Home Blog Page 203

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छांचा अर्थ

पंढरपूर -महाराष्ट्रामध्ये सर्व नेते वैचारिक विरोधक असतील मात्र, ते शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या दिवशी, एखाद्याच्या अभीष्टचिंतन प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे, याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांनी याचा चूकीचा अर्थ न काढण्याचे आवाहन केले आहे. या विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, याचा चूकीचा अर्थ काढून महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण पुढे करतो आहोत का? असा याचा अन्यथा अर्थ निघेल त्यामुळेच याला याच परिक्षेपात पाहायला हवे. जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केले, त्यांनी ज्या महाराष्ट्रातील प्रमुख दोनही नेत्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र याचा अन्य अर्थ काढणे खूपच संकुचित ठरेल असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

रुग्णालयांनी गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा तत्परतेने लाभ द्यावा-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, दि. २३: धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना तत्परतेने लाभ देण्याकरिता पुढाकार घ्यावा, या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयानी नोंदणी करुन घ्यावी, याकामी राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. आबिटकर म्हणाले, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या योजना आहे. धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालये नोंदणीकृत असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आजारपणाच्या काळात सकारात्मक पद्धतीने मदत करण्याची भावना ठेवावी. त्यांची सेवा करण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.

धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी तत्परतेने काम करावे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करुन द्याव्यात.

पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या तसेच वैद्यकीय उपचाराकरिता येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, सेवा दिल्यानंतर रुग्णाच्या मनात रुग्णालयाप्रती समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

डॉ. शेटे म्हणाले, शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावे, याकामात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावी, असेही डॉ. शेटे म्हणाले.

राज्य कामगार विमा रुग्णालयाची पाहणी

पिंपरी-चिंचवड मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषधी भंडार,आहार कक्षाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. येथील रुग्णांशीही संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.

रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरिता डॉक्टर व प्रशासनानी काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात, अशा सूचना श्री. आबीटकर केली.

पुरंदर तालुक्यातीलभोसलेवाडी व जेजुरी गावांच्या हद्दीत अवैध गावठी दारु भट्टीवर धडक कारवाई

पुणे दि.23 :- विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे नरेंद्र थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे पथकाने 22 जुलै 2025 रोजी पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गाव हद्दीत टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस, मोकळया जागेत तसेच जेजुरी गावच्या हद्दीत बारामती जेजुरी रोड लगत, ओढ्याच्या काठी दोन विकाणी सुरु असलेल्या अवैध गावठी दारुच्या भट्टीवर छापे मारले.

या छाप्यामध्ये 5550 लिटर रसायन, 1855 लिटर अवैध गावठी हातभटटी दारु व निर्मीती साहीत्य असा एकुण अंदाजे रु. 3,94,500/- किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या ठिकाणी गावठी दारूभट्टी तयार करणा-या इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ब. क. ई. फ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापुढे देखील अवैध गावठी हातभटटी दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने सातत्याने छापे मारण्याची कारवाई सुरु राहणार असल्याचे निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

सदरची कारवाई विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते, जवान शशीकांत भाट, संदिप सुर्वे व ऋतिक कोळपे यांनी केली असून, या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते करीत आहेत.

पुणे शहरातील नागरीकांना अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती असल्यास त्यांनी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधवा असे, आवाहन निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावानेच डान्सबार सुरु!सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. २३
महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे व त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असा घणाघात हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

भाजपा युती सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, हे सरकार लोकशाही माननारे नाही तर हम करे सो कायदा पद्धतीने काम करत आहे. एका मंत्र्यांच्या घरात पैशाने भरलेली बॅग सापडते, दुसरा मंत्री विधानसभेत रमी खेळतो तर गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावाने खुलेआमपणे डान्सबार सुर आहे. अशा मंत्र्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. महिला असुरक्षित आहेत, महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग आणून त्याचा काळा धंदा जोरात सुरु आहे, तरुण पिढीला नशेखोरीत ढकलले जात आहे. आका, कोयता गँग बिनधास्त धुडगुस घालत आहेत, अवैध धंद्यांचे पीक जोमात सुरु आहेत. कोणालाही पोलीसांचा धाक राहिलेला नाही. ही गुंडगिरी, मवाली संस्कृती आणण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. महाराष्ट्राची ती राजकीय संस्कृती आहे. राज्यात विरोधकांना शत्रू मानत नाहीत, वैचारिक मतभेद असतात व विचाराची लढाई विचाराने लढली जाते, त्यामुळे या शुभेच्छातून काही राजकीय समिकरण बदलेल असे वाटत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दक्षिण कोरियातील जागतिक तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची १६ पदकांची कमाई

पुणे: दक्षिण कोरियात नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चरल एक्स्पो २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या आठ खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ४ सुवर्ण, १० रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. हे खेळाडू आर. बी. होरांगी तायक्वांदो अकादमी आणि सेंट फेलिक्स हायस्कूलचे विद्यार्थी असून त्यांना प्रशिक्षक मास्तर रवींद्र भांडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेत पुमसे आणि क्युरोगी प्रकारांत आयुषी भांडारी, झोया खान, हर्ष निकम आणि वाल्मीकी चौरसिया यांनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. समीक्षा साबळे आणि पवन ननावरे यांनी प्रत्येकी दोन रौप्य पदके पटकावली. स्वलिहा खान आणि अनुष्का चिनाय्या यांनी प्रत्येकी एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवले.

दक्षिण कोरियातील कुकिवॉन – वर्ल्ड तायक्वांदो मुख्यालय येथे खेळाडूंना अधिकृत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर खेळाडूंनी वर्ल्ड हपकीदो आणि कुमदो मार्शल आर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष ग्रँडमास्टर डॉन ओ चोई यांच्या डोजांगमध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्याकडून ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्रे व सुवर्ण पदके मिळवली.

तसेच खेळाडूंनी कोरिया शिन (९ वा डॅन, चंग-डो क्वान), ग्रँडमास्टर ह्युंगनाम क्वोन (९ वा डॅन, पूमसे प्रशिक्षक) आणि ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते ग्रँडमास्टर मून डे-सुंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि वैयक्तिक सन्मान व प्रमाणपत्रे प्राप्त केली. या दौऱ्यादरम्यान अर्चना चिनाय्या यांनी पालक म्हणून संघास साथ दिली.

पुण्यात परतल्यानंतर सेंट फेलिक्स शाळेच्या वतीने प्रांतीय प्रमुख सिस्टर उर्सुला पिंटो, सिस्टर जेनिफर परेरा, शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर रोझमेरी आल्मेडा, प्राचार्या लीना पॉल, सिस्टर एल्सा व श्रीमती बेला डिसिल्वा यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.

ही कामगिरी केवळ पदकांची कमाई नसून, आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याच्या युवा खेळाडूंनी मिळवलेले मानांकन आणि तायक्वांदो क्षेत्रातील पुण्याचे उंचावलेले स्थान दर्शवणारी ठरली. या यशामागे मास्टर रवींद्र भांडारी यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करा-पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे

पिंपरी (दि.२३) : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसह रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिकांसह व्यवसायिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे यासंदर्भात पडताळणी करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणे अपेक्ष‍ित आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त यांनी पीएमआरडीए कार्यालयात बुधवारी (दि.२३) विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते खराब झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रहदारीला अडचणी येत आहे. यासह वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे, यावर पर्यायी मार्ग म्हणून संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते दुरुस्त करत या भागातील अतिक्रमणे तात्काळ काढून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रासह इतर ठ‍िकाणची अतिक्रमणे काढून घेत रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी एमआयडीसी, पोलीस यंत्रणेला निर्देश देण्यात आले. नागरी सुव‍िधांसाठी एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आदी विभागांनी चाकण हद्दीतील रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्ष‍ित आहे. यासह संबंध‍ित यंत्रणांनी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे न‍िर्देश यावेळी महानगर आयुक्त यांनी द‍िले.

औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करत त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. यासह वाहतूक कोंडी निराकरणासाठी नवीन पर्यायी मार्गाचा विचार करून तातडीने त्यासंबंधीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणांना देण्यात आले. यावेळी पुणे – नाश‍िक रस्ता, तळेगाव – चाकण – शिक्रापूर, माई ते चिखली, निघोजे ते कुरळी, चाकण ते आळंदी अशा विविध रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, आमदार बाबाजी काळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, महागनर न‍ियोजन सम‍िती सदस्य वसंत भ‍िसे यांच्यासह औद्योगिक संघटना, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

शासनाच्या फसवणूकीबद्दल शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द

पुणे, दि. 22 : शहरातील मार्केट यार्ड भागात शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा परवाना सुरू होता. सदर परवाना श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे नावाची व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय चालवत असल्याचे परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांनी तपासणी केल्यावर आढळून आले. तसेच तपासणी दरम्यान श्री. हाडे यांना सदर रास्त भाव दुकानात अनेक गंभीर दोष आढळून आले जसे की रास्त भाव दुकान शासन निर्धारित वेळेत बंद ठेवणे, महिला मंडळाचे दुकान इतर व्यक्तीने चालवणे, रास्त भाव दुकानात शासनाने नेमून दिलेले दप्तर न ठेवणे, रास्त भाव दुकानातील तराजू व वजने प्रमाणित नसणे, शिधापत्रिकाधारकांशी अरेराविपणे बोलणे व धमकावणे तसेच तपासणी वेळी प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात तफावत आढळून येणे असे दोष आढळल्याने प्रशांत खताळ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकान परवाना क्रमांक ह 31 कायमस्वरूपी रद्द केला.

तसेच शारदा महिला मंडळ सद्यस्थितीत अस्तित्वात आहे का याची खातर जमा करण्यात येत आहे. दुकानातील आढळून आलेल्या दोषांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडाची रक्कम रु 33 हजार 666 वसूल करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच सर्व परिमंडळ कार्यालयातील सहकारी संस्था व महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही श्री. खताळ यांनी दिल्या आहेत.

टाटा समूहाची आघाडी,त्यानंतर गुगल इंडिया आणि इन्फोसिस  भारतातील सर्वात आकर्षक नोकरी देणारे ब्रँड

●      GenZ नोकरी बदलण्याच्या ट्रेंडला चालना देत आहेज्यात 38% लोकांनी मागील सहा महिन्यांत नोकरी बदली आहे.

●     IT, ITeS, आणि GCC क्षेत्र भारतातील सर्वात आकर्षक उद्योग म्हणून उभे राहिले आहे.

●     AI चा वापर झपाट्याने वाढला असूनकामावर 5 पैकी 3 कर्मचारी त्याचा नियमित वापर करतातनोकरी गमावण्याची चिंता असूनही आशावाद वाढत आहे.

●     पैकी 10 कर्मचारी पुनःकौशल्य प्रशिक्षणाच्या मदतीची अपेक्षा करतातहे फक्त नोकरी शोधणाऱ्यांसाठीच नव्हेतर सध्या नोकरी करत असलेल्या लोकांसाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

बेंगळुरू,टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड म्हणून उदयास आला आहे, असे रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च (REBR) 2025 च्या निष्कर्षांतून समोर आले आहे — जे जगातील सर्वात व्यापक, स्वतंत्र आणि सखोल नियोक्ता ब्रँड संशोधन आहे आणि दरवर्षी केले जाते.

टाटा ग्रुपने आर्थिक स्थिरता, करिअर प्रगतीच्या संधी आणि प्रतिष्ठा या तीन मुख्य कर्मचारी मूल्य प्रस्ताव (EVP) चालकांवर उच्च गुण मिळविले, ज्यामुळे हा ब्रँड विजेत्या स्थानावर आला. या वर्षी गुगल इंडियाने या यादीत वर चढून दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले, तर इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त, या वर्षाच्या अहवालातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमेव भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्राची बँक म्हणून टॉप 10 नियोक्ता ब्रँड्सच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

आता भारतातील 15व्या आवृत्तीमध्ये आणि जागतिक पातळीवर 25व्या आवृत्तीमध्ये असलेला REBR अहवाल टॅलेंट समुदायाच्या बदलत्या प्राधान्यांकडे सखोल दृष्टी देतो. 34 बाजारपेठांमधून 1,70,000 हून अधिक प्रतिसादकांच्या, ज्यात भारतातील 3,500+ समाविष्ट आहेत, अहवालानुसार आजचे टॅलेंट केवळ पगारापेक्षा खूप अधिक अपेक्षा करते. ते समावेशक, भविष्यमुखी कामकाजाच्या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहेत, जे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ यांना समर्थन देतात.

विशेष म्हणजे, भारतातील टॅलेंट त्यांच्या सध्याच्या संस्थांना प्रतिष्ठा, आर्थिक स्वास्थ्य आणि समतेसारख्या घटकांवर उच्च गुण देतात. तथापि, आदर्श नियोक्ताविषयी विचारले असता, काम आणि जीवनातील संतुलन, तसेच आकर्षक पगार व फायदे हे भारतीय नियोक्त्यांनी अजून पूर्ण करावयाचे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे दिसून आले आहे.

2025 साठी भारतातील टॉप 10 सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँडः

या वर्षी भारतातील टॉप 10 सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड विविध उद्योगांतील आहेत, जे दर्शविते की, आजच्या टॅलेंटच्या संधी अनेक क्षेत्रांमध्ये पसरल्या आहेत. हे या गोष्टीची जाणीव करून देते की, नियोक्त्यांमध्ये कडक स्पर्धा आहे; ते केवळ स्वतःच्या क्षेत्रातील कंपन्यांशीच नव्हे, तर विविध उद्योगांमधील कंपन्यांशीही सर्वोत्तम टॅलेंट आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

1.    टाटा समूह

2.    गूगल इंडिया

3.     इन्फोसिस

4.    सॅमसंग इंडिया

5.    जेपीमॉर्गनचेस

6.    आयबीएम

7.    विप्रो

8.    रिलायन्स इंडस्ट्रीज

9.    डेल टेक्नॉलॉजीज लिमिटेड

10.  स्टेट बँक ऑफ इंडिया

REBR 2025 च्या अहवालाचे सादरीकरण करतानारँडस्टॅड इंडिया या टॅलेंट कंपनीचे एमडी आणि सीईओविश्वनाथ पीएस यांनी सांगितले की रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च हे सतत बदलत चाललेल्या टॅलेंटच्या जागतिक परिसंस्थेत संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन ठरते. 2025 च्या निष्कर्षांत स्पष्टपणे दिसून येते कीआजचा कर्मचारी पारंपरिक नोकऱ्यांमध्ये समाधान मानत नाहीते समतेची अपेक्षा करतातउद्दिष्ट असलेली कामेअर्थपूर्ण वाढ आणि कामजीवन यामध्ये संतुलन शोधत आहेत.

या वर्षीच्या डेटामध्येविशेषतः तरुण टॅलेंटमध्ये नोकरी बदलण्याची इच्छा वाढल्याचेही दिसतेहे नियोक्त्यांसाठी एक जाणीव जागरण आहे कीकेवळ तात्पुरते फायदे देण्यापुरते थांबून  राहताविश्वासपारदर्शकता आणि सामा उद्दिष्ट यावर आधारित संस्कृती निर्माण करणे गरजेचे आहेकामजीवन संतुलन पुन्हा एकदा कर्मचारी मूल्य प्रस्तावातील (EVP) प्रमुख घटक बनले असूनसर्व वयोगटांमध्ये पुनःकौशल्य प्राप्ती (reskilling) सुद्धा प्राधान्यक्रमात आहेत्यामुळे संस्थांनी आपली EVP धोरणे नव्याने आखूनबदलत्या गरजांनुसार जुळवून घ्यावी लागतील.

शी आपण कौशल्यांवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतोतसतसे सर्वोत्तम टॅलेंटसाठी स्पर्धा अधिक तीव्र होत जाईलसमावेशकता प्रोत्साहन देणाऱ्यासतत शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या आणि टॅलेंटच्या खऱ्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणाऱ्या संस्था यशस्वी होतीलमला खात्री आहे कीREBR 2025 अहवाल प्रत्येक नियोक्त्यासाठी एक प्रभावी आणि रणनीतिक मार्गदर्शक ठरेलज्यामुळे ते खऱ्या अर्थाने टॅलेंटसाठी आकर्षक ठरू शकतील.”

REBR 2025 अहवालातील मुख्य निष्कर्षः

नोकरी बदलण्याचा मानस वाढत चालला आहे. भारतातील 47% कर्मचारी 2025 च्या पहिल्या सहामाहीत नोकरी बदलण्याचा विचार करत होते, ज्यात Gen Z (51%) आणि Millennials (50%) यांचा नियोक्ता बदलण्याचा मजबूत मानस दिसून आला.

कर्मचारी कामाशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत; 86% भारतीय कर्मचाऱ्यांनी स्वतःला अत्यंत प्रेरित असल्याचे सांगितले, तर फक्त 5% कर्मचारी कमी प्रमाणात कामाशी जोडलेले होते, तरीही 67% असंतुष्ट कर्मचारी नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत, जे गुंतवणूक आणि टिकवणुकीमधील संबंध दर्शवितात.

Gen Z आणि Millennials या पिढ्या समता आणि समावेशाला Gen X पेक्षा जास्त प्राधान्य देतात, तर Gen X काम-जीवन संतुलनावर अधिक लक्ष केंद्रित करतात. Gen Z संस्थेच्या नेतृत्वाच्या ताकदीपेक्षा प्रशिक्षण आणि विकासाला अधिक महत्त्व देतो. Millennials सर्वात समाधानी पिढी असून, ते आपल्या नियोक्त्यांना पगार, समता आणि काम-जीवन संतुलनासाठी उच्च गुण देतात.

AI चा वापर वेगाने वाढतो आहे, सध्या 61% भारतीय कर्मचारी नियमितपणे AI वापरतात. Millennials या वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय असून, मागील वर्षीच्या तुलनेत 13% वाढ झाली आहे. 38% कर्मचाऱ्यांना वाटते की, AI त्यांचे काम लक्षणीय पद्धतीने प्रभावित करत आहे.

पुनःकौशल्य प्राप्ती (Reskilling) अजूनही महत्त्वाचा विषय आहे, विशेषतः उच्चशिक्षित व्यावसायिकांसाठी. 9 पैकी 10 कर्मचारी अशा नियोक्त्यांना अधिक महत्त्व देतात, जे अपस्किलिंगच्या संधी देतात.

सुमारे 49% भारतातील कामगार अल्पसंख्याक गटाशी संबंधित असल्याचे ओळखतात. विशेष म्हणजे, तरुण पिढ्यांमध्ये अल्पसंख्याक ओळख जास्त आहे – Gen Z मध्ये 55% आणि Millennials मध्ये 50%. सकारात्मक बाब म्हणजे, अल्पसंख्याक कर्मचारी पुनःकौशल्य संधींबाबत आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळणाऱ्या न्यायाबाबत अधिक सकारात्मक आहेत. मात्र, बरेच जण करिअरमध्ये प्रगतीच्या संधींमध्ये अडचणींचा अनुभव घेत असल्याची नोंद आहे.

कामजीवन संतुलन उद्योगांमध्ये सर्वसामान्य आणि महत्त्वाची गरज म्हणून उभी राहिली आहेमात्र, भूमिका आणि उद्योगानुसार अपेक्षा वेगवेगळ्या आहेत: मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाइल, लाइट इंडस्ट्रियल, सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स, हेवी इंडस्ट्री, एनर्जी व इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच कौशल्यप्रधान व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या टॅलेंटला नोकरीची सुरक्षितता महत्त्वाची वाटते, तर फार्मा, हेल्थकेअर व लाइफसायन्सेस, फायनान्स/ITeS, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, बिझनेस कन्सल्टिंग, इंजिनिअरिंग, सेल्स, ट्रेड व मार्केटिंग, BFSI, होलसेल, रिटेल, डिझाइन व R&D क्षेत्रातील टॅलेंटना मजबूत व्यवस्थापन आणि करिअर वाढ अधिक महत्त्वाची वाटते.

माणिकराव कोकाटे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा घ्या – प्रशांत जगताप

पुणे -शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रति इतके निष्काळजी असलेले कृषिमंत्री आपल्या महाराष्ट्राला नकोच… माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याच भाषेत “ओसाड गावची पाटीलकी” सोडून शेतकऱ्यांवर उपकार करावेत, मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळीजगन्नाथ शेवाळे, शेखर धावडे, फहीम शेख, रोहन पायगुडे, असिफ शेख, दीपक कामठे, रानु साने, योगेश पवार, पूजा काटकर, गौरव जाधव, फिरोज तांबोळी, प्राजक्ता जाधव, विमल झुंबरे, रुपाली शेलार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रशांत जगताप यांनी तीव्र शब्दांत माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी जगताप म्हणाले,’ स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी माणिकराव कोकाटे महाराष्ट्राला भिकारी म्हणत आहेत. अशा व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राहण्याचा काहीही अधिकार नाही. एकतर माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढून टाका, किंवा महाराष्ट्राला जुगारी राज्य बनवण्यासाठी त्यांना थेट मुख्यमंत्री करा अशी खोचक मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे.महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकार स्पष्टपणे नकार देत आहे. या असंवेदनशीलपणावर कळस म्हणून महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे लोकशाहीच्या पवित्र सभागृहात, म्हणजेच विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळताना चे चित्र सबंध महाराष्ट्राने बघितले आहे.

धनकवडीत मध्यरात्री अज्ञात व्यक्तींचा उच्छाद:१५ रिक्षा, २ कार आणि स्कूलव्हॅनच्या काचा फोडल्या, दोन नागरिकांना मारहाण

पुणे-पुणे शहरातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ दरम्यान तीन अज्ञात व्यक्तीने तुफान राडा घालत गोंधळ आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथ नगर या भागात त्यांनी तब्बल वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यामध्ये १५ रिक्षा, दोन कार आणि एक स्कूल व्हॅन टेम्पोचे नुकसान झाले. सीसीटीव्हीमध्ये तोडफोड करणारे तीघे एका दुचाकीवरुन आलेले दिसत आहेत.याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी दुचाकीवरुन येत हॉकीस्टीक आणि दगडाच्या सहाय्याने एकूण १५ ऑटो रिक्षा, २ कार, १ स्कूल व्हॅन यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हे हल्लेखोर रस्त्यावर पार्किं केलेल्या वाहनांवर तोडफोड करत असताना त्यांना दोन नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांना हल्लेखोरांनी मारहाण केली. यातील एका रहिवाशाचीदुचाकीही फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

रात्र गस्तीवरील पोलिसांचे पथक आणि सहायक पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र रात्रभर शोधाशोध करुनही हल्लेखोर हाती लागले नाहीत. दरम्यान पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते हे सहकारनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

डान्सबार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको:अंजली दमानिया यांनी केले अनेक गंभीर आरोप

मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बारची पाहणी करत डान्सबार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको, अशा शब्दात त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गृह राज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बार मध्ये जाऊन बारची पाहणी केली. कारवाई झाल्यानंतर हा बार बंद करण्यात आला आहे. या बारमध्ये काही चुकीचे होत नव्हते तर बार बंद ठेवण्याची वेळ का आली? असा प्रति प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे. या संदर्भात आपण सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच बोलणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.आज या बार आणि परिसराची पाहणी केली असता या ठिकाणी डान्सबार होता, असेच दिसून आले आहे. या संदर्भात आपण या एफआआयची पूर्ण कॉपी वाचलेली आहे. म्हणूनच आपण पोलिस अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

योगेश कदम यांना याआधी देखील बीड मधील डान्सबार प्रकरणाचे व्हिडिओ पाठवत त्यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली होती. मात्र त्यांनी संबंधित डान्सबार वर कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर मी ते व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या बीडमधील डान्सबारवर कारवाई झाली होती. मात्र योगेश कदम यांनी कारवाई का केली नाही? याचा उलगडा मला आज झाला असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता. अनिल परब यांनी विधानपरिषदेत उपरोक्त आरोप केला होता. अनिल परब अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले की, मुंबईच्या कांदिवाली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत 22 बारबालांसह 22 कस्टमर व 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

पुण्याच्या कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार…

पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप

पुणे- दौंड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंडच्या चौफुला परिसरात 3 कलाकेंद्र आहेत. गाणी, नृत्य, लावणी अशा विविध कला इथे सादर केल्या जातात. सोमवारी रात्रीही नेहमीप्रमाणे इथे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होते. पण तिथे आलेल्या दोन गटांत आवडीची लावणी सादर करण्यावरून बाचाबाची झाली. त्यातूनच हा गोळीबार झाल्याचा दावा केला जात आहे. मंगळवारी ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियात पसरली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यात तिन्ही कलाकेंद्र चालकांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला.स्थानिकांच्या माहितीनुसार, या कलाकेंद्रांमध्ये कलेच्या नावाखाली अनेक विभत्स प्रकार सुरू असतात. मद्यपान करून रात्री – अपरात्री राजरोसपणे धिंगाणा सुरू असतो. राजकीय पक्षांचे पुढारी, गुन्हेगार, उद्योजक आदी विविध क्षेत्रातील बडी आसामी इथे येतात. पण पोलिस त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.

दरम्यान सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांचे नेते गत काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकारची सर्वत्र छी थू होत असताना आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने चक्क कलाकेंद्रात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत? हे शोधण्याऐवजी पोलिस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये केली आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात कलाकेंद्रात धुडगूस घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः या घटनेत एक तरुणी जखमी झाल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रम

० प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ
० प्रेक्षकांना मोफत प्रवेश

मुंबई-मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
पत्रकार संघाच्या नगर चौक (व्हिटी) येथील सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाराष्ट्रातील दर्जेदार प्रायोगिक एकांकिका, एकपार्त्री प्रयोग, दीर्घांकांचे मोफत प्रयोग होतील. आहे. नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगांचा नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे. येत्या २५ जुलै २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.
‘मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळ देणं आणि नव्या प्रयोगशील नाटकांना मंच मिळवून देणं, हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचा मूळ हेतू आहे. पत्रकार संघ केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर समाजातील उपक्रमशील घटकांसाठीही एक प्रेरणास्थान असावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ या उपक्रमाला ‘इंडियन ऑईल’चे प्रायोजकत्व लाभल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.

या उपक्रमात सादरीकरण करणार्‍या नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्फे १० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. तसेच संघाचे सभागृह पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. या नाट्य शुक्रवार उपक्रमाचे संचलन करण्यासाठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले यांच्या नेतृत्वाखाली रविंद्र देवधर आणि नयना रहाळकर यांची समिती स्थापन करण्यात आली असून, नाट्य शुक्रवार अंतर्गत प्रायोगिक रंगभूमीची नाटके स्वीकारण्याचा अंतिम निर्णय ही समिती घेईल, अशी माहिती अध्यक्ष चव्हाण यांनी दिली.‘यासाठी कोणतीही नोंदणी फी आकारली जाणार नाही. ‘नाट्य शुक्रवार’ हा एक प्रकारे सांस्कृतिक लोकचळवळीचा आरंभ असून, पुढील काही महिन्यांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचाही मानस देवदास मटाले यांनी व्यक्त केला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघाने सुरु केलेला हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रम स्तुत्य असून महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांसाठी पथदर्शी असल्याचे रविंद्र देवधर म्हणाले. या नाट्यउपक्रमात मुंबईसोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नाट्यकलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळेल असे नयना रहाळकर म्हणाल्या. या नाट्य उपक्रमात ज्यांना आपल्या कलाकृती सादर करायच्या आहेत, त्यांनी देवदास मटाले (९७६९६६४४६४), रविंद्र देवधर (९४२२३४४५५५) आणि नयना रहाळकर (९३२२४९२६२९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या उपक्रमास नाट्यरसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले.

सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार मराठी चित्रपट महोत्सव!

सॅन होजे : राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन’ (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे लक्ष वेधले होते.

मराठी चित्रपटांचा परदेशात साजरा होणारा हा एकमेव सोहळा असून यावर्षी हा सोहळा अधिक भव्य, व्यापक आणि उत्साही स्वरूपात २५ ते २७ जुलैदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ या आलीशान ठिकाणी संपन्न होत आहे. मराठी कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा दोन दिवसांचा महोत्सव यंदा रसिकांच्या मागणीमुळे तीन दिवसांचा होत आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच २५ जुलैला रेड कार्पेट रिजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून रेड कार्पेट एन्ट्री दिली जाणार आहे, त्यानंतर ‘फिल्म अवार्ड्स नाईट’या ग्लॅमरस पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होईल. लोकप्रिय मराठी कलावंतांसोबत भेटण्याची, बोलण्याची त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्याची संधी अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांना या फिल्म अवार्ड नाईटमध्ये मिळणार आहे. या फिल्म अवार्ड नाईटमध्ये कलावंतांचे स्वागत त्यांना विविध पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञ यांचाही या सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्य फेस्टिव्हलची सुरुवात मेन थिएटरमध्ये उपस्थितांच्या नोंदणी कार्यक्रमानंतर अभिनेते सचिन खेडेकर रसिकांची संवाद साधत त्यांना काही महत्वाच्या ‘कि नोट्स’ देतील व त्यानंतर ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर्स’ अंतर्गत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘स्नोफ्लॉवर’चा शो झाल्यानंतर अभिनेते स्वप्नील जोशी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘स्नोफ्लॉवर’ फायर साइडचे कुतूहल जागविणारा रंगारंग कार्यक्रम सादर करतील. यानंतर ‘नाफा’ची निर्मिती असलेल्या ‘सबमिशन’, ‘योगायोग’ आणि ‘द गर्ल विथ रेड हॅट’ या लघुपटांचे प्रीमियर शो होतील. त्यानंतर अमेरिकेतील स्थानिक कलावंतांसोबत ‘पॅनल डिस्कशन’ होणार असून त्यात श्रीयुत मिरजकर, हर्ष महाडेश्वर, संदीप करंजकर यांच्याशी मॉडेरेटोर डॉ. गौरी घोलप संवाद साधणार आहेत. यानंतरचे विशेष आकर्षण म्हणजेच ‘ऐवज’ या जेष्ठ अभिनेते – दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या चरित्रग्रंथाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नव्या आवृत्त्यांचे प्रकाशन ‘नाफा’मंचावर झाल्यानंतर अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची ‘फायर साईड’ जाणून घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या रंगारंग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात लेखक दिग्दर्शक विक्रम वाटवे करणार असून वरील सर्व कार्यक्रम मुख्य थिएटरमध्ये होणार आहेत.

त्यासोबतच २७ जुलैच्या कार्यक्रमांची सुरुवात ‘फेस्टिवल ओपनिंग पार्टनर्सना पुरस्कृत केली जाईल. त्यानंतर ‘नाफा’ विनिंग ‘शॉर्टफिल्म्सचे स्क्रिनिंग होणार असून त्यामध्ये ‘डंपयार्ड’, ‘राडा’, ‘बिर्याणी’ या तीन शॉर्टफिल्म्स पहायला मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘छबिला’, ‘रावसाहेब’ आणि ‘प्रेमाची गोष्ट २’ या मराठी चित्रपटांचे ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर’ होतील. तसेच ‘स्टुडंट स्पॉटलाईट’ विभागातील शॉर्टफिल्म ‘चेंजिंग रूम’, ‘रेबेल’, ‘काजू कतली’ आणि ‘द अनाटॉमीय ऑफ द डे’ यांचे विशेष स्क्रिनिंग होणार आहे. या भरपेट मनोरंजनासोबतच सन्मानीय जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, मधुर भांडारकर, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे व वैदेही परशुरामी यांच्यासोबत पॅनल डिस्कशन होणार आहे.

त्यासोबतच दोन्ही दिवशी म्हणजे २६ आणि २७ जुलैला इतर सभागृहांमध्येही अत्यंत विलोभनीय अश्या कार्यक्रमांचे आयोजन ‘नाफा’ने केले आहे. २६ जुलैला ‘लय, कथा आणि निर्भीड सत्य’ यावर गायक संगीतकार अवधूत गुप्ते, ‘चित्रपटांमध्ये कथनात्मक प्रभाव वाढविण्यासाठी कलात्मकता, इमोशन्स सोबत तंत्रज्ञानाचा वापर’ यावर डॉ. पराग हवालदार, ‘क्रॉसिंग बॉर्डर्स: सिनेमा आणि स्थलांतर यांच्यातील जीवन’ यावर प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे, ‘मराठी चित्रपटातली विनोदी आणि अद्भुत दुनिया’ हा विषय घेऊन महेश कोठारे, ‘गोष्ट आणि दिग्दर्शनातून वास्तववादी चित्रपटाची पायाबांधणी करताना’ या अत्यंत महत्वाच्या विषयावर मधुर भांडारकर यांचे मास्टर क्लास विशेष आकर्षण ठरणार आहेत. २७ जुलैला ‘सो कुल लाईफ’ : अर्थात अ जर्नी विथ सोनाली कुलकर्णी’ त्यांच्यानंतर ‘अभिनयातील स्थित्यंतरे’ कशी असतात यावर स्वप्नील जोशी, ‘व्हाइस, प्रेझेन्स आणि ट्रुथ’ बद्दल सचिन खेडेकर आणि ‘कॅमेऱ्यामधून आयुष्याकडे बघताना’ नेमका काय दृष्टीकोन हवा याबद्दल डॉ. मोहन आगाशे त्यांच्या खुमासदार शैलीत मास्टर क्लास घेणार आहेत.

त्यासोबतच या महोत्सवात रसिक प्रेक्षकांना २६ आणि २७ जुलै या दोन्ही दिवशी त्यांच्या आवडत्या कलावंतांसोबत ‘मीट अँड ग्रीट’ मध्ये सहभागी होता येणार आहे.२६ जुलैला ‘लाईट्स कॅमेरा कथ्थक’ यावर वैदेही परशुरामी, ‘फिल्म, फेम आणि फार्म फ्रेश’यावर अश्विनी भावे, ‘स्टोरीज दोज्  मॅटर’ बद्दलचे रहस्य सोनाली कुलकर्णी सांगतील, त्यासोबत रोमान्स, रोल्स अँड द रिअल स्वप्नील नेमका कसा आहे हे खुद्द स्वप्नील जोशी कडून जाणून घेता येईल तसेच बियॉंड द स्पॉटलाईट बद्दलचे आकर्षण कसे असते याबद्दल दस्तूरखुद्द सचिन खेडेकर सांगतील. त्यासोबतच २७ जुलैच्या दिवशी ‘ट्रॅडीशन मिट्स ट्रेंड्स’ यावर अवधूत गुप्ते, तर ‘अनफिल्टर्ड मधुर’ कसे आहेत? हे प्रत्यक्ष मधुर भांडारकर यांच्याकडूनच ऐकायला मिळणार आहे. तसेच ‘कोठारे अँड सन्स : अ फिल्मी फॅमिली अफेअर’ स्वतः महेश कोठारे जबरदस्त माहिती सांगणार आहेत. नंतर त्यांचे चिरंजीव आपल्या सर्वांचा लाडका आदिनाथ कोठारे ‘बॉर्न टू बी ऑन सेट’ बद्दलचं कुतूहल जागवणार आहे.

वर्षी खास या युवा पिढीला आकर्षित करणारे ‘क्रिएटर्स मीट-अप’ विशेष विभाग असणार आहे. २६ जुलै रोजी दु. १ ते २ वाजता, आदिनाथ कोठारे यांच्या सोबत आदित्य पटवर्धन तर २७ जुलै रोजी वैदेही परशुरामी यांच्याशी हर्ष महाडेश्वर तरुण कलावंतांमधील कलागुणांच्या नवलाईबद्दल संवाद साधतील आहे. यासोबतच व्हाइस आर्टिस्ट आणि अभिनेते प्रसाद फणसे यांचे दोन्ही दिवस ‘डबिंग वर्कशॉप्स’ सुरु राहणार असून ते ‘जाहिरातींचे डबिंग’, ‘चित्रपटांचे डबिंग’ आणि ‘ऍनिमेशन फिल्मचे डबिंग’ कसे करावे याबद्दल प्रशिक्षण देणार आहेत. या सोबतच फेस्टिव्हलमध्ये तिन्ही दिवस ‘चित्रपट एक्स्पो’ सुरु असणार आहे. या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.अधिक माहितीसाठी व सविस्तर कार्यक्रम वेळापत्रकासाठी https://northamericanfilmassociation.org/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

गुन्हेगारीला पूर्णपणे गाडून टाकू -पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गरजवंत ५०० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य

पुणे : पोलीस दल संपूर्ण कार्यक्षमतेने शहराला शिस्तीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांचे प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत आहे. यामुळे आम्ही पुढील काळात गुन्हेगारीला पूर्णपणे गाडून टाकू, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. 

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये सदाशिव पेठेतील महाराष्ट्र विद्यालयातील गरजवंत ५०० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये ३ हजार फुलस्केप वह्या आणि ५०० पॅड चा समावेश आहे. 

कार्यक्रमाला सद्गुरू मनोहर भोसले, राज्याच्या अंमलीपदार्थ विरोधी फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, उद्योजक रवींद्र लुंकड, युवा उद्योजक संग्राम मुरकुटे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह लुंकड परिवार उपस्थित होता. आर.के.लुंकड हौसिंग फर्म चे संचालक रमणशेठ लुंकड यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले. 

अमितेश कुमार म्हणाले, धार्मिकतेसोबत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे केले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे. समाजातील गरजवंतांसाठी अशा प्रकारचे कार्य व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील सुरु आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव
गुरुवार, दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.