Home Blog Page 2165

पोलिसाने पोलिसालाच मारण्याची गुन्हेगाराला दिली सुपारी

0

पुणे : पोलीस कर्मचाऱ्यानेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका गुन्हेगाराला अटक केली आहे.

योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळसो लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१पासून आजपर्यंत हडपसर व दत्तवाडी परिसरात घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ हा सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हे शेजारी शेजारी रहायला होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. योगेश अडसुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच खूनाच्या गुन्ह्यातून पॅरोलवर सुटला होता. नितीन दुधाळ याने अडसुळ याची हडपसर येथे भेट घेतली. त्याला सुपारी देऊन पोलीस कर्मचारी यास मारहाण अथवा अपघात करुन गंभीर दुखापत करुन कायमचे अपंगत्व आणण्यासाठी व त्याचा जीव गेला तरी मी सर्व काही पाहीन, असे सांगितले. अडसुळ याने दत्तवाडी येथील एका गुन्हेगाराला या पोलीस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यास सांगितले. तो जातो कोठे, कधी येतो, त्याच्याकडे काही हत्यार आहे, अशी माहिती काढण्यास सांगितले.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, दत्तवाडी पोलिसांना अशा प्रकारे सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन माहिती घेतली. त्याला अडसुळ याने १० हजार रुपये दिल्याचेही या गुन्हेगाराने सांगितले. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील या पोलीस कर्मचार्याचा पाठलाग करुन त्याचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न कट रचल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी योगेश अडसुळ याला अटक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस नितीन दुधाळ याचा शोध घेत आहे.

शौर्य स्मारकाला साजेसा विकास करणार,डॉ. राऊत यांची ग्वाही

0

पुणे- कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ ऐतिहासिक असून पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. राऊत यांनी वढु बु. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व वीर गोविंद गोपाळ गायकवाड महाराज यांचे समाधी स्थळांना भेटी देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश लिलोठिया, राज्य मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष न्या.थूल, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, उपाध्यक्ष सुजित यादव, शहर अध्यक्ष शिलार रतनगिरी उपस्थित होते.

या परिसरात फिरत असताना हजारो लोकांनी त्यांना ‘जयभीम’ म्हणत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सोबत छायाचित्रे काढून घेण्यासाठी आंबेडकरी तरुणांनी एकच गर्दी केली.

“या ठिकाणी शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करताना मला विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाने या स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा  स्तंभ शौर्याचे प्रतीक आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमीसारखाच भीमा कोरेगाव स्मारकाचा विकास करण्यात येईल,” अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.
या परिसराच्या विकासात न्यायालयीन खटल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, अशी घोषणा त्यांनी केली.
वढू येथे यावेळी वीर गोविंद गोपाळ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी गायकवाड यांच्या कुटुंबियांसोबतच मोठया संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रेही घेतली.

यानंतर लोणीकंद येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेद्वारा आयोजित खिचडी वाटप कार्यक्रमास उपस्थित राहून भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभला मानवंदना करण्यास आलेल्या समाज बांधवांना खिचडी व पाणी वाटप केले.

हायमास्ट उभारणीनंतर आता
विद्युत वाहिन्या भूमिगत होणार

वढु बु. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समधीस्थळ व वीर गोविंद गोपाळ गायकवाड महाराज यांचे समाधी स्थळ परिसरात असलेल्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचे निर्देश यावेळी डॉ राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्यावेळेस या परिसराला त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांना या परिसरात हाय मास्ट दिव्यांची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी भीमा कोरेगाव परिसर, वढू बुद्रुक येथील समाधी परिसर येथे हायमास्ट दिवे तात्काळ उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वढू गावात नियमित वीज पुरवठा खंडीत झाल्यास रिंगफिडर या पर्यायी व्यवस्थेद्वारे आपत्कालीन वीज पुरवठ्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. समाधी परिसरातील वीज वितरण व्यवस्थेची नियमित देखभाल केली जात असून या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रांची क्षमता वाढ करण्यात आली आहे.

संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

0

पुणे – संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियां गांधी आणि नेते राहुल गांधी आणि अ. भा. महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेटाजी डिसूझा, ममता भूपेश (महाराष्ट्र प्रभारी) या सर्वांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली
संगिता तिवारी पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा तसेच पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस म्हणून काम केले आहे कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा पुढाकार असतो , तसेच अनेक वर्षे महिला बचत गट प्रदर्शन, व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसाय मार्गदर्शन, सामाजिक विषयावर शॉर्ट फिल्म फेस्टिवल असे अनेक उपक्रम  कॉंग्रेस पक्षाचे  अंतर्गत घेतले आहेत, कोरोना काळात श्रमिक रेल्वे मधुन जाण्यारया माइग्रेंट्स ला सर्व मदत पार्टीच्या  बॅनर  खाली केली,
संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांसाठी काम करत राहीन असे मनोगत तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले

दलितांच्या उद्धारासाठी महर्षी विठ्ठल शिंदे यांचे योगदान मोलाचे ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांचे विचार एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे ‘ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ ग्रंथाचे प्रकाशन

0

पुणे,दि.१ जानेवारी: “दलितांच्या सर्वागिण उद्धारासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी अहिल्याश्रम व शिक्षण संस्था उभ्या करून ते दलितांना सुर्पूत केले. अशा व्यक्तींनी आपला वारसा हक्क सुद्धा दलितांना दिला.त्यांच्या या कार्यामुळे भारतरत्न या सम्मानाने त्यांचा गौरव होणे गरजचे आहे. ”असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे लेखक आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखीत विश्वधर्म के उपासक उपेक्षित, वंचित, दलित वर्ग के उद्धारक, कर्मयोगी ‘ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या हिंदी ग्रंथांचे प्रकाशन विमाननगर येथे एमआयटी डब्लयूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लेखकांनी आपली भावना व्यक्त केली. भागलपूर विश्वविद्यालय के हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लखनलाला सिंग आरोही हे उपस्थित होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची २ जानेवारी रोजी ७८ वा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्त रतनलाल सोनाग्रा लिखित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
आचार्य रतनलाल सोनाग्रा म्हणालेे,“विठ्ठल रामजी शिंदे हे समाज सुधारक होते. बहुजन समाजाचे असूनही त्यांनी दलित समाजसाठी मोलाचे कार्य केले आहे. आंबेडकरांच्या अगोदर पासून शिंदे हे दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांना जोडणारा महत्वाचा सेतू ते होते. शाहू, फुले, डॉ.आंबेडकर यांचा उल्लेख होतांना दिसत आहे. तसे नसून शाहु, फुले, शिंदे आणि डॉ. आंबेडकर असे झाला पाहिजे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“रामजी शिंदे यांचे कार्य अतुलनीय आहे. महर्षी यांना भारतरत्न देऊन सन्मान करावा अशी मागणी केली जात आहे. लेखकांनी महर्षी शिंदे यांचे जीवनातील बारकावे शोधून त्यांनी केलेल्या सर्व कार्याचा उहापोह या ग्रंथात केलेला आहे. म्हणून हा ग्रंथ समाजाला उपयुक्त ठरणार आहे.”
प्रा.डॉ. लखनलाला सिंग आरोही म्हणाले,“ हिंदी भाषेमध्ये दलित साहित्याला समृद्ध करण्यासाठी मराठी साहित्याने खूप मोठे योगदान दिले आहे. लेखक सोनाग्रा यांनी महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या उपेक्षित अध्यायाला लिहून सर्वांचे ध्यान आकर्षीत केले आहे. देशातील वर्ण व्यवस्थेमुळे काही महानव्यक्ती उपेक्षित होते. अशांचा शोध घेऊन लिखान करणे खूप मोठे कार्य आहे.”

विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागेत भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे : रामदास आठवले

0
  • भीमा कोरेगाव येथे २०४ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन .

पुणे : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून तेथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ५० ते १०० कोटींचा निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. राज्य सरकारने १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून विजयस्तंभ परिसरात भव्य स्मारक उभरण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
शनिवारी (ता. १) २०४ व्या शौर्य दिनानिमित्त रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, संगीता आठवले, संघमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, मोहन जगताप, श्याम सदाफुले, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ५०० महार शूर सैनिकांनी महापराक्रम गाजवत ४० हजार पेशवे सैन्याला पराभूत केले होते. त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी अभिवादन करण्यास येत. आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास भावी पिढीला प्रेरणा देत राहील म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशामुळे दरवर्षी आंबेडकरी जनता भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यास येते.”
“१९८० मध्ये आम्ही भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभा घेण्यास सर्वप्रथम सुरुवात केली. त्याकाळी लोक कमी येत होते. मात्र अलीकडच्या काळात भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो लोक येऊ लागले आहेत, याचा अभिमान आहे. या शौर्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी याठिकाणी स्मारक होण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. लवकरात लवकर स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भीमशक्ती एकत्र होणे गरजेचे आहे.”

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत एस्.एस्.अकादमी संघाचा विजय

0

पुणे,1 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत एस्.एस्.अकादमी संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आलोक लोढाच्या दमदार फलंदाजीच्या बळावर एस्.एस्.अकादमी संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळाताना अर्जुन शेटेच्या अचूक फलंदाजी पुढे प्राधिकरण जिमखाना संघ 20 षटकात 5 बाद 100 धावात गारद झाला विहान शर्माने 29 धावा संघाच्या डावाला आकार दिला. 100 धावांचे लक्ष एस्.एस्. अकादमी संघाने केवळ 14.4 षटकात 2 गडी गमावत 102 धावांसह पुर्ण केले. आलोक लोढाने 51 चेंडूत 11 चौकारांसह 64 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आलोक लोढा सामनावीर ठरला.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरीप्राधिकरण जिमखाना- 20 षटकात 5 बाद 100 धावा(विहान शर्मा 29(36, 6×4), आर्य भुरसे 10(14, 1×4), अर्जुन शेटे 3-13, जय पांडे 1-22) पराभूत वि एस्.एस्. अकादमी- 14.4 षटकात 2 बाद 102 धावा(आलोक लोढा 64(51, 11×4), अनिश मोहोळकर 10(15, 1×4), विहान शर्मा 1-5, अरूष गुप्ता 1-6) सामनावीर- आलोक लोढा; एस्.एस्.अकादमी संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.

विकासाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचाव्यात रामदास आठवले यांचे प्रतिपादन

0
  • विकासकामात लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित असावे:  संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन.

पुणे : “लोकांना चांगले रस्ते, स्वच्छ पाणी मिळायला हवे. प्रभागातील लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित काम करत लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका तिघांनी एकत्रीतपणे काम केले, तर विकास झपाट्याने होईल. समाजातील प्रत्येक घटकाला विकास योजनांचा लाभ देण्यासाठी आपण कार्यरत असले पाहिजे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून व आमदार सुनील टिंगरे यांच्या सहकार्यातून संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. येरवड्यातील ई-कॉमर्स झोन चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका फरझाना शेख, शीतल सावंत, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “गोरगरीब जनतेच्या हिताचे धोरण नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे. पालिकेतही भाजप व रिपाइंची सत्ता आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे सर्वाना सोबत घेऊन काम करत असल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता मार्गी लागला आहे. भाजप, रिपाइं आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असतानाही एकत्रित प्रयत्नामुळे येरवडा प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होत आहे. नागरिकांच्या हिताच्या कामात पक्षभेद आणता कामा नये.” आगामी पालिका निवडणुकीत मागासवर्गीय आरक्षण पडले, तर महापौर ‘रिपाइं’चा होईल, असा पुनरुच्चार आठवले यांनी केला.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अग्रसेन शाळा ते ई-कॉमर्स चौक हा ९०० मीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. राज्य सरकार आणि महापालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रश्न सुटला असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यास मदत होईल.
या प्रभागातील सगळेच लोकप्रतिनिधी अतिशय समर्पित आणि एकोप्याच्या भावनेने काम करत आहेत, ही आनंददायी बाब असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले. सुनील टिंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. ऍड. अयुब शेख यांनी स्वागत-प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

सर्वात मोठी भेट – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबईकरांच्या  500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून 16  लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाची मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेतात. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आभार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या महत्त्वाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा-अजित पवार

0
  • कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

पुणे, दि.१:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

राज्यातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते. कोरेगाव भीमा येथे जे शूरवीर शाहिद झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल. स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आधी सुविधा करण्यास शासनाचे प्राधान्य राहील.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाचा नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

पाश्चात्य देशांत प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

      यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

शौर्य दिनाला येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुयायांना जयस्तंभास सुलभतेने अभिवादन करता यावे यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केले होते. पीएमपीएल तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.

टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने केली 527.70 दशलक्ष रुपये करोत्तर नफ्याची कमाई:दूरसंचार विभागाला दिला 211.10 दशलक्ष रुपये लाभांश

0

नवी दिल्ली- टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडचे  (TCIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार  यांनी  211.10 दशलक्ष रुपयांचा  लाभांश धनादेश  दूरसंचार विभागाचे सचिव आणि डीसीसीचे अध्यक्ष  के. राजारामन यांना सुपूर्द केला.

स्थापनेपासून, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही सातत्याने  नफा मिळवणारी कंपनी आहे. टीसीआयएलने सरकारला त्याच्या सुरुवातीच्या समभागातील  ३० लाख रुपये  इतक्या गुंतवणुकीवर 2020-21 पर्यंत    2678.60 दशलक्ष रुपयांचा लाभांश दिला आहे. 2015-16 मध्ये आणखी 160 दशलक्ष रुपये गुंतवण्यात  आले. कंपनीचे एकत्रित आणि स्वतंत्रपणे  निव्वळ मूल्य  31 मार्च 2021 रोजी अनुक्रमे 9595.1 दशलक्ष आणि .6111 दशलक्ष रुपये होते.

2020-21 मध्ये, टीसीआयएलने अनुक्रमे 17,492.90 दशलक्ष आणि 527.70 दशलक्ष रुपये करोत्तर स्वतंत्र महसूल आणि नफा कमावला आहे.
टीसीआयएल ही ऑगस्ट, 1978 मध्ये दळणवळण मंत्रालयाच्या  दूरसंचार विभागाच्या अंतर्गत स्थापन झालेली   मिनी रत्न श्रेणी – I  कंपनी आहे . त्यात केंद्र सरकारचे 100% भाग भांडवल आहे. टीसीआयएल  ही प्रामुख्याने  अभियांत्रिकी आणि सल्लागार कंपनी आहे. टीसीआयएलचे  देशात  आणि परदेशात दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि नागरी बांधकाम या सर्व क्षेत्रात प्रकल्प आहेत. टीसीआयएलने जगभरातील 70 पेक्षा अधिक  देशांमध्ये प्रकल्प राबवले  आहेत.

आफ्रिका ई-विद्या भारती आणि आरोग्य भारती नेटवर्क  या प्रकल्पांव्यतिरिक्त  कंपनीचे परदेशात कुवेत, सौदी अरेबिया, ओमान, मॉरिशस, नेपाळ सह  15 हून अधिक आफ्रिकन देशांमध्ये प्रकल्प आहेत आणि आणखी इतर  आफ्रिकन देशात व्यवसाय वाढवण्याची शक्यता आहे.

कंपनी केंद्र सरकारसाठी टपाल  विभाग, संरक्षण, नौदल OFC प्रकल्प, एपीएसएफएल , तेलंगणा फायबर, बीबीएनएल ,व्हीसॅट  आणि एकलव्य शाळेसाठी देखील माहिती तंत्रज्ञान संबंधित मोठे प्रकल्प राबवत आहे.

एप्रिल-ऑक्टोबर (2021-22) या कालावधीत, भारताच्या गव्हाच्या निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलर मूल्याच्या निर्यातीचा टप्पा

0

नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2021

कोविड-19 महामारीमुळे जागतिक पुरवठ्यावर  झालेल्या परिणामांनंतरही भारताच्या धान्य निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या(2021-22) पहिल्या सात महिन्यात(एप्रिल ते ऑक्टोबर), भारताच्या गव्हाची निर्यात आकारमानाच्या दृष्टीकोनातून 527 टक्के म्हणजे 3.2 दशलक्ष टनांवर पोहोचली, गेल्या वर्षी याच काळात ती केवळ 0.51 दशलक्ष टन होती. मूल्याचा विचार करता चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान निर्यातील 546 टक्के वाढ होऊन तिचे मूल्य 872 दशलक्ष डॉलर झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत 135 दशलक्ष डॉलरची निर्यात झाली होती.

चालू आर्थिक वर्षात(2021-22) भारताच्या गव्हाची निर्यात आतापर्यंतचा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गव्हाच्या निर्यातीने 2020-21 मधील 2.09 दशलक्ष टनांचा टप्पा यापूर्वीच ओलांडला आहे.

भारताच्या गव्हाची निर्यात  मुख्यत्वे शेजारी राष्ट्रांना होत असून यामध्ये 2020-21 मध्ये बांगलादेशचा आकारमान आणि मूल्य या दोन्हीच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक 54 टक्के वाटा आहे. त्याचबरोबर भारताने येमेन, अफगाणिस्तान, कतार आणि इंडोनेशिया या नव्या बाजारपेठांनाही निर्यात सुरु केली आहे.

कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अपेडाने उचललेल्या विविध पावलांमुळे आणि राबवलेल्या  उपक्रमांमुळे गव्हाच्या निर्यातीत वाढ होत आहे. विविध देशांमध्ये बी टू बी प्रदर्शनांचे आयोजन, नव्या संभाव्य बाजारपेठांची चाचपणी आणि भारतीय दुतावासांच्या सक्रिय सहभागासह पणनविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

सारणीः भारताकडून गव्हाची निर्यात होत असलेले पहिले दहा देश(2020-21)

CountryQuantity (in tones)Value (in US$ million)Share % in volume termsShare % in value terms
Bangladesh1157399.35299.455.454.5
Nepal330707.7483.2315.815.1
UAE187949.46519.09.3
Sri Lanka94039.6324.734.54.5
Yemen Republic8600024.054.14.4
Afghanistan5558419.032.73.5
Qatar63452.8716.753.03.0
Indonesia5605115.292.72.8
Oman30179.338.371.41.5
Malaysia9509.332.540.50.5
Total (top ten countries)20708735449999
Total Exports2,088,488550100100

Source: DGCIS

महापालिकेच्या बांधकाम विभागाला 9 महिन्यात मिळाले 1 हजार 527 कोटी रुपयांचे उत्पन्न

0

पुणे: महापालिकेच्या बांधकाम विभागाला यावर्षी तब्बल 1 हजार 527 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या काही वर्षात हे सर्वात जास्त उत्पन्न आहे. बांधकाम विभागाला अंदाजपत्रकात 1185 कोटी रुपयांचे लक्ष देण्यात आले होते. त्यापेक्षा 125 टक्के उत्पन्न यावर्षी बांधकाम विभागाला मिळाले असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
कोरोनामुळे मागीलवर्षी लॉकडाऊन करण्याची वेळ आली होती. यानंतर मोठ्याप्रमाणात बांधकाम विभागाचे उत्पन्न कमी झाली होतेे. मार्च संपल्यानंतर पहिल्या काही महिन्यामध्ये बांधकामाचे कमी प्रस्ताव दाखल होत होते. राज्यसरकारने बांधकाम विभागाला चालणा मिळावी यासाठी नोंदणी शुल्कात 1 टक्यांनी कपात केली. यानंतर बांधकाम परवानगीच्या वेळी वापरण्यात येणार्‍या प्रीमियम एफएसआयच्या शुल्कात 50 टक्के सवलत दिल्यामुळे शहरातील बांधकामाचे प्रस्ताव वाढले आहेत.
राज्य सरकारडून ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या महिन्यामध्ये तब्बल 400 कोटींपेक्षा जास्त रुपये उत्पन्न बांधकाम विभागाला मिळाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील बांधकाम विभागाची ही सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. बांधकाम विभागाला चालना मिळाल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये तेजीचे वातावरण आहे. घराच्या खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे.राज्य सरकारने दिलेल्या सवलतीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे बांधकाम विभागात प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. प्रस्ताव दाखल केल्यामुळे सवलतीचा लाभ मिळणार असल्यामुळे बरेच बांधकाम व्यावसायिकांनी आज प्रस्ताव दाखल केले असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षात बांधकाम विभागाकडून 1 हजार 185 कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवण्यात आले होते़ मात्र हे उद्दिष्ट बांधकाम विभागाने डिसेंबरअखेरच पूर्ण केले आहे़ शासनाची सवलत योजना व लॉकडाऊन काळात बंद असलेली बांधकामे पुन्हा सुरू झाल्याने, यावर्षी तीन महिने अगोदर बांधकाम विभागाने 1 हजार 527 कोटी 73 लाख रूपयांचा महसुल मिळविला आहे़ तो उदिद्ष्टापेक्षा अधिक म्हणजे 128़92 टक्के इतका आहे़
प्रशांत वाघमारे
शहर अभियंता पुणे मनपा़

पाणीपुरवठा योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन कामे त्वरित सुरु करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

0

अचलपूर, चांदूरबाजार तालुका तसेच मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांबाबत बैठक

अमरावती, दि. 31 : प्रत्येक गावाला पाणीपुरवठ्याची सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी मेळघाटसह सर्वदूर गावांमध्ये सुमारे साडेचारशे कोटी रूपये निधीतून कामे प्रस्तावित आहेत. या योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरु करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अचलपूर, चांदूर बाजार तालुका तसेच मेळघाट भागातील पाणीपुरवठा योजनांचा श्री. कडू यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर, अधिक्षक अभियंता विवेक सोळंके, सहायक मुख्य अधिक्षक अभियंता गजानन दानवे, जल व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे, अचलपूर उपविभागाचे उप अभियंता सत्येन पाटील, चांदूरबाजारचे उपविभागीय अभियंता अजिंक्य वानखेडे, विशेष कार्य अधिकारी संजय कडू़, स्वीय सहायक जी.एस.धुर्वे आदी यावेळी उपस्थित होते.

अचलपूर अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. 83 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अचलपूर व चांदूर बाजार या तालुक्यात या योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. बोरगांव दोरी, बोरगांव पेठ, बोरगांव तळणी, असदपूर, शहापूर येथील पुनर्वसन पाणीपुरवठा योजनांचाही राज्यमंत्र्यांनी घेतला.

नवीन प्रस्तावित योजनेंतर्गत नव्याने जलजीवन मिशनमार्फत प्रस्तावित 19 गावे पाणीपुरवठा योजना तालुका चांदूरबाजार, 24 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका अचलपूर, गौलखेडा व 20 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदारा, बागलिंगा तसेच 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदरा आणि चांदूरबाजार शहराची वाढीव पाणीपुरवठा योजनांचा आढावा त्यांनी घेतला. प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन येथील कामे तातडीने सुरु करावी व कार्यवाहीचा अहवालही त्वरित सादर करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.

पाणीपुरवठ्यासाठी मोठी तरतूद

अमृत अभियानात अचलपूर पाणीपुरवठा योजना टप्पा-1 मध्ये साडेतेरा कोटी व टप्पा-2 मध्ये 10.36 कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. 83 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत अचलपूर व चांदूरबाजार या तालुक्यातील 86 गावे समाविष्ट असून या योजनेचा  148 कोटी 81 लक्ष खर्च अपेक्षित असून काही कामे पूर्ण झाली उर्वरित प्रगतीत आहेत. ही योजना डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळेल.

बोरगाव दोरी, बोरगाव पेठ, बोरगाव तळणी व असदपूर, शहपूर या योजनेची अनुक्रमे किंमत रु. 1.22 कोटी, रु. 74 लक्ष, रु. 0.75 लक्ष व रु. 3.65 कोटी एवढी आहे. बोरगाव दोरी, बोरगाव पेठ, बोरगाव तळणी या योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून वीजपुरवठा घेऊन लवकरच योजना कार्यान्वित करण्यात येईल आणि असदपूर, शहापूर ही योजना मार्च 2022 पर्यंत कार्यान्वित करण्यात येईल.

१५ दिवसांत प्रशासकीय मान्यता द्याव्यात

नवीन प्रस्तावित योजनेंतर्गत नव्याने जलजीवन मिशनमार्फत प्रस्तावित 19 गावे पाणीपुरवठा योजना किंमत रु. 20.32 कोटी या योजनेस तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. पुढील 15 दिवसात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.. तसेच 24 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका अचलपूर किंमत रु. 46.77 कोटी सदर योजनेस तांत्रिक मान्यता प्रदान करुन एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मेळघाटमधील गौलखेडा व 20 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदरा किंमत 36.11 कोटी व बागलिंगा 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदरा किंमत रु. 18.58 कोटी या योजनेस तांत्रिक मान्यता आहे. प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.

चांदूरबाजार शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना किंमत रु. 15.03 कोटी व 105 गावे पाणीपुरवठा योजना तालुका चांदूरबाजार किंमत रु. 158.00 कोटी या दोन्ही योजनेस तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

गुरूत्वावर आधारित सिंचन योजना    

अचलपूर तालुक्यातील 24 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. अस्तित्वात असलेल्या योजनेचा स्त्रोत विंधन विहीरी व कुपनलिका आहे परंतु सिंचनासाठी कुपनलिकेव्दारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असून पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे भूजल स्त्रोताचे पाणी कमी पडत असून उन्हाळ्यात पाणीटंचाई सदृष्यस्थिती निर्माण होत आहे. या भागातील गावांची पाण्याची टंचाई लक्षात घेता या योजनेचा स्त्रोत सापन धरण घेऊन संपूर्ण योजना गुरुत्वावर आधारित प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतची पुढील कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील बारलिंगा व 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कार्यक्रम जलजीवन मिशन कृती आराखड्यात समाविष्ट आहे. चिखलदरा तालुक्यातील गावे आदिवासी बहूल असून सातपुडा पायथ्याशी वसलेली आहेत. या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असून ही गावे डोंगराळ भागात असल्याने भूगर्भीय पाणी अपुरे पडत आहे. या भागातील गावांची पाण्याची टंचाई लक्षात घेता ही योजना राबविण्यात येत आहे. या सर्व कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.

हातावर कमावणाऱ्यांना हक्काचे घर देण्याचा आनंद : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

0

नागपूर दि. 31 : हातावर कमावणाऱ्यांना हक्काचे घर दिवास्वप्न असते. जगण्याची भ्रांत असणाऱ्या लोकांच्या घरावर छत मिळणे यासारखे समाधान नसते. प्रशासनाच्या मदतीने निराश्रितांच्या घराची स्वप्न पूर्ण होत असल्याचा हा क्षण आनंददायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नझूल, मनपा व नागपूर सुधार प्रन्यासच्या कक्षेत येणाऱ्या झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार, नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अधिसूचित झोपडपट्टीतील नझूल जमिनीवरील झोपडपट्टीधारकांना या वेळी प्राथमिक स्वरूपात पट्टे वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जवळपास साडेतीनशे प्रस्तावित प्रकरणांना अधिकृत करण्यात येत आहे. यापैकी काही निवडक प्रातिनिधिक पट्टे धारकांना आजच्या कार्यक्रमात पट्टे वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या नवीन कोरोना प्रतिबंधक नियमानुसार केवळ 50 लोकांना या कार्यक्रमासाठी उपस्थिती मर्यादित ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे मोजक्या लोकांना पट्टे वाटप करण्यात आले. नझूल क्षेत्रातील 110, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत 110 व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील 30 अशा एकूण 250 झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे.

मानकापूर येथील क्रीडा संकुलात या संदर्भातील भव्य आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी लाभार्थी एकत्रित येणार होते. मात्र राज्य शासनाच्या नियमाला अनुसरून काल रात्री 50 चा नियम निर्धारित करण्यात आल्यामुळे आज मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. तथापि, लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी दृकश्राव्य पद्धतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी पालकमंत्र्यांनी कामाच्या शोधात शहराकडे आकर्षित होणाऱ्या गरीब जनतेला घराचा मोठा प्रश्न आहे. कसेबसे शहरात कुठे रोजगार मिळाला तर रहावे कुठे? हा प्रश्न राहतो. त्यामुळे हजारो कुटुंब पुढे निवासाचा यक्षप्रश्न उभा आहे. मागील वीस पंचवीस वर्षांपासून शहरात झोपड्यांचा प्रश्न वाढत आहे. बहुतांशी झोपड्या या केंद्र किंवा राज्य शासनाच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर आहेत. शासनाने वर्षांनुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच आजचा सोहळा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महानगरपालिका सुधार प्रन्यास आणि महसूल विभागाने यासाठी घेतलेला पुढाकार व केलेल्या पाठपुरावा बद्दल कौतुक केले.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी देखील यावेळी संबोधित केले. गरिबांना घरे मिळणे, आयुष्यातील मोठा प्रसंग असतो. यासाठी स्वतः पालक मंत्री यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. सोबतच झुडपी जंगलाच्या प्रश्नाला निकाली काढून नागरिकांना ग्रामीण भागात देखील घरे देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार मोहन मते यांनीही झुडपी जंगलाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाने घर वाटप करताना नागरिकांवर उपकार केल्यासारखे देऊ नये तर त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी सकारात्मकपणे पुढे यावे, असे आवाहन केले. तानाजी वनवे यांनी थांबलेल्या या घर वाटप प्रक्रियेला पालकमंत्र्यांनी गती दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले. सूत्रसंचालन तहसीलदार चैताली सावंत यांनी तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले.

                                         

125 मेट्रिक टन क्षमतेच्या लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टँकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर  शहरातील शासकीय मनोरुग्णालयालगत जिल्हा रुग्णालय परिसरात 125 मेट्रिक टन क्षमतेचे लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टँकची निर्मिती करण्यात आली असून या ऑक्सीजन टँकचे लोकार्पण ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानूसे, उपअभियंता श्री. गिरी यावेळी उपस्थित होते.

मागील वर्षी कोरोनाच्या  डेल्टा व्हेरिएंटमुळे जनतेस अनेक समस्यांचा सामना करावा लागला. हॉस्पिटलमध्ये अपुऱ्या ऑक्सीजन सिलेंडरमूळे अनेकांना स्वत:चा प्राण गमवावा लागला. यावर्षात अशी परिस्थिती उद्भवु नये याची आगाऊ काळजी त्याचबरोबर जिल्ह्यात ओमिक्रॉन विषाणूच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी  या ऑक्सीजन टँकमुळे जनतेस निश्चितच सोय होऊन अनेकाचे प्राण वाचविणे शक्य होणार, असल्याचे पालकमंत्री  यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख मानले.

दारू नको दूध प्या सुखी जीवनाचा आनंद घ्या!-खासदार बापट

0

पुणे :३१:वर्षाच्या शेवटच्या दिवशी दारू पिऊन आयुष्याची नासाडी करण्यापेक्षा दारू न पिता दूध पिउन सुखी जीवनाचा आनंद घेता येईल असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले
भारतीय जनता पार्टी च्या वतीने ३१डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर व्यसन मुक्तीचे प्रबोधन करण्यासाठी अप्पा बळवंत चौक येथे अभियान राबविण्यात आले त्यावेळी खासदार बापट बोलत होते.
बापट पुढे म्हणाले, ‘व्यसनामुळे वैयक्तीक आरोग्याची मोठी हानी होते त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो.आर्थिक सामाजिक हानी होते विशेषतः युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त आहे युवकांनी दारू आणि तत्सम व्यसनापासून दूर रहावे या साठी दारू नको दूध प्या हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला
या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने ,पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे,नगरसेवक ,अजय खेडेकर,नगरसेविका आरती कोंढरे कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,सरचिटणीस छगन बुलाखे ,राजेंद्र काकडे अश्विनी पांडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते