Home Blog Page 2925

वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चुकलेले ‘टायमिंग’ ठरतेय वाहतूक कोंडीला कारणीभूत

कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले उड्डाणपुले ठरताहेत निरूपयोगी ;आबा बागुल 
पुणे –
शहरातील वाहतूक कोंडीला वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चुकलेले ‘टायमिंग ‘ कारणीभूत ठरत असल्याची वस्तुस्थिती असून प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीला ‘खतपाणी ‘ मिळत असल्याकडे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी लक्ष वेधले असून सुरळीत वाहतुकीसाठी उभारण्यात आलेले उड्डाणपुलांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,  दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या पुणे शहरासाठी सुरळीत वाहतुकीकरता पुणे महानगरपालिकेने शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपुले उभारली आहेत. सुरळीत वाहतूक हा एकमेव उद्देश असला तरी काही क्षुल्लक बाबींमुळे हे उड्डाणपूल निरुपयोगी ठरले आहेत. कोट्यवधी रुपये उड्डाणपुलांवर खर्च करूनही सुरळीत वाहतूक होण्याऐवजी वाहतूक कोंडीचा पुणेकरांना  सामना करावा लागत असल्याची वास्तवता आहे. वाहतूक कोंडी का होत आहे ? कोणते घटक कारणीभूत आहेत ?याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, हेच मुळात खेदजनक आहे.त्यातही ही आमची जबाबदारी नाही ही भूमिकाही योग्य नाही. वास्तविक  केलेल्या पाहणीनुसार जिथे जिथे सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाणपुले आहेत आणि अन्य ठिकाणीही वाहतूक कोंडीला वाहतूक नियंत्रक दिवे कारणीभूत ठरत आहेत. केवळ या दिव्यांचे ‘ टायमिंग ‘ चुकीचे असल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा  लागत असल्याचे आढळून आले आहे. कोणत्या रस्त्यावर कोणत्या वेळी रहदारी जास्त असते. कोणत्या रस्त्यावर कमी असते यानुसार वाहतूक नियंत्रक दिव्यांची  वेळ निर्धारित असणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत चित्रच उलट आहे. जिथे रहदारी कमी आहे ,त्याठिकाणी वाहतूक नियंत्रक दिव्यांचा कालावधी जास्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावर रहदारी  जास्त आहे. तिथे वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील सर्वच वाहतूक नियंत्रक दिव्यांची वेळ रहदारीनुसार निर्धारित करून वाहतूककोंडी टाळून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.
 

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नृसिंह मंदिराचे जतन व्हावे -अरविंद शिंदे

पुणे : क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य असलेले आणि असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचे जतन व्हावे याकरिता प्रयत्न करू असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी शनिवारी दिले.
राज्य शासनाने २०१७ साली मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीत सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचा नगारखाना , सभामंडप असा मोठा भाग जात आहे. अडीचशे वर्षे जुने हे जुने मंदिर म्हणजे नमुनेदार स्थापत्यशैलीची जुन्या ऐतिहासिक पुण्याची ओळख आहे. अशा वास्तू पुण्याच्या मानबिंदू आहेत. त्यांचे जतन व्हायला हवे याकरिता रस्ता रुंदीकरणातून मंदिर वगळण्यात यावे , असे शिंदे यांनी सांगितले. मंदिराला भेट देवून शिंदे यांनी विश्वस्त आणि नागरिकांशी चर्चा केली. मंदिर वाचविण्यासाठी चाललेल्या जनआंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला.
महापालिकेच्या पातळीवर शहर सुधारणा समिती, मुख्य सभेत ठराव मांडू असेही त्यांनी सांगितले .
काँग्रेसचे नेते जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक वास्तू समितीने येथे नीलफलक लावला, त्या कार्यक्रमात मी सहभागी होतो. सन १९८७च्या विकास आराखडयातील रस्ता रुंदी रद्द करण्यात आली होती अशी माहिती शिंदे यांनी दिली. २०१७ सालच्या मंजूर विकास आराखड्यात अनेक ठिकाणची रस्ता रुंदी रद्द झाली पण येथील ठेवण्यात आली याकडे नागरिकांनी लक्ष वेधले.
क्रांतीवीरांचे वास्तव्य आणि पुरातन मंदिर , श्री लक्ष्मी नृसिंह अनेक घराण्यांचे कुलदैवत आहे त्यामुळेही अनेकांचे ते श्रध्दास्थान आहे हे वैशिष्टय लक्षात घेऊन या वास्तूला यापूर्वीच हेरिटेजचा दर्जा मिळायला हवा होता. अशा या वास्तूसाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागतात हे खेदजनक आहे , अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्‍कार सन्‍मानपूर्वक प्रदान

0

पुणे- मेक्सिको सरकारच्‍यावतीने देण्‍यात आलेला पुरस्‍कार हा देशाचा गौरव असल्‍याचे प्रतिपादन देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्‍यूइला’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार त्‍या देशाच्‍या भारतातील राजदूत श्रीमती मेल्‍बा प्रिया यांच्‍या हस्‍ते सन्‍मानपूर्वक प्रदान करण्‍यात आला.

सेनापती बापट रस्‍त्‍यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीजच्‍या पाचव्‍या मजल्‍यावरील सभागृहात हा कार्यक्रम झाला.यावेळी ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां.ब. मुजूमदार, डॉ. देविसिंह शेखावत, ज्‍योती राठोड, मोहन जोशी, उल्‍हास पवार, शरद रणपिसे,डॉ. शिवाजीराव कदम, चंद्रकांत शिवरकर, डॉ. के. एम. संचेती, उपजिल्‍हाधिकारी अमृत नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती पाटील म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रपतीपदी असतांना मेक्सिको आणि भारत देशामध्‍ये विविध क्षेत्रातील परस्‍पर सामंजस्‍य करार करण्‍यात आले. दोन्‍ही देशांमध्‍ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्‍यावर भर देण्‍यात आला.  हे सर्व करत असतांना मी देशाचे प्रतिनिधीत्‍व केले. त्‍यामुळे हा पुरस्‍कार म्‍हणजे माझ्या देशाचा गौरव आहे. दोन्‍ही देशांच्‍या मैत्रीचा गौरव आहे. देशाच्‍या राष्‍ट्रपतीपदी असतांना सन 2007मध्‍ये मेक्सिकोचे राष्‍ट्राध्‍यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्‍डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्‍यानंतर मी 2008 मध्‍ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्‍ही देशांदरम्‍यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते, अशी आठवण श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितली.

श्रीमती प्रतिभाताई  त्यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्याच्या वेळी देशातील उच्चत्तम व्यापारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज (फीक्‍की), अॅसोचॅम, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्‍ट्री (सीआयआय)  यांचे व्यापारी प्रतिनिधी मंडळ बरोबर नेत असत,  ते त्यांच्याच खर्चाने यायचे व त्यामुळे भारताचे दुसऱ्या देशांशी व्यापारी संबंध वाढले व ते फायद्याचे ठरले असे या उच्चतम व्यापारी संघटनांनी पुस्तिका प्रकाशित करून सांगितले.

मेक्सिकोच्‍या भारतातील राजदूत श्रीमती मेल्‍बा प्रिया यांनी या राष्‍ट्रीय पुरस्‍कारामागची भावना व्‍यक्‍त केली. त्‍या म्‍हणाल्‍या, मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्‍पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्‍यात येतो. असा पुरस्‍कार मिळवणा-या श्रीमती पाटील या पहिल्‍या भारतीय महिला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. नेल्‍सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन, बिल गेट्स या मान्‍यवरांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले असल्‍याचाही त्‍यांनी उल्‍लेख केला.

कार्यक्रमात माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांच्‍या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी तसेच त्यांच्‍या मेक्सिको भेटीवरील व्हिडीओ चित्रफीत दाखवण्‍यात आली. श्रीमती मेल्‍बा प्रिया यांचे स्‍वागत ज्‍योती राठोड यांनी तर डॉ. देविसिंह शेखावत यांचे स्‍वागत डॉ. जसवंत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा शहा यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित होते..

नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या पोटात आढळली २००ग्रॅमची रक्ताची गाठ !

डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी कठीण शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे-प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई- वडील होणे ही खूप सुखाची गोष्ट असते. शिरूर येथील श्री व सौ साकोरे यांच्या आयुष्यात देखील हा सुखाचा क्षण १४ मार्च २०१९ रोजी आला. भोसरीतील एका खाजगी रुग्णालयात साकोरे दाम्पत्याला मुलगा झाला. परंतु जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बाळाच्या नाकात लावण्यात आलेल्या नलिकेतून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊ लागला. हा रक्त स्त्राव काही केल्या थांबत नव्हता. यामुळे डॉक्टरांनी या बाळाला ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे हलवण्याचा निर्णय घेतला.

ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे आणल्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. येथील बालरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे यांनी बाळाची तपासणी व उपचार करून देखील काही केल्या हा रक्त स्त्राव थांबत नव्हता. २ दिवसाच्या कठीण परिश्रमानंतर बाळाच्या तोंडातून/नाकातून येणारा रक्त स्त्राव थांबवण्यात त्यांना यश आले.

मात्र व्हेंटिलेटर व औषधोपचारानंतर ७ दिवसांनी बाळाचे पोट फुगले आहे असे लक्षात आले. यावेळी डॉक्टरांनी पोटाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बाळाचे जठर फुटले असल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला, तेथे २०० ग्रॅम रक्ताची गाठ निर्माणझाली होती  व इतर भागात गँगरीन झाल्याचे आढळून आले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने रक्ताची गाठ काढून फुटलेले जठर शिवले. व त्यात अन्नपदार्थ आल्यास त्याची गळती होणार नाही याची दखल घेतली.

व्हेंटिलेटर वर असतानाच पुढच्या ४८ तासात या बाळाच्या डाव्या फुफ्फुसाला न्यूमोनिया झाला. हे दुसरे आव्हान डॉक्टरांच्या समोर आले मात्र औषधांच्या सहाय्याने हा न्यूमोनिया बरा केला. पुन्हा काही दिवसात (शस्त्रक्रियेच्या ६ दिवसानंतर) त्या बाळाच्या रक्तात फंगल संक्रमण झाल्याचे आढळले, यावेळी त्याला फंगल संक्रमण डोस देण्यात आले. डॉक्टरांच्या २० दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर आता बाळाची तब्बेतीत सुधारणा असून त्याला डिस्चार्जे देण्यात आला.

या बाबत डॉ. श्रीनिवास तांबे म्हणाले की “याबाळाची प्रकृती अतिशय नाजूक होती तशीच ही केस देखील अतिशय दुर्मिळ होती. याची माहिती कोठेही उपलब्ध नसल्याने आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीम ने अनुभवाच्या जोरावर बाळाचा जीव वाचवला .”

ही शस्त्रक्रिया ज्युपिटरच्या पाडियाट्रिक आयसीयूचे प्रमुख डॉ. श्रीनिवास तांबे , पाडियाट्रिक सर्जन डॉ. प्रणव जाधव व डॉ. कल्पेश पाटील यांच्या टीम ने यशस्वीरित्या पार पाडली.

साकोरे दाम्पत्य हे मुळचे शिरूर तालुक्यातील असून त्यांच्या मुळ व्यवसाय हा केवळ शेती हा आहे. त्यांची परिस्थिती बेताची असून, आपल्या पहिल्या मुलाचे प्राण वाचल्याने  त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.या बाबत बोलताना श्री व सौ साकोरे म्हणाले की, “ बाळाच्या तोंडातून/नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने आम्ही आतिशय घाबरून गेलो होतो. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बाळाला पूर्ण उपचार देणे आमच्या कडून अशक्य होते. मात्र ज्युपिटर हॉस्पिटलने बाळाच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. आम्ही डॉक्टरांनवर पूर्ण विश्वास ठेवून  आमचे बाळ त्यांच्या हाती सोपवले. आज उपचारनंतर बाळाच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे पाहून अतिशय समाधान वाटते” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन

नवी मुंबई- सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते , असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था नवी मुंबई आयोजित नवी मुंबई उत्सव 2019 चे उदघाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी राज्यपाल डॉ.डी वाय पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडको चे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आ.रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आ.मंदा म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामीआदी मान्यवर उपस्थित होते.

कै गणपतशेट तांडेल मैदान, नेरुळ येथे हा शानदार कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवर्धिनी संस्थेच्या वतीने 11 लाख रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट द्वारे महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.त्यानंतर आ. मंदा म्हात्रे यांच्या कार्य अहवालाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई खाडी पुलावरून खाडीत पडलेल्या लोकांना वाचविणाऱ्या महेश अशोक सुतार यांचा तसेच सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात श्री. फडणवीस म्हणाले की, कार्य अहवाल म्हणजे निवडून आल्यानंतर लोकांना केलेल्या कामांची दिलेली छापील माहिती, रामभाऊ म्हाळगी यांनी ही परंपरा सुरू केली. ज्या जनतेने आपणाला विश्वासाने निवडून दिले. त्यांच्यासाठी काय केलं याची माहिती त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. आ.मंदाताई म्हात्रे यांनी हा अहवाल प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करून त्यांनी नवी मुंबई महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई उत्सवाच्या निमित्ताने जनतेचे एकत्रीकरण होणे ही चांगली बाब आहे,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शंकर महादेवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,अभिषेक कांबळे, युक्ता पाटील, सई जोशी आदी कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले

अरविंद सावंत यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या निवडीमुळे मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व – लोढा

0
मुंबई : दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील मंत्रिपदी निवड झाल्यामुळे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आमदार लोढा म्हणाले की, सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल.
नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दक्षिण मुंबईच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. लोढाने विश्वास व्यक्त केला की, मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा आणणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. आमदार लोढा म्हणाले, की सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

भांबुर्डा वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा…

पुणे-गोखलेनगरमधील मेंढी फार्म येथे आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या भांबुर्डा वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येत्या सोमवारी (ता. ३ जून) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. आमदार विजय काळे कार्यक‘माचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुणे (प्रादेशिक) मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ऐ, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भांबुर्डा वन उद्यानाची वैशिष्ट्ये
१. पुणे शहरातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे उद्यान ः १४ एकर
२. आयुष वन, लुप्त होणार्‍या प्रजातींचे वन, गणेश वन, सुगंधी वन, नवग‘ह वन, पंचवटी वन, औषधी वन, नक्षत्र वन, फळ उद्यान, वड जातींच्या वृक्षांचे उद्यान, पाम उद्यान, उपयुक्त प्रजातींचे उद्यान, स्मृती वन, बांबू वन, किचन बाग वन अशा विविध विभागांमध्ये वनउद्यानाची रचना करण्यात आली असून, १४ हजार वृक्ष व वेलींची लागवड करण्यात आली आहे
३. नागरिक विशेषतः विद्यार्थ्यांना पर्यावरणाची ओळख व्हावी यासाठी निसर्ग परिचय केंद्र
४. पर्यावरण विषयक कार्यक‘मांसाठी खुले सभागृह, चित्रफिती दाखविण्याची सुविधा
५. विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक विकासासाठी साहसी खेळ, मैदानी खेळ, प्राण्यांच्या प्रतिकृती व खेळांचे साहित्य, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग
६. व्यायामासाठी ओपन जिम, योग केंद्र, ङ्गिरण्यासाठी निसर्ग पाऊलवाटा, बसण्यासाठी कठडे व मनोरे
७. उद्यानात ४ वन तलाव खोदून पाणीसाठा करण्यात आला आहे. ओढे, नाले यांना दगडी पिचिंग करून नागरिकांना पाणी अडविण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. जमिनीची धूप थांबविणे आणि पाणी अडविण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर गॅबियन वॉल उभारण्यात आली आहे.
८. लाकडी आभासाचे पूल, भव्य प्रवेशद्वार, आकर्षक भित्तीचित्रे, रंगीबेरंगी फुले, विविध प्रकारचे गुलाब, मनमोहक धबधबा, सुंदर प्रकाश व्यवस्था, नैसर्गिकपणे केलेली सजावट यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे

आमदार विजय काळे :
‘भांबुर्डा वनउद्यान हे एक सुंदर, आधुनिक, आरोग्यदायी, पर्यावरण व निसर्गाची माहिती देणारे, नैसर्गिक, शैक्षणिक, मनोरंजनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. गोखलेनगर, शिवाजीनगर, पत्रकारनगर, पाषाण, कर्वेनगर, कोथरुड आदी परिसरातील नागरिकांसाठी फिरण्यासाठी, व्यायामासाठी, शुद्ध नैसर्गिक हवेसाठी, पर्यावरण शिक्षणासाठी आणि निसर्गाचे अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास वाटतो. वनउद्यानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील टप्प्यांत विविध विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध दिला जाईल.’

पार्श्‍वभूमी
भांबुर्डा वन विभागातील ही जागा पूर्वी मॅफको कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. कंपनीचा करार संपल्यानंतर हे क्षेत्र ओसाड होते. मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अनिरुध्द उपासना केंद्राचे स्वयंसेवक यांनी स्वच्छता, वृक्ष लागवड, रोपांना पाणी देणे अशी मदत सातत्याने केली. आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून वनउद्यान निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्च झाला आहे.

रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळाल्याने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पुणे रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका सुनीता वाडेकर, कार्यध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, पुणे शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, पुणे शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सुनीता वाघमारे, मीनाताई गालटे, मोहन जगताप, किरण भालेराव, अतुल भालेराव, रमेश टेलवडे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, माणिक माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक कांबळे म्हणाले, “आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. समाजाच्या हितासाठी आठवले साहेबांनी काम केले आहे. पक्षाच्या वतीने त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी आहे.”
बाळासाहेब जानराव म्हणाले, “संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आठवले साहेब कायम सजग असतात. समाजात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. पुढील काळात ते समाजाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो.”
परशुराम वाडेकर म्हणाले “रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पाहिले असे नेते आहेत, ज्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नेहमी नरेंद्र मोदी आणि आठवलेंना पाठिंबा देतील. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे. आता साहेबांना चांगले खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे.”
‘रामदास आठवले तुम्ह आगे बडो, हम तुम्हारे साथ है’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा रुग्णालयात सोहळा

पुणे –  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने येथील  जिल्हा रुग्णालयात  जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्‍यानंतर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस वंदन करण्‍यात आले.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी  प्रास्‍ताविक केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांची त्‍यांनी  माहिती दिली.  मौखिक आरोग्य चांगले ठेवून स्वस्थ जीवन कसे जगता येईल,  याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हयात एकूण १४ समुपदेशन केंद्र सुरु असून या  समुपदेशन केंद्राकरीता तयार करण्यात आलेल्या  समुदेशन पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील वाहक श्री लोहार यांनी तंबाखू सोडली असल्याने त्यांचे सुद्धा स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. लोहार यांनी कश्याप्रकारे तंबाखू सोडली व याकरीता दृढ निश्चय कसा आवश्यक आहे, हे मनोगतात सांगितले.  त्यानंतरआमदार जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांनी तंबाखू सोडावी,  ते कठीण नाही.  मी सुद्धा सोडली, असे म्हणत सर्वांना तंबाखू सोडण्याकरीता आवाहन केले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी  तंबाखू सोडणे गरजेचे आहे. धूम्रपानामुळे  सर्वांनाच  त्रास होतो,  त्यामुळे असे करणाऱ्यास दंड करावा व तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीस त्याची जाणीव व्हावी याकरीता त्यांना समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी उपस्थितांना  तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमानंतर शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी एकपात्री नाटक सादर केले.

साईश्री हॉस्पिटल तर्फे सैनिक व पोलिसांसाठी मोफत तपासणी

पुणे-साईश्री हॉस्पिटल, औंध तर्फे आजी व माजी पोलिस अधिकारी व लष्करी अधिकारी यांसाठी  मोफत ऑर्थोपेडिक तपासणी हा 
उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये ऑर्थोपेडिकच्या तपासण्या अधिकारी त्याचबरोबर त्यांच्या पती/ पत्नीच्या देखील मोफत केल्या
 जाणार आहेत . 
ड्यूटीवर असताना अधिकारी अनेक वेळा जखमी होतात. यावेळी त्यांच्या सांध्यांना व स्नायुंना दुखापत होत असते. यावर साईश्री 
हॉस्पिटलचे संचालक व अध्यक्ष डॉ. नीरज आडकर म्हणाले कि,  “आपल्या देशाचे व देशातील नागरिकांचे संरक्षण करणारे पोलिस
 व लष्करी अधिकारी, त्यांची जबाबदारी बजावत असताना, होणाऱ्या दुखापती कडे दुर्लक्ष करतात. यामुळे ऑर्थोपेडिक समस्या उद्भवू
 शकतात.” 
हा उपक्रम साईश्री हॉस्पिटल मध्ये कायम स्वरूपी चालू राहणार आहे.  पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवेचे आभार
 मानण्यासाठी हॉस्पिटल ने हा उपक्रम हाती घेतला आहे. साईश्री हॉस्पिटलचा हेतू जागरूकता वाढवणे आणि आर्थोपेडिक 
समस्यांविषयी पुरेशी वैद्यकीय मदत प्रदान करणे हे आहे. या तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे व त्यांच्या पती/ पत्नी चे ओळखपत्र अनिवार्य
आहे.

तंबाखू विरोधी दिना ‘ निमित्त जनजागृती मोहीम

एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयाचा उपक्रम
पुणे :’ जागतिक तंबाखू विरोधी दिना ‘ (३१ मे )निमित्त  महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयातर्फे    जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली .आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे हा कार्यक्रम झाला .
२५ मे ते ३१ मे अखेर तंबाखूविरोधी जनजागरण सप्ताह साजरा करण्यात आला. व्याख्यांने,विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आज ( शुक्रवारी ) ३१ मे रोजी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे रजिस्ट्रार ए आर शेख अध्यक्षस्थानी होते.डॉ. अमिता आदित्य, डॉ. रेणुका नगराळे यांनी तंबाखू, आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. विनोद व्ही.सी. यांनी रंगूनवाला दंत महाविद्यालयातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याची माहिती दिली.
जनजागृती उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींना डॉ अमिता आदित्य ,डॉ रेणुका नागराळे ,दीपक बीडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

पूर्व भागातील हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे-अॅॅड. राहील मलिक युवा मंच व दलित युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी पेठेतील पदमजी गेट येथे हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवांच्या साक्षीने सामाजिक ऐक्य व सलोखा कायम राहावा अशी प्राथर्ना करून खेळी मेळीच्या व आनंदाच्या वातावरणात रोजा  इफ्तार हा पवित्र कार्यक्रम पार पडला .

सदर कार्य्रक्रमाप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ ऍड. राहील मलिक , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन , भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणीस वसंत साळवे ,दलितमित्र अंकल सोनवणे ,  राष्ट्रवादीचे नेते रविंद्र माळवदकर ,माजी उपमहापौर हिरामण शिंदे ,  भगवान वैराट , ऍड. मोहन वाडेकर , मिलिंद अहिरे , धनराज बिरदा ,  राजेश लोंढे , राजेश गाडे , गौतम वानखेडे , धम्मपाल संघाचे सर्व पदाधिकारी किशोर सोमनाथ गायकवाड , अनिल दामजी , जितेंद्र जठार ,विजय जाधव , अनिल हातागळे , विकास भांबुरे , सतीश लांडगे , अशोक देशमुख , भगवान वायाळ ,अजय पाटोळे , दीप्ती पाटोळे ,  सतीश लांडगे , महेंद्र जगताप , सुरेश पाटकर , सुरेश रासगे, धम्मप्रकाश शिंदे , अशोक शिरोळे , गणेश जाधव , दिनेश नायकू , किरण क्षीरसागर ,  सुनील वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  ऍड. राहील मलिक . असिफ हारून शेख , अनिल अडागळे व दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी इंद्रजित जगन्नाथ सकट, सुफी अन्वर , इब्राहिम शेख , अलीम खान , रहीम सय्यद  व सलीम खान यांनी विशेष परिश्रम घेतले . 

टायटन रागाचे नवीन कॉकटेल कलेक्शन

बंगलोर-अभिजात सौंदर्य व संतुलन या स्त्रीत्वाच्या खास गुणांचा सन्मान करण्यासाठी टायटन रागाने खास कॉकटेल कलेक्शनसादर केले आहे.  ही नवीन श्रेणी कॉकटेल पेहराव व मूडला अतिशय साजेशी आहे.  मदर ऑफ पर्ल डायल, उठावदार स्वारोस्की क्रिस्टल्स यांनी सजलेली सहा घड्याळे फॅशनेबल व्यक्तिमत्वाची शान वाढवतात.  यापैकी प्रत्येक मास्टरपीस म्हणजे एक खास संकल्पना आहे, कॉकटेल लूकसाठी हे प्रत्येक घड्याळ अतिशय आदर्श ऍक्सेसरी आहे.  नवीन मॅग्नेटिक बकल असलेल्या या घड्याळांसोबत आकर्षक, स्टायलिश कॉकटेल रिंग दिली जाते व याचे पॅकेजिंग देखील एका खास बॉक्समध्ये करण्यात येते.

टायटन कंपनी लिमिटेडच्या मार्केटिंग हेड श्रीमती कंवलप्रीत वालिया यांनी सांगितले, टायटन रागा हा एकमेव असा ब्रँड आहे जो फक्त महिलांसाठी घड्याळे बनवतो.  आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या पेहरावाबद्दल विशेष चोखंदळ असते.  आपल्या व्यक्तिमत्वातील अनोखी वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यासाठी स्त्रिया समारंभ, प्रसंगांसाठी अतिशय विचारपूर्वक तयार होतात.  अशा स्त्रियांसाठी टायटन रागा कॉकटेल कलेक्शन हे सर्वार्थाने योग्य ठरेल.”   

 या नवीन कलेक्शनमध्ये तीन स्टाईल्स व सहा घड्याळे  आहेत. एनिग्मा या डिझाईनमध्ये स्ट्रॅपवर तीन मोठे व इतर अनेक छोटे स्वारोवस्की बॅगेट कट क्रिस्टल्स आहेत.  एक्स्टेसी या डिझाईनमध्ये स्वारोवस्की डान्सिंग क्रिस्टल स्ट्रॅप, बॅगेट कट क्रिस्टल, ४ स्वारोवस्की क्रिस्टल असलेली मदर ऑफ पर्ल डायल व प्रत्येक स्ट्रॅपवर छोटे, मोठे स्वारोवस्की ही खास वैशिष्ट्ये आहेत.  क्रिसेन्ट या तिसऱ्या स्टाईलमध्ये तीन रंग आहेत, यामध्ये प्रत्येक ब्रेसलेटवर स्वारोवस्की अर्धचंद्राकार क्रिस्टल स्ट्रॅप व ४ स्वारोवस्की चंद्राकार क्रिटलॉन आहेत.  ही निव्वळ घड्याळे नसून तुमच्या हातात आकर्षक ब्रेसलेट / ऍक्सेसरी घातल्याचा लुक मिळवून देतात.

 टायटन रागा कॉकटेल कलेक्शनच्या किमती १४९९५ रुपयांपासून १७९९५ रुपयांपर्यंत असून निवडक वर्ल्ड ऑफ टायटन स्टोअर्समध्ये ते खरेदीसाठी उपलब्ध आहे.

 टायटन कंपनी लिमिटेड

तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टीआयडीसीओ) व टाटा ग्रुपने मिळून सुरु केलेली टायटन कंपनी लिमिटेड (आधीची टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड) १९८७ पासून टायटन वॉचेस लिमिटेड बनली.  १९९४ साली टायटनने दागिने उद्योगात पदार्पण केले व त्यापाठोपाठ टायटन आय प्लस सुरु करून आयवेअरमध्येही प्रवेश केला.  २०१३ साली स्किन ब्रँड आणून ही कंपनी सुगंध, अत्तर व्यवसायात उतरली.  आज घड्याळे, दागिने व आयवेअर क्षेत्रात टायटन कंपनी लिमिटेड ही भारतातील अजेय अग्रेसर कंपनी म्हणून नावाजली जाते.  या सर्व उद्योगक्षेत्रांचा चेहरामोहरा बदलवण्याचे श्रेय टायटनला जाते.  २०१७-१८ आर्थिक वर्षात या कंपनीने (स्टॅन्डअलोन) २०.४% टॉपलाईन वाढ नोंदवली तर याच कालावधीत त्यांचा एकूण महसूल १५,६५६ कोटी रुपये होता.

मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी कटिबद्ध – दिलीप वळसे पाटिल

जुन्नर /आनंद कांबळे :
शिरूर लोकसभा मतदार संघातील  मतदारांनी मोठा विश्वास राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षावर दाखवून उमेदवार डाॅ.अमोल कोल्हे यांना विजयी केले आहे.या पुढील काळात सच्चर आयोगाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून मुस्लीम समाजाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
          कादरीया वेलफेअर सोसायटी जुन्नर आणि जुन्नर तालुका मुस्लिम समाज यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोजा ईफ्तार कार्यक्रमात श्री.वळसे पाटील प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
         यावेळी जुन्नर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.अशी माहीती निमंत्रक अब्दूल रऊफ खान व सादिक आतार यांनी दिली.
         याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काॅन्ग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, जि.प.गटनेत्या आशाताई बुचके,विघ्नहर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर,जि.प.पुणेचे माजी अध्यक्ष गणपतराव फुलवडे,पांडूरंग पवार, शरद लेंडे,उज्वला शेवाळे,हाजरा ईनामदार हाजी रज्जाक कुरेशी,ज्येष्ठ नेते बशीरभाई तिरंदाज,नगरसेवक रऊफखान पठाण,मुन्ना सय्यद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे तालुका अध्यक्ष अकबरखान पठाण, राजू ईनामदार,सईद पटेल,मुबीन शेख,अकबर बेग,आजीम तिरंदाज, सादिक आतार,मुबारक तांबोळी,दादाभाई पटेल,जुबेर ईनामदार,सिद्दीक ईनामदार, फकीर आतार,अन्वर सय्यद,एजाज चौधरी कादरीया सोसायटीचे सर्व सदस्य,तालुक्यातील मुस्लीम कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           सत्काराला उत्तर देताना खासदार डाॅ.अमोल कोल्हे म्हलाले की हा विजय फक्त माझा एकट्याचा नसून तो सर्व सामान्य जनतेचा विजय आहे.समाजाच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहील,असेही ते यावेळी म्हणाले.
           याप्रसंगी अतुल बेनके,आशाताई बुचके,गणपतराव फुलवडे,सत्यशील शेरकर यांचीही भाषणे झाली.
           उपस्थितांचे स्वागत कादरीया वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रऊफ खान यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजू ईनामदार व सईद पटेल यांनी केले.उपस्थितांचे आभार नगरसेवक रऊफ पठाण यांनी मानले.

दिल्लीत शपथविधी सोहळ्या निमित्त पुण्यात मोदी भक्तांचा जल्लोष

पुणे-नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी प्रित्यर्थ आज पुण्यातील स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक येथे मोदी  भक्तांनी भांगड़ा नृत्य करत जल्लोषाने आनंद व्यक्त केला.

सावरकर स्मारक.कर्वे रस्ता.येथे झालेल्या जल्लोषात शीख बांधवांनी भांगडा नृत्य सादर करत बार बार मोदी सरकार ; फिर एक बार मोदी सरकार च्या जयघोषात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शरबत वाटप करुन या आनंदात सहभागी करुन घेतले….यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक आदित्य माळवे,वृक्ष संवर्धन समिती सदस्य संदीप काळे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,दत्तात्रेय खाडे , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि शिपिंग कारपोरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना योगेश गोगावले म्हणाले ” नरेंद्र मोदींच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीस देशवासीयांनी पसंती दिली व त्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमत दिले. ” आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सबका साथ सबका विकास या घोषणेबरोबरच नरेंद्रभाईनी दिलेल्या सबका विश्वास या घोषणेला प्रत्यक्षात उतरवायचे आहे आणि नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील विकासपर्व गाठायचे आहे.प्रदीप रावत यांनी सांगितले ” की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार भाजप करते त्यांच्या स्मारक स्थळी आज नरेंद्र मोदींच्या शपथविधी निमित्त जल्लोष केला जात आहे हा अपूर्व संयोग असून ज्या प्रकारचे राजकारण स्वातंत्र्यानंतर अपेक्षित होते ते सुशासन नरेंद्र मोदींनी देशाला दिले असे ही ते म्हणाले.ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज ही उपेक्षा सहन करावी लागते त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन होत असल्याने या स्मारकाच्या ठिकाणी हा जल्लोष आयोजित केल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.कार्यक्रमाचे संयोजन चरणजीतसिंग सहानी,संदीप खर्डेकर दिलीप उंबरकर  सतीश गायकवाड,शरणजीतसिंग बग्गा,यशराज शेट्टीयांनी केले.यावेळी ढोल च्या तााशा च्या निनादात सर्व नमोभक्तांनी तल्लीन होवून नृत्य केले व जयघोष केला..