Home Blog Page 2968

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर हवा -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

0
पुणे : “भारतीय परंपरा, संस्कृती आणि इतिहास अतिशय समृद्ध आहे. नव्या पिढीला त्याविषयी जागृत करणे हे आपले दायित्व आहे. केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण संस्थांनी काम केले पाहिजे. त्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट असायला हवे. पूर्वजांनी केलेल्या भरीव कार्याची माहिती त्यांना द्यायला हवी. तसेच आपल्या भाषेविषयीचा आदर जपण्याची तसेच, जागतिक स्तरावर टिकण्यासाठी उपयुक्त शिक्षण देण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
‘जागरणजोश’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन वेस्ट इंडिया अवॉर्ड’ पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला बुधवारी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्याला जागरण प्रकाशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक महेंद्र मोहन गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता व भारत गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पश्चिम भारतातील व्यवस्थापन महाविद्यालयांच्या क्रमवारीतील पहिल्या चारमध्ये सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने स्थान पटकावले होते. ‘सूर्यदत्ता’बरोबरच देशातील एकूण २० नामांकित संस्था व विद्यापीठांच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. भारतातील व्यावसायिक महाविद्यालयांच्या (बी-स्कुल) सर्व्हेक्षणातून या २० उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यात आली. विद्यार्थी आणि उद्योगांच्या दृष्टिकोनातूनही विविध पैलूंचे विश्लेषण केले गेले आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर ‘महाविद्यालय स्तरावर होत असलेली कौशल्य विकासासाठीचे प्रयत्न आणि तंत्रयुगातील नोकऱ्यांच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना घडवणारे नवउपक्रम’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात डॉ. संजय चोरडिया यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योगातील मनुष्यबळ अधिकारी सहभागी झाले होते.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत शैक्षणिक कौशल्याच्या माध्यमातून कृती आणि विचारांतून स्वातंत्र्याची भावना रुजवली जाते. क्षेत्रभेटी, छोटे प्रकल्प, उद्योजकता विकास यातून विद्यार्थ्यांना स्व-कार्यक्षमतेसाठी मदत होते. सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कॅम्युनिकेशन (एसआयएमएमसी) महाविद्यालय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गौरव केलेला आहे. ‘नॅक’च्या मानांकन यादीतही महाविद्यालयाचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून एआयसीटीई-सीआयआय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाविद्यालयाला क्रमवारीत स्थान मिळालेले आहे. या यशाचे श्रेय टीमवर्कला असून, सर्व संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सातत्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे.”

राहुल गांधीकडून मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली: ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी DRDOचे अभिनंदन केले आहे. तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे पण सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खोचकपणे शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या सोशल मिडियावर राहुल गांधी यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.

पंतप्रधान मोदी हे जाहिरातबाजी करण्यात कायम पुढे असतात असा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत असतो. तोच रोख ठेवत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर ही खोचक टीका केली आहे. आज जागतिक रंगभूमी दिन आहे. पंतप्रधान हे सारखंच काहीतरी ड्रामेबाजी करत असतात असा संदेश तर राहुल गांधी यांना या ट्विटमधून द्यायचा नाही ना? अशी चर्चा सध्या सोशल मिडियावर होताना दिसत आहे.

दरम्यान, भारताने आज आपले नाव अंतराळात मोठे नाव केले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच आतापर्यंत ही कामगिरी करता आली आहे. भारत हा चौथा देश आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा गर्वाचा क्षण आहे. एलईओ या उपग्रहाला आपल्या शास्त्रज्ञांनी ऩष्ट केले आहे. फक्त तीन मिनिटांत शास्त्रज्ञांनी ही कामगिरी केली आहे, याबाबत राहुल गांधी यांनी DRDO चे अभिनंदन केले आहे.

‘आयसीएआय’तर्फे मोफत ‘सीए करिअर कौन्सिलिंग’

0

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘मेगा सीए करिअर काउंसलिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. ३० मार्च २०१९) सकाळी १० ते १ या वेळेत काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रोड, डेक्कन जिमखाना पुणे येथे हे मार्गदर्शन शिबीर होणारआहे. दहावी, अकरावी, बारावी उत्तीर्ण, परीक्षा दिलेल्या आणि सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच पालकांसाठी हे करिअर कौन्सिलिंग महत्वपूर्ण ठरणार आहे. हे करिअर मार्गदर्शन शिबीर सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे व ‘विकासा’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सीए ऋता चितळे म्हणाल्या, “सनदी लेखापाल परीक्षेविषयी लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. ते दूर व्हावेत, तसेच या परिसक्षेची तयारी कशी आणि केव्हापासून करावी, याविषयी या मार्गदर्शन शिबिरात तज्ज्ञ सांगणार आहेत. त्याचबरोबर अकाउंट संबंधित इतर करिअर आणि त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी याविषयी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. सीए चंद्रशेखर चितळे, सीए संकेत शहा, सीए प्रीती चांडक यांच्यासह इतर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.” सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘विकासा’कडून नियमित उपक्रम, सेमिनार, परिषदा होतात, त्याचाच एक भाग म्हणून हे मार्गदर्शन शिबीर मोठ्या स्वरूपात घेत आहोत, असे धामणे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी, तसेच विनामूल्य नाव नोंदणीसाठी मोनिका – ८२३७१६६००१ या क्रमांकावर किंवा https://www.puneicai.org/upcoming-events/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे चितळे यांनी नमूद केले.

थरार पाहायला मला फार आवडतं – सुयश टिळक

0

झी युवा वाहिनीवर ‘एक घर मंतरलेलं’ ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सुरुची अडारकर गार्गी महाजन ह्या पत्रकाराची भूमिका निभावत आहे. आता यामालिकेत सुयश टिळकची एंट्री झाली आहे . सुयश आणि सुरुची या दोघांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. सुयश सोबत या मालिकेबद्दल आणि त्यातील त्याच्याव्यक्तिरेखेबद्दल साधलेला हा खास संवाद

 

१. ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय वाटतं?

– एक घर मंतरलेलं या मालिकेत मी साकारत असलेला क्षितिज निंबाळकर, हा एक अत्यंत शिस्तप्रिय व व्यावहारिक माणूस आहे. तो एक रिअल इस्टेट एजंट आहे. दुर्मिळ वस्तू गोळा करायचा त्यालाछंद जडलेला आहे. दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करून, त्यांचा इतिहास जाणून घेण्याची क्षितिजला आवड आहे.

 

२. ही भूमिका स्वीकारावी असं तुला नेमकं का वाटलं?

– ‘झी युवा’ वाहिनी आणि आयरिस प्रोडक्शन यांच्याविषयी मुळातच मला एक आपुलकी आहे. शिवाय, क्षितिजचं पात्र, मला फारच आवडलं. क्षितिजचा स्वभाव, त्याचं वागणंबोलणं या गोष्टी व माझ्यास्वतःच्या सवयी बऱ्याचशा मिळत्याजुळत्या आहेत. ‘एक घर मंतरलेलं’ मधील ही भूमिका स्विकारण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण होतं.

३. सुरुची अडारकर सोबत तू पुन्हा एकदा काम करत आहेस. तुम्हा दोघांच्या ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन केमिस्ट्रीविषयी काय सांगशील?

– गेल्या अनेक वर्षांपासून आमची छान मैत्री आहे. त्यामुळेच, ऑनस्क्रीन काम करणं फार सोपं जातं. याआधी दोनवेळा एकत्र काम करत असतांना, जसं सगळ्यांचं प्रेम मिळालं, तसंच याहीवेळी मिळेलयाची खात्री वाटते. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, ‘झी युवा’वरील ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिकादेखील आम्ही यशस्वी करू पाच वर्षांनंतर सुरुचीसोबत पुन्हा काम करायला मिळत असल्याचा आनंद आहेच.

 

४. ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिका, रोमांचक आणि थरारपूर्ण अशी आहे. अशा प्रकारच्या मालिकेत काम करत असताना कसं वाटतं?

– मालिका आणि चित्रपटांतील थरार पाहायला मला फार आवडतं. त्यामुळे, अशा धाटणीचं काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. मनासारखी भूमिका करत असल्याने खूप मजा येतेय. ही मालिकाअधिकाधिक रंजक व्हावी यासाठी दिग्दर्शक अमोल पाठारे व संपूर्ण टीम अतिशय मेहनत घेत आहे. त्यामुळेच काम करण्याचा आनंद अधिक आहे.

५. या निराळ्या भूमिकेविषयी तुझ्या चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत?

इतर भूमिकांप्रमाणेच माझी ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडली आहे. आठवड्याभराच्या कालावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली, याचा आनंद आहे. चाहत्यांकडून मिळणारं प्रेम, ही आमच्या  पोचपावती ठरते. पुढे काय होणार याविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता, त्यांना पडणारे प्रश्न यातून आम्हाला ती पोचपावती मिळाली. सगळ्यांना मी एवढंच सांगेन, की मालिकेतील थरार आणि रहस्य जाणूनघेण्यासाठी, सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता, ‘झी युवा’वर ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिका पाहायला विसरू नका.

सुप्रिया सुळे एक लाख मताधिक्याने पराभूत होतील -महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख खासदार संजय काकडे यांना विश्वास

0

पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागा महायुती जिंकणारगिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत-

पुणे, दि. 27 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला निश्चितपणे हादरा बसेल अशी परिस्थिती सध्या अाहे, असे सांगून महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख खासदार संजय काकडे यांनी बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मताधिक्याने पराभव होईल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

महायुतीच्या कोल्हापूर येथील सभेला सुमारे 4 लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता तर, आघाडीच्या सभेला अल्पसा प्रतिसाद होता. पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा मैदानावर व्हायच्या. शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे झालेली प्रचाराच्या शुभारंभाची सभा एका चौकात घ्यावी लागली. यावरुनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जनाधार संपला असून भाजप-शिवसेना महायुतीला मोठा जनाधार प्राप्त झाल्याचे दिसून येते. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे आमची ताकद आणखी वाढत आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत महायुतीचे चित्र आणखी चांगले झालेले दिसेल आणि यातूनच विजयाची खात्री येते.

बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. बारामती वगळता इतर खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदार संघातून भाजपला आघाडी मिळेल व किमान एक लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे आणि त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. त्यामुळे पुणे लोकसभेतही मी प्रचार करणार आहे. भाजपचे उमेदवार गिरीश बापट आज सकाळी भेटीसाठी आले होते. प्रचारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून प्रचारात मी असणार आहे, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत. इच्छुक अनेकजण असतात मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचं काम करायचं असतं. हा प्रोटोकॉल असतो. त्यामुळे मी पुण्यासह बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे खासदार संजय काकडे म्हणाले.

कोकण किनाऱ्यावर कोळथरे (दापोली ) येथे १ एप्रिल पासून ‘कासव जलार्पण ‘ सोहळा !

0
पुणे :कोकणमधील  कोळथरे (तालुका दापोली ) येथील समुद्र किनाऱ्यावरील संरक्षित घरट्यातून कासवाची पिले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्याचा ‘जलार्पण ‘ सोहळा १ एप्रिल पासून होणार असल्याची माहिती ‘कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ ‘ चे अध्यक्ष दीपक महाजन यांनी पत्रकाद्वारे दिली .
कोळथरे गावात सन २००५  पासून कासव संवर्धन प्रकल्प वन विभाग ,निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने चालवला जात आहे . त्यास   ‘सहयादी निसर्ग ‘ संस्थेचे भाऊ काटदरे,’आगोम ‘चे  महाजन , केदार तोडणकर,  प्रवीण  तोडणकर   यांची साथ  लाभली आहे.कासवांची सर्वाधिक २३ घरटी या समुद्र किनारी संरक्षित करण्यात आली आहेत .
 घरट्यामध्ये  कासवाने घातलेली सुमारे ३५५० अंडी  ठेवण्यात आली आहे. या घरट्यांमधून लवकरच पिले बाहेर पडून समुद्राकडे धाव घेणार आहेत .
त्यांच्या या नैसर्गिक ओढीचा सोहळा  निसर्ग प्रेमींना पाहायला मिळणार आहे.  महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, वनक्षेत्रपाल सुरेश वरप , वनरक्षक श्री वडार , सह्याद्री निसर्ग मित्र ‘चे  भाऊ काटदरे आणि  ‘कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ ‘   यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 सर्वसाधारणपणे कोळथरे किनाऱ्यावर  अंड़ी घातल्यापासून ५२ ते ५५ दिवसात पिले  बाहेर येतात ,
कोळथरे किनाऱ्यावर  वर्षी १  ते 3 एप्रिल  , ९ एप्रिल ते १० एप्रिल, २९ एप्रिल ते १ मे  या दिवशी कासव पिल्लाचा जलार्पण सोहळा आयोजित केला जातो . पर्यटक हा सोहळा पाहायला येतात . या कालावधी मध्ये सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता आलेल्या पिलाना त्यांच्या  अधिवासात म्हणजेच समुद्रामध्ये  सोडण्यात येणार आहे,
ज्यांना हा सोहळा पाहायचा असेल त्यांनी नोंदणी साठी   ७७७५८५३४५६, (०२३५८) २८५२२२ /२३
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन , दीपक महाजन यांनी केले  आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन देणार – उप आयुक्त दिपक पुजारी

0

म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे निवेदन

भाईंदर. (प्रतिनिधी) – कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन दिले जाईल अशी ग्वाही उप आयुक्त दिपक पुजारी यांनी म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांना दिली आहे. यावेळी मुलाणी यांनी मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगांवकर यांना व उप आयुक्त मुख्यालय दिपक पुजारी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दरम्यान आयुक्तांनी पत्र वर्ग केले असता अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा कारावाच्या देयकांची कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन परिपत्रकाचे कटाक्षाने पालन करावे असे नमूद करत कार्यालयीन परिपत्रक उपायुक्त मुख्यालय, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, आस्थापना विभाग सहित सर्व विभाग सूचना दिल्या आहेत.

म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन आदा करावयाच्या देयकांची कार्यपद्धती विहित करण्याबाबत राज्य शासनाने दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन परिपत्रक जारी केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 01) मूळ वेतन, 02) विशेष/ महागाई भत्ता, 03) घरभाडे भत्ता, 04) इतर भत्ते, 05) भविष्य निर्वाह निधी (P.F.), 06) राज्य कामगार विमा योजना (ESIS) / कर्मचारी नुकसान भरपाई (W.C.), 07) व्यावसायिक कर (P.T.), 08) बोनस, 09) कामगार कल्याण निधी, 10) सुट्यांच्या दिवशी केलेले काम इ. अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा करण्यात यावे असे नमूद आहे. त्यानुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य शासने जारी केलेले शासन परिपत्रक लागू करण्याची लेखी मागणी मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगांवकर व उप आयुक्त मुख्यालय दिपक पुजारी यांना केली असता पुजारी म्हणाले की, आज समाजात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षित होत आहे. परंतु, नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मिळेल तेथे तरुण वर्ग काम करत आहे. कंत्राटी कर्मचारी हा महानगरपालिकेच्या भरपूर उपयोगी येत आहे. कंत्राटी कर्मचारी हा उत्तम काम करत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकाप्रमाणे वेतन प्राप्तीची हमी दिली जाईल, असे पुजारी म्हणाले.

काकडे हाऊसवर गिरीश बापट ..( पुणेरी राजकारण )

 
पुणे-सुरेश कलमाडी नंतर पुण्याचे नवे नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मराठा आणि बहुजन समाजाशी जवळीक असलेले राज्यसभेतील अपक्ष खासदार संजय काकडे यांच्या घौडदौडीला सातत्याने लगाम घालण्याचे पुणेरी राजकारण केल्याचा ज्यांच्यावर नेहमी आरोप होत आला ते पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी लोकसभा रिंगणात भाजपच्या वतीने उमेदवारी मिळवल्यावर आज काकडे हाऊस वर जावून ‘खरोखर नाना तुम्ही माझ्या यशासाठी क्रीम रोल निभवावा,महत्वाची भूमिका निभवा ‘ अशी विनंती केली .
काकडे कुटुंबीयांनी यावेळी बापट यांचे स्वागत करून त्यांना निवडणुकीत यशासाठी शुभेछ्या दिल्या .
गेल्या महापालिका निवडणुकीत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडल्यानंतर भाजप कडून सर्व प्रथम काकडे यांनी उमेदवारी मागितली होती ,पण त्यानंतर हि त्यांची पुणेरी राजकारणात उपेक्षा होत गेली . मुख्यमंत्री हे त्यांचे मित्र असल्याने त्यांनी बाराच काळ भाजपमध्ये स्थानिक पातळीवर पुणेरी राजकारणातील उपेक्षा सहन केली.पण नंतर मात्र कॉंग्रेसचे दिल्लीद्वार गाठले आणि तशी घोषणा पुण्यात येवून केली सुद्धा. पण या निर्णयाने धक्का बसल्याचे समजू न देता , काकडे यांना कॉंग्रेसच्या दरवाजातून खेचून आणण्याचे यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले. बापट यांना उमेदवारी देवून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची धुरा आपण काकडे यांच्यावर सोपवितो आहे असे त्यांनी स्पष्ट केले . पण त्यांनतर हि बापटांनी पत्रकार परिषदेत ‘काकडे यांचा क्रीम रोल ‘ अशी टिप्पणी केली. हि टिप्पणी बापटांनी कोणत्या अर्थाने ,भावनेने केली याहून लक्ष वेधले गेले ते या टिप्पणी ने हशा पिकला याकडे … त्यानंतर काकडे कोल्हापूरच्या प्रचार शुभारंभाला सर्व नेत्यांसमवेत उपस्थित राहिले. मात्र काल संध्याकाळी झालेल्या पुण्यातील प्रचार शुभारंभाच्या पहिल्याच सभेला त्यांनी दांडी मारली .आणि सभेला झालेली गर्दी मुख्य वक्त्यांच्या भाषणापूर्वीचं पांगली . तत्काळ याची दखल माध्यमांनी  घेतली . आणि आज बापट यांनी काकडे हाऊस गाठले .आणि आपल्या लोकसभा निवडणुकीतील यशासाठी शुभेछ्या मिळविल्या . आता येणारा काळ चं या शुभेछ्या मनापासून मिळाल्या कि पुणेरी पद्धतीनेच मिळाल्या हे स्पष्ट करेल असे दिसते आहे.

पहिल्याच प्रचार सभेत ‘क्रीम रोल’ ..ची अनुभूती ?

पुणे-भाजपचा बालेकिल्ला समजणाऱ्या कोथरूड मध्येच भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या पहिल्याच प्रचार सभेला सुरुंग लागल्याचे चित्र आज सायंकाळी दिसून आले.या सभेसाठी झालेली सात आठशे लोकांची गर्दी फार काळ तग धरून बसू शकली नाही आणि सभेचा फज्जा उडाला ..या पार्श्वभूमीवर …
माझ्या प्रचार यंत्रणेत काकडेंचा   ‘क्रीम रोल’ असेल अशा  बापटांच्या मिश्कील टिप्पणीवर आज या सभेनंतर प्रती टिप्पणी व्यक्त होत होती .  भाजपचे  पालकमंत्री आणि  लोकसभेची  निवडणूक लढविणाऱ्या बापटांना ‘क्रीम रोल ‘ची अनुभूती आल्याची खुशखुशीत चर्चा गमतीने घडत होती . काकडे हे कोल्हापूरच्या प्रचार सभेस उपस्थित होते मात्र पुण्यातील पहिल्याच प्रचार सभेस मात्र ते अनुपस्थित होते.भर दुपारी मुख्यमंत्र्यांनी सदाशिवात घेतलेल्या सभेचे पूर्वी ‘वाजलेले बारा ‘या घटनेचीही आठवण यावेळी काढली जात होती .
लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यावर गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत ,’आपण जे जे इच्छुक होते त्यांना भेटणार आहोत असे सांगून …खासदार संजय काकडे यांचा काय रोल असेल ? या प्रश्नाला उत्तर देताना ‘त्यांचा क्रीम रोल असेल ‘ असे उत्तर दिले होते यावेळी कोथरुड चे शिवसेनचे माजी आमदार त्यांच्या शेजारीच बसले होते त्यांच्यासह अनेक जन यावेळी खळखळून हसले होते .
दरम्यान गमतीचा भाग सोडला तरी ; लोकसभेसाठी संजय काकडे यांनी बांधलेली बहुजन समाजाची मोट आता प्रत्यक्षात  बापटांच्या बाबत निवडणुकीत काय भूमिका घेईल ? हा प्रश्न आणि नक्की कोणाचा रोल’ क्रीम ‘ म्हणजे खरोखर महत्वाचा राहील ?अशा प्रश्नांची उत्तरे  मात्र निकालापर्यंत अनुत्तरीत राहणार आहे.

पुणे जिल्हयाच्या 4 लोकसभा मतदार संघाचे ईव्हीएम /व्हीव्हीपॅट मशीनची प्रथम सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण

0

पुणे- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तथाजिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी ईव्हीएम / व्हीव्हीपॅट मशीनचे प्रथम यादृच्छिकीकरण (सरमिसळ) प्रक्रिया  दिनांक 26 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, ईव्हीएम नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख यांचीही उपस्थिती होती.

मावळ लोकसभा मतदार संघासाठी एकूण 1238 मतदान केंद्रासाठी बॅलेट युनिट (बीयु) 1486, कंट्रोल युनिट (सीयु) 1486, वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट ट्रेल (व्हीव्हीपॅट) 1659  तसेच  पुणे मतदार संघाच्या 1997 मतदान केंद्रासाठी बीयु 2396, सीयु 2396 व्हीव्हीपॅट 2676 आणि बारामती मतदार संघाच्या 2372 मतदान केंद्रासाठी बीयु 2846, सीयु 2846, व्हीव्हीपॅट 3178 व  शिरुर मतदार संघाच्या 2296 मतदान केंद्रासाठी बीयु 2755, सीयु 2755 व्हीव्हीपॅट 3077 असे एकूण 7903 मतदान केंद्रासाठी बीयु 9484, सीयु 9484 व्हीव्हीपॅट 10 हजार 590 एवढ्या मशीन त्या त्या मतदार संघाच्या एकूण मतदान केंद्राच्या बीयु 120 टक्के, सीयु 120 टक्के, व्हीव्हीपॅट 134 टक्‍के या प्रमाणात उपलब्ध प्रथम स्तरीय चाचणीत सुव्यवस्थीत असलेल्या मशीनचे यादृच्छिकीकरण/ सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या मशीन संबंधित लोकसभा मतदार संघाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनच्या समोर उभारलेल्या मंडपामध्ये 21 मतदार संघाचे स्वतंत्र कंपार्टमेंट मधून करण्यात आली.

जिल्हा नियंत्रण कक्ष

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेच्या निवडणूक विषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हास्तरावर 24 X 7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीची सदर नियत्रंण कक्षामध्ये नोंद घेण्यात येणार असून विविध पथकामार्फत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जनतेला संपर्क करण्यासाठी पुढीलप्रमाणे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 020 – 26121281, 26121291, 26121231, 26121271असे हे क्रमांक असून जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

मतदार यादीमध्ये नव्याने समाविष्ट मतदार

आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 1 लक्ष 47 हजार 739 इतक्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये साधारणपणे वरील प्रमाणे मतदानाची वाढ होणार आहे.  पुणे व  बारामती या लोकसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणीसाठी मुदत संपलेली आहे तर मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील जनतेला दिनांक 30 मार्च 2019 पर्यत नोंदणी करता येईल, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका ‍सिंह यांनी कळविले आहे.

निवडणूक लढविणा-या उमेदवारासाठी खर्चाची दर सूची जाहीर

लोकसभा निवडणूक 2019 करिता निवडणूक लढविणा-या उमेदवारासाठी विविध वस्तूंच्या खर्चाचा दर (रेट लिस्ट) निश्चित करण्यात आलेली असून ही यादी निश्चित करताना मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या सूचना विचारात घेवून अंतिम करण्यात आलेली असून एक खिडकी योजनेच्या नोडल ऑफीसरमार्फत संबंधित उमेदवाराला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

बालेकिल्ल्यातच भाजपच्या पहिल्याच सभेला सुरुंग

0

पुणे-भाजपचा बालेकिल्ला समजणाऱ्या कोथरूड मध्येच भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या पहिल्याच प्रचार सभेला सुरुंग लागल्याचे चित्र आज सायंकाळी दिसून आले.सर्वप्रथम उमेदवाराच्या नावाची घोषणा करून सर्वप्रथम प्रचार यंत्रणेचा प्रारंभ करून पहिल्याच सभेला आलेल्या अनुभवाने आता खरी भाजपची कसौटी लागू शकते असे म्हटले तर वावगे होणार नाही .

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या सभेचा प्रचाराचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथे फोडण्यात आला.या सभेतील भाषणे लांबली आणि कंटाळवाणी ठरली, त्यामुळे शिस्तबद्ध असा हवाला देणाऱ्या या पक्षाच्या प्रचार सभेस  दीड तासाहून अधिक काळ नागरिक तग धरून बसू शकले नाही . काही नगरसेवकांनी आणलेली लोकं नगरसेवकांच्या फोटोचे फलक आणि भाजपचे झेंडे जागेवरच सोडून निघून गेले .

या सभेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. या सभेदरम्यान महायुतीमधील घटक पक्षाच्या तब्बल सात नेत्यांची खूप वेळ चाललेल्या भाषणामुळे सभा ठिकाणी असलेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी प्रकाश जावडेकर यांच्या भाषणापूर्वी बाहेर पडणे पसंत केले. नागरिक बाहेर जाताना पाहून आयोजकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे तसेच भाजपचे शहरातील आमदार आणि पदाधिकारी सभेला उपस्थित होते.

पुण्यातील कोथरूड हा परिसर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो .आमदार येथे भाजपचेच आणि बहुसंख्य नगरसेवक हि भाजपचेच आहेत . पुण्यात 100 नगरसेवकांचे बाहू बल लाभलेल्या आणि पालकमंत्री हेच उमेदवार असलेल्या त्यांच्या पहिल्या सभेची हि अवस्था पाहून भाजपच्या कार्यकत्यांच्या डोक्यातील हवा निश्चित वेळेत निघून जाईल असे समीक्षकांना वाटते आहे.

राजा गोसावी यांच्या जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

0

पुणे-कै. राजा गोसावी प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजा गोसावी यांच्या जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आपल्या सहजसुंदर अभिनयाने मागील शतकातील अनेक दशके गाजविलेले मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते स्व. राजा गोसावी यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम गुरुवार, दि. २८ मार्च रोजी सायं. ५ वा. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे चित्रपट सृष्टीत केलेल्या योगदानाबद्दल यावर्षीचा पुरस्कार राजभाऊसारखे व्यक्तिमत्त्व आणि विनोदी भूमिका साकारणारे सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांना ज्येष्ठ सिने अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी साई संस्थान प्रति शिर्डीचे संस्थापक अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक माजी आमदार प्रकाश देवळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेत्री लीला गांधी, दिलीप देशमुख, नवचैतन्य हस्यक्लबचे मकरंद टिल्लू, विठ्ठल काटे, सपना लालचंदनी, राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश गोसावी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. प्रसाद खंडागळे, विदुला गोसावी, दिलीप हांडे, जनाई गोसावी, शमा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ध्येयनिश्चितीच्या जोरावर यशशिखर गाठता येते -मृणाल जोशी यांचे मत

0
पुणे : “आयुष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागते. आपल्यातील कणखरपणा आणि ध्येय निश्चित असेल, तर आपल्याला यशाचे शिखर गाठता येते. पतीच्या निधनानंतर मुलीचा विचार करून व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. आत्मविश्वास आणि सगळ्यांची साथ यामुळे व्यवसायात स्थिरावले आणि विस्तारही करत गेले. त्यामुळे महिलांनी कणखरपणे कठीण परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे,” असे मत नायक्रोम इंडियाच्या कार्यकारी संचालिका मृणाल जोशी यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राम्हण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान परिषदेतर्फे (युवाकॉन) जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा आणि युवा उदयोजिका पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्लु मॅरिएट हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाई नारायण जोशी (अहमदनगर) यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वयंसिद्धा पुरस्कार अक्युपंचर मसाज थेरपिस्ट मानसी कुलकर्णी यांना, तर मनोरमा श्यामराव कुंभोजकर, पुणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युवा उद्योजिका पुरस्कार हर्बीन्जर ग्रुपच्या स्वाती केतकर यांना देण्यात आला.
या महिला उद्योजिकांच्या परिषदेचे उद्घाटन ‘केसरी’ टूर्सच्या झेलम चौबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी शारदा जोशी, संध्या गादो, अमृता देवगावकर आणि दीपा जमदग्नी या उद्योजिकांनाही सन्मानित करण्यात आले. आमदार मेधा कुलकर्णी, केपीआयटीच्या जयदा पंडित, मंडळाचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, दि. ना. जोशी, जयंत कुलकर्णी, अजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, धनश्री जोग, प्रतिभा संगमनेरकर, विवेक मेढेकर, राजश्री देशपांडे, दीपा बडवे, मुकुंद वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “महिलांना समाजात कमकुवत असल्याचे दाखविण्यासाठी ‘बांगड्या भरल्यात का’ असे संबोधले जाते. ही मानसिकता बदलण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा. त्यासाठी स्वयंपूर्ण होणे आणि उद्योजक बनणे गरजेचे आहे. महिलांसाठी सरकार विविध योजना आणत असते. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. महिला उद्योजकांमुळे देशाच्या विकासात मोठी भर पडते.”
जयदा पंडित म्हणाल्या, “आपले ध्येय निश्चित असले, तर ध्येयपूर्ती नक्की होते. त्यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे, याची खूणगाठ बांधून त्याच्या पूर्ततेसाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे असते. तेव्हा तुम्ही नक्की यशस्वी होत असता.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती नानल आणि अमरजा साठे यांनी केले. आभार मुकुंद वाडेकर यांनी मानले.

 

मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक- अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

0

पुणे- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक असून स्‍वीप ( सिस्‍टेमॅटीक  वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्‍यास निश्चितच मदत होईल, असा विश्‍वास अपर जिल्‍हाधिकारी तथा शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हास्‍तरीय स्‍वीप समितीची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस उप जिल्‍हाधिकारी सुभाष बोरकर, नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा समन्‍वयक यशवंत मानखेडकर, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.

पुणे जिल्‍ह्यासाठी स्‍वीप समिती स्‍थापन करण्‍यात आली असून विविध कार्यालयांच्‍या माध्‍यमातून मतदार जागृतीचे कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्‍यात आले आहेत. पुणे जिल्‍ह्यात सर्वच विभागांनी राबविलेल्‍या उपक्रमांचे रमेश काळे यांनी कौतुक केले. प्रत्‍येक निवडणुकीचे वेगळे वैशिष्‍ट्य असते. या निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित होऊ नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने खास प्रयत्‍न करण्‍याचे आदेश दिले आहेत. स्‍वीप कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून या कामी यश येईल, असेही ते म्‍हणाले.

प्रारंभी प्रत्‍येक कार्यालयाने स्‍वीप उपक्रमांबाबत केलेल्‍या कार्यवाहीची माहिती दिली. लोकशाही पंधरवडा, जागतिक दिव्‍यांग दिन, जागतिक महिला दिन या निमित्‍ताने वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, निबंध स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते. महिला बचत गट, ज्‍येष्‍ठ नागरिक, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्‍या कार्यशाळा घेण्‍यात येऊन त्‍यांना मतदानाचे महत्‍त्‍व पटवून देण्‍यात आले. बैठकीस उपजिल्‍हाधिकारी संतोष भोर, सहायक आयुक्‍त अण्‍णासाहेब बोदडे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, प्रवीण आष्‍टीकर आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

द बॉल हॉग्ज, क्यू क्लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, खार जिमखाना संघाचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

0

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बाद फेरीत द बॉल हॉग्ज, क्यू क्लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, कॉर्नर पॉकेट शूटर्स, बीएसएए मास्टर्स, खार जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत शाहबाज खान, आशिक मुदसेर यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर क्यू क्लब वॉरियर्स संघाने फायर बॉल्सचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब अ संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात पहिल्या लढतीत द बॉल हॉग्जच्या लौकिक पठारेला पूना क्लबच्या विग्नेश संघवीने 14-49, 66-29, 17-40, 16-69 असा पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्जच्या आदित्य अगरवाल याने दिनेश मेहतानीचा 29-17, 73-52, 26-32, 66-(55)87, 33-15 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत द बॉल हॉग्जच्या रोहन साकळकरने पूना क्लबच्या सुरज राठीचा 35-22, 32-67, 33-24, 70-22 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत अक्षय कुमार, आयुश मित्तल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एलसीएसए संघाने ऑटो पॉट्स संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने क्यू मास्टर्स अ संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. विजयी संघाकडून संकेत मुथा व तहा खान यांनी सुरेख कामगिरी बजावली. चुरशीच्या झालेल्या लढतीत खार जिमखाना संघाने एसआरके मास्टर्सचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात खार जिमखानाच्या ईशप्रित चड्डाला कडवी झुंज देत एसआरकेच्या वाहीद खानने  22-35, 61-42, 57-00, 03-59, 28-35 असा विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानीने एसआरकेच्या कृष्णराज अरकोटचा 46-16, 67-53, 50(42)-14 असा तीन फ्रेममध्ये सहज पराभव करून संघाचे आपल्या सामन्यातील आव्हान कायम राखले. तिसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या रिषभ ठक्कर याने एसआरकेच्या मोहम्मद सलमानचा 35-14, 10-62, 38-14, 75-42) असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
क्यू क्लब वॉरियर्स वि.वि.फायर बॉल्स 2-0(शाहबाज खान वि.वि.अमेय काळेकर 48-13, 80-35, 38-05; आशिक मुदसेर वि.वि.नितीन भोसले 44-16, 86(56)-22, 14-34, 63-17);

द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब अ 2-1( (लौकिक पठारे पराभूत वि.विग्नेश संघवी 14-49, 66-29, 17-40, 16-69; आदित्य अगरवाल वि.वि.दिनेश मेहतानी 29-17, 73-52, 26-32, 66-(55)87, 33-15; रोहन साकळकर वि.वि.सुरज राठी 35-22, 32-67, 33-24, 70-22);

एलसीएसए वि.वि.ऑटो पॉट्स 2-0(अक्षय कुमार वि.वि.लव बोरीचा 28-07, 54-09, 19-11; आयुश मित्तल वि.वि.सिद्देश मुळे 46-05, 64-69, 38-05, 62-55);

एमपी स्ट्रायकर्स वि.वि.कॉर्नर पॉकेट टायगर्स 2-0(केतन चावला वि.वि.माधव जोशी 44-06, 79(58)-16, 37-17; भरत सिसोडिया वि.वि.चिंतामणी जाधव 62(62)-00, 71-15, 39-07);

केएसबीए वि.वि.केव्हीडी स्कवाङ 2-0(दक्ष रेड्डी वि.वि.गौरव जयसिंघानी 40-28, 81(49)-42, 43-08; एमएस अरुण वि.वि.अभिनय एडके 01-34, 73-01, 07-39, 71-64, 39-01);

बीएसएए मास्टर्स वि.वि.पीवायसी जायंट्स 2-0(रोविन डिसुझा वि.वि.अरुण बर्वे 33-09, 72-26, 30-10; अभिमन्यू गांधी वि.वि.रोहित नारगोलकर 51-01, 63-08, 49-00);

कॉर्नर पॉकेट शूटर्स वि.वि.क्यू मास्टर्स अ 2-0(संकेत मुथा वि.वि.आकाश पाडाळीकर 66-00, 72-42, 37-17; तहा खान वि.वि.समीर बिडवई 37-35, 75-05, 43-12);

खार जिमखाना वि.वि.एसआरके मास्टर्स 2-1(ईशप्रित चड्डा पराभूत वि.वाहीद खान 22-35, 61-42, 57-00, 03-59, 28-35; स्पर्श फेरवानी वि.वि.कृष्णराज अरकोट 46-16, 67-53, 50(42)-14; रिषभ ठक्कर वि.वि.मोहम्मद सलमान 35-14, 10-62, 38-14, 75-42).