Home Blog Page 2951

पुण्यातील उत्तर भारतीयांचा गिरीश बापट यांना पाठिंबा

पुणे  : “नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास होत आहे.अशा कृतिशील नेत्याच्या पाठीशी आणि पक्षाशी आम्ही उभे राहत आहोत,” असे सांगत उत्तर भारतीय सभा, पुणे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला.  
 यावेळी उत्तर भारतीय सभेचे रवी स्वामिनाथ तिवारी, अशोककुमार मिश्रा,मनोज टी. मिश्रा, त्रिभुवननाथ पांडे, अवधेश शुक्ला,  सुभाष दुबे, प्रभूनारायण तिवारी,  सिंह,अभय सिंह, उमेश यादव, सुरेंद्र यादव,विजय प्रताप पांडे, अशोक दुबे, रंगनाथ पांडे, विवेक मिश्रा, मनोज दुबे, मनोज मिश्रा,संजय मोर्या, अरविंद मोर्या, मंजू पांडे, राजेंद्र दुबे, प्रमोद दुबे, पवन पांडे, संतोष विश्वकर्मा, भरत सिंह, बालकृष्ण ओझा, विश्वनाथ विश्वकर्मा, गिरिजेश गिरी, रामविजय पांडे लक्ष्मीनारायण पांडे, विंध्याचल सिंह, कालीप्रसाद मिश्रा, प्रभाकर शुक्ला, बी. जी तिवारी,अजित सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. ते खासदार झाल्यास शहराचा संपूर्ण कायापालट करतील, असा विश्वासही यावेळी रवी स्वामिनाथ तिवारी, अशोककुमार मिश्रा, अवधेश शुक्ला यांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केला. तसेच पुणे-गोरखपूर, पुणे- लखनऊ, पुणे-वाराणसी या मार्गावरील रेल्वेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेऊन या रेल्वेच्या फेऱ्या प्रतिदिन कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदनही संस्थेने बापट यांना यावेळी सुपूर्त केले.   

जैन समाजाची विचारसरणी विकासकार्यामध्ये महत्त्वाची-बापट

पुणे –  “उदार व उदात्त दृष्टिकोनातून जैन समाजाने राष्ट्रीय वृत्तीची आजवर जोपासना केली. हा समाज राष्ट्रीय वृत्तीपासून कधीच दूर राहिला नाही. आपल्या अखंडत्वाची जोपासना व संवर्धन करण्यात जैन बांधवांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. जैन समाजाची विचारसरणी जीवन पद्धतीच्या विकासकार्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे.” असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले.
आज महावीर जयंतीचे औचित्य साधून गिरीश बापट यांनी टिम्बर मार्केट, वडगाव शेरी, येरवडा भागातील कार्यक्रमांना उपस्थित राहून बापट यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. टिम्बर मार्केट येथील जैन सामुदायिक उत्सव समितीमार्फत मिरवणूक काढण्यात आली होती. यात बापट सहभागी झाले. या मिरवणुकीत गो-रक्षण, मतदान करण्याबाबत जनजागृती आली. यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर,अचल जैन, करण शहा, शरद शहा, सचिन गेलडा, अनिल गेलडा, गिरीश सोळंखी, नितीन जैन, जितेंद्र कालेडिया, अरविंद कोठारी उपस्थित होते.
बापट म्हणाले की,  महावीरांचे विचार आज आचारणात आणण्याचा दिवस आहे. त्यांच्या शिकवणी प्रमाणे, विचाराप्रमाणे आपण व्यवहारात वागतो की नाही हे तपासायला हवे. समाजाच्या कल्याणाचा उदात्त हेतू ठेऊन जैन साधक संसाराचा त्याग करतात. हा त्याग आपण लक्षात घेऊन त्यांच्या विचारांचे पाईक व्हायला हवे. मानवतावादाकडे नेणाऱ्या जैन धर्माची बहुमोल शिकवण आज सर्वांनी आचरणात आणायला हवी. लाखो शत्रूंच्या विरोधात जिंकण्यापेक्षा स्वतःच्या वागणुकीत जिंकण्याला महत्व देणाऱ्या वर्धमान महावीर यांचे आदर्श विचार अंगिकारायला हवेत.
 
 महावीरांनी नैतिक व व्यावहारिक जीवन यांचा समतोल घडवून आणला त्याला आजही तोड नाही. कसब्यात गेली अनेक वर्षे आम्ही महावीर जयंती उत्साहात साजरी करतो.  महावीरांचे विचार समोर ठेऊन वडीलोपार्जित जमिनीवर मी गो-शाळा उभी केली असून गेल्या ४५ वर्षाच्या राजकीय जीवनात मी कोणत्याही धार्मिक स्थळावर राजकारणावर बोललो नाही, असे बापट यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट येथील भोपळे चौकात जैन श्वेतांबर राजस्थानी समाज ट्रस्ट मार्फत झालेल्या रक्तदान शिबिराला बापट उपस्थित होते. तसेच वडगाव शेरी वर्धमान स्थानक वासी जैन संघ, येरवडा येथील जैन मंदिर येथे भेट देऊन जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. वडगाव शेरी येथील वर्धमान स्थानक वासी जैन संघ येथे डॉ. समकीत मुनीजी महाराज स्वामी यांचे त्यांनी दर्शन घेतले. 

शहरी मध्यमवर्गीय भाजपला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत – मोहन जोशी

पुणे-बँकिंग सेवांचे वाढलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा बोजा आणि जीएसटीमुळे सोसावा लागणारा अतिरिक्त करांचा भार अशा सार्‍या समस्यांमुळे शहरी मध्यमवर्गीय चांगलाच वैतागला असून हा वर्ग यावेळी भाजपला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहे असे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज कोथरूड विधानसभा मतदार संघात आयोजित विशाल रॅली नंतर ते बोलत होते.

ते म्हणाले की, मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात छोटे फ्लॅट निर्माण करण्यासाठी जे धोरणे भाजपने आखली नाहीत. तसेच मध्यमवर्गीय घरातील करती मुले शिक्षण घेऊनही बेकार बसले आहेत. वणवण फिरूनही त्यांना नोकर्‍या मिळत नाहीत. शिक्षण आणि आरोग्य याचा खर्च हाताबाहेर गेला आहे. मिळणार्‍या महिन्याच्या पगारात प्रपंच चालवणे मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेल्याने
हा वर्ग हतबल झाला आहे. आणि भाजपच्या सरकारवर तो कमालीचा वैतागला आहे. हा वर्गच भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मोठी भूमिका बजावेल असे चित्र आहे. पुण्यात हे चित्र सर्वत्र जाणवत आहे असेही जोशी यांनी यावेळी नमूद केले.
पाषाण गावठाण येथील शिवाजी पुतळ्यास हार अर्पण करून व वंदन करून या रॅलीची सकाळी सुरूवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे रिक्षातून केली जाणारी अनाउन्समेंट, जोरदार घोषणा आणि फटाक्यांचा कडकडाट अशा जल्लोषात निघालेल्या या रॅलीला मार्गात ठिकठिकाणी नागरिक थंड पाणी, नारळ पाणी देत होते. अनेक ठिकाणी महिलांनी मोहन जोशींना ओवाळून शुभेच्छा दिल्या. मार्गावरील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोहन जोशींचे स्वागत केले. शिवाजी पुतळ्याहून ही रॅली पाषाण गावठांण – सुस रोड – साई चौक
– (पाषाण बाणेर) लिंक रोड – महाबळेश्वर हॉटेल – सोमश्वर वाडी – बाणेर फाटा – सानेवाडी – डी. पी. रोड – विधाते वस्ती – पल्लोड – ग्रीन पार्क – महाबळेश्वर हॉटेल – बाणेर गावठाण – बालेवाडी फाटा – बालेवाडी गाव – शरद बालवडकर यांच्या निवासस्थान येथे समाप्त झाली.

या रॅलीमध्ये बाबूराव चांदेरे, चंदूशेठ कदम, प्रमोद निम्हण, उमेश कंदारे, विजय खळदकर, रामदास काळे, नितीन कळमकर, दत्ता जाधव, रोहित धिंडे, बालन सुतार, शिवाजी बांगर, सुनिल चांदेरे आदी  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल     

पुणे- मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर देशात संविधान आणि लोकशाही टिकणार नाही. या निवडणूकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी अक्षरश: पायघड्या घातल्या होत्या. मात्र त्यांनी अवास्तव मागण्या करुन महाआघाडीत येणे टाळले. राज्यात प्रत्येक मतदार संघात उमेदवार देऊन ते मतांचे विभाजन करुन  अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत.
असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच लोक हुशार आहेत, सत्याची बाजू त्यांना कळते त्यामुळे ते महाआघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ गोखले नगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, उमेदवार मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, भटक्या विमुक्ताच्या प्रतिनिधी प्रा. सुषमा अंधारे, गोपाळ तिवारी, सचिन तावरे, माजी नगरसेवक रुपाली ठोंबरे-पाटील,निलेश निकम, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते.       चव्हाण म्हणाले, मोदींनी भरमसाठ आश्वासने दिली. मात्र एकाहीची पुर्तता केली नाही. त्यामुळे पाच वर्षे अत्यंत निराशाजनक गेली. त्यांनी चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना उद्धवस्त केले. एक कोटी लोकांचा रोजगार गेला. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. देशभरात अन्याय अत्याचार करणार्‍यांना मोदी पाठिशी घालीत आहेत. मागील निवडणूकीत भाजपला
केवळ 31 टक्के मते मिळाली होती. सुमारे 62 टक्के मतदारांनी त्यांना नाकारले होते. यावेळी महाआघाडीमुळे मतविभाजन टळेल. राफेल विमान खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर मोदींची जागा संसदेत नाही, तर जेलमध्ये असेल. त्यांचे सहकारी अमित शहा जेलमध्ये जावून आले आहेत. ते देशासाठी जेलमध्ये गेले नव्हते, तर
दंगलीत कत्तल केल्यामुळे अटक झाली होती. त्याच वेळी त्यांना अहमदाबाद येथून हद्दपार करण्यात आले होते. असा हल्लाबोल चव्हाणांनी केला.                       न्यायाधीश लोया यांच्यावर राजकीय दबाव होता. त्यांचा मृत्यूही संशयास्पद आहे. सत्तेवर आलो, तर प्रथम लोया, सोहबराद्दीन खुन प्रकरणाची चौकशी करु. देशात खुनाची मालीका सुरुच आहे. पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. हवाई हल्ल्यात दहशतवादाचे नेटवर्क नष्ट करणे आवश्यक असते. ते केले गेले का असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, समाज माध्यमावर उथळ भक्त कलम 124 अ वरुन भरभरून चर्चाकरीत आहेत. मात्र काँग्रेसने हे कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.
डॉ. नितीन राऊत म्हणाले, संविधानाने महिलांचा स्वाभिमान बहाल केला. हा देश संघराज्य आहे. या राष्ट्राला तडा जाता कामा नये. महिलांवरील अत्याचार वाढले, बेरोजगारी वाढली. आवाज दाबून अभिव्यक्तीवर घाला घातला जात आहे. ज्यांनी आजपर्यंत देशासाठी काहीच केले नाही तेच आता देशवाशीयांना देशभक्ती शिकवित आहेत. त्यामुळे या खोट्या सरकारला या निवडणूकीत पराभव
केला पाहिजे.   डॉ. नितीन राऊत, प्रा. सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरे, निलेश निकम, दत्ता बहिरट, दिप्ती चवधरी यांची भाषणे झाली.

महावीर जयंतीनिमित्त अमृता फडणवीस यांनी केली पूजा

0
मुंबई :  भगवान महावीर स्वामी यांच्या २६१९ व्या जयंती निमित्त मुंबईत कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कल्याणक महोत्सवात श्रीमती अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यांनी भगवान महावीरची पूजा करत जैन संतांचा आशीर्वाद घेतला. तसेच त्यांनी संतांची भेट घेत जय महावीर लिहिलेले फुगे आकाशात सोडत मुलुंडमध्ये विशाल जनकल्याण शोभायात्रेची सुरुवात केली. जैन महासंघ मुलुंडचे अध्यक्ष सुखराज नाहर यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात श्रीमती फडणवीस यांनी श्री सर्वोदय परशुनाथ भगवान मंदिर मधील धर्मचर्य्यांच्या उपस्थितीत जैन धर्माचे तत्त्व आणि परंपरा यांच्यानुसार सर्व विधींमध्ये सहभाग घेतला. या महोत्सवात भाजप नेते मनोज कोटक ही सहभागी झाले होते.
बुधवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या विविध कार्यक्रमात शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण होता. या भव्य रथयात्रेत १५ हजाराहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. मुलुंडमधील सर्व ४४ जैन संघटनांचे प्रतिनिधी मंडळ जैन महासंघचे अध्यक्ष सुखराज नाहर यांच्यासह चेतन शाह, चेतन देढिया, दीपक गोसर, दिनेश भाई जलियावाला आणि नलिन भाई शाह यांच्या नेतृत्वात अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत, सर्वोदय पार्श्वनाथ मंदिरात भगवान महावीरच्या महावीरांच्या मूर्तीचे अभिषेक करून पूजन केले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बुधवारी सकाळपर्यंत सुरू होता. जैन धर्माच्या सर्व चार संप्रदायाच्या संतांच्या पवित्र निश्रा, भव्य भक्ती संगीत, दैविक स्वरूपात सजलेले रथ, पारंपारिक पोशाखांमध्ये ध्वज फडकावत हजारों तरुणांसह रंगीबेरंगी पोशाख घातलेल्या हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच गगनचुंबी इंद्रध्वजा, रथाच्या मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या या रथयात्रेचे खास आकर्षण होते. सुमारे १५ हजार लोकांचा सहभाग हे या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते.

महावीर जयंती : जय आनंद ग्रुपतर्फे धान्यदान उपक्रम

0
पुणे : भगवान महावीर स्वामी यांच्या २६१८ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त पुण्यातील जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यदान उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘धान्यदान करा, दुप्पट पुण्य कमवा’ हा संदेश देत भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणाक महोत्सवानिमित्त आयोजित शोभायात्रेतून नागरिकांना धान्यदानाचे आवाहन करण्यात आले. धान्य खरेदीसाठी शोभायात्रा मार्गावर अनेकांनी रोख देणगी देऊन उपक्रमात सहभाग घेतला. एकूण दहा हजार किलो धान्य आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथावर संकलित झाले. हे धान्य दिव्यांग व विशेष संस्थांना, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मोफत देण्यात येणार आहे.
गुरुवार पेठेतील जैन मंदिरापासून ही शोभायात्रा निघाली. बाबू गेनू चौक, सिटी पोस्ट, नानापेठ मार्गे शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू सभागृहातपर्यंत निघालेल्या शोभायात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंदऋषीजी पुण्य प्रदान रथावरून अंध, अपंग, अनाथ, वंचित, महिला बाल आश्रमासाठी हे १० हजार किलो धान्य संकलन करण्यात आले. आजवर महावीर फूड बँकेने ५ लाख ११ हजार किलो मोफत धान्याचे वितरण करण्यात आले आहे. प्रमोद शांतीलाल छाजेड यांनी ११०० किलो धान्य या उपक्रमाला दिले.
महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला असून, सौ. प्रमिलाबाई नौपतलालजी सांकला व श्रीमती विमलबाई बंडूलालजी भंडारी यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले. या उपक्रमात विजयकुमार मर्लेचा यांच्यासह उपाध्यक्ष शांतीलाल देसरडा, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा, अशोक लोढा, विजय चोरडिया, गुलाबचंद कवाड, अँटी करप्शन कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत फाळके व जय आनंद ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

गोव्यात रात्री ११ नंतर दारू विक्री / सर्व्हिंगवरील बंधने शिथिल करण्याची मागणी

0

पणजी- २३ एप्रिल २०१९ रोजी आगामी लोक सभा निवडणुका लक्षात घेता गोवा पर्यटन विभाग, गोवा सरकारने हॉटेलचालकांच्या प्रतिनिधींसह राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे रात्री ११ नंतर दारू विक्री/सर्व्हिंगचा नियम शिथिलकरण्यासाठी ईसीआयकडे संपर्क साधलाआहे.या वेळमर्यादेच्या परिणामांविषयी चिंता वाटून गोव्यातील हॉटेलचालकांनी पर्यटन खात्याच्या संचालकांकडे सादरीकरण करतयासंदर्भात ईसीआयने नियम शिथिल करण्याची मागणी केली आहे. सध्या जोरात सुरू असलेला पर्यटन हंगाम आणि वीकेंडफेस्टिव्हिटीजवर परिणाम होऊ नये  या भीतीने प्रतिनिधींनी या सादरीकरणामध्ये वेळमर्यादा शिथिल करण्याच्या मुद्द्यावर भरदिला आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला  पर्यटन खात्याचे संचालक श्री. संजीव गडकर यांनी हॉटेलचालकांच्या प्रतिनिधी मंडळांसहगोव्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हॉटेल उद्योगाला (बार्सरेस्टॉरंट्स) होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा केली.पर्यटन खात्याने सांगितले आहे, की गोव्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने खात्याच्या निदर्शनास आणून दिलेल्यासमस्या ऐकून घेतल्या आणि हे प्रकरण ईसीआयकडे नेण्याचे आश्वासन दिले असून लवकरच त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा  हॉटेलचालकांना आहे.

गोवा टुरिझमचे व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हल प्रचंड यशस्वी

0

पणजी- गोवा टुरिझमने १४ एप्रिल २०१९ रोजी आयनॉक्स कोर्टयार्ड, पणजी येथे गोवा व्हिंटेज कार अँड बाइकफेस्टिव्हल आयोजित केला होता. व्हिटेंज कार आणि बाइक्स जमवण्याची व त्यांचे जतन करण्याचा ध्यास साजरा करण्याच्याहेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

यादरम्यान आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये १८ व्या शतकातील काही सर्वोत्तम कार आणि बाइक्स पाहायला मिळाल्या. गोव्याच्याविविध भागांतून तसेच त्याजवळच्या राज्यांतूनही कित्येक व्हिंटेज कार्स आणि मोटरसायकल्स यामध्ये सहभागी झाल्याहोत्या. कार्यक्रमस्थळ ४५ कार्स आणि ७० बाइक्स प्रदर्शनार्थ मांडण्यात आल्या होता. गोव्याच्या राज भवनाने जतन केलेलीकॅडलॅक लिमोझिनचे १९५९ मधील मॉडेल प्रेक्षकांचे सर्वात आवडते बनले.

व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांच्या सहकार्याने आयनॉक्स कोर्टयार्ड येथे आयोजितकरण्यात आलेल्या २०१९ गोवा व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हलचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य निवडणूकअधिकारी, श्री. कुणाल यांनी गोवा टुरिझमचे सचिव श्री. जे. अशोक कुमार यांच्यासह, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमतीआर. मनेका, टुरिझमचे संचालक श्री. संजीव गडकर, इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष श्री. विवेक गोएंका, ऑटोकार मासिकाचेसल्लागार श्री. बर्सिस बांद्रावाला आणि कार्यक्रमाचे आयोजक, अशोक व्हिंटेज वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप नाईकयांच्या हस्ते करण्यात आले.

या व्हिंटेज कार्स आणि बाइक्सनी कंपाळ आणि मीरामार बीच सर्कलवरून मांडवी नदीच्या काठाने रॅली काढली आणि परतपणजीमध्ये आले व पुढे अब्बे फॅरिया पुतळ्यावरून (जुने सचिवालय) यू- टर्न घेत परत आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये डिस्प्लेसाठीपरतले.

आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर आणि गोव्याच्या निवडणूक आयोगाचे आयकॉन वर्मा डिमिलो यांनी गायिका मेरी जो यांच्यासहप्रेक्षकांसाठी खास फॅशन शोचे आयोजन केले होते. त्यात कुणबी हे गोव्याचे पारंपरिक वस्त्र प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेहोते. गोव्याचा लोकप्रिय बँड क्रिमसन टाइडने धमाकेदार नृत्य सादरीकरण केले. यावेळेस खाद्यपदार्थ आणि पेयांचे स्टॉल्सहीउपलब्ध होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मतदार जागृती, न्याय्य मतदानाबद्दल प्रचारकरण्यासाठी #सेव्हदडेट आणि #गोव्होट या खास अभियानांचा प्रचार करण्यासाठी गोवा टुरिझमसह सहकार्य केले. २३ एप्रिल२०१९ रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी त्यांनी कार्यक्रमस्थळी सेल्फी पॉइंट्स आणि बॅनर्सच्या मदतीनेजनजागृती केली.

या कार्यक्रमाचे आयोजन अडव्हर्टायझिंग असोसिएट्स आणि क्युरेटेड बाय अशोक व्हिंटेज वर्ल्ड, सपोर्टेड बाय व्हिंटेज अँडक्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांनी देशातील आघाडीचे वाहनउत्पादन मासिक- ऑटोकार हे मीडियाभागीदार या नात्याने विवा गोवा लाइफस्टाइल मासिक भागीदार म्हणून केले होते.

झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी !!

0

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र हे चित्रीकरण ह्या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे.

सूत्रांच्या अनुसार, स्पृहा जोशी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर ह्या गावात श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवायही पाणी फाउंडेशनच्या वर्षभर होणा-या कार्यक्रमांना स्पृहा सक्रिय सहभागी होती.

अभिनेत्री स्पृहा जोशी 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते,  “मुंबई-पुण्यातल्या सुखासीन आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणा-या लोकांची आयुष्य पाणी फाउंडेशनच्या मोहिमेमूळे मला पाहायला मिळाली. पाणी फाउंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन संघटित होणारे, जातव्यवस्था निर्मुलन होऊन, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो.”

स्पृहा पूढे सांगते, “पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ झालीय. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकर-यांच्या आणि शेतक-यांच्या चेह-यावर मला दिसून आलाय. ह्या आनंदात मीही सहभागी असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी असेन.”

  • शरद लोणकर 

..खुशमस्करेच प्रगतीपथावर …(काहीही न करणारे , नेत्यांना जास्त प्रिय)

0
निवडणूक प्रचाराचे बदलले तंत्र आणि मंत्र
….बदलले नेते ही आणि कार्यकर्ते ही
१९८३ …. पतित पावन संघटनेच्या कामात असतानाच प्रभात रोड भागातून पुणे मनपा ची पोटनिवडणूक लागली.पतित पावन संघटनेचे प्रमुख नितीन सोनटक्के यांच्या समवेत अण्णा जोशी आणि बापट साहेबांना भेटायला कमला नेहरू पार्क येथे गेलो ती माझी पुण्याच्या निवडणुकीची पहिली ओळख.साध्या वेशात सामान्य माणसासारखे वागणारे बोलणारे बापट साहेब स्कूटर वर आले होते.कोणत्यातरी कारणाने नितीनराव आणि अण्णांचे तावातावाने बोलणे झाल्याचे आठवते,पण त्यानंतर आम्ही प्रचार कार्यात झोकुन दिले.१७ /१८ वर्षाचे गरम रक्त आणि त्यातून पतित पावन संघटने सारख्या आक्रमक संघटनेचा कार्यकर्ता.निवडणुकीचे काम काय – तर *टिळक टॅंक* च्या गल्लीत दोन खांबामधे सुतळी बांधली व नितीनरावांच्या प्रेस मधील खळ वापरून पताका चिटकवल्याचे स्मरते.( त्यातील थोडी खळ शिल्लक होती, त्याचा दुसऱ्या दिवशी उपयोग केला तो मांजा करायला,कांचेचा चुरा केला आणि तो खळ वापरुन दोऱ्यावर लावला आणि वाळवत बसलो ) असा तो *बालिश* काळ. नितीनरावांच्या प्रेस मधे खिळे लावून अक्षर जुळवणी करत कसलेसे पत्रक छापले आणि सुरु झाला हाऊस टू हाऊस प्रचार. त्यानंतर १९८५ ची मनपा निवडणूक आठवते जेव्हा आमची बैठक डेक्कन वरील बटाविया मेडीकल च्या गच्चीवर होत असे.बल्ब बरोबर घेउन जाऊन गच्चीवर लाईट लावायचे आणि सतरंजी झटकली की धुळीचे लोट उडायचे.
*भेळभत्त्याचे* दिवस ते. *पोते भर मुरमुरे* त्यात नाममात्र *फरसाण* आणि बुक्कीने कांदा फोडून खाणे. कधीतरी कोणी मेहेरबान झाले तर ढापशे ची भजी किंवा तेथेच अंडाभुर्जी वर ताव मारल्याचे स्मरते पण असे प्रसंग अपवादात्मक.बापट साहेब विजयी झाल्यावर साडे चार/पाच  रुपयांची सुवर्णरेखा डायनिंग हॉल (प्रभात रस्त्यावरील) थाळी खाल्ल्याचे मात्र लक्ख आठवते. रविवारी फीस्ट असल्याने *जिलेबी मठठा* ची मेजवानीच होती ती.पण महत्त्वाचे म्हणजे त्याची *अपेक्षा* नाही केली कधी.१९९२ साली  पतित पावन संघटना म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे ठरवले आणि कोथरूड मधुन दिलीप उंबरकर ,अनंतराव भोज ,पी के कुलकर्णी, विक्रम मानवतकर असे अनेक जण उभे राहिले.
*साधन संपत्तीचा* अभाव आणि उन्हातान्हात न दमता प्रचार.दुपारी *पी के कुलकर्णी* यांच्या आईने केलेली दाण्याची चटणी,भाकरी ,कोरडे पिठलं आणि वरणभातावर ताव मारायचा,बसल्याबसल्या डुलकी मारायची आणि पुन्हा प्रचाराला सज्ज.त्या काळात इनमिन सात वृत्तपत्रे,त्यात ही *संध्या* आमचा आवडता,सनसनाटी हेडलाईन आणि *वसंतराव काणेंची* मार्केटिंग स्ट्रॅटेजी(आणि माझ्यावर प्रेम ) मुळे संध्याकाळी संध्या सर्वत्र जायचा.मी सायकल वर  कॅंप मधील हेराल्ड च्या कार्यालयात *हॅरी डेव्हीड* सरांकडे पत्रक नेउन द्यायचो हे आज *हास्यास्पद* वाटेल पण ती तळमळ होती कार्यकर्त्यांच्या मनात.अनेक निवडणुकांचे निस्पृह कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव सांगता येतील.पण आजच्या निवडणुकांमध्ये ते सगळेच *कालबाह्य* वाटेल. आज *पैश्याला मोल* आला आहे,
*मोबाईल,चकाचक गाड्या,झकपक स्टेज,फ्लेक्स,दिव्यांची रोषणाई,मुबलक चकचकीत पत्रके,सतत चहा नाश्ता ठंड पेयांचा मारा,रॅलीसाठी पेट्रोल ची सोय आणि जेवायला बिर्याणी किंवा गोड धोड* . हे सगळे नव्हते ८०/९० च्या दशकात पण *एकमेकांच्या प्रती प्रेमभाव* घट्ट होते,
*पक्षनिष्ठा होती,ज्येष्ठांचा आदर* होता,
*पक्षाच्या भूमिकेशी -आदर्शां शी* बांधीलकी होती,कोणत्याही निर्णयावर ” असे का ” म्हणून विचारल्याचे स्मरत नाही.निस्पृहता म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण त्या काळात पहायला मिळे.पक्षाचे कोणीही *सीनियर आले तर आम्ही उठून* उभे रहायचो ( आता वरिष्ठांना कोणी उठून खुर्ची ही देत नाही ) असे बदल घडत गेले त्याला कारण म्हणजे *अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जोडीला अमाप पैसा*.सर्व काही *पेड यंत्रणेवर* *पॅकेजवर* अवलंबून.
*कार्यकर्ता राहिला कुठे* ? *सगळेच नेते झालेत*,आसुरी महत्त्वकांक्षेचे पंख फुटलेत आणि मग काहीही कष्ट न करता *पूर्वजन्मीच्या संचितावर एखादा माननीय होत असेल तर मी का नाही* ही भावना मूळ धरु लागली आणि *राजकारणाला उतरती कळा लागली*.कार्यकर्त्यांचे गट पडले आणि ते वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थक म्हणून ओळखले जावु लागले. *पक्षाचे कोण* असा प्रश्न पडावा इतपत सर्वच पक्षात *व्यक्तीनिष्ठ गटबाजी* वाढीस लागली.त्याची *काटेरी फळं आता सर्वपक्षीय  नेत्यांना* (चाखायला)बघायला मिळतात. फक्त सभा ,रॅली याला गर्दी करणारे तरुण मस्टर वर सही करुन गायब व्हायला लागले. *याद्या फोड* म्हणजे काय हे ही अनेकांना माहिती नाही आणि हाऊस टू हाऊस प्रचार ही….निरोप सुद्धा Whatsapp वर.उत्स्फूर्तपणे भाषण ऐकायला जाणारे रोडावले आणि लाखांच्या सभेचे दृश्य ही लोपले. *वच्चा रे वच्चा – कमळ वच्चा* ह्या गगनभेदी घोषणा विरल्या आणि आता *घोषणा देणे कमीपणाचे* वाटू लागले.अरे बघता काय सामील व्हा / ताई माई अक्का विचार करा पक्का …. ह्या घोषणा २००२ नंतर फारश्या ऐकूच आल्या नाहीत. *हे फक्त आधुनिक तंत्रज्ञान,सोशल मीडिया,टीव्ही चॅनल मुळे घडले असे मानने भोळेपणाचे ठरेल. सगळे कमर्शियल झाले*,झटपट यश मिळविण्यासाठी कष्ट करायची सवय गेली आणि *राजकारणातील अर्थकारण* वेगाने वाढले त्याचे हे दुष्परिणाम आहेत असे मला वाटते.घरोघरी जाऊन स्लिपा वाटायच्या असतात हे आता फक्त बैठकीत मार्गदर्शनापुरते.मग छापील स्लिपा आणि टॅब वर लोड केलेली मतदार यादी घेऊन घरोघरी जाणारे पेड कार्यकर्ते (?)ही आत्ताच्या निवडणुकीची ओळख बनली आहे.येथे आता असण्यापेक्षा दिसण्यावर भर आहे (चमकोगिरी चरम वर ) *मनी,मसल पॉवर ,माणसे जमविण्याची क्षमता आणि जात* महत्त्वाची झाली आहे.
अश्या राजकारणाच्या दूषित वातावरणात ही भाजप सारख्या केडर बेस पार्टी मधे अजुन ही याद्या फोडणारे – अरे ते शिंपी आळीतले कुंभार कुठे राहायला गेले ,तो पत्र्या मारुती पासचा कुलकर्णी आता डहाणूकर ला राहतो कुणी तरी उद्या जाऊन या त्याच्याकडे ,अशी आरोळी ठोकणारे आणि अजूनही *भेळभत्ता वर ताव मारणारे कार्यकर्ते* बघितले की सगळेच काही संपले नाही याची जाणीव होते आणि नव्या उमेदीने पुनश्च प्रचाराच्या रणधुमाळीत उतरायला सज्ज होतो.परंपरागत प्रचार यंत्रणाच कामाची आहे ,वैयक्तिक संपर्क हाच राजकारणाचा पाया आहे आणि तो भक्कम करणे गरजेचे आहे हे पटते.
अजून एक महत्त्वाचे म्हणजे आता नेते ही Professional झाले आहेत,हलक्या कानाचे आणि ठराविक चमच्यांपुरते … पूर्वी प्रमाणे *कार्यकर्त्यांच्या सुख दु:खात* सहभागी होणारे ,आपलेपणा  वाटावा असे नेते दुर्मिळ झाले आहेत .ताण तणावामुळे *कार्यकर्त्यांशी तुसडेपणे वागणारे* ,मूड प्रमाणे वागणारे नेते जास्त झालेत. आता अश्या नेत्यांना ही केवळ त्यांच्या कडे असलेल्या *सत्तेच्या पदामुळे* लोक थोडा भाव देतात / पूर्वी च्या सारखे *प्रेम आणि आदर* खचितच उरलेला नाही . त्यातून जिथे *वाकावे तिथे मातीचे पाय आणि अत्यंत हलक्या कानाचे नेते* …. यामुळेच मनी आणि मसल पावर असलेल्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले आणि सर्व पक्षांचा पाया असणारे *सच्चे कार्यकर्ते* मागे पडले .
एक आठवण महत्त्वाची आहे . पुणे मनपा च्या २००२ च्या निवडणुकीमध्ये मला *प्रवक्ता* अशी जबाबदारी देण्यात आली होती तसेच पक्ष कार्यालयातील अन्य जबाबदाऱ्या ही होत्याच . प्रदेशाकडून प्रचार साहित्य आले होते ,त्याचे गठ्ठे करुन सर्व उमेदवारांना ते घेऊन जाण्यासाठी फोन करत होतो . पक्षात नव्यानेच दाखल होवुन तिकीट मिळालेल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना फोन केला असता ” तुम्ही माझ्या ऑफिस जवळच राहता ना ,मग घरी जाताना देउन जा ना ऑफिसवर ” आणि माझा त्यांचा फारसा परिचय नसताना ही पक्षकार्य म्हणून मी घरी येताना त्यांचे साहित्य माझ्या स्कूटर वरुन पोच केले . हा प्रसंग येवढ्यासाठीच सांगितला की तेव्हा कार्यकर्ता जमीनीवर होता आणि निष्ठेने पक्षकार्य करत असे . आज *कोणास असे साहित्य पोहोचविण्यास* सांगितले तर त्याला त्यात कमीपणा वाटतो .
अर्थात ३५ वर्षात बदलले नाही ते म्हणजे – *खुशमस्करे* – ही एक *वेगळीच जमात* असते , हे *काम काहीच करत नाहीत* ,फक्त *रिपोर्टींग करणे ,नेत्यांच्या कानाला लागणे* त्यांच्या फेऱ्यांतून किंवा सभा / बैठकीत स्थानिकांना डावलून *चमकोगिरी* करणे आणि एसी त बसून आल्यागेलेल्यांवर डाफरणे. पूर्वी लिंबु सरबत किंवा कुल्फी खाणारे खुशमस्करे आता प्रगतीपथावर असून मस्तानी आणि बिर्याणी वर ताव मारतात…..आणि गंमतीचा भाग असा की काहीही न करणारे हे नेत्यांना जास्त प्रिय असतात लाडके असतात आणि उन्हात घरोघरी जाउन पत्रक वाटणारा कार्यकर्ता दोडका …. कार्यकर्त्याने ही हे ओळखले असल्याने तो ही आता तोंडदेखले काम करतो….Accountability राहिली नाही आणि आपले कोणी काही वाकडे करु शकत नाही ही भावना बळकट झाली……. 
 *हे असे बदलले आहे निवडणूकीचे तंत्र आणि मंत्र* …
*संदीप खर्डेकर*
मो – ९८५०९९९९९५
(लेखक हे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते असून भाजपच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी आहेत .ज्यांचा गेली ३५ वर्षाहून अधिक काळ आंदोलने, माध्यमे,शासकीय प्रशासन व्यवस्था आणि नागरिकांच्या कथा आणि व्यथांशी सातत्याने संपर्क राहिला आहे. )

गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नावीन्यपूर्ण, भविष्यात्मक कूलिंग तंत्रज्ञान दाखल

नवा क्युब हा आधुनिक सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले, विविध पर्याय असणारा स्टायलिश व आटोपशीर फूड व बेव्हरेज कूलर दाखल

 मुंबई: गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील होम अप्लायन्सेस श्रेणीतील आघाडीच्या कंपनीने व रेफ्रिजरेशनमधील कौशल्यासाठी नावाजलेल्या ब्रँडने क्युब हे वैशिष्ट्यपूर्ण लाइफस्टाइल उत्पादन दाखल केल्याचे जाहीर केले आहे. या उत्पादनामध्ये आधुनिक सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग ग्रीन तंत्रज्ञानाचा समावेश असून हे तंत्रज्ञान कूलिंग करते, फ्रीझ करत नाही. भारतामध्ये हे प्रगत तंत्रज्ञान दाखल करणारा गोदरेज हा पहिला ब्रँड आहे.

सर्व पारंपरिक कूलिंग उपकरणे रेफ्रिजरंटवर आधारित कूलिंगवर अवलंबून असतात, तर गोदरेज क्युबमध्ये रेफ्रिजरंट, कॉम्प्रेसर यांचा वापर केला जात नाही. गोदरेज क्युब थर्मो-इलेक्ट्रिक चिपवर चालते. बहुतेकशी रेफ्रिजरंट निरनिराळ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरतात. त्यामुळेच, नॉन-रेफ्रिजरंट प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान सर्वात पर्यावरणपूरक कूलिंग सोल्यूशन ठरते.

काही महिन्यांपूर्वी, देशातील विविध राज्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी श्रेणीसाठी क्युब प्रायोगिक तत्त्वावर दाखल करण्यात आले. भरभरून प्रतिसाद मिळाल्याने आता या ब्रँडने आपल्या ट्रेड चॅनलद्वारे बी2सी श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारे गोदरेज क्युब हे कूलिंग उपकरण प्रामुख्याने लहान प्रमाणातील कूलिंगची गरज असणाऱ्या लोकांसाठी तयार केले आहे. सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे, हे उत्पादन या श्रेणीतील अन्य उत्पादनांपेक्षा वेगळे असून ते 0 फ्रॉस्ट उत्पादन आहे, म्हणजेच डिफ्रॉस्ट करण्याची आवश्यकता भासत नाही. डिफ्रॉस्टिंग करावे लागत नाही, या वैशिष्ट्याबरोबरच आटोपशीर आकार व तुलनेने अधिक स्टोअरेज क्षमता, शांतपणे चालणे व आकर्षक डिझाइन अशा वैशिष्ट्यांमुळे गोदरेज क्युब हे कामाच्या व राहण्याच्या ठिकाणी, किचनच्याही पलीकडे जाऊन एक वैयक्तिक फूड व बेव्हरेज कूलिंग उपकरण म्हणून आदर्श ठरते – किचनव्यतिरिक्तचे हे ठिकाण बेडरूम असेल किंवा कार्यालये असतील, दुकाने असतील किंवा हॉटेल, होस्टेल व गेस्ट हाउस.

यामध्ये अन्यही काही वैशिष्ट्ये आहेत, जशी एलईडी फिट इंटिरिअर, स्टॅबिलायझरमुक्त कार्य, घरातील इन्व्हर्टरशी कम्पॅटिबिलिटी, मॅग्नेटिक ऑटो डोअर यंत्रणा, सहज देखभाल व सेवा आणि ग्राहकासाठी श्रेणीतील सर्वोत्तम सोय व कामगिरी, तसेच हे उत्पादन 100% हरित व पर्यावरणपूरक असणे.

उत्पादन दाखल केल्याविषयी, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी नमूद केले, “आम्ही 61 वर्षांपूर्वी, आम्ही उत्पादन केलेले पहिला भारतीय रेफ्रिजरेटर दाखल केल्यापासून, भारतातील घराघरातील फ्रॉस्ट फ्री व डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरसाठी लोकप्रिय पर्याय ठरण्याच्या हेतूने, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने विकसित होत आहोत. गेल्या काही वर्षांत, आम्ही रेफ्रिजरेशन / कूलिंग व त्यासंबंधीच्या क्षेत्रामध्ये मोठे कौशल्य विकसित केले आहे. गोदरेजमध्ये, पृथ्वी व भविष्यातील पिढ्या यांच्याविषयीच्या जबाबदारीचे पालन करत, आमच्या संबंधित घटकांना आनंद देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. क्युबच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांच्या कमी प्रमाणातील कूलिंगच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी आणखी एक विशेष लाइफस्टाइल उत्पादन दाखल केले आहे व या उत्पादनामध्ये प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग ग्रीन तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. त्यामुळे हे उत्पादन शाश्वतही ठरले आहे. ब्रँडच्या ‘सोच के बनाया है’ या विचारसरणीला अनुसरून, ग्राहकांना नव्या नावीन्यपूर्ण, महत्त्वाच्या व हरित तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे क्युब हे प्रतिक आहे.”

तंत्रज्ञानाविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे थर्मोइलेक्ट्रिक अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट संजय लोनिअल यांनी सांगितले, “हवामानातील बदल ही एक जटिल समस्या असताना, सध्या वापरल्या जाणाऱ्या व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीमच्या ऐवजी पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध सुरू आहे. बहुतेकशा व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीममध्ये रेफ्रिजरंटचा वापर केला जातो व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणखी वाढते. पर्यायी तंत्रज्ञान म्हणजे, रेफ्रिजरंट-मुक्त प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा कूलिंग, हीटिंग, वीजनिर्मिती व वेस्ट हीट रिकव्हरी या बाबतीत स्वच्छ वापर केला जातो. या प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गोदरेज विशेष अॅप्लिकेशन विकिसत करण्याचा प्रयत्न करत आहे. शाश्वतता, कार्यक्षमता, पोर्टेबिलिटी, स्मॉलर फॉर्म फॅक्टर अशा विविध पैलूंच्या बाबतीत हे तंत्रज्ञान सरस असल्याने आम्ही या क्रांतिकारी प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर क्युब या आमच्या नव्या उत्पादनामध्ये केला आहे. हे उत्पादन घरातील इन्व्हर्टरच्या बाबतीत कम्पॅटिबल असून ते 24/7 काम करते. स्टाइल व आरामदायीपणा असणारे गोदरेज क्युब हे आदर्श लहान कूलिंग उपकरण आहे.”

गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव यांनी सांगितले, “प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान समाविष्ट असणारे नवे मल्टि-अॅप्लिकेशन गोदरेज क्युब उत्पादन सादर करताना आम्हा अतिशय अभिमान वाटतो आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये या उत्पादनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, आम्ही हे उत्पादन एंड युजर्ससाठी घरे व कार्यालये यांसाठी दाखल करत आहोत. आम्ही आमच्या आघाडीच्या ट्रेड पार्टनरकडे नमुना म्हणून हे उत्पादन दिले आहे आणि ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे. आमच्या सक्षम ट्रेड नेटवर्कचा लाभ घेण्याव्यतिरिक्त, आम्ही संभाव्यग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल सुविधांचाही वापर करणार आहोत. आटोपशीर आकार, डिफ्रॉस्टिंगची चिंता नाही व शांतपणे कार्य, या वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे वापरता येऊ शकते: आवाज करणाऱ्या बेडरूम रेफ्रिजरेटरऐवजी वापरणे किंवा विशेष पदार्थांसाठी स्वतंत्र जागा देणे किंवा कार्यालये, दुकाने, हॉटेल, होस्टेल, गेस्ट हाउस आदी ठिकाणी वापरणे. शिजवलेले पदार्थ, पेये, दूध व दुग्ध उत्पादने, फळे व चॉकलेट, औषधे अशा विविध प्रकारच्या घटकांच्या साठवणुकीसाठी क्युब हे उत्पादन आदर्श ठरेल.”

नवे क्युब दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक ग्रे व ब्लॅक, तसेच त्यांची किंमत 6999 रुपये आहे, आणि हे उत्पादन भारतभर सर्वत्र उपलब्ध केले जाईल.

श्नायडर इलेक्ट्रिकने केले पुण्यातील नव्या कार्यालयाचे उद्घाटन

16,000 चौरस फूट कार्यालयामध्ये ऊर्जा, इमारती, मशीन व प्रकल्प यासाठी इकोस्ट्रक्शर सोल्यूशन्सचे प्रात्यक्षिक दिले जाणार

पुणेश्नायडर इलेक्ट्रिक या ऊर्जा व्यवस्थापन व ऑटोमेशन या क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील स्पेशालिस्ट कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे, ओपन स्पेस या संकल्पनेवर आधित असणाऱ्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्याचे आज जाहीर केले आहे. श्नायडर इलेक्ट्रिक ही शहरातील व आजूबाजूच्या उपनगरांतील महत्त्वाच्या ग्राहकांसाठी पसंतीची ऊर्जा व्यवस्थापन भागीदार आहे. या विस्ताराच्या निमित्ताने, कंपनीने वैविध्यपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन उत्पादने व सोल्यूशन याद्वारे, महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक राजधानीतील आपले आघाडीचे स्थान व उत्पन्न बळकट करायचे ठरवले आहे. कंपनीचा सर्व व्यवसाय आणि अमेरिकेतील एएससीओ पॉवर टेक्नालॉजीजचे डिझाइन इंजिनीअरिंग सेंटर यांसाठी कंपनीचा हा एकात्मिक प्रकल्प असणार आहे.

 नव्या कार्यालयामध्ये श्नायडर इलेक्ट्रिकची दर्जेदार उत्पादने व सोल्यूशन दर्शवली जाणार आहेत, तसेच ग्राहकांना झटपट सेवा देण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमताही वाढवली जाणार आहे. यानिमित्त बोलताना, श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे नॅशनल सेल्सचे उपाध्यक्ष मनीष खंडेलवाल यांनी समावेशक, खुल्या व भविष्यात्मक वर्कप्लेसचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विचार व्यक्त केले. पुण्यातील नवा प्रकल्प हा भारतातील कंपनीच्या सर्वोत्तम कार्यालयांपैकी एक असणार आहे आणि कार्यालयांच्या बाबतीत नवा बेंचमार्क निर्माण करणार आहे.

श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे जनरल मॅनेजर श्रीकर पैठणकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना नमूद केले, “या शहरामध्ये असणाऱ्या क्षमतेविषयीचे आमचे आकलन या विस्तारातून अधोरेखित झाले आहे, तसेच ग्राहकांना उत्तम अनुभव देऊन स्थानिक व्यवसाय झपाट्याने वाढण्यासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्नही स्पष्ट झाला आहे. मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी असल्याने आम्हाला ग्राहककेंद्रित सेवा देणे व त्यांना सहज उपलब्ध होईल, अशी सेवा देणे शक्य होणार आहे.” अमर कॅलिबर, सीटीएस नं. 911, बीएमसीसी रोड, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर येथे असणारे नवे कार्यालय श्नायडर इलेक्ट्रिकची ऊर्जा, इमारती, मशीन व प्रकल्प यासाठीची इकोस्ट्रक्शर सोल्यूशन दर्शवण्याच्या दृष्टीने आखले आहे. कार्यालयामध्ये ग्राहकांसाठी प्रशिक्षण सुविधा व नॉलेज शेअरिंग सुविधाही आहे.

 

 

केटरिंग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटित व्हा:सरपोतदार

0
पुणे :’केटरिंग क्षेत्रातील सरकार दरबारपासून सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आणि एकत्रितरित्या प्रगतीच्या संधी शोधण्यासाठी आउटडोअर केटरिंग क्षेत्रातील सर्वानी संघटित होण्याची आवश्यकता आहे ‘असे प्रतिपादन महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी केले.
‘न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘चा महामेळावा  पुण्यात १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल ताज विवांता (ब्लू डायमंड ) येथे झाला .‘महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन’चे अध्यक्ष किशोर सरपोतदार हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते ,उपाध्यक्ष जी.एस.बिंद्रा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी‘न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘अध्यक्ष मन्साराम माळी ,उपाध्यक्ष बाबूसिंह पुरोहित,उपाध्यक्ष बाबुलाल गौड,सनी अवसरमल ,मनोज वैष्णव,एम.क्यू सईद,दिनेश्वर नाथानी ,सुहास आदमाने उपस्थित होते.
किशोर सरपोतदार म्हणाले,’भारतभरातून ४ पिढ्या केटरिंग क्षेत्रात व्यवसाय करायला पुण्यात आल्या आहेत.हा व्यवसाय आव्हानात्मक होत आहे.ग्राहकांच्या आवडी ,निवडी ,गरजा ,बजेट बदलत आहेत ,सरकारी नियम बदलत आहेत.अशावेळी संघटित होऊन प्रश्न सोडविणे आणि संघटितपणे प्रगतीच्या संधी शोधणे आवश्यक आहे.
‘सणासुदीलाही दुसऱ्याना सेवा देणाऱ्या केटरर्स मंडळींनी आरोग्य जपावे,स्वतःसाठी वेळ काढावा’,असे आवाहनही त्यांनी केले.
जी.एस.बिंद्रा यांनी’संघटनशक्तीचे फायदे’या विषयावर मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात केटरिंग क्षेत्रातील करियरसाठी ,जीएसटी विषयक उपयुक्त ठरणारी दोन व्याख्यानेही झाली.एस.आर.भार्गव यांनी जीएसटी कर प्रणालीची माहिती दिली ,तर दिनेश्वर नाथानी यांनी प्रेरक व्याख्यान दिले.ऑल इंडिया हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे अध्यक्ष सनी अवसरमल यांनी केटरिंग असोसिएशनसाठी आवश्यक विमा योजनांविषयी माहिती दिली.
संयोजन समितीच्या वतीने मन्साराम माळी,बाबूसिंह पुरोहित,बाबुलाल गौड,काळुराम गेहलोत ,दलपतसिंह पुरोहित ,मनोज वैष्णव यांनी स्वागत केले.महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले. अन्नपूर्णा माता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पुणे जिल्ह्यातील केटरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांनी  (आउट डोअर ) एका छत्राखाली यावे,या उद्देशाने हा महामेळावा घेण्यात आला. जीएसटी कर प्रणालीतील प्रश्न ,एफडीए चे नियम समजावून सांगणे ,सरकारदरबारी व्यावसायिकांच्या समस्या मांडणे,समाजात या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नवनवे उपक्रम आयोजित करणे ,यासाठी ही असोसिएशन उपक्रम आयोजित करणार आहे,असे यावेळी संयोजकांनी सांगितले. न्यू पूना केटरिंग असोसिएशच्या व्या कार्यकारिणीची घोषणा  मनोज वैष्णव यांनी केली

‘फिक्की फ्लो’ पुणेच्या अध्यक्षपदी रितू प्रकाश छाब्रिया यांची निवड

0

पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्लो’च्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांच्याकडून रितू प्रकाश छाब्रिया यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. ही निवड २०१९-२० या कालावधीसाठी असणार आहे.

रितू प्रकाश छाब्रिया मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अत्याधुनिकरण करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, एन्डोस्कोपी विभागाचा चेहरामोहरा त्यांनी बदलला आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून रितू प्रकाश छाब्रिया आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास, स्वच्छता आणि जलसंवर्धन या क्षेत्रात भरीव काम करीत आहेत. अनेक प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन व अंमलबजावणीचे काम त्या गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने करीत आहेत.

समाजातील वंचितांचा सर्वांगीन विकास, शेती, आरोग्य आणि शिक्षण सुधारण्यासाठी ‘शहरातून गावाकडे’ या उद्दिष्टावर काम करणार असल्याचे रितू प्रकाश छाब्रिया यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितले. शहरातील महिलांच्या साथीने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या वर्षभरात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह ‘फ्लो’चे सदस्यत्व वाढविण्यात यश आल्याचे मावळत्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी सांगितले.

उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन महिलांचे सबलीकरण, आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘फ्लो’ या संस्थेची १९८३ साली स्थापना करण्यात आली. या संस्थेत सहा हजारांपेक्षा अधिक महिला उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्हजचा समावेश आहे. पुणे विभागात सध्या ४०० पेक्षा अधिक महिला सदस्य आहेत. या संस्थेचे देशभरात एकूण १५ विभाग आहेत. महिलांमध्ये उद्यमशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी ‘फ्लो’तर्फे विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्याने, प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय !!

0

स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. त्यानूसार, ‘मिर्झापूर’ नंबर वन स्थानी तर ‘सॅक्रेड गेम्स’ दूस-या स्थानावर आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमधली ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात वेब दुनियेत ‘मेड इन हेवन’, ‘दि फायनल क़ॉल’, ‘फ्लिप’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘दि शोले गर्ल’ ह्या वेबसीरिज रिलीज झाल्या. त्यापैकी ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेत सर्वौच्च स्थानी दिसून येतेय.

गेल्या काही दिवसांपासून स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्ट्सवर ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापुर’ ह्या दोन क्राइम थ्रिलर्सची प्रचंड लोकप्रियता दिसून आलीय. ह्या दोन्ही वेबसीरिज लोकप्रियतेत नेहमी पहिल्या किंवा दुस-या स्थानावरच असतात. त्यांना त्या स्थानावरून हटवणे हे बाकी वेबसीरिजसाठी एक आव्हानच म्हणावे लागेल.

यंदा मार्चमध्ये अमेज़ॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ रिलीज झाल्यावर डिजिटल न्यूज, न्यूज प्रिंट आणि वायरल न्यूजमध्ये ह्या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यामूळेच तर 67.57 गुणांसह ही मालिका तिस-या स्थानावर आली. आणि मार्च 2019मध्ये झळकलेल्या वेबसीरिजमध्ये ती सर्वोच्च पदावर पोहोचली.

ह्यासोबतच, अर्जुन रामपाल, जावेद जाफरी आणि नीरज काबी स्टारर ‘झी-5 ओरिजिनल’च्या ‘द फाइनल कॉल’ने 42.57 गुणांसह लोकप्रियतेत सहावे स्थान पटकावले आहे. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ती दुस-या स्थानावर पोहोचली आहे.

इरॉस नाउ ओरिजिनलची बिजॉय नांबियार दिग्दर्शित, ‘फ्लिप’ 25.54 गुणांसह वेबसीरिजच्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 11 व्या स्थानी पोहोचलीय. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये तिस-या स्थानी आलीय.

ह्याशिवाय नेटफिक्स ओरिजिनल्सची ‘दिल्ली क्राइम’ 20.27 गुण मिळवून लोकप्रियतेच्या लिस्टमध्ये 12 व्या पदावर आहे. आणि मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

भारताची पहिली स्टंटवूमन रेश्मा पठाणवर आधारित बायोपिक सीरिज, Zee 5 ओरिजिनलची ‘दि शोले गर्ल’ 10.41 गुणांसह14 व्या स्थानी पोहोचलीय. मार्च 2019मध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेच्या शिखरावर कमी अवधीत चढत गेली. ‘द फाइनल कॉल’, फ्लिप आणि ‘द शोले गर्ल’ ह्या मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजही सध्या जनमानसात लोकप्रिय झालेल्या दिसून येतायत. वेब सीरीज़च्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे.  सोशल प्लेटफॉर्म, वायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्स मध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पूरावा आहे. मार्चमध्ये रिलीज झालेली ‘दिल्ली क्राइम’ सुध्दा कमी अवधीत लोकप्रिय झाली.ज्यामूळे आम्हांला असं वाटतंय, की ही वेबसीरिज येत्या काही दिवसांमध्ये लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करेल. “

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”