्या पिशव्या सांभाळण्याची किंमत कमी असतानादेखील वाढीव दराने रक्ताच्या पिशव्यांची विक्री होत आहे. हा प्रकार तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि अन्नधान्य व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना सविस्तरपणे लिखित स्वरुपात सांगितला आहे, असे शिंदे म्हणाले.
‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ‘ मधील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
अहिल्यादेवी हेच नांव बरोबर! वा. ना. उत्पातांनी समाजाची माफी मागावी- सोनवणी
पुणे- अहिल्या की अहल्या हा वाद केवळ विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव दिल्याबद्दल पोटशूळ उठलेल्या मंडळींचे
प्रतिनिधी श्री. वा. ना. उत्पात यांनी निर्माण केला आहे. यामुळे जनसामान्यांत संभ्रम पसरला असून नामविस्तारामुळे झालेल्या
आनंदावर विरजन पडले आहे. वैदिक धर्माचे अभिमानी लोक प्रत्येक शब्दाचे कृत्रीम संस्कृतीकरण करत तेच शब्द मुळचे आहेत
असा दावा आजवर करत आले आहेत. अगदी सालाहनचे शालिवाहन, सूग या मुळच्या शब्दाचे शृंग असली असंख्य मुळ प्राकृत
शब्दांची पोरकट संस्कृत रुपांतरे केल्याने इतिहासाची अक्षम्य हानी झालेली आहे. ‘अहिल्या’हे नांव चुकीचे असून ‘अहल्या’ हे
नांव असले पाहिजे असे श्री. वा. ना. उत्पातांचे मतही याच प्रकारात मोडते. त्यांनी दिलेली अहल्या या शब्दाची व्युत्पत्तीही चुकीची
असून’अहेव लेणे ल्यालेली ती अहिल्या’ असा या जनमानसात रुळलेल्या मुळच्या प्राकृत शब्दाचा अर्थ आहे. समाजात उगाचच
गोंधळ माजवून सामाजिक तेढ पसरवण्याचे काम केल्याबद्दल श्री. उत्पात यांनी जनतेची जाहीर लेखी माफी मागीतली पाहिजे
अशी मागणी आदिम हिंदू महासंघाचे अध्यक्ष व इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी केली. महाराजा यशवंतराव होळकर गौरवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश खाडेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
वैदिक परंपरेतील संस्कृतकरण केलेल्या अहल्या या शब्दाचा अहिल्या या शब्दाशी व त्याच्या मूळ अर्थाशी काहीही संबंध
नाही. प्राकृत हीच मुळची भाषा असून संस्कृत भाषा ही इसवी सनाच्या दुस-या शतकात जन्माला आली. प्राकृतातील अगणित
शब्द या भाषेने ध्वनीबदल करुन स्विकारले, पण या उद्योगात अनेक शब्दांचा मुळ अर्थ व संदर्भ हरपला. ही इतिहासाची नासाडी
करणारी बाब होती. परंतू वैदिक धर्माभिमानी आपल्या वर्चस्ववादाच्या नादात सामान्य हिंदूत सातत्याने अपसमज पसरवत राहिले
आहेत आणि त्यामुळे सामाजिक हानी होत आहे असेही श्री. सोनवणी म्हणाले.
होळकर घराण्याबाबत वारंवार खोटे आक्षेप घेत प्रवाद पसरवले जातात. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव
देण्यासही होळकरांबद्दल असलेल्या असुयेपोटी विरोध केला जात होता. विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव दिले तर समाजात तेढ
माजेल असे वादग्रस्त विधानही शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी केले होते. आता विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ज्यांचा
पोटशूळ उठला आहे ते आता अनैतिहासिक वायफळ वाद उकरुन काढत आहेत. यामुळे समाजात नाराजी पसरली असून धनगर समाजाची एक तरी मागणी मान्य झाली म्हणून झालेल्या आनंदावर विरजन घालण्याचा अक्षम्य प्रकार श्री. उत्पातांकडून घडला
आहे, असेही सोनवणी म्हणाले.अहिल्या हा शब्द पहिल्या शतकातील गाथा सप्तशतीतही आलेला आहे. संस्कृत भाषा तेंव्हा जन्मालाही आलेली नव्हती.शिवाय सुभेदार मल्हारराव होळकर ते स्वत: अहिल्यादेवी आपल्या पत्रांत अहिल्या असाच उल्लेख करत आले आहेत. नाना
फडवणीस ते दिल्लीचा बादशहाही त्यांच्या पत्रांत अहिल्याच म्हणतात. समकालीन शिलालेखांतही अहिल्या हेच नांव आलेले आहे.
जनमानसात अहिल्या हेच नांव लोकप्रिय व आदरणीय राहिले आहे. खुद्द अहिल्यादेवींनाच चूक ठरवू पाहण्याचा अश्लाघ्य प्रकार
श्री. उत्पात यांच्याकडून घडला आहे. प्राकृत भाषेतील शब्दांना मूळ न मानता नंतर आलेल्या संस्कृत भाषेत असलेले शब्द मूळ
मागणे हा वैदिक परंपरेचा डाव आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला दिले हे सहन न झाल्याने पोटशूळ
उठलेल्यांनी हा वाद निर्माण केला आहे. आदिम हिंदू महासंघ या प्रवृत्तीचा निषेध करतो व श्री. वा. ना. उत्पातांनी समस्त
समाजाची लेखी जाहीर माफी मागावी अशी मागणी करतो, अन्यथा त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशाराहीश्री. संजय सोनवणी यांनी केला. या प्रसंगी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश खाडेही उपस्थित
होते.
संजय काकडेंसह कॉंग्रेसने केली १२ उमेदवारांची नावे निश्चित
नवी दिल्ली: पुण्याच्या संजय काकडे यांच्यासह ,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच संजय निरुपम आणि प्रिया दत्त यांच्यासह 12 जणांची उमेदवारी शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस स्क्रीनिंग कमिटीने निश्चित केल्याचे वृत्त आहे.यूपीए -2 मधील प्रतिक्षा पाटील यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे .राज्यात उर्वरित 14 जागांसाठी उमेदवारांना क्लिअरिंगसाठी चर्चा सुरू आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) संस्थेचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, राज्य काँग्रेसचे प्रमुख अशोक चव्हाण आणि माजी महाराष्ट्र राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या बैठकीतील प्रमुखांमध्ये समावेश होता .
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात 11 जागांसाठी नामांकित उमेदवारांची नावे औपचारिकपणे 11 मार्चच्या निवडणुकीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीनंतर जाहीर होतील.
महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा जागांपैकी कॉंग्रेस 26 जागांवर निवडणूक लढवेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) 22 जागांवर लढणार आहे.पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, शिंदे यांची उमेदवारी सोलापूर सीटसाठी मंजूर केली गेली आहे, निरुपम यांचे नाव मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून घेण्यात आले आहे.सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांचीही निवड करण्यात आली आहे. तथापि, त्यांचा मतदार संघ अद्याप निश्चित नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस पुणे मतदारसंघातून निवडणूक लढवत असून संजय काकडे यांचे नावही मंजूर केले आहे, सध्या भाजपचे सहयोगी अशी ओळख असलेले काकडे हे राज्यसभेचे स्वतंत्र सदस्य आहेत. श्री काकडे औपचारिकपणे कॉंग्रेसमध्ये सामील झाले नाहीत परंतु आगामी काही दिवसांत ते अधिकृत प्रवेश करतील असे सूत्रांनी सांगितले
आव्हानात्मक क्षेत्रांतही महिलांचा ठसा -प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी
पुणे एकाच वेळेला अनेक अवधाने सांभाळत आयुष्य जगणार्या महिलांनी विज्ञान, संरक्षण, अवकाश आदी जीवनातील आव्हानात्मक क्षेत्रांतही कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. महिलांच्या प्रगतीचा उंचावलेला आलेख देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवेल असा विश्वास फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. परदेशी बोलत होते. उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, महिला संरक्षण, स्त्री भ‘ूण हत्येला विरोध, हुंड्याला विरोध आदी विषयांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूबिना मुल्ला , शर्मिला येवले, रूपाली शिंदे, अमृता काथे, निर्मला तळपे यांनी संयोजन केले.
पीएमआरडीएच्या १७२२ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी- रिंगरोड, नदी सुधार पाणीपुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकासकामासाठी भरीव तरतूद
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)ची सहावी प्राधिकरणसभा मुख्यमंत्री,
देवेंद्र फडणवीस ,यांच्याअध्यक्षतेखालीसह्याद्री अतिथी सभागृह, मलबार हिल, मुंबई येथे शुक्रवारी संपन्न झाली.या
बैठकीमध्ये पीएमआरडीएच्या २०१९-२०च्या रुपये १७२२ कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. तसेच
यावेळी मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते विकास नियंत्रण नियमावली पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते.
सदर सभेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरनाच्या सन २०१९-२०साठीच्या एकूण रक्कम रुपये १७२२ कोटी १२
लक्ष इतक्या अंदाजपत्रकिय तरतुदीस आज रोजी मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये आरंभीची शिल्लक रक्कम रुपये ७९४
कोटी इतकी आहे. त्यामध्ये रिंग रोड प्रकल्पासाठी ५६९ कोटी, नदी सुधार व पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ३५ कोटी, टीपी
स्कीममधील विविध विकासकामासाठी ३२० कोटी, प्राधिकरण क्षेत्रात पूल, सबवे रस्त्याचे काम करण्यासाठी १२५
कोटी, हायपरलूपसाठी ५५ कोटी, व इतर योजनावरील खर्चासाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पीएमआरडीएच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून
चालना मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार
आहे.
– प्रधानमंत्री आवास योजनेची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळासोबत परवडणाऱ्या घरांसाठी सयुंक्त
भागीदारी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ३ अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या नगर
रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर परवडणारी घरे “महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ”
सोबत सयुंक्त भागीदारी (Joint venture) तत्वावर बांधणेसाठीच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता मिळाली आहे. पुणे शहर
व महानगरातील नागरिकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी प्राधिकरणामार्फत नियोजनात्मक विकास व पायाभूत सुविधा
विकसित करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेसाठी एकूण १४ विविध ठिकाणी १३.३
हेक्टर क्षेत्रावर महाळुंगे-माण नगररचना योजनेच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उभी केली
जाणार आहेत.त्यासोबत रस्ते, वीज, गटारे आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
– राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून हडपसर महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र.५६ रस्ता कॉंक्रीटीकरणद्वारे
चौपदरीकरणास मंजुरी
पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील वाहतूकीच्या व दळणवळणाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्ग ९ पासून हडपसर
महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र.५६ भाग मांजरी ते रेल्वे गेट ते मांजरी पूल साखळी क्र.३/४४ ते ५/१०० या
लांबीमध्ये कॉंक्रीटीकरणाद्वारे (एकूण १३.९१ किमी) चौपदरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या
कामकाजासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. सदर रस्ता प्राधिकरणाच्या प्रस्तावित ११०
मी. रुंद रिंगरोडच्या पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर रस्त्याला जोडणारा आहे. त्याचप्रमाणे मांजरी, आव्हाळवाडी व वाघोली
या तीन टीपी स्कीमकरिता पोच मार्ग आहे. सदर रस्त्याच्या विकास कामामुळे निवासी क्षेत्रास चालना मिळणार आहे.
त्याचप्रमाणे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे विविध भांडवली प्रकल्प राबविताना रस्ते विकास खासगी सहभागातून
करण्यासाठी विविध आर्थिक नमुन्यांना (financing models) पीपीपी या विकल्पावर व इतर तरतुदीसह मान्यता देण्यात
आली आहे.तसेच पीएमआरडीए हदीतील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी निर्मूलन, पर्जन्यजल व घनकचरा व्यवस्थापण
करण्यासाठी बृहत आराखडा (Master plan) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास मान्यता मिळाली
आहे. तसेच पुरंदर येथील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विकास
कंपनीमध्ये सहभागी (Equity Shares) होण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सदर बैठकीला मुख्यमंत्री यांच्या समवेत प्रकाश मेहता, मंत्री गृहनिर्माण विभाग तथा सदस्य, पुण्याचे
पालकमंत्री गिरीश बापट, अपर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव
संजय कुमार, नगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महानगर
आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीए, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज
मांढरे यांचे सदस्य, पि.चिं.वि.न.पा. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी मान्यवर उपस्थित होते.


