Home Blog Page 195

अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक

पुणे – सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील आळते आणि खानापूर तालुक्यातील कार्वे या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्याने खुला करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

आळते आणि कार्वे या दोन गावांच्या हद्दीवरील खानापूर तासगाव रस्त्यापासून सुरू होऊन ओढा पर्यंत जाणारा अंदाजे दोन किलोमीटरचा रस्ता बऱ्याच वर्षापासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यास तसेच शेतामध्ये मोठी अवजारे आणि वाहने नेण्यास अडचणी येत होत्या. या कारणाने त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता. या रस्त्याची शासकीय तसेच खाजगी मोजणी होऊन सुद्धा शेतकऱ्यांमध्ये त्या रस्त्याबाबत एकमत होत नव्हते. दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवरील रस्ता हा या खानापूर व तासगाव या दोन तालुक्यांच्या शीवेवरचा हा रस्ता खुला झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आळते गावचे सरपंच बालाजी मोहिते आणि कार्वे गावचे सरपंच बाळासो जाधव यांची भेट घेऊन याकामी पुढाकार घेतल्याबद्दल दोघांचे तसेच शेतकऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी इतर शेतकऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल प्रशासनाच्या मदतीने अधिकाधिक रस्ते खुले करून घ्यावेत तसेच त्या रस्त्यांची सात बारावर नोंद करून घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी विटा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल आणि खानापूर – विटा तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, कार्वे गावच्या शेतकरी तसेच पोलीस पाटील ज्योत्स्ना पाटील, अमित पाटील, रोशन जाधव व आळते गावचे माणिक सूर्यवंशी उपस्थित होते.
०००००

हर्षल पाटील यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही;थकबाकीविरोधात न्यायालयात जाणार: बीएआय

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हर्षल पाटील यांना श्रद्धांजली; मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा

पुणे: जलजीवन मिशनमध्ये १.४० कोटीचे काम करूनही बिले अदा न केल्याने, तसेच या कामासाठी काढलेल्या ६० लाखांच्या कर्जाचे हप्ते भरून न शकल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे. राज्यातील विविध विकासकामांमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांची सुमारे ९० हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार कंगाल झाले आहेत. शासनाने झालेल्या कामाचे पैसे अदा करावेत, यासाठी दोनवेळा नोटीस पाठवली. मात्र, शासनाकडून त्याला केराची टोपली दाखवली असून, कंत्राटदारांची थकबाकी लवकर अदा करावी, या मागणीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच मुंबईत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी तांदुळवाडी येथील हर्षल अशोक पाटील यांनी कर्जबाजारी होऊन आपली जीवनयात्रा संपवली. हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘बीएआय’च्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते. संगम पुलाजवळील ‘बीएआय’च्या सभागृहात आयोजित शोकसभेला बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, राज्यसचिव मनोज देशमुख, पुणे केंद्राचे उपाध्यक्ष महेश मायदेव व राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी, माजी अध्यक्ष सुनील मते, डॉ. राजीव कृष्णानी, पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे रवींद्र भोसले आदी उपस्थित होते. हर्षल पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

जगन्नाथ जाधव म्हणाले, “राज्याच्या विविध विभागातील विकासकामे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी राज्यभरात हजारो कंत्राटदार आपले आयुष्य पणाला लावतात. काम पूर्ण केल्यावर बिले निघतील, या आशेवर स्वतःजवळची जमापुंजी गुंतवतात. वेळप्रसंगी दागदागिने मोडून, कर्ज काढून ही कामे पूर्ण करतात. मात्र, शासनाकडून काम पूर्ण होऊन वर्षे लोटली, तरी पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे कंत्राटदार मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या तीनचार वर्षांपासून कंत्राटदारांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये थकीत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासन त्याची दखल घेत नाही. परिणामी, हर्षल पाटील यांच्यासारखे दुर्दैवी पाऊल उचलले जात आहे. यावर आता कंत्राटदार गप्प बसणार नाहीत. हर्षलचे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत. उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यासह आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाणार आहे.”

अजय गुजर म्हणाले, “हर्षलसारख्या तरुण कंत्राटदाराचे असे अकाली जाणे वेदनादायी आहे. या संवेदनशील विषयातही राज्यकर्ते हर्षल हा सबकॉन्ट्रॅक्टर होता, त्याची सरकारकडे नोंद नाही, अशा संवेदनाहीन प्रतिक्रिया देत आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. देशाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या, शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या कंत्राटदारांवर ही वेळ येणे दुर्दैवी आहे. आधीची बिले काढली नसताना, सरकार नवीन कामे काढते. निधीची तरतूद केली जात नाही. तरतूद केली, तर ती अन्य योजनांमध्ये वळवली जाते. त्यामुळे पैसे मिळत नाहीत. कंत्राटदारांचे आयुष्य कंगाल होत आहे. ही थकबाकी दिली नाही, तर येणाऱ्या काळात आत्महत्यांचे हे सत्र वाढत जाईल. सरकारने आमचा अंत पाहू नये.”

मनोज देशमुख, डॉ. राजीव कृष्णानी, संजय आपटे यांनीही श्रद्धांजली वाहिली.  

संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा उपयुक्त- महासंचालक सुनील वारे

पुणे दि.25 :- समाजात सलोखा रहावा यासाठी महापुरूषांच्या विचारांचे स्मरण करून तसेच संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे असे, प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुनिल वारे बोलत होते.
या कार्यशाळेला सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर अनुराधा उदमले, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राधाकिसन देवडे, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यावेळी उपस्थित होते.
महासंचालक श्री. वारे म्हणाले, बार्टीसंस्थेतर्फे समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम नियमित राबविले जातात. समाजात जातीय सलोखा रहावा, समाजाचा उत्तम विकास व्हावा या उद्देशाने ॲट्रोसिटी कार्यशाळा आयोजित केली आहे. ॲट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे, शासकीय अधिकारी, विधीज्ञ आणि सामान्य जनतेला या कायद्यासंदर्भात ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांची अंमलबजावणी करत जगातील विविध देशांनी यासंदर्भात मोठा विकास साधला आहे. त्याचे अनुकरण करून तसाच विकास आपण साध्य करू शकतो. बार्टी संस्थेतर्फे नुकतीच नॅशनल ॲट्रोसिटी हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे ॲट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळा प्रत्येक जिल्ह्यात होत असून या कार्यशाळेमध्ये ॲट्रोसिटीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येवून चर्चा करून समाजातील अन्यायग्रस्त लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य असून अशा राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये, समाजात सद्भावना वाढीस लागावी यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात त्याचा समाजाला चांगला उपयोग होतो असे ते म्हणाले.
या एकदिवसीय कार्यशाळेत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची पार्श्वभूमी या विषयावर सामाजिक वक्ते सुभाष केकाण, कायद्यांतर्गत न्यायालयीन कामकाज पध्दती या विषयावर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद दातरंगे यांनी तर न्यायालयीन प्रक्रीया या विषयावर सहाय्यक सरकारी वकील जावेद खान, सामाजिक सलोखा या विषयावर विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचा उद्देश व प्रयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेच्या सुरूवातीला संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यशाळेला पोलीस, महसूल, सामाजिक न्याय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
00000

रविवारी – नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार

  • छत्रपती शिवाजीनगरमध्ये खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा

पुणे – नागरिकांचे प्रश्न थेट समजून घेता यावेत आणि ते सोडविले जावेत, या उद्देशाने केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरु केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरु असून रविवारी हे अभियान छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता, औंध येथील इंदिरा गांधी शाळा येथे हा उपक्रम होणार आहे. या अभियानात नागरिकांनी आपले प्रश्न, समस्या आणि नवकल्पना घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी विधानसभानिहाय “जनता दरबार” या स्वरूपात हा उपक्रम सुरू केला. या संवादातून नागरिकांच्या नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि नव्या कल्पनांचा विचार करून त्यावर कार्यवाही करण्यात येते. सध्या सध्या या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु असून यात कोथरूड, कसबा आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आता छत्रपती शिवाजीनगरमध्ये दुसऱ्यांदा हे अभियान होत आहे.या उपक्रमात महापालिका, पोलीस प्रशासन आणि विविध सरकारी विभागांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत, जेथे नागरिकांना थेट माहिती मिळते आणि समस्यांचे निराकरणही करता येते. तसेच केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देखील उपलब्ध करून दिली जाते आणि पात्र लाभार्थ्यांना लाभही घेता येईल.या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले,“माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी पुणेकरांचा खासदार म्हणून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. आतापर्यंत झालेल्या अभियानांना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. छत्रपती शिवाजीनगरकरांनी पुन्हा एकदा आपल्या भागातील मुद्दे, अडचणी आणि सूचना घेऊन या अभियानात भाग घ्यावा, ही विनंती आहे. या उपक्रमातून अनेक प्रश्न मार्गी लागले असून नागरिकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देत आहेत.”या अभियानामुळे सशक्त लोकप्रतिनिधित्व, प्रभावी संवाद आणि गतिमान कामकाज याला चालना मिळत असून जनतेचा सरकारशी थेट संपर्क घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे.

कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा-सुनील माने यांची मागणी

पुणे ता. २५ : सांगली जिल्ह्यात हर्षल पाटील या कंत्राटदाराने शासनाकडून बिले मिळत नाहीत म्हणून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. यांच्यासारख्या अनेक कंत्राटदारांची बिले सरकारकडे थकीत आहेत. मात्र सरकार याबाबत नेहमी खोटी माहिती देत आहे. याबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढून खरी माहिती जनतेसमोर अणावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात जवळपास ८० हजार लहान मोठे नोंदणीकृत कंत्राटदार आहेत. त्या प्रत्येकाकडे १० ते १५ कामगार कामाला आहेत. म्हणजे ३० ते ४० लाख लोक या असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. त्या सर्वांवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आली आहे. छोटे कंत्राटदार कामे करूनही आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. महाराष्ट्रात छोट्या मोठ्या कंत्राटदारांचे नव्वद हजार कोटी रुपये शासनाने थकवले आहेत. जवळपास पन्नास लाख लोक या असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्याही परिस्थितीचे काय होईल अशी चिंता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आता लागली आहे.
या सर्व कंत्राटदारांनी जुलै महिन्यात शासनाला पत्र दिले. मा. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्यांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी भेटीची वेळ मागत आहेत. ८९ हजार कोटी रुपये शासनाकडे थकलेत अशी त्यांची तक्रार आहे. किती पैसे कोणत्या खात्यात थकले आहेत या संदर्भातल्या याद्या दिलेत. जसे सार्वजनिक बांधकाम विभागात ४० हजार कोटी रुपये, जलजीवन मिशनकडे १२ हजार कोटी, ग्रामविकास मध्ये ६००० कोटी, जलसंधारण, जलसंपदा १३ हजार कोटी, नगर विकास अंतर्गत डीपीडीसी आणि विशेष बाबीचा निधी म्हणून ४२१७ कोटी, ग्रामीण सुधारणा विभाग २११५ आणि १८००० कोटी अशी रक्कम थकीत आहे.
ही रक्कम गेली वर्षभर कंत्राटदार मागत आहेत. कंत्राटदारांनी कर्ज काढून प्रकल्प पूर्ण केलेत, पैसे नसल्याने आता त्यांचे जगणे अवघड झाले आहे. शासनाकडे जवळपास १ लाख कोटी जमलेत. ज्या कंत्राटदारांनी कामे केलीत त्यांना द्यायला शासनाकडे पैसे नसतील तर हे खूप गंभीर आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जवळपास ५० लाख लोकांना वाचवायचं काम शासनाला तातडीने हातात घ्यायला लागेल.लाडकी बहीण योजना, महागडे महामार्ग, स्मारके, पुतळे यांच्यासाठी कोट्यावधी रुपये सरकार कर्ज काढत आहे. वेगवेगळ्या योजनातून पैसे वळवत आहे. हे सर्व पैसे लोकांना जगण्यासाठी, ज्यांनी कामे केली त्यांची देयक देण्यासाठी सरकारने वापरले पाहिजेत.
आमची तर मागणी आहे की सरकारने या पद्धतीने जी मान्यता नसताना कामे काढली ती निवडणुकीच्या आधी टक्केवारी घेण्यासाठी कामे काढली का ? जर २० हजार कोटी रुपयांच्या कामाची गरज असेल तर ४०००० कोटीचं काम कसं होतं त्याची चौकशी माननीय मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे. अर्थसंकल्पात मंजुरी नसताना हजारो कोटींच्या वर्कॲार्डर देणाऱ्या आणि त्यात मलिदा खाणाऱ्या मंत्री अधिकाऱ्यांवर याबाबत मुख्यमंत्र्यांनी गंभीर कारवाई केली पाहिजे. एकूण ९० हजार कोटी रुपयांचा आकडा असताना सरकार कमी आकडे दाखवत हे नेहमीप्रमाणे चालू झाले आहे. आता सरकारने याबद्दल श्वेतपत्रिकाही काढली पाहिजे. लोकांची बिल दिली पाहिजे आणि या सर्व असंघटित कामगारांना, छोट्या मोठ्या कंत्राटदारांना जीवदान दिले पाहिजे. अन्यथा हर्षल पाटील सारखे अनेक कंत्राटदार आत्महत्या करतील, त्यामुळे सरकारने यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.

एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला

देशातील आघाडीची जीवन विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीसाठी हा प्रीमियम 7,033 कोटी रुपये होता. तर 30 जून 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा नियमित प्रीमियममध्ये 12% ची वाढ झाली आहे.

संपूर्ण लक्ष सुरक्षेवर केंद्रित करत एसबीआय लाईफचा प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमियम 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 980 कोटी रुपये होता. तर प्रोटेक्शन इंडीव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमियम याच कालावधीसाठी 165 कोटी रुपये होता. 30 जून 2024 रोजी संपलेल्या कालावधीच्या तुलनेत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम 4% वाढीसह 4,939 कोटी रुपये होता.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत एसबीआय लाईफचा कर वजा जाता नफा 594 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा 14% नी वाढला आहे.

कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो सामान्यपणे 1.50 च्या आसपास असण्याची आवश्यकता असते. त्या तुलनेत 30 जून 2025 रोजी 1.96 वर राहिला आहे.

एसबीआय लाईफच्या एयूएममध्ये 15% ने वाढ होऊन 30 जून 2025 रोजी तो 4,75,813 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत (30 जून 2024) तो 4,14,772 कोटी रुपये होता, ज्यात डेबिट-इक्विटीचे गुणोत्तर 60:40 होते. 94% कर्ज गुंतवणूक AAA आणि सॉवरेन इंस्ट्रुमेंट्समध्ये आहे.

कंपनीकडे 3,23,838 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वितरण नेटवर्क आहे तसेच देशभरात 1,146 कार्यालये देखील आहेत. यामध्ये मजबूत बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन (पीओएस), विमा मार्केटिंग फर्म्स, वेब एग्रीगेटर्स आणि डायरेक्ट बिझनेस यांचा समावेश आहे.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी

  • आयआरपी आणि इंडस्ट्रीज एनबीपीमध्ये खासगी बाजारपेठेतील अनुक्रमे 22.3% आणि  25% बाजार हिस्सा घेत आघाडी.
  • वार्षिक प्रीमियम इक्विव्हॅलंटमध्ये (एपीई) 9% वाढ नोंदवत रु. 3,969 कोटी.
  • 73% वाढ नोंदवून वैयक्तिक नवीन व्यवसाय विमा रक्कम रु. 66,631 कोटी.
  • 13 दशलक्ष आणि 61 दशलक्ष स्थिरतेमध्ये अनुक्रमे 58 बीपीएस आणि 501 बीपीएसने सुधारणा.
  • नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीओएनबी) 12% वाढीसह 1,088 कोटी रु.
  • व्होएनबी मार्जिन 27..
  • इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू (आयईव्ही) 20% वाढ नोंदवत 74,257 कोटी रु. झाली आहे.
  • 14% वाढीसह करपश्चात नफा (PAT) 594 कोटी रु. झाला आहे.
  • सॉल्व्हन्सी रेशो मजबूत 1.96 वर.
  • 15% वाढीसह व्यवस्थापनाखालील मालमत्ता 4,75,813 कोटी रु. झाली आहे.

एसबीआयकडून 13,455 ज्युनिअर असोसिएट्सच्या नियुक्तीला सुरुवात

संपूर्ण देशभर ग्राहक सेवा बळकट करण्याचे उद्दिष्ट्य

मुंबई, 25 जुलै 2025: देशाची सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया देशभरातील आपल्या विस्तृत शाखा नेटवर्कमध्ये नव्याने भरती करण्यात आलेल्या 13,455 ज्युनिअर असोसिएट्स (कनिष्ठ सहायक) च्या नेमणुकीला सुरुवात करत आहे.

हे नवे असोसिएट्स बँकेच्या अग्रणी, आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीत एक मोलाची भर घालत आहेत. त्यायोगे एसबीआयच्या सेवाभावाला अनुसरून नवचैतन्य, बांधिलकी आणि ग्राहक प्रथम हा दृष्टिकोन जोमाने पुढे येत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचा  अनुभव उंचावण्यासाठी आणि प्रत्येक पातळीवर कार्यक्षमता वाढवण्यासाठी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे.

एसबीआयने 11 जून रोजी ज्युनिअर असोसिएट्सच्या भरतीची घोषणा केली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. सी. एस. सेठी यांनी बदलत्या कार्यात्मक व तांत्रिक गरजांशी सुसंगत अशा सुव्यवस्थित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे मनुष्यबळ विकास क्षमतेच्या बळकटीकरणावर भर दिला होता.

एसबीआयचे 2,36,000 हून अधिक कर्मचारी असून बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या पुढील पिढीला घडवण्याचा त्यांना अभिमान आहे. अधिक मजबूत, सर्वसमावेशक भविष्याच्या उभारणीसाठी एसबीआय कटिबद्ध आहे. 

दिल्लीत देवेंद्र फडणवीस – अमित शहा यांची भेट:मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा झाल्याची माहिती

नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व चर्चांदरम्यान, भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाजूला करत त्यांना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांवर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील फेरबदलाबद्दल कोणतीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रिमंडळाबाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर होत असतो. अशा प्रकारचा काही बदल होणार असेल, तर तो योग्य वेळी कळतो, पण सध्या असा काही बदल होईल, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षपदाबद्दलही आपल्याला सध्या काही माहिती नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढील काळात नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचे काम होणार नाही.

जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मनोभावे प्रार्थना

जेजुरी, दि. २५ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जेजुरी येथील श्री खंडेरायाच्या गडावर मनोभावे दर्शन घेतले. सकाळी लवकर मंदिरात आगमन करून त्यांनी श्री खंडोबाची पूजा-अर्चा केली व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

डॉ. गोऱ्हे यांच्या आगमनावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मंदिर परिसरातील सोयी-सुविधा, स्वच्छता आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जेजुरी हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून इथे येऊन प्रत्येक वेळी आत्मिक समाधान मिळते. राज्यातील जनतेसाठी चांगल्या योजना राबविण्याची प्रेरणा अशा पवित्र स्थळांवरूनच मिळते.”

बुकिंग करूनही गृहप्रकल्प रेंगाळला,१५० जणांच्या फसवणूकीचा आरोप:हिंदू महासंघ आणि ग्राहकांचा ‘विष प्राशन’आंदोलनाचा इशारा

पुणेःनऱ्हे येथील किशोरी प्रांगण गृहप्रकल्पात १५० ग्राहकांनी  वीस टक्के बुकिंग रक्कम भरून देखील  प्रकल्पाचे चार वर्ष बांधकाम सुरु न केल्याने  १८ कोटीची फसवणूक झाली असून हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या ग्राहकांनी  पोलिस आयुक्त कार्यालयासमोर  विषप्राशन आंदोलनाचा   इशारा दिला.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता ही पत्रकार परिषद झाली.या पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे ,ग्राहकांच्या कायदेशीर सल्लागार एड.नीता जोशी, ग्राहकांचे प्रतिनिधी गिरीश चौधरी, प्रशांत कोल्हे,सूर्यकांत कुंभार उपस्थित होते. 

कसबा पेठेतील सामाजिक कार्यकर्ते  श्रीकांत शेटे,तसेच विजय रायकर हे किशोरी प्रांगण एल एल पी या भागीदारी संस्थेत भागीदार आहेत.जागामालक निलेश दांगट,शाम दांगट यांनी या  जागेचा विकसन करारनामा ( DAPA Agreement) हे दिनांक ०३/११/२०२१ रोजी केले आहे.कोणतातरी राजकीय दबाव पोलीस यंत्रणेवर आहे,असा आरोप या ग्राहकांनी पत्रकार परिषदेत केला.तसेच पोलिसांच्या वर्तणूक बाबत शंका सुद्धा व्यक्त केली. 

२०२१ साली १५० ग्राहकांनी नऱ्हे येथील किशोरी प्रांगण या गृहप्रकल्पात २० टक्के रक्कम भरून १५० ग्राहकांनी बुकींग केले. रेरा रजिस्ट्रेशन असतानाही हे पैसे बिल्डरने रेरा अकाऊंटला न घेता वैयक्तिक खात्यात घेतले. बुकींगचे निबंधक कार्यालयात नोंदणी रजिस्ट्रेशन केले नाही. बांधकामही सुरु केले नाही.आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी २०२४ मध्ये सिंहगड रस्ता  पोलिस स्थानकात तक्रार केली.३० ग्राहकांनी    एकत्र येऊन सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार नंतर पोलिस कमिशनर ऑफिसला वर्ग करण्यात आली आहे व त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे  अधिकारी कैलास करे हे  करत आहेत. सर्व सभासदांची स्टेटमेंट नोंद करूनही साधारण २ महिने झाले तरीही पोलिस बिल्डर्स च्या विरोधात व जागा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाहीत.या ग्राहकांचे कर्ज आणि हप्ते सुरु झाले आहेत,सध्या जिथे राहतात त्या जागेचे घरभाडे सुरु आहे.सिबिल खराब  होऊ नये म्हणून हप्ते थकवता येत नाहीत आणि पोलीस दाद देत नाहीत,अशी बिकट अवस्था या दीडशे ग्राहकांची झाली आहे.आत्तापर्यंत यातील दोघांनी आत्महत्याचा प्रयत्न केला आहे, पोलिसांना हे सांगून सुद्धा त्यात काही प्रगती होत नाही . 
‘आम्ही पोलिसांना पैसे दिले आहेत.आमचे काही वाकडे होणार नाही’ असे  हे बिल्डर ग्राहकांना  तोंडावर सांगत असतात.२०% रक्कम गुंतविल्यास सदनिकेचा करारनामा करून देणार हे आश्वासन बिल्डर व जागा मालक अशा  तिघांनी केल्याप्रमाणे साधारण  १५० जणांनी फ्लॅट बुकींग केले .बिल्डरकडे ती रक्कम साधारण १८ कोटी पेक्षा जास्त जमा झाली आहे.ही रक्कम जमा करूनही अनेक सभासदांचे फ्लाटचे रजिस्ट्रेशन करून दिले नाही. दर वेळी प्रकल्प उशीरा सुरू होणार आहे याची वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. सदर प्रकल्प हा रेरा रजिस्ट्रेशन झाला आहे. रेरा सर्टिफिकेट प्रमाणे सदर प्रकल्प हा डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला पाहीजे. पण आजतागायत त्या जागेवर खड्डाही मारलेला नाही.
पोलिसांनी,आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई न केल्यास पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर विष प्राशन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

सुदर्शन केमिकल्सने 1,847 हेक्टर क्षेत्रात परिवर्तन घडविले; एकत्रित पर्यावरण संवर्धन प्रकल्पांद्वारे 350 हून अधिक कुटुंबांना सक्षम केले

मुंबई, 25 जुलै 2025 – वर्ल्ड नेचर काँझर्व्हेशन डेच्या निमित्ताने, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (“SCIL” किंवा “कंपनी”) ने एकत्रित पर्यावरण संवर्धन प्रकल्प यशस्वीपणे राबवून विविध ठिकाणी एकूण 1,847.25 हेक्टर क्षेत्र व्यापले असून, पाण्याचे स्रोत विकास, शाश्वत शेती व कचरा व्यवस्थापन यांद्वारे दीर्घकालीन पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम साधण्याचा कंपनीचा दृढ संकल्प अधोरेखित केला आहे.

सुदर्शनच्या जलसंवर्धन उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाले असून, योजनाबद्ध हस्तक्षेपातून विस्तृत क्षेत्रावर प्रभाव पडला आहे. एससीआयएलने 2,915 घनमीटर इतके नाला खोलीकरण पूर्ण केले असून, 8 गॅबियन रचना व 4 चेक डॅम्सचे बांधकाम केले आहे, ज्याचा 100 हेक्टरहून अधिक शेती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सुखदरे कोंड आणि बौद्धवाडी येथील झऱ्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्पांमुळे 250 लाभार्थ्यांना 24×7 स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा सहज वापर मिळत असून, टँकरची गरज पूर्णपणे टळली आहेत. यामुळे समुदायाचा खर्च वाचला असून, बाह्य पाणीस्रोतांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे.

यासह 800 मीटर पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन आणि वॉटर फिल्टर्स स्थापन केल्यामुळे पाण्याच्या टंचाईच्या काळात व ऋतुपरत्वे होणाऱ्या बदलांमध्ये 100 हून अधिक घरांना लाभ मिळतो आहे, तसेच माती व पाणी संवर्धनासाठी 1,400 घनमीटर ‘कंटिन्युअस काँटूर ट्रेन्चेस’ (CCTs) राबविण्यात आले आहेत आणि 100 एकरहून अधिक जमीन शेती सुधारण्यासाठी प्रक्रियेत आणली गेली आहे.

सुदर्शनने रोहा, महाड आणि सुतारवाडी या भागांमध्ये 5,000 हून अधिक वृक्ष लागवड केली असून, यामध्ये आंबा, चिकू आणि फणस अशा स्थानिक हवामानात फुलणाऱ्या आणि बाजारात उच्च मागणी असलेल्या फळझाडांच्या 1,200 रोपांचा समावेश आहे. या प्रजातींची निवड त्यांच्या स्थानिक हवामानाशी सुसंगततेसाठी, फळ उत्पादनाच्या आर्थिक मूल्यासाठी आणि मातीच्या स्थिरीकरणासाठी करण्यात आली आहे.

याशिवाय, कंपनीने 120 हून अधिक किचन गार्डन्सची स्थापना केली असून, 150 एकर क्षेत्र जैविक शेतीसाठी रूपांतरित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक संधी उपलब्ध होत असून, उत्पन्नातील चढ-उतार व मातीची गुणवत्ता खालावणे यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय मिळत आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी एकूण 75 कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदविला, ज्यामुळे संस्थेमध्ये पर्यावरणप्रेमी संस्कृती वृद्धिंगत झाली आहे.

सुदर्शनने रोहा आणि महाड येथे केंद्रीकृत कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेत. याबरोबरच 2,500 हून अधिक घरगुती कंपोस्ट प्लांटर्सचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक प्लांटर दररोज 1 किलो ओला किचन कचरा प्रक्रिया करतो आणि त्याला उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करतो, यामुळे घराच्या पातळीवर सर्क्युलर इकॉनॉमीचे उत्तम उदाहरण उभे राहत आहे.

कंपनीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नेचर क्लब्स’ची स्थापना केली असून, विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत. नियमितपणे नर्माल्य संकलन मोहिमा, जैवविविधता, कचरा व जलसंवर्धन विषयक जनजागृती अभियान यांद्वारे स्थानिक समुदायांमध्ये पर्यावरणपूरक वर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत.

या विषयावर बोलताना शिवारिका राजे, प्रमुख – पीपल प्रॅक्टिसेस  चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर, सुदर्शन केमिकल्स म्हणाल्या“खरे पर्यावरण संवर्धन तेव्हाच शक्य होते, जेव्हा निसर्ग रक्षणाचा भाग समुदाय सक्षमीकरणाशी जोडला जातो. सुदर्शनमध्ये आमचा विश्वास आहे की, नफा आणि उद्दिष्ट यांच्यात योग्य समतोल साधला, तर अशी शाश्वत उपाययोजना निर्माण होते, जी पर्यावरण  समाज दोघांच्याही हिताची ठरते. आम्ही आमच्या पर्यावरणीय परिणामांमध्ये सतत घट करण्यासाठी, संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत.”

सुदर्शन येत्या काळात लावण्यात आलेल्या रोपांची वाढ आणि टिकाव नियमितपणे तपासत राहणार आहे, तसेच दरवर्षी मूल्यांकन करून शेतकऱ्यांना मिळालेल्या फायदे व जैवविविधता, मातीची आरोग्यदशा व जलसंवर्धन अशा पर्यावरणीय सुधारणा यांचा आढावा घेत राहणार आहे.

एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाणानंतर 18 मिनिटांत आपत्कालीन लँडिंग

जयपूर-शुक्रवारी एअर इंडियाच्या एका विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान जयपूरहून मुंबईला निघाले होते. उड्डाणानंतर अवघ्या १८ मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर वैमानिकाने जयपूर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले.सध्या विमानात सर्व १३५ प्रवासी आहेत. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह जयपूर विमानतळावरील तज्ज्ञ पथक विमानाची तपासणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण घेतल्यानंतर पायलटला विमानाचे चिन्ह (कार्गोचे गेट दर्शविणारे) उघडे आढळले.

खरंतर, एअर इंडियाचे विमान AI-612 शुक्रवारी दुपारी १:३५ वाजता जयपूरहून मुंबई विमानतळावर निघणार होते. विमानाने नियोजित वेळेपेक्षा २३ मिनिटे उशिरा मुंबईसाठी उड्डाण केले.१८ मिनिटांनी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

कार्गो गेटचे चिन्ह लागताच, पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिटशी संपर्क साधला आणि जयपूर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागितली. उड्डाणानंतर अवघ्या १८ मिनिटांनी, विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.तथापि, सध्या एअर इंडियाकडून विमानाच्या लँडिंगबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. हे एअरबस ए३२० निओ आहे.

एअर इंडियाच्या फ्लाइट AI-612 मधील हवेतच उद्भवलेली समस्या तांत्रिक पथकाने दुरुस्त केली आहे. यानंतर, विमान दुपारी ४:२९ वाजता मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. तथापि, विमानातील तांत्रिक बिघाडाबद्दल एअर इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

जयपूरहून चंदीगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातही जयपूर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाला. शुक्रवारी, इंडिगो एअरलाइन्सचे विमान 6E-7516 दुपारी 1:45 वाजता चंदीगडला रवाना होणार होते. पण उड्डाण सुरू होताच तांत्रिक बिघाड आढळून आला. यानंतर उड्डाण थांबवण्यात आले.

इंडिगो एअरलाइन्सच्या अभियांत्रिकी शाखेने विमानाची तपासणी केली आणि सुमारे दीड तासात तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. यानंतर, इंडिगोचे विमान दुपारी ३.२५ वाजता चंदीगडसाठी रवाना झाले.

१२ जून रोजी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात २७० लोकांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. एक जण वाचला होता. विमान ज्या वसतिगृहाच्या इमारतीत कोसळले त्या इमारतीत २९ मृतदेह आढळले.

अखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धा ‘अंतरंग उत्सव’ मध्ये ध्रुव ग्लोबलच्या विद्यार्थीनी शरीन काळे व मृदुला जोडे चे उत्कृष्ट प्रदर्शन

पुणे, २५ जुलैः भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्य स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची  विद्यार्थीनी शरीन काळे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच तिला ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मर ऑफ द सेशन’ चा सन्मानही मिळाला आहे. तसेच नववीच्या मृदुला जोडे हिने ही याच स्पर्धेत कनिष्ठ गटात दुसरे स्थान पटकविले.
अभिनव कला अकादमी व सांस्कृतिक मंत्रालयाच्या पाठिंब्याने आयोजित केलेल्या प्रतिष्ठितअखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धे अंतर्गत अंतरंग उत्सव स्पर्धेत तिने भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्यात राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे.
तिच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, प्राचार्य संगीता राऊतजी आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनदंन केले. यावेळी यशवर्धन मालपाणी म्हणाले की, या दोघींच्या अदभुत कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्य व यशासाठी शुभेच्छा.
नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी शरीन काळे ने शुभश्री राउतराय यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ओडिशा नृत्य सादर केले. तिने भारतीय शास्त्रीय ओडिशा नृत्य अंतर्गत सोलो डान्स-ज्युनिअर एज ग्रपमध्ये भाग घेतला. यामध्ये तिने ओडिशा नृत्यातील अभिनयाचे बारकावे आणि भाव उत्कृष्ट पद्धतीचे सादरीकरण केले. तिच्या नृत्यात तिने सिर भेद, आंख भेद, गर्दन भेद, सीना भेद या सारख्या एकत्रित आणि असंघटित हस्तमुद्रा सादर केले.

वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या नवीन बसमार्गावर धावणार स्मार्ट एसी इकोफ्रेंडली ई बसेस

पुणे -महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या वतीने वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या
नवीन बसमार्ग क्र. ३२८ चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. पार
पडला. या नवीन बसमार्गाचे उद्‍घाटन मा. श्री. बापूसाहेब पठारे, आमदार, वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ यांच्या
शुभहस्ते करण्यात आले. या नवीन बसमार्गावर एकूण ४ स्मार्ट एसी इकोफ्रेंडली ई बसेस १ तास वारंवारितेने धावणार
आहेत.
नवीन बसमार्ग क्र. ३२८ चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक
संदीप सातव व शांताराम कटके, तसेच पंढरीनाथ कटके, पीएमपीएमएल चे सहव्यवस्थापकीय संचालक
नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमास पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्‍हाणे, वाहतूक नियोजन व
संचलन अधिकारी नारायण करडे, प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, वाघोली डेपो मॅनेजर
विजयकुमार मदगे यांच्यासह स्थानिक नागरिक व प्रवासी उपस्थित होते.
बसमार्ग क्र. ३२८ चे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे –

वाघोली → डायमंड वॉटर पार्क → लोहगाव → धानोरीगाव → विश्रांतवाडी → दिघी → भोसरी → शिवार चौक → मानकर
चौक → इन्फोसिस फेज १ व २ → हिंजवडी माण फेज ३.
पीएमपीएमएल कडून सुरू करण्यात आलेल्या या नवीन मार्गामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना हिंजवडी
आयटी पार्कपर्यंत जलद, सुलभ व सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. तरी नवीन बसमार्ग क्र.३२८-वाघोली ते
हिंजवडी माण फेज ३ या बसमार्गाचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून
करण्यात येत आहे.

“साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण खोरे यांना जाहीर

-विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांची माहिती

-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या  जयंतीदिनी होणार पुरस्कार प्रदान

पुणे :  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने “साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

“साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५”  हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वा. सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी, पुणे येथे प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, मानपत्र व रोख रु. ११०००/- असे आहे. याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या पूर्वी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, परिवर्तनवादी चळवळीतील नेते, साहित्यिक आणि अधिकारी यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये अंकल सोनवणे, रमेश राक्षे, प्रा. सुकुमार कांबळे, शाहीर दीनानाथ साठे,  वाल्मीक अवघडे, दत्ता शेंडगे, सदाशिव वाघमारे, वसंत वाघमारे, श्रीमती शुभा अंगीर तसेच दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले होते.

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे गेली ४७ वर्षे लेखक आणि संपादक, पत्रकार म्हणून काम करीत आहेत.  सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात आदि दैनिकांमध्ये त्यांनी संपादक पदावर कार्य केले आहे. तर लोकसत्ता, पुण्यनगरी मध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.   ‘पोरके दिवस’ हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय असून दोन युरोप, इंदिरा प्रियदर्शनी, मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.  सामाजिक प्रश्न, समाजातील वंचित, दलीत, अपंग, कष्टकरी महिला यांचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत .महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, दलित आत्मचरित्रे यांचा अभ्यास करून त्यावर त्यांनी लेखन केले आहे. याशिवाय गांधीजींची पुनर्भेट.  दिव्यांग आणि आपण. महाड सत्याग्रह – ९० वें स्मरण वर्ष विशेषांक. महाराष्ट्र – विकासाचे नवे प्रवाह. लोकशाहीला बळ देणाऱ्या विचारधारा विशेषांक. दलित उद्योजकता विशेषांक. गांधीजींचे प्रेरणादायी विचार- मराठी आणि इंग्रजी . कृतिशील परिवर्तनवादी शरद पवार. दलित साहित्याच्या शोधात. महाड सत्याग्रह: ९० वे स्मरणवर्ष – मार्च २०१७. लोकसभा निवडणूक विशेषांक २०१९. विधानसभा निवडणूक विशेषांक २०१९. महाराष्ट्र- विकासाचे नवे प्रवाह. महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरण अंक आदि ग्रंथ आणि विशेषांकाचे संपादन , लेखन अरुण खोरे यांनी केले केले आहे.