Home Blog Page 199

टिपु पठाण टोळीचा मोकामधील WANTED आरोपी पोलिसांनी तेलंगात जाऊन पकडला

पुणे -टिपु पठाण टोळीचा मोकामधील WANTED आरोपी पोलिसांनी तेलंगात जाऊन पकडला आहे. फैयाज गफार बागवान वय. २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे असे त्याचे नाव आहे. हा हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे लपून बसला असताना पुणे पोलिसांनी त्याला पकडला .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.
काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८ (२), ३२९ (३),३५१ (२),३५२,१८९(१),१८९(२),१९१ (२) सह ६१(२),१११ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३(१), ३(२), ३ (४) या गुन्हयामधील पाहिजे असलेला आरोपी फैयाज गफार बागवान वय. २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी फैयाज गफार बागवान यास मियापुर पोलीस स्टेशन, हैद्राबाद तेलंगणा हद्दीतुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे व राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

धनकवडीत वाहनांची तोडफोड करणारे, स्वतःला भाई म्हणविणारे सराईत ५ भामटे पकडले, तिघे अल्पवयीन …

पुणे- धनकवडीत वाहनांची तोडफोड करणारे सराईत ५ भामटे पोलिसांनी पकडले असून यात तिघे अल्पवयीन आहेत तर अन्य दोघांची नावे रोहीत कैलास आढाव वय २१ वर्षे रा.मु. पो. किरकट वाडी ता. हवेली जि. पुणे आणि सुधिर बाप्पु सावंत वय १९ वर्ष रा गोरावी वस्ती नांदेड फाटा ता. हवेली जि. पुणे अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले .

पोलिसांनी असेही सांगितले कि,’दि.२३/०७/२०२५ रोजी फिर्यादी रा. केशव कॉम्प्लेक्स चिंतामणी गणेश मंदीराजवळ धनकवडी, पुणे यांची मारुती सियाज कार तसेच सार्वजनीक रोडवर नागरीकांनी पार्क केलेल्या इतर गाड्यांच्या काचा अनोळखी इसमांनी लाकडी बांबु, दगडान फोडुन मोठ मोठ्याने ओरडत आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, आम्हास कोणी नडला तर त्यास सोडणार नाही असे ओरडुन नागरीकांमध्ये दहशत केली त्या बाबत अनोळखी इसमाविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२५ भा.न्या. सं. २०२३ चे कलम ३२४ (१) (२), ३२४ (४), ३५१ (२) (३) क्रिमीनल लॉ अमॅटमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि.२४/०७/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा सहकारनगर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहीत आढाव याने त्याचे इतर साथीदार यांचे सह केला असुन तो त्याच्या मित्रास भेटण्यास नवले ब्रिज येथे येणार आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन थांबलो असता काही वेळातच बातमीतील वर्णनाचा इसम त्याचे साथीदारासह दुचाकी वरुन येवुन नवले ब्रिज जवळ गप्पा मारत थांबलेले दिसले. बातमी प्रमाणे खात्री होताच त्यांना स्टाफच्या मदतीने चारही बाजुंनी घेरुन पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) रोहीत कैलास आढाव वय २१ वर्षे रा.मु. पो. किरकट वाडी ता. हवेली जि. पुणे २) सुधिर बाप्पु सावंत वय १९ वर्ष रा गोरावी वस्ती नांदेड फाटा ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्यानी सदरचा गुन्हा त्यांचे इतर तिन अल्पवयीन साथीदारांसह केल्याचे सांगितल्याने त्यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेवुन सर्व आरोपींन कडे तपास केला असता सदर गुन्हयाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३२४ (१) (२), ३२४ (४), ३५१ (२) (३) क्रिमीनल लॉ अमॅटमेंट कलम ७ हा गुन्हा उघडकीस आला असुन सदर आरोपी कडुन गुन्हयात वापरलेली ३०,०००/- रूपये किंमतीची एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रकरणी हस्तक्षेपासाठी खा. मेधा कुलकर्णी यांनी घेतली केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांची भेट

पुणे: महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) ६२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व अन्य थकीत रक्कम योग्यरीत्या मिळण्याकामी हस्तक्षेप करण्याची मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली. अन्यायग्रस्त या ६२ कर्मचाऱ्यांनी खासदार कुलकर्णी यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले होते. सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यामध्ये लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.

गुरुवारी खा. मेधा कुलकर्णी यांची सिंधिया यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. १० मार्च २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयानेही या कर्मचाऱ्यांना थकीत वेतन, नोकरीवर असताना कापलेले वेतन त्वरित देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ‘एमटीएनएल’ने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करीत या कर्मचाऱ्यांना रक्कम परत केलेली नाही.

याप्रकरणी खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ” उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन ‘एमटीएनएल’ने केले नाही, ही गंभीर बाब आहे. न्यायालयीन आदेशानुसार, ‘एमटीएनएल’ने कर्मचार्‍यांकडून स्वेच्छा निवृत्ती योजनेवेळी अन्यायाने वसूल केलेली रक्कम परत करणे अपेक्षित होते. तसेच त्यांच्या वेतनात ‘बेसिक पे’मध्ये अन्यायकारक कपात केली गेली. परिणामी त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या हक्कांवर विपरीत परिणाम झाला आहे. चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले नाही. 

“उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्याऐवजी, ‘एमटीएनएल’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहे. ‘एमटीएनएल’च्या या भूमिकेमुळे या कर्मचार्‍यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये अनेक कर्मचारी ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचा उदरनिर्वाह निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेळेत त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप करून या निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,” असेही खा. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.

सुरळीत वीजपुरवठा, दर्जेदार ग्राहकसेवांमध्ये हयगय नको; वीजबिलांच्या वसूलीला आणखी वेग द्या

0

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

सोलापूरदि. २४ जुलै २०२५: सर्व वीजग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा देण्याच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही हयगय करू नका. पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक वसाहतींसह सर्व भागात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणार्‍या प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येत आहे. यासह सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा देण्यासाठी सजग राहावे आणि वाढती थकबाकी कमी करण्यासाठी वीज बिलांच्या वसूलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी गुरुवारी (दि. २४) दिले.

सोलापूर येथील नियोजन भवनात पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील विविध कामे, योजनांचा श्री. लोकेश चंद्र यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे (प्रकल्प) व श्री. धनंजय औंढेकर (पायाभूत आराखडा व विशेष प्रकल्प), प्रभारी पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे, मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर (बारामती) व श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर) उपस्थित होते.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट वीजसेवा व ग्राहकसेवा देण्याची क्षमता आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत ही क्षमता सिद्धही केली आहे. मात्र त्यात आणखी तत्परता व सकारात्मकता अपेक्षित आहे. महसूलवाढीसाठी नवीन ग्राहकांचे स्वागत करा. सर्व ग्राहकांच्या समाधानासाठी सेवेच्या कृती मानकांनुसार कालमर्यादेतच सेवा द्या. ग्राहकांशी समन्वय साधा. त्यांच्या अडचणी समजून घेत आवश्यक मदत करा. पायाभूत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक आराखडे करून संबंधित कामांना वेग द्यावा. गेल्या काही दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर बाब आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वीज बंद ठेवण्याचा कालावधी कमी करावा व संबंधित ग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वसूचना द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

गेल्या एप्रिलपासून वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महसूलाच्या उद्दिष्टांप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. महसूल वाढ व वसूलीमध्ये हयगय केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पुणे प्रादेशिक विभागात वीजबिलांच्या थकबाकीमुळे १५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. परिणामी वीजहानीत वाढ होत आहे. पुणे विभागात पुणे ग्रामीण मंडळाची वीज हानी ६.९४ टक्के आहे तर सोलापूर मंडळाची वीजहानी सर्वाधिक २८.३१ टक्के आहे. हे चित्र गंभीर आहे. प्रत्येक विभागात कायमस्वरूपी वीज खंडित असलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करा. यासह इतर ठिकाणी मोहीम राबवून वीजचोरी आढळल्यास त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून येत्या मार्च २०२६ पर्यंत राज्यातील ५ लाख तर पुणे विभागातील एक लाख घरगुती ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर ऊर्जा कृषिपंप आदींची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्याचा ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी ग्राहक संवाद व प्रबोधन करण्यात यावे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनेला आणखी गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती द्यावी. गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली.

औद्योगिक वीज दर होणार कमी –

सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांशी श्री. लोकेश चंद्र यांनी विविध मुद्द्यांच्या सादरीकरणातून संवाद साधला. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या अडीच वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीमुळे महाराष्ट्रात प्रथमच वीज दरात कपात झाली आहे. त्याचा फायदा औद्योगिक ग्राहकांनाही निश्चितपणे होणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये लघु व उच्चदाबाच्या औद्योगिक वीज दरात घट होत जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उद्योजकांच्या विविध वीज प्रश्नांवर चर्चा करून ते त्वरीत सोडविण्यासाठी स्थानिक यंत्रणेला निर्देश दिले. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस), विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आदी योजनांच्या कंत्राटदार एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींची आढावा बैठक घेतली व विविध कामांना वेग देण्याची सूचना केली.

भारतात यूकेच्या गाड्या-ब्रँडेड कपडे स्वस्त होणार:दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

भारतात यूकेच्या गाड्या, कपडे आणि पादत्राणे स्वस्त होतील. आज २४ जुलै रोजी भारत आणि यूकेने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. २०२२ पासून वाटाघाटी सुरू होत्या.आता भारतातील ९९% वस्तू शून्य शुल्कावर युकेला निर्यात केल्या जातील. तर युकेच्या ९९% वस्तू ३% सरासरी शुल्कावर आयात केल्या जातील. यामुळे २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन १२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समकक्ष केयर स्टार्मर यांच्या उपस्थितीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटिश व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षरी केली.याचा फायदा युकेलाही होईल. आयात केलेल्या व्हिस्कीवरील भारताचा कर १५०% वरून ७५% पर्यंत कमी केला जाईल. कराराच्या दहाव्या वर्षापर्यंत तो नंतर ४०% पर्यंत कमी केला जाईलयूकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सरासरी कर १५% वरून ३% पर्यंत कमी केला जाईल. १० वर्षांत ८५% वस्तू पूर्णपणे करमुक्त होतील. यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होतील:

व्हिस्की आणि जिन: युकेमधून आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्की आणि जिनवरील भारताचा कर १५०% वरून ७५% पर्यंत कमी केला जाईल. नंतर कराराच्या दहाव्या वर्षापर्यंत तो ४०% पर्यंत कमी केला जाईल. उदाहरण – ५००० रुपयांची स्कॉच बाटली ३५०० रुपयांना उपलब्ध असेल.

लक्झरी कार: कोटा सिस्टीम अंतर्गत यूके कारवरील (जसे की जग्वार लँड रोव्हर, रोल्स-रॉइस) टॅरिफ १००% वरून १०% पर्यंत कमी होतील. यामुळे या कार २०-३०% स्वस्त होऊ शकतात.

अन्न आणि पेये: युकेमधून आयात होणाऱ्या सॅल्मन, कोकरू, चॉकलेट, बिस्किटे आणि शीतपेयांवरचे शुल्क कमी केले जाईल. यामुळे ही उत्पादने स्वस्त होतील.

सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे: यूके सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस भागांवरील कमी कर या वस्तू स्वस्त करतील. हा कर १५% वरून ३% पर्यंत कमी होईल.
कापड, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि रसायन यासारख्या क्षेत्रांना फायदा होईल.

यूकेमध्ये भारतीय कपडे आणि बेडशीट आणि पडदे यांसारख्या घरगुती कापडांवर ८-१२% कर आता पूर्णपणे रद्द केला जाईल. यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांच्या तुलनेत आपले कपडे स्वस्त आणि अधिक स्पर्धात्मक होतील. तिरुप्पूर, सुरत आणि लुधियाना सारखी निर्यात केंद्रे पुढील तीन वर्षांत ४०% पर्यंत वाढू शकतात.

भारतातून युकेमध्ये जाणाऱ्या दागिने आणि बॅग्ज, शूज यासारख्या चामड्याच्या वस्तूंवर कोणताही कर लागणार नाही. लहान व्यवसाय (एमएसएमई) आणि लक्झरी ब्रँडसाठी याचा मोठा फायदा होईल. यासोबतच, युकेद्वारे युरोपमध्ये भारताचे वर्चस्व आणखी वाढेल.

यूकेने भारतीय यंत्रसामग्री, अभियांत्रिकी साधने आणि कारच्या सुटे भागांसारख्या ऑटो पार्ट्सवरील आयात कर रद्द केला आहे. यामुळे भारत, यूके आणि युरोपमधील औद्योगिक पुरवठा साखळी आणखी मजबूत होईल. पुणे, चेन्नई आणि गुडगाव सारख्या उत्पादन केंद्रांना याचा फायदा होईल.

भारतीय औषध कंपन्यांना यूकेमध्ये जेनेरिक औषधांसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी मिळेल. यामुळे भारतीय औषधे यूके आरोग्य सेवा (एनएचएस) पर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि औषधांना देखील लवकर मान्यता मिळेल.

बासमती तांदूळ, कोळंबी, प्रीमियम चहा आणि मसाल्यांसारख्या सागरी उत्पादनांवरील यूके आयात कर रद्द केला जाईल. यामुळे आसाम, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या प्रदेशांच्या निर्यात उद्योगाला मोठी चालना मिळेल.

कृषी रसायने, प्लास्टिक आणि विशेष रसायनांवरील कर कमी केल्याने गुजरात आणि महाराष्ट्र सारख्या प्रमुख केंद्रांमधून निर्यात वाढेल. या करारांतर्गत, भारत २०३० पर्यंत युकेला होणारी रासायनिक निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

या करारामुळे सौर, हरित हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) पायाभूत सुविधांसह अक्षय ऊर्जेमध्ये संयुक्त उपक्रमांसाठी मार्ग मोकळा होईल. यूके भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आणखी गुंतवणूक करेल, ज्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा सह-विकास होईल.

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एफटीए अनेक प्रकारे फायदेशीर आहे:

निर्यातीत वाढ: ९९% भारतीय वस्तू ब्रिटनला शून्य शुल्कात निर्यात केल्या जातील. यामुळे कापड, चामडे, रत्ने आणि दागिने, सागरी उत्पादने आणि अभियांत्रिकी वस्तू यासारख्या क्षेत्रांना फायदा होईल. २०३० पर्यंत भारताची ब्रिटनला होणारी निर्यात २९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

रोजगार वाढेल: कापड आणि चामड्यासारख्या कामगार-आधारित क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण होतील. कापड क्षेत्रातील रोजगार दुप्पट होऊ शकतो.

एमएसएमईला चालना: भारतातील ६ कोटी एमएसएमईंना याचा फायदा होईल. भारताच्या निर्यातीत त्यांचा वाटा ४०% आहे. या करारामुळे त्यांना नवीन बाजारपेठा आणि चांगला नफा मिळेल.

गुंतवणुकीत वाढ: यूके कंपन्या भारतात आयटी, वित्तीय सेवा आणि हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवतील. यामुळे भारताचे उत्पादन आणि सेवा क्षेत्र मजबूत होतील.

आर्थिक वाढ: या करारामुळे २०३० पर्यंत भारत-यूके व्यापारात दरवर्षी १५% वाढ होईल. यामुळे भारताला १०० अब्ज डॉलर्सचे व्यापार लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल.

हा करार २४ जुलै २०२५ रोजी झाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकते. कारण भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आणि यूके संसदेची मान्यता आवश्यक आहे. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

भारत आणि ब्रिटनमधील करारावरील वाटाघाटी १३ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाल्या, ज्या सुमारे ३.५ वर्षांनी पूर्ण झाल्या. २०१४ पासून, भारताने मॉरिशस, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए (युरोपियन मुक्त व्यापार संघटना) सोबत असे ३ मुक्त व्यापार करार केले आहेत. भारत युरोपियन युनियन (ईयू) सोबत अशाच प्रकारच्या करारांवर सक्रियपणे वाटाघाटी करत आहे.

महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणाकरिता भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पुणे, दि. 24: ‘महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण’ म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भुसंपादनाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले.

भिडेवाडा, महात्मा फुलेवाडा येथे भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, सहायक आयुक्त किसन दगडखैर, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते.

श्री भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राचे पुणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे. स्मारकांचे कामे करतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केलेल्या सूचनाचा विचार करावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

प्रारंभी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी तसेच याठिकाणी बसविण्यात येणाऱ्या खिडक्यांबाबत माहिती घेवून स्मारकाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

श्री. चंद्रन म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणाकरिता महानगरपालिकेने स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राअंतर्गत 119 घरांक (सिटी सर्वे क्रमांक), 624 मालक, 358 भाडेकरु, गलिच्छ वस्ती निर्मूलनाअंतर्गत 36 गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, भुसंपादनाच्या कामे गतीने पूर्ण करण्यात येईल, असेही श्री.चंद्रन म्हणाले.

कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण:म्हणाले – आम्ही हर्षल पाटीलला काम दिले नव्हते

मुंबई-कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण दिले आहे . ते म्हणाले, आम्ही हर्षल पाटीलला काम दिले नव्हते, आम्ही संबंधित कंत्राट एका कंत्राटदाराला दिलेले आहे. त्या कंत्राटदाराने हर्षल पाटील यांना सबकंत्राटदार म्हणून नेमले आहे. आमचा संबंध हा कंत्राटदाराशी येतो. सबकंत्राटदाराशी नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याने आता तेही या प्रकरनी टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे. बिले मिळत नाहीत, असे बोलणे खूप सोपे असते. बिले देण्यासाठी काही नियम असतात. काम झालंय का? दर्जाचे झालंय का? त्यामध्ये कुठली अडचण नाही ना? या सगळ्या गोष्टी तपासून बिले दिली जातात. आम्ही बिले थकवू देणार नाही. कोणत्या कंत्राटदारांची बिले बाकी आहेत, त्यांच्या नावांची यादी मला द्या, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे. .

जल जीवन मिशन अंतर्गत काम केलेल्या तरुण कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय हर्षल पाटील असे या कंत्राटदाराचे नाव असून, सरकारच्या विविध विभागाकडून सुमारे दिड कोटी रुपयांची बिले थकल्याने आपल्या शेतात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुनच बोलताना अजित पवार यांनी सरकारने हर्षल पाटीलला कंत्राट दिले नव्हते असे म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले कि,’आज सकाळी १० वाजता एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये राज्याचे मुख्य सचिव आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. या मीटिंगमध्ये ही या प्रकरणाची माहिती घेतली. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राट एका कंत्राटदाराला दिलेले आहे. त्या कंत्राटदाराने हर्षल पाटील यांना सबकंत्राटदार म्हणून नेमले आहे. आमचा संबंध हा कंत्राटदाराशी येतो. कंत्राटदाराचे जशी बिले येतील, तसे आम्ही पैसे देणार. पण सबकंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही. तो कंत्राटदारांचा अधिकार आहे. आता कंत्राटदार आणि सबकंत्राटदार यांच्यात काय झाले? याची आम्हाला माहिती नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

जलजीवन ही केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये ५० टक्के केंद्राचा तर ५० राज्याचा निधी असतो. आम्ही हर्षल पाटील यांना कंत्राट दिले नव्हते. पण एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्यामागणी नक्की काय कारणे आहेत, याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. या तपासादरम्यान, काही मोबाईल तपासले जात आहेत. आत्महत्या करण्याआधी त्यांनी कुणाकुणाला फोन केले. अशा प्रकारची सर्व माहिती पोलिस यंत्रणा मिळवत आहे. मी राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण त्याला आम्ही काम दिलेले नव्हते. संबंधित काम दुसरा कंत्राटदार करत होता. त्याच्या हाताखाली हर्षल पाटील काम करत होता, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या:जलजीवन मिशनची थकबाकी न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल

मुंबई- जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत काम केलेल्या तरुण कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 35 वर्षीय हर्षल पाटील असे या कंत्राटदाराचे नाव आहे. सरकारच्या विविध विभागाकडून सुमारे दिड कोटी रुपयांची बिले थकल्याने आपल्या शेतात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आता या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार नीलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे संवेदनशील वास्तव, असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. तर ही आत्महत्या नाही सरकारने घेतलेला बळी असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

सरकारच्या लोकप्रिय योजना मागचे असंवेदनशील वास्तव – जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं.पण… काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याचे सरकारकडे ₹1.40 कोटी इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने ₹65 लाखांचं कर्ज काढलं…आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं! पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ…यांना ठेवून.”लाडकी बहीण योजना” – एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत.कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत. मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय,पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील,याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही – तर प्रशासकीय अपयश देखील आहे! निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही – ती एक इशारा आहे.राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

अनिल अंबानींच्या 50 कंपन्यांवर ED चे छापे:येस बँकेतून झालेल्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणातून कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी आणि ५० कंपन्यांवर छापे टाकले. येस बँकेतून झालेल्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी, २४ जुलै रोजी दिल्ली आणि मुंबईत टाकण्यात आलेला हा छापा सुरू आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या मते, सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआर आणि सेबी, नॅशनल हाऊसिंग बँक, बँक ऑफ बडोदा आणि नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) सारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.छाप्याच्या बातमीनंतर, अनिल अंबानींच्या दोन प्रमुख कंपन्या, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५% पर्यंत घसरले आहेत.काही दिवसांपूर्वी, स्टेट बँकेने अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि स्वतः अनिल अंबानी यांना “फ्रॉड” म्हणून घोषित केले होते.एसबीआयचे म्हणणे आहे की आरकॉमने बँकेकडून घेतलेल्या ३१,५८० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर केला. यापैकी सुमारे १३,६६७ कोटी रुपये इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात खर्च झाले. १२,६९२ कोटी रुपये रिलायन्स ग्रुपच्या इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले.एसबीआयने असेही म्हटले आहे की आम्ही या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय, अनिल अंबानींविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई येथे वैयक्तिक दिवाळखोरीची कारवाई देखील सुरू आहे.

मात्र २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानींशी संबंधित रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने दिलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाशी हा छापा संबंधित असल्याचेही सांगण्यात आले आहे.ईडीच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ही कर्जे बनावट कंपन्या आणि ग्रुपच्या इतर युनिट्सकडे वळवण्यात आली होती. तपासात असेही उघड झाले आहे की येस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली असावी. ईडी म्हणते की ही एक “सुविचारित आणि सुनियोजित” योजना होती, ज्या अंतर्गत बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांना चुकीची माहिती देऊन पैसे हडप करण्यात आले. तपासात अनेक अनियमितता आढळून आल्या,

जसे की:कमकुवत किंवा पडताळणी नसलेल्या कंपन्यांना कर्ज देणे.
अनेक कंपन्यांमध्ये एकाच संचालकाचा आणि पत्त्याचा वापर.
कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा अभाव.
बनावट कंपन्यांना पैसे हस्तांतरित करणे.
जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया (कर्ज सदाबहार).

सीबीआयने दोन प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला होता. ही प्रकरणे येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयने येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव घेतले होते.यानंतर, नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या इतर एजन्सी आणि संस्थांनीही ईडीशी माहिती शेअर केली. आता ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाच्या महायज्ञाची विक्रमी नोंद


एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ तर्फे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा सन्मान

मुंबई:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवत भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्व विक्रम प्रस्थापित केले. या महारक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सन्मानित केले . एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील सर्व १२२१ मंडलांमध्ये सर्वाधिक १०८८ रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा आणि सर्वाधिक ७८ हजार ३१३ युनिट्स रक्ताचे संकलन, असे दोन विश्वविक्रम केल्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. प्रदेश भाजपा आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी न्यासाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे वरिष्ठ परीक्षक संजय भोला, वरिष्ठ परिक्षक सीमा मन्नीकोट यांच्या हस्ते श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे , विजय चौधरी , मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी एकाच दिवशी झालेल्या महारक्तदान उपक्रमाने दोन जागतिक विक्रम केले ही पक्षासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. सातत्याने समाजासाठी काम करण्याच्या पक्ष संघटनेच्या शिकवणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अव्याहतपणे कार्य करत आहेत त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याची संधी या शिबिरामुळे सर्वांना मिळाली .रक्तदात्यांनीही सामाजिक जाणीवा जागृत ठेवत रक्तदानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना समर्पण भावाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल श्री. चव्हाण यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.संघटित शक्तीमुळेच रक्तदानाच्या या महायज्ञाने दोन विक्रमांना गवसणी घातली या शब्दांत कौतुक करत श्री. चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी , प्रदेश कार्यलायातील कर्मचारी यांच्या योगदानाची दखल घेतली. पक्षकार्यकर्त्यांचे हे यश असून मी भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रतिनिधी म्हणून प्रशस्तीपत्राचा स्विकार केला असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि. २३ जुलै – मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत माहिती दिली.या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अंतर्गत आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम (Recruitment Rules) सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर
मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित नियुक्त्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात कालबद्ध नियोजनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत. तसेच, सध्या रिक्त असलेल्या अनुकंपाच्या जागांचा पुन्हा आढावा घेऊन तातडीने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अशा सर्व रिक्त जागा १०० टक्के भराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी बैठकीत दिले.
00000

जेएनयू’मध्ये मराठीचा झेंडा आता फडकणार! कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलैला उद्घाटन

0

मुंबई (प्रतिनिधी)- दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र असावं, ही कल्पना १७ वर्षांपूर्वी मांडली होती. पण ही कल्पना वर्षानुवर्षं कागदावरच राहिली. अनेक परिपत्रकं, बैठकं, आश्वासनं झाली. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीच झाली नाही. मराठी विद्यार्थ्यांच्या मनात एक खोल प्रश्न सतत भिरभिरत राहिला: “आपल्या भाषेला इथे स्थान कधी मिळणार?”आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रखडलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी दिली. ‘प्रलंबित राहिलेलं काहीही अपूर्ण ठेवायचं नाही’ या त्यांच्या कार्यशैलीनुसार त्यांनी ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रा’चा प्रस्ताव पुन्हा पुढे रेटला आणि केवळ काही महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत हे केंद्र प्रत्यक्षात आणलं. २४ जुलै रोजी फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्राच्या स्थापनेचा कोनशिला समारंभही पार पडणार आहे.‘कुसुमाग्रजांच्या नावाचे मराठी भाषेचे केंद्र सुरू होणे म्हणजे मराठीचा अभिमान आणि अस्मिता यांचाच गौरव आहे. ‘जेएनयू’मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय २००५ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. परंतु आजवर मराठी भाषेसाठी ‘मेळावे’, ‘सभासद संमेलने’, ‘भाषणाचे गाजावाजा’ असे उपक्रम भरपूर झाले. तथापि प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय, शैक्षणिक पातळीवरील प्रयत्न आणि प्रशासकीय कृतिशीलता कमीच होती. याउलट फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अनेक ठोस निर्णय झाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दिल्लीत अहर्निश प्रयत्न केले गेले.३ ऑक्टोबर २०२४ला ‘अभिजात मराठी दिवस’ म्हणून जाहीर केला असून मराठी अभिजात सप्ताहदेखील साजरा होणार आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी उच्च शिक्षणात तिचा वापर सुरू केला. मराठी माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण सुरू करणे, कृषी आणि तांत्रिक शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय असेल वा ‘एमपीएससी’च्या सर्व परीक्षा मराठीतून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय असेल; हे सगळेच निर्णय एकात्मिक दृष्टिकोनातून झाले. भाषिक अस्मितेची व्याख्या केवळ घोषणांपुरती न ठेवता ती शिक्षण, प्रशासन आणि संशोधन यांच्यात प्रत्यक्ष उतरविण्याची ही दिशादर्शक वाट आहे. मराठीचा वापर शासकीय व्यवहारात सक्तीने लागू करण्याचा निर्णय मराठीप्रेमी सरकारने घेतला. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीतून संवादही आता अनिवार्य केला गेला आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी जी ठोस पावले उचलली, ज्या उपाययोजना राबवल्या, त्या प्रत्यक्षात आणताना, त्याचा राजकीय लाभ काय होईल किंवा भाषिक मतांच्या समीकरणांची गणिते मांडण्यासाठी नव्हे. ठाकरे बंधूना निवडणुका जवळ आल्या की मुंबईतील मराठी भाषिकांची आठवण होते आणि मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. निवडणुका झाल्या की पुन्हा मायमराठीचा विषय ते गुंडाळून बाजूला ठेवून देतात. मात्र डबल इंजिन सरकारची कार्यपद्धती तशी नाही. सरकारची भूमिका ही केवळ प्रशासकीय नाही, तर ती सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्याही परिवर्तनाची आहे.

जेएनयूच्या भिंती आता शिवरायांचा जयघोष ऐकतील!

कधी काळी जेएनयू हे ‘डाव्या विचारांचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखले जात होते. याच विश्वविद्यालयात भारतविरोधी घोषणांनी भिंती थरथरल्या होत्या. “भारत तेरे टुकड़े होंगे” आणि “अफझल हम शर्मिंदा हैं…” असे घोष, तिरंग्याचा अवमान, आणि ‘आजादी’च्या गोंगाटात देशाच्या अस्मितेलाच प्रश्नांकित करण्यात आलं होतं.

मात्र आता तिथे नवा अध्याय लिहिला जातोय. याच जेएनयूच्या परिसरात आता छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्र उभं राहतंय. एका अशा हिंदू राष्ट्रनायकावर अभ्यास होणार आहे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मुघल-सुलतानशाहीला ललकारी दिली आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षतेचा खरा पाया घातला. ही केवळ घटना नाही, ही इतिहासाने केलेला काव्यात्म न्याय आहे.

ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन, राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना

0

मुंबई, दि. 23 दि. २३ ( प्रतिनिधी ) : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. तसेच दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला व साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक असून वयोमानानुसार ज्येष्ठ असणारे विधवा, परितक्त्या व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका पूर्णतः कलेवर अवलंबून आहे, व इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही, असे कलाकार पात्र ठरतील. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही महामंडळ किंवा नियमित मासिक पेन्शन योजनेत लाभार्थी असता कामा नये तसेच कलाकार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा एकत्र फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), राज्य व केंद्र सरकारची प्रमाणपत्रे (लागू असल्यास) आणि नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांची घोषणा

0

धायगुडे, जवादे, वंसकर, मलये, जाधव, झुंजारराव पुरस्काराचे मानकरी

पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा बुधवारी (दि. 23) करण्यात आली. सन 2024 वर्षातील बालसाहित्यातील नऊ विभागात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिली.

कादंबरीसाठी दिला जाणारा लोखंडे-जोशी पुरस्कार कल्पना मलये कणकवली यांच्या ‘सई’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. वा. गो. आपटे पुरस्कार रवींद्र जवादे, मूर्तिजापूर यांच्या ‘चिंटू अस्वल आणि त्याचे घर’ या कथासंग्रहाला, ग. ह. पाटील पुरस्कार रमेश वंसकर, गोवा यांच्या ‘वार्‍या वार्‍या आंबे पाड’ या कवितासंग्रहाला, दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार प्रमोद धायगुडे, वाघोशी, खंडाळा यांच्या ‘आबली’ या किशोर कथासंग्रहाला, लीलाताई भागवत पुरस्कार डॉ. विठ्ठल जाधव, बीड यांच्या ‘एकविसाव्या शतकातील बालसाहित्य’ या समीक्षा ग्रंथाला, प्रथम प्रकाशनासाठी कारले गुरुजी पुरस्कार राजेंद्र झुंजारराव, पुणे यांच्या ‘चिमण्यांची शाळा’ या पुस्तकाला, तर उत्कृष्ट सजावटीचा सर्जेराव जगताप पुरस्कार विजयकुमार चित्तरवाड, छ. संभाजीनगर यांना ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ पुस्तकाच्या सजावटीसाठी जाहीर झाला आहे. दिवाळी अंक – आनंद मासिक हा पुरस्कार ‘छावा’ दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. ‘छावा’च्या संपादक डॉ. गीताली टिळक आहेत. बालसाहित्य प्रकाशनासाठी दिला जाणारा बा. रा. मोडक पुरस्कार नंदिनी प्रकाशन, पुणे यांना जाहीर झाला आहे.

बालसाहित्य पुरस्कारासाठी संस्थेकडे 100 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. पुस्तकाचे परीक्षण प्रा. सचिन पालवे, रवीकांत आदरकर, सचिन बेंडभर व शिवाजी चाळक यांनी केले. संस्थेतर्फे 2 ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी 10.30 वाजता लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे -5 येथे आयोजित करण्यात आला असून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व संदर्भ तज्ज्ञ, ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती माधव राजगुरू आणि अनिल कुलकर्णी यांनी दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

अभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव

संस्थेतर्फे ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव वाचन उपक्रम घेण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासेतर पुस्तके, ग्रंथांचे वाचन करून त्या त्या पुस्तकाबद्दलचे मनोगत स्वहस्ताक्षरात दर महिन्याला नियमित लिहून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या उपक्रमात सर्वाधिक पुस्तके वाचणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. त्यात उपरी ता. पंढरपूर विद्यार्थी – श्रावणी नागणे, राधा पवार, साक्षी वाघमारे, कीर्ती शिरगुरकर, सायली लोखंडे, छ. संभाजीनगर येथील विद्यार्थी – राहेश कुलकर्णी, श्रेया नातू, गौतमी अजगावकर, अंजली केने, निधी कांकरिया, कवडा, हिंगोली येथील विद्यार्थी – पवित्रेश्‍वर चक्रधारी, सृष्टी नरवडे, तेजस्विनी देवरे, अनुष्का भोपळे, वरद भुजंग, नयना गवई यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षक शिवाजी नागणे, सोलापूर, डॉ. विनोद सिनकर, छ. संभाजीनगर, बबन शिंदे हिंगोली, प्रा. सुहास सदावर्ते, जालना यांचा वाचनगुरू म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी सांगितले.

पुण्यातील उद्योजकांना मिळणार शासकीय आणि बँकांच्या विविध योजनांचा लाभ

0

पुणे: पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘लोन आणि सबसिडी एक्सपो-2025’ चे शुक्रवार दिनांक 25 रोजी, सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत,सिद्धी बँक्वेट,डीपी रोड,पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, सचिव सई बहिरट पाटील, उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष अरुण निम्हण,उपाध्यक्ष विजय गवारे, प्रमोद साठे,खजिनदार राजेश कुराडे, कार्यकारिणी सदस्य आश्रम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये आघाडीच्या पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, एमएससी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉसमॉस बँक, विद्या सहकारी बँक, लोकमंगल बँक,एचडीएफसी बँक, महानगर बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, क्रिसिल, मेडा, अण्णासाहेब पाटील महामंडळ अशा शासकीय व खाजगी बँका, वित्तीय संस्था, उद्योजकांना अनुदान देणाऱ्या शासकीय व अन्य संस्था यांच्याशी एका छताखाली उद्योजकांना चर्चा करून आपल्या उद्योगांना लाभ मिळवून देता येणार आहे.

या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य, विविध शासकीय, खाजगी व सहकारी बँकांचे अधिकारी सहभागी होणार असून यामध्ये उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना, त्यासाठी राष्ट्रीय व सहकारी बँकांची होऊ शकणारी मदत याबद्दल माहिती चर्चासत्राद्वारे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध शासकीय विभाग, शासकीय खाजगी व सहकारी बँका यांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत. त्याद्वारे उद्योजकांना अथवा उद्योग करू इच्छिणाऱ्यांना विविध शासकीय व इतर योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.

त्याचप्रमाणे या उपक्रमात बँकांनी उद्योगांसाठी उपयुक्त असलेल्या जप्त केलेल्या मालमत्ता,यंत्रसामग्री आणि औद्योगिक जागा यांची माहिती देणारे आणि त्यासंबंधी व्यवहार करणारे स्टॉल उपलब्ध असणार आहेत.

मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशन ही 16 लोकांच्या सहभागाने सन 2014 मध्ये स्थापन झालेली संस्था असून तिचा वेगाने विस्तार होत आहे. सध्या या संस्थेत 800 पेक्षा अधिक मराठा उद्योजकांचा सहभाग असून त्यापैकी 110 पेक्षा अधिक महिला उद्योजकांचा समावेश आहे. या संस्थेने पिंपरी चिंचवड या औद्योगिक विभागात विस्तार केला असून या विभागातही 200 पेक्षा अधिक संस्थेचे सदस्य आहेत. परस्पर सहकार्यातून व्यवसाय वाढीसाठी मदत करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.